श्री जगदीश काबरे

? मनमंजुषेतून ?

☆ “निवड आपली आहे – –☆ श्री जगदीश काबरे ☆

परलोक ही संकल्पना मानवी भीती, अनिश्चितता आणि नियंत्रणाच्या गरजेतून निर्माण झालेली आहे, असे अनेक इहलोकवादी तत्त्वज्ञ मानतात. जेव्हा माणसाला मृत्यूचे रहस्य समजत नाही, तेव्हा तो त्याला अर्थ देण्यासाठी “परलोक” ही कल्पना उभी करतो. वेदांत परंपरेत हा परलोक केवळ अस्तित्वाचा पुढचा टप्पा नसून, नैतिक नियंत्रणाचे साधनही बनतो. इहलोकात ज्या गोष्टींना “भोग”, “वासना” किंवा “मोह” म्हणून नाकारले जाते, त्याच गोष्टींना परलोकातील स्वर्गात अधिक शुद्ध, अधिक उंच रूपात मिळण्याची कल्पना मांडली जाते. त्यामुळे एक प्रकारचा विरोधाभास तयार होतो—इथे नाकारणे आणि तिथे अपेक्षा ठेवणे.

याच्या अगदी उलट भूमिका चार्वाक (लोकायत) मांडतात. चार्वाकांचा मूलभूत आग्रह असा आहे की, प्रत्यक्ष अनुभव हाच ज्ञानाचा एकमेव विश्वसनीय स्रोत आहे. जे दिसत नाही, जे अनुभवता येत नाही, त्यावर विश्वास ठेवणे ही भ्रमनिर्मिती आहे. म्हणूनच ते परलोक, आत्मा, पुनर्जन्म यांसारख्या संकल्पना नाकारतात. “यावत् जीवेत् सुखं जीवेत्” ही त्यांची प्रसिद्ध भूमिका केवळ भोगवाद म्हणून पाहणे ही मोठी चूक ठरते; कारण येथे “सुख” म्हणजे बेफाम उपभोग नव्हे, तर या एकमेव आयुष्याचे महत्त्व ओळखून त्याचा अर्थपूर्ण उपयोग करणे असा व्यापक अर्थ घ्यायला हवा.

एवंच चार्वाक तत्त्वज्ञानात सकारात्मकतेचे अनेक पैलू दिसतात. पहिले म्हणजे, चार्वाक विचार माणसाला वास्तवात ठेवतो. तो काल्पनिक भीती (नरक) आणि काल्पनिक लालसा (स्वर्ग) यांपासून मुक्त करतो. दुसरे म्हणजे, तो जबाबदारी वाढवतो. जर परलोक नाही, तर या जगातच न्याय, आनंद आणि अर्थ निर्माण करण्याची जबाबदारी पूर्णपणे माणसावर येते. ही भूमिका पलायनवादी नसून अत्यंत सक्रिय आणि जबाबदार आहे. तथापि, चार्वाक विचारावर एक टीकाही कायम केली जाते, ती म्हणजे तो नैतिकतेचा पाया कमकुवत करतो. कारण जर “परलोकातील शिक्षा” नाही, तर माणूस अनैतिक वर्तनाकडे झुकू शकतो. पण हा आक्षेप पूर्णपणे पटणारा नाही. कारण नैतिकता ही केवळ भीतीवर टिकत नाही; ती सामाजिक सहजीवन, सहानुभूती आणि परस्पर अवलंबित्वावर उभी असते. चार्वाक तत्त्वज्ञान हेच सूचित करते की, नैतिकता ही मानवी करारातून आणि व्यवहारातून निर्माण होते, बाह्य दैवी नियंत्रणातून नव्हे. म्हणूनच, चार्वाक तत्त्वज्ञानाला “सकारात्मक” म्हणतात. कारण ते माणसाला भ्रमातून बाहेर काढून वास्तवात जगायला शिकवते. ते जीवनाला नाकारत नाही, तर उलट त्याला मध्यवर्ती ठेवते. परलोकाच्या आशेवर जगण्याऐवजी इहलोकातील न्याय, आनंद आणि मानवी मूल्यांना प्राधान्य देण्याची प्रेरणा देते. या अर्थाने ते बौद्धिक प्रामाणिकपणाचे आणि जीवनाभिमुखतेचे तत्त्वज्ञान आहे.

हे तत्त्वज्ञान मान्य करणे म्हणजे फक्त एक विचार स्वीकारणे नाही, तर जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलणे आहे. भीतीवर आधारित नव्हे, तर अनुभव आणि जबाबदारीवर आधारित जीवन जगणे होय. त्यामुळे हा निर्णय वैयक्तिक आणि सामाजिक दोन्ही पातळ्यांवर खोल परिणाम करणारा ठरतो. म्हणून साथींनो, चार्वाकवादी होणे म्हणजे आधुनिक काळात वैज्ञानिक दृष्टिकोनाने जगणे होय. अदृश्य आणि काल्पनिक देवाच्या भीतीपोटी नैतिकतेने जगणे योग्य की स्वतःच्या जबाबदारीवर निर्भयतेने जगणे योग्य? यापैकी तुम्ही कशाची निवड कराल?

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments