प्रा. सुनंदा पाटील

? मनमंजुषेतून ?

☆ आम्रफूल पत राखत ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

मंडळी, सध्या बाजारात आम्रफल म्हणजेच आंबा आलेला आहे. अजून कुठे कुठे कच्च्या कैऱ्या आहेत, तर कुठे कुठे नव्हे सर्वत्र पिकलेले आंबे सुद्धा आपल्याला दिसू लागले आहेत. हा फळांचाच राजा. आंबा केवळ फळांचाच राजा नाही, तर तो सर्व तऱ्हेने राजा आहे असं मी म्हणेन.

आंबा आपण घराच्या अगदी जवळ लावू शकतो. कारण आंब्याचं मूळ हे दंडाकार असतं. म्हणजे ते जमिनीत खोलवर जातं. त्याचा घराला घराच्या पायव्याला त्रास होत नाही. धोका होत नाही. याउलट वड – पिंपळ – चिंच हे महावृक्ष ! यांची मुळे ही शाखाकार असल्यामुळे ती घराच्या पायव्याच्या खाली ही जाऊ शकतात. म्हणूनच कदाचित हे सर्व महावृक्ष आपल्याला गावाबाहेर / नदीकाठी / तळ्याकाठी किंवा जंगलात आढळतात. अर्थात यासाठी वेगवेगळी कारणे सांगतात. कारण चिंचेवर – पिंपळावर भूत असतं म्हणून घाबरवलं जातं. ही भूते अर्थातच आपल्या घराशी संबंधित आहेत / सुरक्षेसाठी आहेत. हे खरं कारण आहे. जेव्हा शास्त्रीय कारण लोकांना पटत नाही, तेव्हा त्यांच्या मनाशी खेळ करून ही कारणं त्यांच्या गळी उतरवली जातात, हे आपल्याला ठाऊक आहे.

हे झालं मुळांबद्दल ! यापुढे जाऊन आंबा हा बारा महिने हिरवागार असतो. खरं तर आपला भारत देश हा मोसमी हवामानाचा प्रदेश आहे. म्हणजेच शिशिर ऋतू लागला की, पानझड सुरू होते. अगदी सागवानाची जंगलं बघितली तरी या ऋतूत पानांवर जाळी पडलेली आणि पुढे जाऊन ती सगळी पानं गळून पडलेली आपण बघतो. अर्थात पुढे वसंत ऋतू लागला की खरी पालवी येते हे खरे आहे. मात्र आंबा – आम्रवृक्ष आपल्या भरगच्च पानांनी बाराही महिने हिरवागार असतो.

सर्वांनाच ठाऊक आहे की आंब्याची पाने ही शुभ मानली आहेत. आंब्याचं खोड हे घरासाठी अवजारांसाठी असं वापरलं जातं. पण याही पुढे जाऊन आंब्याच्या संबंधात एक गोष्ट मी तुम्हाला सांगते आहे.

आम्रफूल पत राखत / मोह फूल पत खोय 

नापत का रस चाखत जो उसकी क्या पत होय

वरील चरण मी लहान असताना एका कीर्तनात, कीर्तनकार बुवांच्याकडून ऐकलं होतं. अर्थात त्यावेळी जी समज होती त्याप्रमाणे मला त्याचा अर्थ लागला. पण आज त्याचा खरा खरा अर्थ कळतोय.

आपण प्रथम चरण बघूया ! “आम्रफूल पत राखत ” – म्हणजे ज्यावेळी आंब्याला फुले येतात म्हणजे मोहर येतो, त्यावेळी सुद्धा आंबा हा आपल्या हिरव्या गार पानांनी नटलेला असतो म्हणजे आंब्याची फुलं ही आंब्याची पानं यांचं रक्षण करत असतात. अर्थात पत या शब्दावर श्लेष अलंकार आहे. पत म्हणजे तुमची प्रतिष्ठा ! म्हणजे आंब्याची फुले तुमची – त्या झाडाची प्रतिष्ठा राखतात. आता दुसरं चरण बघूया !

मोह फूल पत खोय “ म्हणजेच मी आधी सांगितल्याप्रमाणे मोसमी हवामानाच्या प्रदेशामुळे आपल्याकडे मोह या वृक्षाला जेव्हा फुले येतात, त्यावेळेस मोहाची पाने झडतात पानगळीमुळे. म्हणजेच मोहाची पाने ज्यावेळेला झडू लागतात त्यावेळेसच मोहाची फुले येतात. याचा अर्थ असा की मोहाची फुले आपल्या वृक्षाची पाने घालवतात. म्हणजेच पत / प्रतिष्ठा घालवतात. आता पुढे बघा

नापत का रस चाखत जो उसकी क्या पत होय ?

ना पत का रस चाखत “ हे चरण घेऊ या ! म्हणजेच मोहापासून / मोहाच्या फुलांपासून दारू बनवली जाते हे सर्वांना ठावूक आहे.. जी फुले आपल्या झाडांची पत – प्रतिष्ठा राखत नाहीत, अशा फुलांचा रस – म्हणजे दारू प्राशन केल्यानंतर त्या माणसाची पत कोणीही राखू शकत नाही.

सरळ भाषेत सांगायचं तर, दारू पिणाऱ्या माणसाची पत अजिबात राहत नाही. पण हे सांगण्यासाठी कवीने हे अतिशय सुंदर चरण सांगितलेले आहे.

या दृष्टीने आंब्याची पत राखणारा मोहर पुढे येणाऱ्या आंबा याची /आपल्या वृक्षाची / आपल्या घराची पत राखतात. प्रतिष्ठा जाणतात. लोकांना सावली देतात. आंब्याला नवीन पालवी फुटायला अगदी वसंत ऋतूची वाट बघावी लागत नाही. कालमानाप्रमाणे आंब्याची पाने सुद्धा जुनी झाली की ती गळतात आणि नवी पालवी उगवत असते. त्यासाठी कुठल्याही ऋतूची हवामानाची आंब्याला वाट बघावी लागत नाही. मात्र मोह वृक्षाचं नेमकं उलट आहे. त्याला फुलं येतात तेव्हा मोहाची सर्व पाने गळून गेलेली असतात.

त्यामुळे आपण स्वतः लक्षात ठेवायचे आहे की, जतन कोणाचं करायचं ? आपल्या घराचं की, आपल्या घराचं वाटोळं करणाऱ्या लोकांचं ? स्वतःच जगून पहा ! जगून घेताना एवढं मात्र लक्षात ठेवा की, तुम्ही कुठेही, कितीही दूर गेलात तरी मोहांच्या फुलांसारखे होऊ नका /तर आंब्याच्या फुलासारखं वागत चला. घराची प्रतिष्ठा वाढेल असंच वागत चला ! म्हणजेच जगणं सोपं होईल.

© प्रा.सुनंदा पाटील (गझलनंदा)

८४२२०८९६६६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted