शीला पतकी
मनमंजुषेतून
☆ मदतीची जाणीव … ☆ शीला पतकी ☆
☆
अगदी बरोबर आहे. आपण करतो त्या मदतीची जाणीव समोरच्यांनी ठेवावी अशी साधारण अपेक्षा आहे. पण 90% लोकांना ही जाणीव नसते दहा टक्के माझ्यासारखे पामर फार जाणीवपूर्वक यावर काम करतात.
1989 साली तडवळकर ट्रस्ट या संस्थेची मी स्थापना केली. त्यापूर्वी एक वर्ष मी त्यासाठी रक्कम गोळा करीत होते. कोणी 50 कोणी शंभर पुढे 200 अशी रक्कम माजी विद्यार्थिनी, पालक, हितचिंतक यांच्याकडून मिळत होती. मी दरवर्षी दिवाळीत या सगळ्या देणगीदारांना शुभेच्छापत्र म्हणजे एक दहा पैशाचं कार्ड टाकत असे. पुढे त्याची किंमत एक रुपया झाली. बऱ्याच लोकांचे पत्ते वगैरे बदलले आणि कार्डही बंद झाली. डिजिटल जमाना आला. तेव्हा कोणाकडे फोन नव्हते आता सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे पण त्यांचे नंबर आमच्याकडे नाहीत. त्यामुळे ती गोष्ट थांबली… पण 51 रुपये देणाऱ्या माणसाला सुद्धा दिवाळीत तडवळकर ट्रस्टचे उत्तम मजकूर तयार करून दिलेलं ते कार्ड जात असे आणि हे कार्ड लिहिण्याचं काम माझी नापास शाळेतली मुलं करायची. पुढे पुढे त्या सगळ्याच लोकांना त्या कार्ड वरचा नाविन्यपूर्ण मजकूर वाचायची सवय लागली. पत्र जाणं बंद झालं त्यावेळेला कित्येक लोकांनी भेटून मला विचारलं ‘ दिवाळीतलं तुमचं कार्ड खूप छान असायचं कारण आमच्या घरी एकमेव येणार ते शुभेच्छांचे कार्ड होतं आणि ते आपण दिलेले 51 रुपये तुम्ही सार्थकी लावले. ‘ असं ते म्हणत असत.
जुनी गिरणी बंद असल्यामुळे आमच्या शाळेमध्ये जुन्या गिरणीतील कामगार वर्गाच्या मुलांचे पैसे म्हणजे एसएससी बोर्डाची वीस रुपये फी दयानंद महाविद्यालयाने भरली. त्या वेळेला वीस रुपयेही नव्हते. तीच कृतज्ञता म्हणून मी कितीतरी विद्यार्थ्यांची फी भरते. शाळेत असतानाही भरत होते, आताही देते. मला जागेची गरज होती कारण वडील खूप आजारी होते, वाड्यात निभाव लागणे अवघड होते तेव्हा सर्व मैत्रिणींनी मला मदत केली आणि राजेश्वरी आपटे हिने तर आपली विद्यानगर मधील जागाच मला देऊ केली.. अवघ्या दहा हजार रुपयांमध्ये मी ती जागा घेतली, तेही दोनशे रुपये हप्त्याने.! पण आजही मी त्या मदतीबद्दल कृतज्ञ!!
लहानपणी आम्हाला मोफत शिकवणारे इटाई गुरुजी होते. ते चौपाडात रहात. ते गरीब किंवा हुशार, बऱ्याच विद्यार्थ्यांना घरी बोलवून फुकट शिकवत असत आणि दसऱ्याला आणि संक्रांतीला पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना अर्धी पेन्सिल आणि वरच्या विद्यार्थ्यांना पूर्ण पेन्सिल भेट देत. आजही इटाई सरांनी दिलेली पेन्सिल आठवते किंवा मोफत शिकवणी वर्ग सुरू केला तेव्हा मला ईटाई सरांचीच आठवण झाली किंबहुना मी त्यांचाच वारसा पुढे चालवते असे वाटते.
आमच्या नगरपालिकेच्या दवाखान्यात शांताबाई सरोदे नावाच्या एक महिला ड्रेसर होत्या. जखमा वगैरे बांधणे त्यांचं काम. मी त्यांना म्हटलं “ मला डॉक्टर व्हायचंय, मला हे सगळं काम शिकवाल का ? “
मला वाटायचं डॉक्टर म्हणजे सगळं काम आलं पाहिजे ना! त्यांनी मला ड्रेसिंग करायचे, टॉन्सिल बोळा घशात फिरवायचा, कानामध्ये औषध टाकायचे, अशी अनेक कामं शिकवली. सुट्टीत मी त्यांच्या दवाखान्यात त्यांच्याबरोबर काम करत असे. त्या त्यांच्या नातीसाठी माझ्या नापास शाळेत प्रवेशाला आल्या. मी त्यांना खूप आश्वासक गोष्टी सांगितल्या.. ‘ तुमची नात नक्की पास होणार ‘ याचा दिलासा दिला. त्यांची फी बरीच कमी घेतली आणि त्यांची नात उत्तम मार्काने माझ्याकडून पास झाली.. ही कृतज्ञताच होती.
आमच्या वाड्यातल्या मालकिण बाई , हुंडेकरी वहिनी.. आम्ही त्यांच्या घरी अभ्यासाला जात असू.. म्हणजे अगदी शेजारच्या वाड्यात. वरच्या त्यांच्या एका खोलीत अभ्यास करताना त्या मधूनच आम्हाला खायला आणून देत, कधी कधी एक वाजता त्यांच्या मिस्टरांबरोबर आम्हालाही गरम भाकरी करून जेवायला घालत. आजही मी त्यांच्याबद्दल कृतज्ञ आहे आणि हे वेळोवेळी आमच्या कृतीतून आम्ही त्यांना जाणवून नदिले होते.
मात्र लोकांची मदत केल्यानंतर विसरून जाण्याची भावनाही अलीकडे जास्त प्रगल्भ झाली आहे… ‘मग त्यात काय झालं? केली असेल मदत’… हा भाव असतो. मदत केल्यानंतर विसरून जाणारी अनेक मंडळी मी आजही पाहते आहे.
माझा एक विद्यार्थी आहे. त्याला आई नसल्यामुळे प्रेमाचा भुकेला होता. शिक्षकांमध्येच आई पाहायचा. नापास झाल्यामुळे घरात जरा त्रास होता. घरातून लवकर निघून येऊन ट्रस्टमध्ये बसायचा. हळूहळू अभ्यास चांगला करायला लागला. हुशार होताच पण घरच्या वातावरणाने थोडासा भटकला होता. आमच्या ट्रस्टमधील शिक्षकांकडून त्यांना आईची माया मिळाली. माझ्याशी बोलण्यासाठी तर तो धडपडत असे. फर्स्टक्लासमध्ये पास झाला, ग्रॅज्युएट झाला. सध्या सोलापूरच्या कोर्टात नोकरीला आहे.. खूप छान झाले. जेवणाच्या सुट्टीत मधूनच केव्हातरी येऊन भेटून जातो. आता तो 40 च्या आसपास आहे पण आठवणीने येतो.. केवळ कृतज्ञतेच्या जाणिवेतून…
‘जाणीव’ नावाची गोष्ट जर टोकदार असेल ना तर माणसं कृतज्ञता व्यक्त करतात. नाहीतर त्यात काय झालं असं म्हणून सोडून देतात. मी माझे परवा प्रकाशित झालेले पुस्तक एका शाळेच्या मुख्याध्यापकाला शाळेसाठीच पाठवले… कोणतेही शुल्क न घेता. विचार केला की एका शाळेत पाठवल्यामुळे तो विचार अनेक शिक्षकांपर्यंत जाईल. माननीय मुख्याध्यापकाने साधी पोच सुद्धा दिली नाही कि फोन सुद्धा केला नाही की तुमचं पुस्तक मिळाले आहे. माझ्या मनात ती गोष्ट फार रुतून राहिली. माझ्या एका मैत्रिणीचे वाक्य मला आठवले.. ‘ मॅडम पुस्तक कुणालाही मोफत द्यायचे नाही. ‘.. तिचे नाव वसंती.
– – अगदी खरे आहे मोफत देणे, मदत करणे याला आजच्या जमान्यात काही अर्थ उरला नाही हे खरे आहे. मी वासंतीच्या मताशी सहमत आहे.
– – तरीही माझ्या बाबतीत जी जाणवलेली उदाहरणं होती ती मी या ठिकाणी लिहिली आहेत. आपल्यालाही असे अनुभव आले असतील आपण इथे मांडावेत.
सकाळी सकाळीच हा खूप सुंदर विचार सुचला – मांडावासा वाटला, कारण हा विचार इतकाही छोटा नाही… तो सरकारी यंत्रणेपर्यंत जाऊन पोहोचायला हवा… जिथे फुकट्यांचे राज्य आहे तिथे ते फुकटे अक्षरश:… झालेले आहेत.. असो.
© शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





