श्री अनिल वामोरकर

? मनमंजुषेतून ?

☆ असावा असा एक छंद! – लेखिका : रेशमा डोळे (रमा) ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

नवीन ठिकाणी राहायला आलो, पण मन काही त्या नव्या जागेत अजून रुळलं नव्हतं. नवऱ्याच्या नोकरीची अजून सहा वर्षे बाकी होती. तब्येतीच्या कारणामुळे आम्हाला जुनी राहती जागा सोडावी लागली आणि त्यांच्या नवीन ऑफिसजवळ घर घ्यावं लागलं.

सुरुवातीचे एक-दोन दिवस सामान लावण्यातच गेले.

एक दिवस दाराची बेल वाजली. दार उघडलं तर समोर एक गोड आजी उभ्या होत्या. गोऱ्यापान, गुलाबी वर्ण, ठेंगण्या. अंगात सुंदर पंजाबी ड्रेस, त्याला मॅचिंग टिकली, कानातले, बांगड्या… आणि ते निळेशार डोळे! सगळंच देखणं… आणि त्याहूनही गोड त्यांचं बोलणं.

 

मी मात्र घरच्या अवतारात होते. मला अगदीच लाजल्यासारखं झालं.

“अगं, मी तुझी शेजारीण. सगळे मला ‘माई’ म्हणतात. कालच यायचं ठरवलं होतं ओळख करून घ्यायला, पण लगेच आले असते तर तू म्हणाली असतीस, ‘काय ही म्हातारी, लगेच आली! ‘”

हे बोलून त्या गालावर खळी पाडत इतक्या गोड हसल्या की मी त्या खळीतच हरवून गेले.

“हे घे, मस्त टोमॅटो सूप आणलंय. घरात किती जण आहेत माहीत नव्हतं, म्हणून अंदाजाने आणलं. आवडतं ना? म्हणजे आवडत नसलं तरी आता प्यावंच लागेल हं! “

पुन्हा तेच मधाळ हसू…

“अगं, मीच बोलत बसले ना! माझं असंच होतं. समोर माणूस दिसला की किती बोलू आणि किती नको, हेच कळत नाही.

चल येते… चालू दे काम तुझं.. काही लागलं तर सांग.. “

आमच्या दोघींच्या गच्च्या समोरासमोर होत्या. त्यामुळे सकाळी हळूहळू गप्पा सुरू झाल्या. बिल्डिंगमध्येही एक-दोन ओळखी झाल्या; पण तिथल्या बायकांना इतर रहिवाशांच्या घरात काय सुरू आहे याच्या गप्पा, मालिकांची चर्चा यांतच जास्त रस होता. त्यामुळे मी त्यांच्यात फारशी रमले नाही.

माईंच्या हातचे पदार्थ अप्रतिम असायचे. हळूहळू माझ्या घरूनही पदार्थांच्या वाट्या त्यांच्याकडे जाऊ लागल्या. त्या मनापासून कौतुक करायच्या आणि मला अजून काहीतरी करून त्यांना खाऊ घालावंसं वाटायचं.

मी आता इथे रुळले आहे, हे पाहून नवरा आणि परदेशात असलेली मुलगी दोघेही निर्धास्त झाले. “आता काय करू? कंटाळा आलाय… ” हा माझा पंचक्षरी मंत्रही बंद झाला.

एक दिवस सकाळी माई गच्चीत बसून क्रोशेचं काम करताना दिसल्या.

“माई, तुम्हाला हे येतं? मला शिकवाल का? “

“अगं, आजपासूनच ये. उभ्याउभ्या पळतेस नेहमी. निवांत घरीच आली नाहीस अजून. “

दुसऱ्या दिवशी सगळी कामं आटोपून मी अकराच्या सुमारास त्यांच्या घरी गेले.

माईंबद्दल मला फारसं काही माहीत नव्हतं. एवढंच ऐकलं होतं की त्यांचे पती आणि मुलगा आर्मीमध्ये होते.

घरात शिरताच समोर भिंतीवर मोठा फोटो होता. माई, त्यांचे पती आणि मुलगा. पती आणि मुलगा दोघेही आर्मीच्या गणवेशात.

घराचा प्रत्येक कोपरा त्यांनी इतका सुंदर सजवला होता! कुठेही दिखाऊपणा नव्हता; पण साधेपणातलं देखणेपण मात्र प्रत्येक वस्तूतून जाणवत होतं.

“येतेस का गं आत? मी जरा आमच्या नातेवाईकांना जेवू घालून येते. “

मी चकित झाले.

नातेवाईक? पण घरात कोणाचाच आवाज नव्हता. बाहेर चप्पलही नव्हत्या.

“माई, मी नंतर येऊ का? “

“अगं, कशाला? थांब. हे असे जेवतील आणि जातील. “

मला काहीच कळेना.

“ये ना, आतच. तुझी ओळख करून देते. “

मी किचनमध्ये गेले.

खिडकीजवळ खुर्ची टाकून माई बसल्या होत्या. त्यांच्या हातात कणकेच्या छोट्या गोळ्यांचा डबा होता.

एक गोळा त्यांनी खिडकीत ठेवला.

क्षणात एक कावळा आला, दोन मिनिटं एकदम शांत बसून राहिला. सावकाश एक गोळा चोचीत धरला आणि उडून गेला.

“ही माझी बहीण. एकदम गाय होती. आयुष्यभर कधी कसले नखरे नाहीत. समोर जे आलं ते आनंदाने स्वीकारलं. “

पुढचा गोळा ठेवताच दुसरा कावळा आला. बराच वेळ कर्कश आवाज करत राहिला. गोळा चोचीने इकडे-तिकडे करत राहिला आणि मग घेऊन गेला.

माई हसत म्हणाल्या,

“या माझ्या सासूबाई. आयुष्यात कधी म्हणून कौतुक नाही. “

मलाही आता गंमत वाटू लागली.

पुढचा गोळा ठेवला. एक कावळा आला; पण आमच्याकडे पाठ करून बसला.

“हा कोण? “

“आमच्या आईचे मोठे जावई. कायम मानपान हवा असायचा. अजूनही ताठा तोच. “

माई म्हणाल्या,

“जयंतराव, वाढलं आहे. येता का? “

माई हे म्हणताच क्षणात तो कावळा वळला, गोळा घेतला एकदा कर्कश्य ओरडला आणि उडून गेला.

योगायोग असेल कदाचित; पण मला मात्र हे सगळं विलक्षण वाटत होतं. मला आता जरा मजा वाटत होती.

आणखी एक कावळा गोळा घेऊन खिडकीच्या कपारीत ठेवून थोडा खाऊन उडून गेला.

“ही माझी जाऊ. कायम सगळं लपवून ठेवायची. “

तेवढ्यात एक खार आली.

“माई, हीसुद्धा नातेवाईक? “

“नाही गं. ही पाहुणी. “

एक गोळा घेऊन ती धूम ठोकून पळाली.

थोड्याच वेळात आणखी एक कावळा आला. आधी त्याने चोचीने जागा स्वच्छ केली, मग स्वतःची चोच साफ केली आणि शेवटी गोळा खाल्ला.

मी भुवया उंचावत विचारलं,

“हे कोण? “

माई कपाळावरचं कुंकू दाखवत हळूच म्हणाल्या,

“आमचे हे… सगळी कडे शिस्त म्हणजे शिस्त. “

त्यांच्या डोळ्यांत त्या क्षणी वेगळीच चमक होती.

थोड्या वेळाने कावळे येणं थांबलं.

माईंनी दहीभाताची वाटी खिडकीत ठेवली.

क्षणात एक कावळा आला आणि दहीभातावर तुटून पडला.

मी हसत विचारलं,

“याला वेगळा मेनू? फार स्पेशल दिसतोय हा नातेवाईक. “

क्षणात माईंचे डोळे भरून आले.

“माझा लेक… नील. त्याला माझ्या हातचा कालवलेला दहीभात फार आवडायचा. “

माझ्याकडे बोलायला शब्दच उरले नाहीत.

क्षणभर शांतता पसरली.

पण पुढच्याच क्षणी माई नेहमीसारख्या गोड हसल्या.

“चल… झाले सगळे. उरलेले गोळे ठेवून देऊ. अजूनही येतात हळूहळू. जवळचे सगळे भेटून गेले. “

मी म्हणाले,

“माई… आज क्रोशा नको. आज फक्त गप्पा मारूया. हा सगळा प्रकार मला सांगाल? “

माई हळूच बोलू लागल्या.

“हे आणि माझा मुलगा नील… दोघेही एका पाठोपाठ गेले. हे आजाराने गेले आणि नील देशासाठी शहीद झाला. नुकतंच त्याचं लग्न झालं होतं. आम्ही दोघी बायका अक्षरशः कोलमडलो होतो.

एक दिवस मला स्पष्ट जाणवलं… नील मला दहीभात मागतोय.

सुनेनेच सांगितलं, ‘आई, तुम्हाला तो जाणवतोय ना? मग खिडकीत ठेवा. ‘

मी दहीभात ठेवला… आणि मिनिटभरात एक कावळा आला. सगळा भात खाऊन गेला. मग रोजच ठराविक वेळी येऊ लागला.

त्या दिवशी मला किती आनंद झाला होता, हे मी कुणालाच सांगू शकले नाही.

वर्षभराने मी सुनेचं दुसरं लग्न लावून दिलं. ती तिच्या संसारात सुखी आहे. मला दोन गोड नातवंडं आहेत. आली की तुला भेटवेन.

मग नीलसाठी ठेवलेला दहीभात… त्यानंतर एक-एक कावळा यायला लागला मग रोज अशी पंगत बसायला लागली… आणि हळूहळू हा माझा छंद झाला.

लोक म्हणतात ना, माणूस एकटा पडला की काहीतरी आधार शोधतो…

मी माझे आधार या ‘नातेवाईकांमध्ये’ शोधले. “

 

थोडा विराम घेऊन त्या पुढे म्हणाल्या,

“बिल्डिंगमध्ये गेले की मुल सुनांचा तक्रारी, मेंदू बधिर करणाऱ्या मालिकांवर चर्चा या गप्पा. माझी सून दुसऱ्या घरी सुखात आहे म्हणून तिच्याबद्दल वाईट बोलायचं मला कधी जमलं नाही. मग माझ्या कडून काही मसालेदार खबर नाही म्हणून मी जरा त्यांच्यात नापासच होते.. मग मी खाली जाणंच बंद केलं.

आता, सकाळी या नातेवाईकांसोबत वेळ जातो. दुपारी थोडेसे विणकाम किंवा वचन, चार वाजता परदेशात राहायला जाणाऱ्या मुलांसाठी ऑनलाइन रेसिपी क्लास. संध्याकाळी मिलिटरीच्या एनजीओमध्ये काम. रात्री पुन्हा घर… असा माझा दिवस संपतो.

लोक मला वेड्यात काढतील म्हणून हे कावळ्यांचं प्रकरण मी कुणालाच सांगितलं नव्हतं… तुला सांगितलं… कारण तू चेष्टा करणार नाहीस, असा विश्वास वाटला. “

मी त्यांच्या हातावर हलकेच हात ठेवला. त्या दिवशी मला एक गोष्ट उमगली…

प्रत्येक जण दुःख विसरण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत असतो. कुणी देवात रमतो, कुणी कामात, कुणी आठवणींमध्ये… आणि माई? माई रोज आपल्या “नातेवाईकांना” एक गोळा कणिक वाढून जगण्याची उमेद गोळा करत होत्या.

त्या दिवशी मी क्रोशा शिकले नाही…

पण आयुष्याच्या विणकामात दुःखाचे धागेही किती प्रेमाने गुंफायचे असतात, हा सर्वात मोठा धडा मात्र माईंनी मला शिकवला.

लेखिका : रेश्मा डोळे (रमा).

प्रस्तुती : श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted