तृप्ती कुलकर्णी

🪷 मनमंजुषेतून 🪷

☆ वटसावित्री! ☆ तृप्ती कुलकर्णी

मानवी तृष्णेची तहान शमवणारी कथा.

अनादी कालापासून माणसाला मृत्यूबद्दलचे भय आणि आकर्षण दोन्हीही वाटत आले आहे. या भयावर मात करण्यासाठी त्याने सतत नाना प्रकारच्या युक्त्या शोधण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. तथापि मृत्यूचे वास्तव हे या सगळ्याला कायमच आव्हान देत आले आहे. या आव्हानाला उत्तमरीत्या प्रतिसाद देणारी कथा म्हणजे वटसावित्रीची कथा. त्यामुळे या कथेतल्या सावित्रीबद्दल, तिने मागितलेल्या वरांबद्दल आणि एकूणच यमाबद्दल एक उत्सुकता मनात निर्माण झाली. त्या उत्सुकतेतून ही कथा पुन्हा पुन्हा वाचण्याचा मोह झाला. आणि प्रत्येक वेळी त्याच्यात काय नवीन सापडते हे स्वतःशीच पडताळण्याचा प्रयत्न झाला. त्यातून गवसत गेलेल्या काही गोष्टी.

काही कथा काल्पनिक का खऱ्या या वादाच्या पलीकडे असतात. त्यांचं मूल्य कथा म्हणून स्वतःला सिद्ध करणं हे नसून त्यामध्ये सांगितल्या गेलेल्या गोष्टीचा विचार दुसऱ्या पर्यंत पोहोचवणं हा महत्त्वाचा असतो असं मला वाटतं. वटसावित्रीची कथा ही यापैकीच एक महत्त्वाची वाटते. याचं कारण या गोष्टीत असणाऱ्या मृत्यूच्या अनेक छटा…

साधारणपणे मृत्यू म्हटलं की आपल्या डोळ्यांपुढे शारीरिक मृत्यू हा चटकन येतो. परंतु मृत्यू हा शरीरापर्यंत पोहोचण्याआधीही अनेक पातळीवर मानसिकदृष्ट्या पोहोचलेला असतो. जसं की राज्य नसणं हा एखाद्या राजासाठी आणि राजकुमार म्हणून गणल्या जाणाऱ्या व्यक्तीसाठी मोठ्या प्रमाणावरती मानसिकदृष्ट्या मृत्यूच असतो. आपले सर्व राजभोग, राज कर्तव्य सोडून एखाद्या वनामध्ये अत्यंत सामान्य पातळीवरील जीवन जगावं लागणं. हा शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि बौद्धिक दृष्ट्या सुद्धा अक्षमता दाखवणारा, मृतवत अवस्था निर्माण करणाराच प्रसंग आहे. एक प्रकारे तो मृत्यूच आहे.

इथे हा राजा अंध दाखवलेला आहे. अंधत्व हे सुद्धा फक्त दृष्टी पूर्ती मर्यादित नसून संकुचित दृष्टी किंवा अज्ञानाची दृष्टी या अर्थाने सुद्धा महत्त्वाचं आहे. त्या दृष्टिकोनातून एखाद्या राजाचं राज्य नष्ट होण्यामागे त्याची संकुचित वृत्ती किंवा त्याचं अज्ञान हे मोठ्या प्रमाणावर कारणीभूत असणे ही गोष्ट मान्य करावी लागेल. आणि त्याबाबतीतला अंधत्व हे तर राजाकडे होतं ते अंधत्व दूर करण्याची थोडक्यात त्याबाबतीत ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा, वर सावित्रीने यमाला मागितला. म्हणजे इथे राज्यप्राप्तीसाठीचा राज्य चालवण्यासाठीचा जो दृष्टिकोन, आवश्यक ती क्षमता लागते तिची प्राप्ती ही महत्त्वाची आहे. ती सावित्रीने मिळवली म्हणजे मृत्यूची एक छटा सामर्थ्यहीनता यावर मिळवलेला विजय आहे.

त्यानंतर आपल्या सासू-सासर्‍यांसाठी तिने मागितलेले आणखीन पुत्रांचे वरदान म्हणजे साम्राज्यविस्तारासाठी लागणारे शारीरिक, मानसिक सामर्थ्यशाली जीवांची वृद्धी आहे. ज्या वेळेला सासू-सासरे ज्ञानाने सामर्थ्याने युक्त होतील त्यानंतर त्यांचे होणारे पुत्र हे हे देखील त्याचे प्रतीक असतील. आणि त्यांची जेव्हा वाढ होईल संख्यात्मक दृष्टीने गुणात्मक दृष्ट्या तेव्हा ते साम्राज्य विस्तार पावेल यात शंकाच नाही. म्हणजे अशा अर्थाने साम्राज्याचा संकुचिकरण होण्याचा किंवा पुन्हा ते हातून न जाऊ देण्याचा विजय हा देखील तिने मागितला.

आणि सरते शेवटी स्वतःला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद मागून ते साध्य करण्यासाठी प्रत्यक्ष सत्यवानाला पुनर्जन्म मिळाला. यातून सावित्रीने पुन्हा एकदा चैतन्यमय तेजस्वी आनंददायी आणि धर्माधिष्ठित जीवनाची निवड केली. ज्या वेळेला राजा तसे पुत्र हे सर्व धर्माधिष्ठित जीवन जगतील त्यावेळेला ते  राज्य तेथील, वातावरण, तेथील इतरेजन यांचे जीवन देखील  सर्वच दृष्ट्या उन्नत ठरणारे असेल. थोडक्यात एका वरातून सावित्रीने संपूर्ण राज्याची तेही सामर्थ्यवान आणि नीतीवान राज्याची  पायाभरणी केली.

हा सर्व प्रसंग वटवृक्षाच्या झाडाखाली झाला म्हणून आज वटवृक्षाचे महत्व. परंतु वटवृक्षाचे आधीच पुराणातही पुष्कळ महत्त्व आहे. मुळात हा वृक्ष आपल्या पारंब्यातूनही पुन्हा नवनिर्मितीची क्षमता धारण करतो. म्हणजे या वृक्षातच मुळात अजेय राहण्याची वृत्ती आहे. विस्ताराचा ध्यास आहे. आणि अनेकांना आश्रय देण्याची क्षमताही आहे. थोडक्यात एखाद्या राजाला किंवा एखाद्या मनुष्याला ज्याप्रमाणे आपल्या वंश विस्ताराची किंवा साम्राज्यवाढीची इच्छा असते तशीच काहीशी इच्छा धारण करणारा वृक्ष आहे. असे सगळे साधर्म्य साधणारे योग या कथेत जुळून आले आहेत.

त्यामुळे सर्वच प्रकारच्या मृत्यूवर विजय प्राप्त करण्यासाठीच्या दुर्दम्य इच्छाशक्तीची  प्रगाढ ज्ञानाची आणि विश्वासाची ही कथा आहे असं मला वाटते. जे लोक अधिक अभ्यासक आणि जाणकार असतील ते आणखीनही शोधतील. पण एकंदरी कथा मानवी तृष्णेची तहान शमवणारी आहे यात शंका नाही.

© तृप्ती कुलकर्णी

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted