राधिका भांडारकर
☆ टपरीवरचा चहा… भाग – १ ☆ राधिका भांडारकर ☆
जरा विमनस्क अवस्थेतच होते. एकाएकी रुटीनचा कंटाळा आला. जीवनात नव्याने काही करण्यासारखे उरलेच नाही असंच वाटायला लागलं. तोचतोचपणामुळे एक प्रकारची निरसता मनाला व्यापून राहिली. प्रत्येकाची एक वेगळी चौकट ही असतेच. चौकटीच्या बाहेर काहीतरी करणे यात नक्कीच थ्रिलिंग असावं किंवा मौज असावी. अशा काहीशा विनाकारणच्या भग्नावस्थेत असतानाच वंदनाचा फोन आला. वंदनाला मी “गडगडाटी”च म्हणते. साध्या साध्या गोष्टीतही तिचा उत्साह प्रचंड ओसंडत असतो. खरं म्हणजे आमची दोघांची व्यक्तीमत्त्वे भिन्न असली तरी आमची मैत्री मात्र घट्ट आहे.
पलिकडून म्हणाली, “काय करतेस आज? थांब! काहीच करू नकोस. माझ्याकडे आज मस्त प्लॅन आहे. “प्रार्थना” मध्ये नवा स्टॉक आलाय, सेल पण आहे आणि हो हो तुझा आवडता चहा. तिथे जवळच माऊली अमृततुल्य चहाची टपरी आहे. मला माहीत आहे, तुला टपरीवर चहा प्यायला आवडत नाही. आरोग्यव्यवस्था वगैरे वगैरे पण एकदा पिऊन तर बघ. “होश उड जायेंगे तेरे” आणि तुझ्या त्या साऱ्या सोफिस्टिकेटेड चौकटी मोडून टाक बरं का एक दिवस तरी आणि काय आश्चर्य? मी पण तिला हो म्हणूनच टाकले. ”चालेल. जाऊया. कुठे भेटूया वगैरे आमचे फोनवरच ठरले.
वंदनाचं एक वैशिष्ट्य आहे ती कधीही ब्रँडेड दुकानात अथवा शोरूम वगैरे सारख्या ठिकाणी खरेदी करणारच नाही. “प्रार्थना” सारख्याच भर गर्दीतली टपरी वजा दुकानातच ती खरेदी करते.
“अगं! अशा ठिकाणी ओव्हरहेड खर्च नसतात म्हणून. तू जो ड्रेस मॉलमध्ये घेतेस ना तो इथे निम्म्या किमतीत मिळतो अगदी त्याच क्वालिटीचा. ” असेच ती नेहमी म्हणत असते आणि ते खरे ही असल्याचे मला जाणवलेले आहे. वास्तविक ही एका प्रथितयश उद्योगपतीची बायको आहे बरंका? पण विनाकारण जास्तीचे पैसे का खर्च करायचे हे तिचे तत्त्व!
टपरीवरच्या चहाबाबतीतही तेच. “अगं एकदा तरी सोड ना तुझी किटली, शृंगारिक कपबशी वगैरे. कंटेनर पेक्षा आतला पदार्थ महत्त्वाचा नाही का! काय भारी असतो गं माऊलीचा चहा! सुगंधी खऱ्या अर्थाने उत्तेजित करणारा! अहाहा! तुझ्या ताज संस्कृतीची ऐशी की तैशी! ”
तर असा हा चहा.
चहा नावाचं हे उत्कट पेय ज्याने शोधून काढलं त्याचे मी पहिले आभार मानते. त्यामागचा इतिहास काही असेल. ब्रिटिशांच्या काळात एका इंग्रज माणसानेच चीन मधून चहाचे रोप भारतात आणले आणि हळूहळू भारतात चहाचे मळे फुलले.
तशी चहाची परंपरा अश्मयुगापासून आहे म्हणतात. एकदा जंगलात फिरणाऱ्या माणसाने गरम पाण्यात एक वनस्पती टाकली. पाण्याचा रंग बदलला, सुगंध दरवळला आणि न राहवून तो ते पेय प्राशन करता झाला. हे अनोळखी पेय पिताच त्याला विलक्षण ऊर्जा जाणवू लागली आणि त्याने सारी वस्ती जमा करून हे पेय सर्वांना प्यायला लावले. तोच हा चहा.
माझ्या आयुष्यात तसा फार उशिरा आला. खात्रीशीर गवळ्याने आणून दिलेलं नुकतंच काढलेलं, पांढरं शुभ्र, फेसाळ दूध गरम करून रोज सकाळी ग्लासभर पिण्यातच माझं बालपण गेलं पण मोठी माणसं पितात त्या चहापासून मी वंचितच राहिले. बुद्धी, मेंदू स्मरणशक्तीस धोकादायक म्हणून चहा वर्ज्य पण जीवनाच्या पुढच्या पर्वात सायनस, मायग्रेन, पचनसंस्था असहकार, थकवा, मानसिक ताण यामुळे चहा जवळ आला आणि तो आयुष्यभर मस्त एक सवंगडी बनवून व्यापून राहिला. मात्र या चहापानासोबत माझे काही नखरे आहेत बरं का? एक तर मला कान तुटलेली, जराशीही फुटकी कपबशी अजिबात चालत नाही. चहा कसा मस्त हलकीशी डिझाईन असलेल्या शक्यतो सफेदच सोनेरी कड असलेल्या कपात आणि साजेशा बशीसोबत असला की चहा पिण्याची लज्जत वाढते. शिवाय मला थेट कपात डळमळत आणलेला, बशीत सांडलेला चहा प्यायला अजिबात आवडत नाही. त्यासाठी मला देखणी किटलीही लागतेच. तर असे सगळे नखरे सांभाळतच मी चहाचा खरा आनंद (माझ्या दृष्टीने) अनुभवात असते. मी ४० वर्षे नोकरी केली पण त्या दरम्यानही मी माझा चहा कपबशीसह थर्मास मध्ये नेत असे. टपरीपेक्षा थर्मास बरा म्हणून आणि त्या कारणाने सह कर्मचाऱ्यांकडून माझी भरपूर थट्टा ही झालेली आहे. त्यावेळी “लोगों का काम है कहना… छोडो बेकार की बातों को.. ” अशा झोनमध्येच मी स्वतःला ठेवायचे.
तर सांगायची गोष्ट अशी की आज वंदना बरोबर एक मस्त उनाड दिवस जरासा चौकटी बाहेरचा घालवायचाच असे मी ठरवले.
लक्ष्मी रोडवर भर गर्दीत एका गल्लीतल्या मारुती मंदीरा जवळ आम्ही भेटलो. वंदना नेहमीप्रमाणेच अतिशय उत्साही आणि खळखळणारीच. दिवस आषाढ महिन्यातले असूनही अगदी काही कोसळणारा पाऊस त्या दिवशी नव्हता. पावसाची फक्त भुरभुर होती. हवा छान थंडगार होती आणि सारं मजेदार वाटत होतं. गजबजलेले रस्ते, माणसं, वाहनं, फेरीवाले, रस्त्याच्या दुतर्फा छोटी मोठी दुकाने, हॉटेल्स सगळं काही. मी फारशी कधी या भागात येत नाही पण आज वंदना बरोबर गप्पा करत, गर्दीतून वाट काढत, मनसोक्त शॉपिंग करत, लहान लहान, फूटपाथवर पसरलेल्या दुकानापाशी थांबत, चालण्यात मला खरोखरच खूप मजा वाटत होती. या वैविध्यात, गर्दीत एक चैतन्य होतं. एक जीवन होतं. धक्काबुक्की, आवाज, गोंधळ पावसामुळे रस्त्यावर आणि रस्त्याच्या कडेला साठलेले जलाशय चिखल सारंच मजेशीर वाटत होतं मला एकदम “रोमन हॉलिडे” चित्रपटातली ती बागडणारी “अॉड्री हेपबर्न” आठवली. भटकण्यात वेळ कसा गेला ते कळलेच नाही. शिणलो होतो. थकलो होतो. चहाची एक मस्त तल्लफही जाणवत होती. तेवढ्यात वातावरणात खमंग कांदा भजीचा वासही दरवळला आणि त्यासोबत चहाचा सुगंधही. चहा, पाऊस आणि कांदा भजी यांचं काय नातं असेल ते असो पण त्यात ब्रह्मानंद आहे नक्की. आम्ही “माऊली अमृततुल्य” चहाच्या टपरीजवळच आलो होतो. वंदना अगदी उत्साहात होती. “चल! चल! आता मस्त चहा पिउया.”
– क्रमशः भाग पहिला
© राधिका भांडारकर
पुणे
मो.९४२१५२३६६९
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈






