शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ गिरणगाव सोलापूर आणि दहा तारीख… ☆ शीला पतकी 

सोलापूर शहर हे 60 /65 वर्षांपूर्वी गिरणीवर चालणारे गाव होतं. गिरणगाव या नावानेच ते ओळखलं जायचं. सरकारी कार्यालयातील कर्मचारी म्हणजे सरकारी नोकर, एसटीतील कर्मचारी, रेल्वेतील कर्मचारी आणि उरलेली तमाम जनता जुनी गिरणी नरसिंग गिरजी, लक्ष्मी विष्णू मिल जाम मिल आणि फुटाणे गिरणी नावाची गिरणी होती. मला त्याबद्दल फारशी माहिती नाहीये पण तिचं नाव मी ऐकले आहे..

हे संपूर्ण शहर आर्थिक व्यवस्थापनासाठी गिरण्यांवर अवलंबून होते. सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार एक तारखेला, एसटी वाल्यांचा पगार सात तारखेला, आणि सर्व गिरण्यांचे पगार मात्र दहा तारखेला होत. त्यामुळे दहा तारखेला सोलापुरात दिवाळी..! 

75 टक्के गाव हे गिरणीवर अवलंबून… वडिल कुठे काम करतात विचारलं तर वर्गातील किमान 30 पोरं तरी सांगायची गिरणीमध्ये काम करतात. गिरणीचा पगार हा दहा तारखेला होत असे त्यामुळे दहा तारीख ही सर्व कामगार वर्गाच्या आयुष्यामध्ये दिवाळीची तारीख असायची… म्हणजे किशोर कुमारच गाणं आहे की खुश है जमाना आज पहिली तारीख है तस आज दस तारीख है.. अशी परिस्थिती होती.

दहा तारखेला सकाळपासूनच घरामध्ये आज वडिलांचा पगार होणार म्हणून मुल आनंदी, नवऱ्याचा पगार होणार म्हणून बायको आनंदी, लेकराचा पगार होणार म्हणून आई बाप आनंदी! त्यादिवशी सगळे गाव आनंदाच्या आगमनाच्या लगबगीत असायचं कारण शेवटचे चार-पाच दिवस हे उसनवारीत गेलेले असायचे. त्यामुळे दहा तारखेचा उत्साह वेगळा असायचा. तो केवळ घरातच नाही तर गावातही वेगळा असायचा. गिरणीत जाणारा प्रत्येक माणूस येताना खिशात पगार घेऊन येत असे त्यामुळे जाताना त्याचे चेहरे आशावादी आणि येताना प्रफुल्लीतच…. असं शहराचं वातावरण…!

अगदि हे तसंच असायचं गिरणीच्या रस्त्यावर…. संध्याकाळी दुतर्फा मिठाईच्या गाड्या लागलेल्या या गाड्यावर रंगीबेरंगी दाणे असलेले बुंदीचे लाडू.. शेवेने भरलेली गच्च ताट… तिच्यातही बारीक शेव जाडी शेव गोडी शेव असे प्रकार…. चिवड्याची टोपली… जिलबीची केशरी परात…. त्या सगळ्यांना रंगीबेरंगी कागद..! गाडीवाल्याच्या गाडीत वजन मापाचा काटा… वर्तमानपत्राची रद्दी आणि सुताचा गुंडा इतकं सामान…! प्रकाशाची फारशी व्यवस्था नसलेल हे गाव त्या दिवशी या गाड्यांवरती पेट्रो मॅक्स म्हणजे बत्त्या किंवा टेंभे यानी झगमगून जायचे. बाजूला असणाऱ्या फाटकावर, मरीआई चौकात, भैया चौकात भरपूर भाज्या घेऊन बसलेले भाजीवाले अस एक फार उत्साही दृश्य असायच. त्याचबरोबर बाहेर उभी असणारी काही दांडगट माणसंही असायची… ते असायचे रोहिले पठाण…. हे या गरीब कामगारांना व्याजाने कर्ज द्यायचे…. कामगाराकडे महिन्याचा पगार जेमतेम कुटुंब भागवणे एवढा असायचा. जुजबी आजारासाठी गिरणी दवाखाने मोफत होते पण मोठ्या आजारावर बाहेरचा औषध उपचार करावा लागायचा त्याला पैसा खर्च व्हायचा असे विमे वगैरे त्या काळात नव्हते. त्यासाठी, पोरबळांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी किंवा प्रपंचाला कमी पडतं म्हणून ्या बिचार्‍या गरीब कामगारांना कर्ज काढावच लागायचं… या कर्जाला व्याज असायचा आणि त्या व्याज वसुलीसाठी ही पठाण मंडळी दहा तारखेला गिरणीच्या दारात उभे….! प्रत्येक गिरणीच्या दाराशी असे पठण दिसायचे त्याची नजर चुकवून जाणं केवळ अशक्य..! तिथेच त्या पगारातले व्याजापुरते रक्कम काढून द्यावी लागायची आणि मग उरलेला पगार तो कामगार घरी घेऊन यायचा….!तरीही येताना आपल्या लेकरा बाळांसाठी लाडू चिवडा ते वर्तमानपत्राच्या दोऱ्याने बांधलेल्या पुडयात आनंदाने घेऊन यायचा.

लेकर बाळ दारामध्ये बापाची वाट बघत बसलेली असायची. तिथेच जुन्या गिरणीच्या चाळी नरसिंग गिरजि चाळी आहेत. भैय्या चौकात हीआहेत सगळी गिरणीच्या आसपास राहणारी मंडळी. प्रत्येक घरातलं पोर बापाला लांबून येताना पाहून आनंदित व्हायचं बापाच्या हातातली पिशवी घेण्यासाठी ते आनंदाने धावायचे जगातली सगळी सुख देणारा बाप त्यांना त्या दिवशी खूप मोठा वाटायचा…. कारण त्याच्या हातात जिलबी शेव चिवडा लाडू ही स्वप्नवत वाटणारी खाद्य श्रीमंती असायची…! आज या पदार्थाकडे डुंकुनी न पाहणारी पिढी पाहिली की आमचे दिवस आम्हाला आठवतात. जिलब्यांच्या वेटोळ्या प्रमाणे गोल गोल फिरणार आमचा आयुष्य तिथेच रिंगणात राहणार होतं. बुंदीच्या लाडवातला एकही बुंदीचा कण सांडणार नाही अशी दक्षता घेऊन आणि ते खाद्यपदार्थावर कागदाच्या तुकड्यावर संपवत असू.

प्रत्येक घरातला बाप आणलेला पगार खिशातून काढून म्हाताऱ्या आईच्या हातात ठेवत असे. देवाजवळ दिवा लावून ती सुद्धा पांडुरंगा समोर तो पगार ठेवून त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत असे आणि मग तो पैसा घर खर्चाला वापरला जायचा. त्या तोकड्या पैशात ते घर समाधानांन भरून जायचं कारण… घरात विठ्ठल रुक्माई सारखे आईबाप आणि श्रीकृष्ण पेंद्या यांच्यासारखाच गोकुळ असायचं. घरात आजीच्या भोवती गोळा झालेली मुलं बापान आणलेला खाऊ आजीने वाटून दिला की आनंदाने खाऊन पसार व्हायची. फार पैसा नसला तरी समाधान होतं आणि त्या समाधानाच सुखही ही मोठं होतं.

त्यादिवशी चाळीतल्या भजनाला मोठी रंगत यायची किती थोड्या पैशात किती समाधानी होती माणसं..! आमच्या घरी त्या दिवशी बेकरीतला मोठा ब्रेड यायचा तो दुसऱ्या दिवशी सकाळी चहा बरोबर खायला मिळायचा त्यामुळे रात्री ब्रेड खाण्याचे स्वप्न उराशी घेऊन आम्ही झोपायचं.. इतकं साधं जीवन होतं पगाराच्या दुसऱ्या दिवशी गिरणीच्या बाजूचे चौक फुललेले असायचे. भैया चौकात कॅन्टीनस सगळी भरलेली असत भजी आणि चहा यांच्यावर ताव मारत… विविध पक्ष संघटना तिथे चर्चा करायच्या.. कामगारांच्या हक्काच्या… त्यांना काय काय मिळालं पाहिजे याच्या. कामगार पुढारी तिथे असायचे ते आपल्या मागण्यांसाठी काही कार्यक्रम आखायचे… आंदोलन व्हायची चळवळी व्हायच्या… चहा पिणारे चहाचे हॉटेलात…. दारू पिणारे दारूच्या गुत्त्यात जायचे पण… दारूबंदीच कार्य प्रभावी असल्यामुळेदारू झोकून माणसअशी राजरोस रस्त्यावरून फिरत नव्हती किंवा त्याला आळा तरी होता. दुकानातून औषधाची बाटली विकत आणावी इतकी सहजासाची दारू उपलब्ध नव्हती आणि दारू प्यायला जाणारा माणसाला समाजात फारसा मान नसायचा त्यामुळे ते सगळं चोरून व्हायचं. एकत्र कुटुंब असल्यामुळे आई बापाचा धाक असायचा. मोठा भाऊ बापाच्या जागी त्यामुळे एक चांगली भीती असायची. गिरणीतली तरुण पोर सहजासहजी चुकीच्या मार्गाला जात नव्हती खरं तर ही गिरणीत काम करणारी मंडळी शेजारच्या खेड्यातन आलेली एक भाऊ थोडी शेती करतोय दुसरा नोकरी करायला आला त्यांन आणखीन आपल्या धाकट्या भावाला बोलवून घेतलं अशी त्यांची कुटुंब शहरात वाढलेली. गिरणीच्या मालकाने त्यांच्यासाठी चाळी बांधून दिलेल्या त्यामुळे जुनी गिरणीच्या चाळी, नरसिंग गिरजीच्या चाळी अशा चाळीने त्यांच्या घराच्या राहण्याचे प्रश्न सोडवूनच टाकले होते पाणी दोन्ही वेळा यायचं कारण गिरण्या तीन पाळ्यात चालायच्या त्यामुळे पाण्याच व्यवस्थापनही त्यांच्या वेळेनुसार असायचे गिरणीच्या भोंग्यानी शहर जागे होत असल्यामुळे शहराला उद्योगाचे वळण होते.

कामगारांच्या विकासासाठी सरकारने स्थापलेली कामगार कल्याण केंद्र असायची ते अशाच गिरण्यांच्या आसपास किंवा कामगारांच्या वसाहतीत होती. ती केंद्र तरुण मुलातून खेळाडू तयार करायचे गिरणीतल्या तरुण मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून वर्तमानपत्र आणि उत्तम पुस्तक ठेवायचे म्हणजे त्यांचे ग्रंथालय होते खेळाचे सामने भरवायचे… नाटकाच्या स्पर्धा व्हायच्या…! दुपारच्या वेळेला हेच केंद्र महिलांसाठी उघडे असायचे. तिथे शिवण वर्ग, विविध कलाकुसर शिकवणारे शिक्षक येऊन शिकवायचे, महिलांच्या विविध विषयावर वेगवेगळ्या व्याख्यातांना बोलवून व्याख्यानं व्हायची, त्यामध्ये मुलाचे संगोपन कसे करावे… गरोदर स्त्रीने कोणती काळजी घ्यावी… यासारख्या असंख्य विषयावर मार्गदर्शन होत असे… शिवण्याच्या मशीन असायच्या त्यामुळे बायका कपडे शिवून घेऊन जायच्या… मुलींची त्यांची नाटकं व्हायची छोट्या मुलांना सिनेमे दाखवले जायचे… सिनेमा म्हणजे ते माहितीपट असायचे.. पण केंद्रात सिनेमा आहे म्हटलं की सगळी पोरं धूम केंद्रात पळायची. केंद्र चालवणारी मंडळी खूप छान होती तळमळीने काम करणारे होती. ह्या कामगार कल्याण केंद्रा संदर्भात एक स्वतंत्र विषय करून लिहीन तेव्हा अशी कामगार कल्याण केंद्र ह्या गिरणीतल्या कामगारांच्या कलागुणांना वर्धिष्णू करीत मनोरंजन करीत आणि संस्कारही करीत होते… त्यावेळी कामगारात गुंड होते गटबाजी करणारे होते पक्ष वाले होते त्यांच्या त्यांच्यात इंटक वगैरे अशी काही संघटनांची आम्ही नाव ऐकत असू व्यंकप्पा मडूर हे चळवळीतलं नाव अशी बरीच नाव त्यावेळेला कानावर येत होती त्यांचे मोर्चे असायचे आंदोलन असायची पण गिरणी पेटवली… गिरणी जाळली… गिरणीत दगडफेक झाली… असे मात्र होत नव्हते. कारण काम करायच्या ठिकाणी त्यांची श्रद्धा होती हे हिंसक प्रकार आंदोलनात नव्हते… काय ते रस्त्यावर थोडे व्हायचे… अर्थात हे शहर धाडसी मर्दांच होतं आहे. प्राणाची पर्वा न करता लढणारी माणसं या शहराने दिली. खून व्हायचे मारामाऱ्या व्हायच्या तशी थोडी सोलापूरची दहशत होती लोकांना, अगदी इंग्रजांना सुद्धा…! आम्हाला असं सांगायचे की इंग्रज, वर्तमानपत्रात सोलापूर हे नाव वाचले तर त्यांच्या हातातलं वर्तमानपत्र कापायचं इतकी दहशत नावात होती. इंग्रजांच्या नकाशात लाल रंगाने स्पॉट केलेल आपलं गाव होतं पहिला हुतात्मा या देशाला सोलापूर ने दिलाय तो शंकर शिवदारे… त्यांच्या आत्मसमर्पणाने स्वातंत्र्य चळवळीला ही उधाण आले होते.. अशा झोकून देऊन काम करणाऱ्या कामगारांचे जगत असलेले गाव…. सगळ्या गिरण्या राजकीय निष्क्रियतेमुळे कटकारस्थानामुळे हळूहळू बंद पडल्या.

तीन मोठ्या गिरण्यांची मिळून झालेली एक सोलापूर स्पिनिंग अँड विविंग मिल म्हणजे जुनी गिरणी पहिल्यांदा बंद पडली ती अनेक वेळा बंद पडत होती पण 64 स*** पूर्ण बंद झाली खूप आंदोलन झाली चळवळी झाल्या माणसं 50 दिवस उपोषणाला बसली लोक भाबडे आणि गरीब होते आणि नेते लबाड होते आपलीच गिरणी बंद पाडून स्वस्तात विकत घेणारे मुरारका यांना मदत करून आपलं उखळ पांढरं करून घेणारे नेतेही होते. बघता बघता एक एक गिरणी बंद पडत गेली सोलापूर बेकारीच्या खाईत गेलं… मधले अनेक वर्ष सोलापूरचा विकास थंड झाला… त्याला कारण उद्योग नाही!आजही फरशा उद्योगाची निर्मिती नाहीच आहे…

असो एकेकाळी चारच्या भोंग्याला उठणारे गाव निवांत म्हणून ओळखलं जाऊ लागलं याचं वाईट वाटतं डोळ्यात फक्त समाधानी होण्याचं स्वप्न घेऊन झोपणारा सोलापूरकर गिरणी बंद पडल्यानंतर ना सुखी झाला ना समाधानी राहिला. मधल्या एका पिढीच्या अफाट संघर्षानंतर गिरणगाव ही ओळख संपत आली तिथे काम करणारे आणि गिरणीवर अवलंबून असलेली गिरणीच्या पगारावर मोठी झालेली आणि गिरण्या बंद झाल्यानंतर होरपळून निघालेली तीआमची पिढी आता संपत आली. आता सोलापूर नवनविन उद्योगाने पुन्हा भरारी घेत आहे. चांगले नेते मिळाले तर कदाचित सोलापूरला हे पुनर्वैभव प्राप्त होईल. दुर्दैव हे आहे की आम्हाला मतदानापुरतं वापरलं जातं असो तो आजचा विषय नाही. आता सोलापुरात पगार एक तारखेला होतात विविध चांगल्या वाईट उद्योगातून सोलापूरकर मुलांच्या खिशात पैसे खुळखुळत आहेत तरुणांनी आपापले छोटे छोटे उद्योग शोधले आहेत माणसं पोट भरत आहेत काहीनी पुणे मुंबई जवळ केली तरीही सोलापूरची लोकसंख्या वाढली दोन तीन लाख वस्तीचं गाव बारा लाख वस्तीत रूपांतरित झाले. खूप चांगले बदल झालेत पण दहा तारखेची ती मजा ते पेट्रोल मॅक्स च्या गाडीतले हिरवे पिवळे कागद गुंडाळलेले लाडू जिलबी शेव चिवडा त्याच्या त्या गाड्या… भरगच्च भरलेली भजनी मंडळी हे सारं सार आजही डोळ्यासमोर येतं आणि दर दहा तारखेला वर्तमानपत्राच्या पुड्यात खाऊ बांधून आनंदाने आपल्या लेकरांसाठी हातात घेऊन येणारा बाप डोळ्यासमोर दिसतो… फार छान होते दिवस… सुखाचे नसतील पण समाधान मात्र होते कॅलेंडर वरची दहा तारीख पाहताना आजही गाणं तोंडावर येतं…

‘खुश आहे जमाना आज दसवी तारीख है…!’

©  शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted