संध्या बेडेकर
मनमंजुषेतून
☆ “विचारात चिमूटभर बदल झाला तर??..“ ☆ संध्या बेडेकर ☆
“Sometimes You meet someone in life, Who change your way of thinking. “
काल ताई कडे गेले होते. सहजच. जेंव्हा मनात येईल तेंव्हा जाण्यासाठी हक्काचे ठिकाण म्हणजे माझ्या ताईचे घर.
ताई म्हणजे ‘आभा कुलकर्णी ‘ चा सधन मध्यमवर्गीय परिवार आहे. भाऊजी सरकारी नोकरीत मोठ्या हुद्द्यावर होते. आजही कन्सल्टंट म्हणून काम करतात.
एक मुलगा अजय आणि एक मुलगी अनघा.
अजय भारतातच शिकला आणि भारतातच एका मोठ्या कंपनीत नोकरीला आहे. पण मधून मधून कामानिमित्त परदेशात जाव लागत. कधी कधी तर प्रोजेक्ट च्या कामाने महिनाभर तेथेच रहावं लागतं. तेंव्हा सूनेच्या शोधात असताना हा पोइंट सांगणे खूप महत्वाचे आहे. असं भाऊंजींचे म्हणणे आहे.
‘अनिता देशमुख ‘ बरोबर बरेचदा भेटीगाठी झाल्यानंतर, सर्व सम्मतीने पसंती झाल्यावर,अजय ने हा मुद्दा सर्वांसमोर मांडला.
अजय म्हणाला,
मला कामानिमित्त कधी कधी महिनाभर बाहेर रहाव लागत. तेंव्हा माझ्या होणाऱ्या बायकोला प्रथम ही गोष्ट माहीत असली पाहिजे,मान्य असली पाहिजे. आणि तीने किंवा आई बाबांनी एकट राहण्यापेक्षा एकत्र रहावं. दोघांनाही एकमेकांची मदत होईल. आधार असेल. मला काळजी राहणार नाही. सर्वांचे सर्व प्रश्न सहज सुटतील. असं माझं मत आहे.
अनिता ने नोकरी चालू ठेवावी किंवा तिला अजून काही आपले छंद जोपासायचे असतील तर ते ही चालेल. माझ्याकडून तिला प्रत्येक कामात माझे व आईबाबांचे सहकार्य नेहमी मिळेल. याची मी खात्री देतो.
अजयने स्पष्ट बोलून सौम्य शब्दात सर्व गोष्टी सांगितल्या. बंगल्यात राहणाऱ्या अनिताला सर्व गोष्टी मान्य होत्या. आणि अजय चे लग्न पार पडले. बंगल्यात तून अनिता फ्लॅट मध्ये रहायला आली.
अनिता मधून मधून माहेरी जात असली,तरी जास्तीत जास्त ती आई बाबांबरोबरच असते. या गोष्टी चे ताईला आणि अनिताच्या आईबाबांना दोघांनाही कौतुकच आहे.
ताई आणि भाऊजीं ना तशी थोडी काळजीच होती. कारण दोन्ही घरच्यांच्या सांपत्तिक स्थिती मध्ये बराच फरक आहे.
प्रत्यक्षात रहायला सुरुवात झाली की कदाचित अनिता ला adjust होण कठीण होईल की काय?? ही भीती ताईला वाटतं होती.
आता लग्नाला महीना झाला. अनिता घरात छान रुळली आहे. आज संध्याकाळी जेवणानंतर सर्वांच्या गप्पा गोष्टी सुरू होत्या. सध्या लग्नाच्याच गोष्टी म्हणजे Pre and Post marriage गप्पा होत असतात.
आज ताई अनिताला म्हणाली,
अनिता!! आता जवळजवळ महिना झाला ग तुला या घरात येऊन. अगदी आरामात रहा. मोकळेपणाने काही वाटलं तर सांग. प्रत्येक घरच्या पद्धती वेगळ्या असतात. अग! भाजीत गुळाचे प्रमाण पण प्रत्येक घरचे वेगळे असते, किंवा अजिबात गुळ घालतही नाही. तेंव्हा तुला काही वेगळ खायचं असेल तर तसं सांग,मी करून देईन किंवा तू कर. आम्हाला पण खायला आवडेल.
तुला घरात काम करायची सवय नसेल तर संकोच करू नको. आपण एखाद्या मावशींना कामाला ठेवू शकतो.
अनिता म्हणाली,
आई!! तुम्ही माझा एवढा विचार करता हे बघून मला माझा निर्णय बरोबर आहे. हे लक्षात येतंय.
आई!! मी घरी खूप पैसा बघितालाय. बाबांचा बिझनेस हळूहळू वाढत गेला. पैसा घरात येत गेला. यामागे बाबांचे कष्ट आणि Vision दोन्ही आहे. मला बाबांचा अभिमान आणि कौतुक दोन्ही आहे. आता एवढा बिझनेस सांभाळायला दादा पण भारतात नाही. तो अमेरिकेत स्थायिक झालाय. म्हणजे बाबांनाच सर्व बघावं लागतं. आईने घर,मला आणि दादाला खूप छान सांभाळल. आम्हाला शिस्तीत ठेवल. बाबांनी शुन्यातून हे साम्राज्य उभे केले.
मी बाबांना नेहमी विचारते,
बाबा!! स्वतः साठी वेळ केंव्हा काढणार आहात?? कमविलेल्या पैशाचा आनंद केंव्हा घेणार आहात??
केंव्हा आणि कुठे थांबायचं तेही ठरवता आलं पाहिजे ना.
मी आणि दादा नेहमीच स्वतः चे निर्णय घेत आलो. आई बाबांचा नेहमीच सपोर्ट असतो. मला श्रीमंत परिवारापेक्षा एक छान समजूतदार परिवार मिळावा,ही आमच्या सर्वांचीच इच्छा होती.
“श्रीमंत परिवार, एकुलता एक मुलगा, मुलांची प्रोपर्टी, बंगला ” हे मुद्दे आमच्या घरी नव्हतेच.
आज या गप्पागोष्टींत ‘अनघा ‘ताईची उच्च शिक्षित मुलगीही हजर होतीच. अजय पेक्षा एकच वर्ष लहान,लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून पोस्ट ग्रॅज्युएट झालेली, एका नामी कंपनीत लठ्ठ पगाराची नोकरी करणारी अनघा, अनिताचे बोलणं लक्ष देऊन ऐकत होती.
अनघाला लग्न तर करायचे आहे. पण अटी भरपूर आहेत. उच्च शिक्षण,पगार या अटी तर आहेतच. बरोबर एकुलता एक,पॉश लोक्यालिटीत स्वतः चे घर असणारा हवा ही एक अटही आहे.
आता अनघा चे वय तीस वर्ष आहे.
सगळ्यांचे सर्व समजावून झाले. पण पालथ्या घड्यावर पाणी. वय वाढतय पण अटी काही कमी होत नाहीत.
बाकी सर्व अटी तरी ठीक म्हणता येतील. पण पॉश एरियातच घर हवं,
ये बात कुछ हजम नहीं हुई ।
या अटी वर भरपूर चर्चा नेहमीच होत असते.
मध्यंतरी ताईंच्याच कॉलोनीत राहणारे श्री देशपांडे यांनी त्यांच्या उच्च शिक्षित एकुलत्या एक मुलांसाठी विचारलेही होते.
भाऊजींचे म्हणणे,
आपण नेहमीच मिडिल क्लास सोसायटीत राहिलो. आपल काय वाईट झाल.?? खरंतर कोविड पिरियड मध्ये किती लोकांची मदत झाली.
मध्यवर्गीय सामान्य लोकांची सोसायटी चांगली नसते की लोक चांगली नसतात.??
घर / बंगला कुठं आहे यापेक्षा घरातील माणसे महत्वाची नाही का??
आजही अनघाच्या लग्नाचे प्रयत्न सुरूच आहेत पण सर्व अटीत फिट बसणारा मुलगाच मिळत नाहीये.
ताई भाऊजी ना तिची काळजी आहेच.
म्हणतात ना,
वेळ निघून गेल्यावर सुचलेले विचार आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस दोघांची किंमत सारखीच आहे.
आज अनघा बाबांना म्हणाली,
बाबा!! देशपांडे काकांना भेटून पूढच्या गोष्टी केल्या तर माझी काही हरकत नाही.
ताई भाऊंजीं एकमेकांकडे समाधानाने आनंदाने बघतच राहिले.
ताई मनात म्हणाली, हा अनिताच्या विचारांचा प्रभाव आहे का?
भाऊजी पण मनात म्हणाले,
“Sometimes you meet someone in life who change your way of thinking.”
विचारात चिमूटभर बदल झाला तर आयुष्य बदलत.
© संध्या बेडेकर
वारजे, पुणे.
7507340231
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





