श्री मकरंद पिंपुटकर
☆ अंपायर्स कॉल… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆
विद्या वहिनी आणि माझा मामेभाऊ कौस्तुभ यांच्या मुलाचं तीन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं, त्या लग्नाचा अल्बम बघत त्यांच्याशी निवांत गप्पा मारणं चाललं होतं. लग्न कसं जमलं, पत्रिका बघणं वगैरे विषय निघाले आणि मिश्किलपणे वहिनी म्हणाली, “लेकाच्या लग्नासाठी मुलींच्या पत्रिका येत होत्या, मग आम्ही आमच्या पुरोहितांकडून कामचलाऊरीत्या – प्राथमिक पत्रिका कशी बघायची, किती गुण जुळत आहेत ते कसं ठरवायचं हे सगळं शिकून घेतलं, आणि गंमत म्हणून आम्हा दोघांचे पत्रिकांनुसार किती गुण जुळतात ते पाहायचं ठरवलं. ”
— —
क्रिकेटमध्ये अंपायरने एखाद्या फलंदाजाला पायचीत (LBW) बाद ठरवलं, तर फलंदाजाला दाद (DRS) मागण्याचा हक्क असतो. जर अर्धवट चेंडूचाच यष्टीला (स्टंप) स्पर्श होत असेल, तर चेंडू यष्टीला नक्की लागत आहे का नाही, फलंदाज बाद आहे का नाही, हे अंपायरने दिलेल्या निर्णयानुसारच ठरते. जर अंपायरने फलंदाजाला बाद दिले असेल तर तोच निर्णय कायम ठेवला जातो, आणि जर नाबाद दिले असेल, तर तो निर्णय कायम ठेवला जातो.
– – – याला क्रिकेटच्या भाषेत “अंपायर्स कॉल” असं म्हणतात.
— —
“आमच्या लग्नापूर्वीची गोष्ट आहे ही. कौस्तुभची मोठी बहीण – किशोरी – ज्या कंपनीत नोकरीला होती, त्याच कंपनीत मी दोन – तीन महिन्यांपूर्वी कामाला लागले होते. नंतर ती आजारपणामुळे सलग काही दिवस कामाला आली नाही, म्हणून मी आणि मैत्रीण तिला घरी भेटायला गेलो होतो. आणि तेव्हा कौस्तुभची माझी पहिली भेट झाली होती.
योगायोगाने, एक महिन्याभरातच बाबांच्या एका मित्राने आम्हाला त्याचं स्थळ सुचवलं. त्यांनीच परस्पर माझी पत्रिकाही कौस्तुभच्या आई वडिलांना पाठवून दिली. त्यांच्याकडून पत्रिका जुळत असल्याचा निरोप आला, आणि मग प्रत्यक्ष त्यांच्याकडे भेटायला जाण्याबद्दल बाबांचे मित्र आणि बाबा बोलत होते.
चर्चेत ऐकू येणारे कौस्तुभचे आडनाव आणि पत्ता ऐकून मी म्हटलंही, “मी गेले आहे या घरी. याला बघितलंही आहे बहुतेक. ” त्यावर काकांनी मी कदाचित त्याच्या धाकट्या भावाला पाहिले असेल असं म्हटलं, आणि एकदा प्रत्यक्ष भेटावं असा आग्रह धरला.
सरतेशेवटी आम्ही त्यांच्या घरी गेलो, रीतसर मुलगा / मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला, पसंदापसंदी झाली, मी ‘ हो ‘ म्हटलं आणि चि. सौ. कां. विद्या परांजपे सौ. विद्या कौस्तुभ जोशी झाली.
घरी सासू, सासरे, धाकटा दीर सगळेच होते. नणंद किशोरी – तिचं आधीच लग्न झालं होतं. मी कौस्तुभला अगदी ‘अहो कौस्तुभ’सुद्धा म्हणायचे. आमचा काही प्रेमविवाह नव्हता, त्यामुळे रुसवेफुगवे, एकमेकांचे काही निर्णय न पटणे, वादावादी हे सगळं झालंसुद्धा.
माझ्या काही गोष्टी त्याला पटत नसायच्या, त्याच्या काही सवयींबद्दल मला आक्षेप होता. पण ही सगळी चहाच्या कपातली वादळं असायची, थोडी खळखळ व्हायची, पण नंतर शांतही व्हायची.
कौस्तुभची नोकरी, माझीही नोकरी, सासूबाईंचं अपघाती निधन, माझं बाळंतपण, नोकरीवर जाताना लेकाला माहेरी आईकडे सोडायचं – येताना त्याला परत घेऊन यायचं, कौस्तुभची वर्क्स मॅनेजरपदाची नोकरी, नंतर स्वतंत्र व्यवसाय – भरपूर धावपळ असायची.
पुढे धाकट्या दीराचंही लग्न झालं होतं, ते दोघं त्याच्या नोकरीमुळे वेगळ्या शहरात राहू लागले. नंतर वयोमानापरत्वे सासऱ्यांचेही निधन झाले. इकडे लेक शिकत होता, मोठा होत होता, इंजिनियर झाला, MBA केलं आणि बघता बघता त्याच्या लग्नाचे वारे वाहू लागले.
आणि तेव्हा आम्ही आमच्या पुरोहितांकडून कामचलाऊरीत्या पत्रिका कशा बघायच्या हे शिकून घेतलं. गंमत म्हणून आम्हा दोघांच्या पत्रिकांचे किती गुण जुळतात हे पाहिलं, तर ३६ पैकी आमचे फक्त १८. ५ गुण जुळत होते. कमीत कमी १८ गुण तरी जुळणं गरजेचं असतं, म्हणजे आम्ही दोघं अगदीच काठावर पास झालो होतो.
… कोणत्या गुरुजींनी आमच्या पत्रिका पाहून, फक्त १८. ५ गुण जुळत असूनही आमच्या लग्नावर शिक्कामोर्तब केलं होतं, कोण जाणे!
मला खरंतर आश्चर्य वाटलं, लग्न ठरवण्यासाठी ३६ पैकी कमीत कमी २४ तरी गुण जुळावेत अशी अपेक्षा धरली जाते, आणि इथे तर अगदीच कमी गुण जुळले असूनही आम्ही इतकी वर्षं गुण्यागोविंदाने संसार करत होतो.
कौस्तुभचे आजारपण, त्याची बायपास सर्जरी, त्याचा व्यवसाय सुरू असताना मी केलेल्या अनेक adjustments जशा माझ्या नजरेसमोरून सरकल्या, तसेच माझा accident, हाताचं fracture, मनगटाचं fracture या काळात आणि नंतर रोजच, भाजी निवडण्यापासून, चिरण्यापासून – स्वयंपाकघरातील आणि घरातील अनेक लहानमोठ्या गोष्टींत कौस्तुभचं माझा शब्दशः उजवा हात होणं – याही गोष्टी मला प्रकर्षानं जाणवल्या.
… ज्या कोण्या गुरुजींनी आमच्या पत्रिका बघितल्या होत्या, तो “अंपायर्स कॉल” आमच्या बाबतीत २००% खरा ठरला होता, हेच खरं.
वहिनी बोलायची थांबली. आता आणखी काही बोलायची गरजच नव्हती.
… शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले!
© श्री मकरंद पिंपुटकर
चिंचवड
मो ८६९८०५३२१५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




