सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “अवतार…” ☆ सुश्री शीला पतकी 

शेजारची मुलगी विचारत आली आत्या देवाचे अवतार असतात का? मी म्हणाले हो… ” मग देवाचे जर अवतार असतात तर आई मला म्हणाली काय अवतार केलाय जरा आरशात बघ मी काय अवतार केला मग अवतार… म्हणजे नेमकं काय? परवा आजी म्हणाली… आम्ही लहानपणी विठोबाच्या देवळात अवतार बघायला जात असू.. मला खूप कन्फ्युजन आहे की नेमक अवतार म्हणजे काय? आणि मी थोडा मेकअप केला तो आईला आवडला नाही तर ती मला पटकन म्हणाली काय अवतार केलायस? ते जरा आरशात बघ…! त्यात फरक काय? .. मी तिला जवळ बसून घेतले आणि सांगितले बाळा मराठी मध्ये असे अनेक शब्द आहेत की त्याला अनुभवानेच समजून घ्यावे लागते देवाने अवतार घेतला… देव खाली अवतरले… किंवा काय अवतार केलास ग बाई…! अवतार बघायला जाऊया.. तुझ्या त्या अवतारात तू नाटकात छान दिसत होतीस…! इथे म्हणजे शेवटच्या वाक्यात अवतार म्हणजे गेट अप बाकीच्या सगळ्या अवतारांचा पण अर्थ पाहुयात..!

आपल्या धर्मामध्ये मुख्य देव तीन मानले जातात ब्रह्मा विष्णू आणि महेश… प्रत्येक देवाचे वेगवेगळे अवतार आहेत विष्णूचे दहा अवतार शिवाचे 11 अवतार मानले जातात याशिवाय आणखीन काही उप अवतार सुद्धा आहेत. आता हे जे मुख्य देव आहेत हे स्वर्गात आहेत मग लोकांच्या कल्याणाकरता त्यांना वेगवेगळे रूप घेऊन चांगला संदेश देण्यासाठी पृथ्वीवर यावे लागते त्यांचा तो जन्म जो असतो तो साधारण माणसांप्रमाणेच असतो आणि त्या जन्मामध्ये ते जे आपल्याला सांगून जातात त्यांच्या वागणूकीतून शिकवणीतून ते आपल्यापुढे काही आदर्श ठेवतात…! देवाने सुद्धा या निसर्गचक्राप्रमाणेच अवतार घेतले. देव एकदम मानवी रूपात आले नाहीत… विष्णूचा पहिला अवतार मत्स्य म्हणजे मासा कुर्म म्हणजे कासव वराह म्हणजे डुक्कर नरसिंह म्हणजे अर्धा माणूस आणि अर्धा प्राणी मग वामन म्हणजे बुटका असलेला माणूस पराक्रमी असलेला परशुराम आदर्श ठेवणारा राम मग शांतता संदेश देणारा बुद्ध किंवा बलराम त्यानंतर कृष्ण आणि पुढे भविष्यात येणारा कल्की असे हे सगळे अवतार आहेत म्हणजे हे सगळे अवतार उत्क्रांतीला धरून आहेत तसेच शिवाचे पण अवतार आहेत शिवाचे अकरा अवतार वीरभद्र पिपलाद नंदी भैरव अश्वत्थामा शरभावतार गृहपती दुर्वास हनुमान ऋषभ आणि यतीनाथ

एका विशिष्ट महिन्यामध्ये पांडुरंगाला हे अवतार केले जातात त्याच्याभोवती तसे डेकोरेशन करतात म्हणजे त्या अवताराला साजेचा देखावा… तुझी आजी लहानपणी ते देखावे म्हणजे आमच्या लहानपणी ते देखावे पाहायला आम्हाला घेऊन जात असे. दहा दिवस असे दशावतार सादर करतात. कोकणामध्ये दशावताराचे नाटकही होते आणि देवाने अवतार घेतला म्हणजे देवाने जन्म घेतला. नाटकातलं तुझा अवतार अगदी बरोबर होता म्हणजे नाटकात तुझा गेटअप अगदी योग्य होता आणि तुझी आई तुला म्हणाली ना काय अवतार करून घेतला आहेस…? म्हणजे तू अतिशय चुकीच्या पद्धतीने नटली होतीस किंवा तुझा मेकअप केला होतास ते अजिबात चांगला दिसत नव्हतं ते म्हणजे तू आहेस त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळीच दिसत होतीस म्हणून तुझी आई तुला म्हणाली काय अवतार केलास तर अशीही अवताराची किमया!

आत्या मराठी खूप अवघड आहे ना? अगं तुम्हाला अवघड वाटणारच कारण तुम्ही इंग्रजी माध्यमात शिकता व मराठीतल्या कुठल्याही शब्दाचा नेमका अर्थ तुम्हाला कळत नाही आणि सगळेच अर्थ शाळेत शिकून येत नसतात ते बोलीभाषेतून वापरून वापरून आपल्याला समजतात मराठी इतकी समृद्ध भाषा आहे त्याच्यामध्ये म्हणी वाक्प्रचार यांचाही समावेश आहे. थोडक्यात आपलं म्हणणं मांडण्यासाठी म्हणी वापरतात उदाहरणार्थ… नाव सोनू बाई हाती कथलाचा वाळा… म्हणजे नाव सोन्याची संबंधित आणि परिस्थिती इतकी गरीब की अत्यंत कमी दर्जाचा असलेला धातू म्हणजे कथिल त्याची बांगडी तिने हातात घातली आहे. इतकी परिस्थिती वाईट पण हे एवढं सगळं सांगत बसण्याच्या ऐवजी एका म्हणी मध्ये ते व्यक्त होते. अग मराठीमध्ये सुंदर काव्य आहे अभंगाच्या सुंदर रचना आहेत ज्ञानेश्वरीच्या ओव्या आहेत तुम्हाला इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांना या भाषेचे सौंदर्य किंवा त्याचा आस्वाद घेता येणार नाही हे तुमचे दुर्दैव आहे म्हणून मी तुझ्या आईला सांगत होते मराठी माध्यमात घाल आपल्या भाषेचे सौंदर्य कळाले पाहिजे. इंग्रजी जागतिक बोलीची भाषा आहे 26 अक्षरांची भाषा.. ती येतेच थोड्या प्रयत्नाने पण मराठी बोलल्याने सरावानेच येते अनुभवाने कळते कामाला हातभार लावावा म्हणजे मदत करावी हे अपसुक कळायला लागतं

“ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा काय भुललासी वरीलीया रंगा”

किती सुंदर अर्थ आहे अभंगात की उस जरी वाकडा असला तरी रस गोडच असतो त्याच्या चवीत बदल होत नाही म्हणून वरवरच्या रंगाला कधीही भुलून जाऊ नका वरच्या रूपाला फसू नका असा संदेश देणारे महानकाव्य आपल्या मराठी भाषेत आहे…! जन्मभरीच्या श्वासाइतके मोजले हरिनाम बाई मी विकत घेतला शाम तुम्हाला इंग्रजी माध्यम वाल्यांना काय डोंबल कळणार यातलं म्हणजे ती बाई म्हणते.. ” की प्रत्येक श्वासाला मी परमेश्वराचे नामस्मरण केले आहे जणू काय मी ते नामस्मरणाचे पैसे मोजून परमेश्वराला विकत घेतला आहे तो माझ्याजवळच आहे “हे लिहिणारे माडगूळकर, सुरेश भट.. ” सरणावर जाताना इतकेच मजला कळले मरणाने सुटका केली जगण्याने छळले होते”

“टाळ हाती धराया धजेना कुणी लावणी ने हजारो दिवाणे दिले” हे लिहिणारे श्री सुधाकर इनामदार संदीप खरे हे सर्व कवी अत्रे पु ल देशपांडे यांच्यासारखे प्रतिभावंत लेखक त्यांचे अनमोल साहित्य याचा आस्वाद तुम्हाला घेता येणार नाही. आणि हेच आमचे दुर्दैव आहे या सर्व साहित्यावर मराठी संस्कार आहे भारतीय परंपरेचा अभिमान सांगणाऱ्या गोष्टी आहेत आपल्या धर्मातील गीते सारखे तत्त्वज्ञान सोप्या शब्दात सांगणाऱ्या कथा आहेत रामायण आहे महाभारत आहे… अग तू तर मला परवा चक्क विचारलं हु वॉज राम अँड सीता अगं त्यादिवशी बेशुद्ध पडायची वेळ आली मला थोडंसं समजून घ्या बसा ऐका मराठी शिकून वाचा आम्ही मराठी माध्यमात असून इंग्रजी वाचतो की नाही मग तुम्हाला मराठी यायला काय हरकत आहे. आपल्या मातृभाषेवर प्रेम पाहिजे बाळा आणि ती इतकी समृद्ध असताना तर पाहिजेच पाहिजे असो तुला आता कळलं ना अवताराचा अर्थ? मग तुझ्या इतर मुलांना मित्रांना पण तो सांग म्हणजे तुझा अभ्यास होईल. ती म्हणाली, “आत्या किती माहिती कळाली मला मी नक्कीच माझ्या मित्रांना सांगेन… आय विल शेअर इट… मी कपाळावर हात मारून घेतला… म्हणाले, ” सांग बाई सांग तरी नाही तर शेअर तरी कर…! “

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted