शीला पतकी
मनमंजुषेतून
☆ कुछ तो लोंग कहेंगेही… ☆ शीला पतकी ☆
☆
आपल्या आई वडिलांना सुद्धा काही वेळा आपली हुशारी कळत नाही. मी आमच्या घरात विज्ञानाचे प्रयोग करत बसायची. मग त्याचा रंग देणे – खिळे मारणे हे माझ्या हातून व्हायचं नाही. ते मी आमच्या कामवाल्या बाईच्या नवऱ्याकडून करून घ्यायची.
– – एकदा चक्क मी ‘ तिहेरी उपयुक्त शेगडी ‘ नावाचं उपकरण तयार केले.
घरात आमच्या एक जुनं कुकर पडलं होतं – किर्लोस्कर कंपनीच! डबे डबे जोडलेले. माझ्या डोक्यात रात्री तीन वाजता ही कल्पना आली की याच्यामध्ये वाफ सोडली तर, (ते वाफेवर होणार कुकर होतं) म्हणजे त्या प्रत्येक डब्याला आतून एक नळीचा कनेक्शन होतं – म्हणजे पहिल्या डब्यातली वाफ दुसऱ्या डब्यात, दुसऱ्यातून तिसऱ्या या पद्धतीने..! ते मी शाळेत घेऊन गेले. नळाची शेगडी तयार केली. त्या नळातनं कमी व्यासाचा एक तांब्याचा पाईप आत मध्ये फिट केला. नळातून पाणी सोडल्यावर ते गरम होऊन बाहेर यायचं.. आत मध्ये बसवलेल्या तांब्याच्या नळातलं पाणी.. त्याची गरम वाफ होत असे, कारण शेगडीच्या आत तापमान जास्त.. त्या नळीवर कोळसा असायचा ना. तांब्याची नळी आणि कमी व्यास त्यामुळे
ती वाफ शेतावर फवारणी करतो तो पाईप असतो ना त्याच्याद्वारे त्या कुकरला जोडून आत सोडली. एका वेळेला तीन वस्तू होत होत्या.. म्हणजे शेगडी, शेगडी सारखी… बाजूला नळ जोडलेले.. याच्यातून पाणी येत होतं ते 56-57 अंश सेल्सिअस इतकं गरम, आणि डब्यामध्ये डाळ तांदूळ आणि बटाटे – –
– – ४0 मिनिटात शिजवून तयार…!
… कुकर शेगडीवर ठेवलेला नाही, ते सगळं वाफेवर व्हायचे. हे असलं काही काम मी घरात करत बसले की वडील आमच्या आईला सांगायचे, ” काय करते की येडं कुणास ठाऊक. काहीतरी जुनंपानं घेऊन खटपट करत बसतय झालं.. नादिष्ट आहे. कसे व्हायचे या पोरीचे कुणास ठाऊक?” घरात अशी चर्चाही चालायची. आई म्हणायची, “ जाऊदे, काहीतरी करून ती आपला आनंद घेतेना.. राहू दे “…
– – या उपक्रमाला राष्ट्रपती-सन्मान प्राप्त झाला त्यावेळेला रेडिओ होता. सातच्या बातम्यात त्याचा सन्मान झाल्याचेही सांगितले. लखनऊ येथील प्रदर्शनात त्याची मांडणी झाली. तत्कालीन राष्ट्रपती आदरणीय झैलसिंग यांनी गाडीतून उतरून उपकरण पाहून याचे अतिशय कौतुक केले. लखनऊच्या सर्व वृत्तपत्रांनी मुलाखती घेतल्या. इथे आल्यावर आमचे सोलापुरात अनेक ठिकाणी सत्कार झाले. कारण त्या काळात राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या एक दोनच शाळा होत्या. आता सुद्धा कमीच आहेत. सर्वत्र माझं कोड कौतुक…! वृत्तपत्रात मुलाखती… शाळेतल्या सगळ्या मैत्रिणींनी, शिक्षकांनी, घरी बोलावून सत्कार केले. – – पण आमच्या घरात – –
काय येडं काहीतरी करतंय झालं… ही प्रतिक्रिया होती. चालायचंच.. प्रेमापोटी बोलतात ते.
एकूण काय… कोण काय म्हणते याकडे फारसं लक्ष देऊ नये. यावर मी काल एक व्हिडिओ पाहिला.. चार छान सुटाबुटातली माणसं.. समोर एक माणूस उभा आहे.. ती चार माणसं एकत्र बोलत होती…
“आपण नेहमी विचार करतो ना की चार लोक काय म्हणतील?… ते चार लोक आम्हीच आहोत… आम्ही काही म्हणणार नाही…! आणि इथं ती फिल्म संपते.
– – – थोडक्यात काय.. तर आपण विचार करू नये.
© शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




