श्री मकरंद पिंपुटकर
☆ जन्मठेप – एक अनुभूती… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆
“आज आत्ता या क्षणाला मी एका काळकोठडीत बंद आहे. जेमतेम ७*११ फुटांची खोली, साध्या चुन्याने रंगसफेदी केलेली, बाकी विटांचा खडबडीतपणा तसाच. दाराची जाळी जेमतेम दोन फूट रूंद. खोलीला एकच खिडकी – जमिनीपासून सात फूट उंचावर, नजरेच्या आवाक्यापलीकडे. खिडकीला समोरून आच्छादन, आकाशाचा तुकडाही दिसण्याची सुतराम शक्यता नाही.
चाकाला जसे आरे (spokes) असतात तसे सात आरे – प्रत्येक spoke मध्ये रांगेत कोठड्या. तळमजला, पहिला मजला आणि दुसरा मजला – प्रत्येक मजल्यावर ४०-४५ खुराडेवजा कोठड्या. मध्यभागी सेंट्रल वॉच टॉवर. कोठडीच्या दारासमोर समोरच्या कोठड्यांच्या रांगांची मागची बाजू. सहकैदी नजरेसही पडू नये म्हणून ही रचना.
जे जास्त बनचुके कैदी होते त्यांच्या कोठड्यांच्या समोर फाशीघर – तेही उघड्यावर. आज ना उद्या आपलाही हाच अंजाम होणार या टांगत्या तलवारीची जाणीव करून देणारा.
शिवाय समोर मैदानात उभे केलेले तिकाटणे – कैद्याला इथं बांधलं जायचं, अंगावरचे सगळे कपडे काढून टाकले जायचे आणि उघड्या पाठीवर वेताचे, चाबकाचे, आसूडाचे फटकारे ओढले जायचे.
नाठाळातील नाठाळ कैद्यांचे अनन्वित शारीरिक हाल केले जायचे, जाणून बुजून कदान्न – नासके – सडके – कुजके अन्न खायला घातले जायचे. कैदी सतत आजारीच रहावे आणि जेलमधील अन्यायाविरुद्ध कोणतेही बंड वा उठाव त्यांनी करूच नये यासाठीची ही योजना.
आणि एक वेळ हे छळ परवडले पण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या जो मानसिक छळ व्हायचा तो याहूनही जास्त अमानुष असे. “ – – – –
मी होतो अंदमानच्या श्री विजय पुरम् (पूर्वीचे नाव – पोर्ट ब्लेअर) येथील कुख्यात सेल्युलर जेल येथे. निमित्त होते “शब्दामृत” आयोजित “अंदमान बोलावतंय” या अंदमान सहलीचं. पाच दिवसांच्या या सहलीत, दिवसा सर्वमान्य आणि सर्वसामान्य (general) भटकंत्या व्हायच्या, पण संध्याकाळी पार्थ बावसकर आपल्या ओघवत्या शैलीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनपटातील विविध पैलू उलगडून दाखवायचे.
त्या व्याख्यानाच्या कळसाध्यायाच्या (क्लायमॅक्स) वेळी – सेल्युलर जेलच्या प्रत्यक्ष भेटीच्या वेळी त्यांनी आम्हा सर्वांना आवाहन केले – “त्या ७*११ फुटांच्या खुराड्यात अर्धा तास बसून दाखवा. त्या कोठडीच्या बाहेर, हाकेच्या अंतरावर खुला, मुक्त, मोकळा, अथांग सागर आहे. पण ना तो तुम्हाला नजरेला दिसेल, ना त्याची गाज तुम्हाला ऐकू येईल.
तुरुंगात तुमच्यासोबत जवळपास ७०० कैदी असतील. पण एरवी तुम्हाला अन्य कैदी दिसणार देखील नाहीत, दिसतील ते फक्त जेव्हा त्यांना चाबकाने फोडून काढले जाईल, दिवसभर खडाबेडीच्या शिक्षेसाठी लटकवले जाईल अथवा फासावर चढवले जाईल तेव्हाच.
बाहेरच्या जगाचे कायदेकानू इथं अस्तित्वातच नसतील. इथला कायदा, नियंता, देव – सबकुछ एकच – जेलर डेव्हिड बॅरी. आणि त्याच्यासाठी तुम्ही एक क्षुद्र काला आदमी आहात, एखाद्या किड्यामकोड्यारखे चिरडले जाणारे.
कल्पना करा, की दिवसभरात तुम्हाला बैलासारखं कोलूला जुंपलं जाणार आहे, कोलूत टाकलेल्या नारळांतून तुम्हाला दिवसाला तब्बल १५ लिटर तेल काढायचे आहे. तुम्ही गुरासारखे राबत असताना ढिलाई दाखवलीत की पाठीवर आसूड उठलाच समजा.
किंवा तुम्हाला काथ्या कुटायला सांगितलं जाईल. चुकून एखादी नारळाची ओली शेंडी त्यात जाण्याचा अपराध तुमच्याकडून घडला तर पुन्हा मारहाण.
खायला पातळशी पेज, त्यात पडलेल्या पाली वा अन्य कीडे काढायची तसदी न घेतलेली. नैसर्गिक विधींसाठी जमादाराने ठरवलेल्या वेळांचे बंधन. प्यायला पाणी मागणे, एवढेच काय पण शौचाला जायला परवानगी मागणे हाही दंडनीय गुन्हा.
शब्दशः उठता लाथ आणि बसता बुक्की असा कारभार.
आणि दिवसभर हे झालं की त्या टीचभर खोलीत तुम्हाला कोंडून ठेवणार.
आणि हे आणि हेच सगळं रोज घडत राहणार, तुमचा शिक्षेचा कालखंड पूर्ण होईस्तोवर किंवा हे सहन न होऊन तुम्ही मरेपर्यंत किंवा आत्महत्या करेपर्यंत.
आणि सावरकरांना तर एकापाठोपाठ एक – सलग दोन जन्मठेपा भोगायच्या होत्या, पन्नास वर्षे या नरकात काढायच्या होत्या.
नुसत्या या कल्पनेनेच भल्याभल्यांना कापरे भरेल. पण सावरकर अविचल राहिले.
तुमचं काय होतंय? अनुभवून बघा. “
बावसकरांच्या आवाहनानुसार आणि आव्हानानुसार मी आत्ता इथल्या एका काळकोठडीत बंद आहे. अर्ध्या तासाचा गजर लावून, फोन बंद करून ठेवला आहे. डोळे बंद करून बसलो आहे. अंग घामाने निथळते आहे. हा अंदमानचा उष्मा का इथल्या इतिहासाची दहशत?
सारखा कानोसा घेतोय. वेळ जाता जात नाहीये, काळ अंगावर येतोय. अजून अर्ध्या तासाचा गजर काही होत नाहीये. वेड लागायची पाळी आलीये. एवढ्यातच.
आणि सावरकर इथे एक तप राहिले – तब्बल बारा वर्षे.
शेकडो क्रांतीकारी इथे कोंडले गेले होते. उष्मा, घाम, डास, माणुसकीविहीन गोरा अधिकारी आणि त्याला खुश ठेवण्यासाठी वाट्टेल ते करणारे काळे शिपाई.
आपल्या चौकोनी कुटुंबात, सुखवस्तू घरात राहणाऱ्या आपल्याला या अनाम वीरांच्या हालअपेष्टांची सुतराम तरी जाणीव असते का हो?
सुधा मुर्ती म्हणतात, “रशियात स्त्री असो वा पुरुष, दोन वर्षांसाठी सैन्यात भरती होणे प्रत्येकाला अनिवार्य आहे. जेव्हा रशियात लग्न होते तेव्हा नवपरिणीत दाम्पत्य आवर्जून सर्वप्रथम जवळील शहीद स्मारकाला जाऊन श्रद्धांजली वाहून येतात. तुमच्या बलिदानाने आम्ही आज स्वतंत्र आहोत याची जाणीव ठेवतात. “
आपणही असं करण्याची गरज आहे. विनम्र भावाने अंदमानला या, सेल्युलर जेल पहा, मुद्दाम इथल्या कोठडीत थोडा तरी वेळ बसा, त्या काळी इथे काय अवस्था असेल त्याची कल्पना करा. आणि मग जेलच्या गच्चीवर किंवा सेंट्रल टॉवरवर जा. तिथला वारा, उजेड, मोकळी हवा अनुभवा. अथांग समुद्र पहा. स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्याला मिळवून दिलेल्या आणि आपल्याला असलेल्या स्वातंत्र्याचा खरा आणि सखोल अर्थ आपल्याला नव्याने उमगेल.
एकदा तरी हे अवश्य करा.
© श्री मकरंद पिंपुटकर
चिंचवड
मो ८६९८०५३२१५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





