श्री संभाजी बबन गायके

? मनमंजुषेतून ?

☆ “अस्थिहीन जिव्हा आणि भिक्षापात्रे !” ☆ श्री संभाजी बबन गायके

निसर्गाने हाड नसलेला जीभ नावाचा एक महत्त्वाचा अवयव निर्माण केला तो बोलणे सुलभ व्हावे म्हणून. हा अवयव लवचिक असल्याने त्यातून कोणत्याही शब्दांचा उच्चार करता येतो. पण असे असले तरी काहीही बोलू नये, असे अपेक्षित असते. जिभेला हाड असते तर जीभ मन मानेल तशी वळली नसती.. म्हणून तुझ्या जिभेला काही हाड आहे की नाही? असं रागावून विचारले जाते. अर्थात, आपल्या जिभेला हाड आहे, असे समजून जीभ वापरली पाहिजे. हा संकेत पाळला नाही तर या जिभेच्या शब्दाने ऐकणाऱ्या माणसाला बोलणाऱ्याचे हाड मोडायची इच्छा होऊ शकते!

गेल्या तीन दिवसांत अशा अनेक जिभा वळवळत आहेत. आणि दुर्दैवाने ही वळवळ बघावी आणि ऐकावी लागत आहे! 

पूर्वी समाजमाध्यमे म्हणजे रेडिओ आणि वर्तमानपत्र आणि पुढे फार फार तर दूरदर्शन असा कारभार होता.

आता माळरानावर जाऊन बोंब मारायला पाटलाची परवानगी लागत नसल्याने सर्वांनाच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा साक्षात्कार झाला आहे! 

यात आघाडीवर आहेत ते इलेक्ट्रॉनिक मिडिया मधील अधिकृत आणि स्वयंघोषित वार्ताहर. वार्तेचे हरण (हरिण नव्हे!) करणारे म्हणजे बातमी शोधून, हुडकून ती हरण करून, पळवून घेऊन जाणारे ते वार्ताहर. पण म्हणून काहीही पळवून न्यावे का?

ज्या विषयाचे तांत्रिक ज्ञान आपल्याला नाही, तसे ते इतरांनाही नसावे, अशा आविर्भावात ही मंडळी बोलत असतात. घटनास्थळ आणि विमानतळ यांत कित्येक किलोमीटर्स चे अंतर होते, असे सांगणारे प्रतिनिधी दिसले! सामाजिक विषयांवर उत्तम live येणारे काही विमानविद्येवर तुफान बोलताना दिसले!

फेसबुक, यूट्यूब व्हिडिओ यांच्या माध्यमातून बरेच पैसे मिळू शकतात, हे आता सर्वांना ठाऊक झाले आहे. Likes जितक्या जास्त तेवढे पैसे मिळण्याची शक्यता अधिक असाच हिशेब असल्याने येनकेन प्रकारे लोकांनी like करावे, comment करावे, share करावे, असा प्रयत्न होणे साहजिकच आहे. पण त्यासाठी भिक्षापात्र अवलंबणे कितपत योग्य आहे? हे लाजिरवाणे जिणे जळाले तरी चालेल का?

अमूक व्यक्तीला अमूक पदी नेमावे असे कुणाला वाटते आणि कुणाला वाटत नाही? या पोस्टवर लोक सहज व्यक्त होतात, कारण सध्या हा विषय ऐरणीवर आहे. खरं तर, चितेची राख थंड होण्याआधीच या चर्चा सुरू केल्या जातात, हेच दुर्दैवाचे आहे! एखाद्या पोस्ट वर आपण नाही म्हटले किंवा होय म्हटले तर कोण ऐकेल? या संख्येवर निर्णय होणार आहे का? हा काय अधिकृत surevy आहे का? पण अशा पोस्ट्स वर हजारो comments दिसतात!

खरेच भक्त असाल तर या संताच्या, नेत्याच्या फोटोला like कराल… अशी गळ घातली जाते! 

बारामती विमान अपघातसदृश भलतेच व्हिडिओ अपलोड केले जात आहेत, लोक उत्सुकतेपोटी हेही व्हिडिओ खरे म्हणून पहायला जातात! 

आणि व्हिडिओवाला म्हणतो… हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा… कारण youtube वाले अर्धवट व्हिडिओ पाहिला गेला की पैसे देत नाहीत. म्हणून हे लोक आमटीत पाणी घालत राहतात.

लोकांना बीभत्स बघण्याची चटक लागली आहे. आणि त्याचाच फायदा घेत विविध व्हिडिओ share होत आहेत. आपल्या प्रिय व्यक्तीचा छिन्नविछिन्न देह बघण्याची इच्छा का व्हावी. त्याची शेवटची हीच प्रतिमा आपल्याला मनात कोरायची असते का? 

अपघात नव्हे घातपात हे ठासून सांगणारे सर्वाधिक आहेत. नशीब याबाबतीत तरी बहुमतावर काही निर्णय होत नाही ते!

आणखी एक… श्रद्धांजली वाहताना… मला त्यांचे राजकारण आवडत नव्हते, मतभेद होते, मतभेद असू शकतात, अशी पुस्ती जोडायला लोक कमी करत नाहीत! केवळ श्रद्धांजली वाहिली असती तर तुम्हांला लोकांनी त्यांचे अनुयायी म्हटले असते, अशी भीती वाटते का?

शोक करणाऱ्या व्यक्तीचे close ups का हवे असतात छायाचित्रकारांना? तुमच्या भावना काय आहेत हे शोकमग्न नातेवाईकांना विचारणे कितपत शहाणपणाचे आहे? 

यावर उपाय म्हणजे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करीत राहणे… पण हे शक्य होत नाही! आणि यामुळेच सर्वांचे छान चालले आहे! 

आजवर झालेल्या अपघातांच्या रीतसर चौकशा झालेल्या आहेत, पण त्यांचे निष्कर्ष कुणी पहात नाहीत. जनरल कमेंट म्हणजे आपलं मनाला वाटेल ते बोलून मोकळं होणं लोक पसंत करतात. फेसबुक, व्हॉट्सॲप मुळे हे बोलणं एकाच वेळी अनेकांना ऐकावे, वाचावे लागते! दिशाभूल करणारे मथळे, फोटो आणि व्हिडिओ यांची आजकाल चलती आहे. कृपया विवेक से काम लें! असे म्हणावेसे वाटते!

‘लोक जैसा ओक धरवेना’ असे तुकोबाराय म्हणून गेलेत, ते खरेच! असो.

झाले ते वाईट झाले एवढे मात्र खरे आहे !

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted