उज्ज्वला केळकर
☆ साठा उत्तराची कहाणी… ☆ उज्ज्वला केळकर ☆
श्रावणातला मनोहारी निसर्ग बघून बालकवी म्हणतात, ‘श्रावण मासी हर्ष मानसी. ’ श्रावणात, केवळ लेखक कवींनाच हर्ष होतो, असे नाही, तर जनसामान्यांच्याही मनात हर्ष दाटून येतो. त्याचं कारण, या महिन्यात अनेक सण, समारंभ, उत्सव येतात. रोजच्या दैनंदिन जीवनातील चाकोरीपेक्षा, काही वेगळं करताना, नवा उत्साह, नवचैतन्य, नवी उर्जा निर्माण होते.
माझ्या लहानपणी मी या सण-समारंभाच्या कहाण्या माझ्या आजीला वाचून दाखवायची. उदा. नागपंचमीची, दिव्याच्या आवसेची, जीवतीची, शीळासप्तमीची. याशिवाय प्रत्येक दिवसाची कहाणी असे. मला वाचायला त्या खूप आवडत. बाहेरच्या सारखे गूढ, अद्भूत वातावरण कहाणीत असे. त्या मनोरंजकही होत्या, तशाच बोधप्रदही असत. प्रत्येक कहाणीतील कथा वेगळी. त्यांची सुरुवात असे, एक आटपाट नगर होतं. तिथे एक गरीब ब्राह्मण. किंवा एक राजा होता. मग त्या कथेत एक वसा सांगितलेला असे. म्हणजे वागण्याचा नियम. वसा करणार्याला सुख मिळे. तो मोडणार्याला दु:ख, संकटे भोगावी लागत. आशा किती तरी कहाण्या. प्रत्येक कहाणीची कथा वेगळी, पण प्रत्येक कहाणीचा शेवट असे, ही साठा उत्तराची कहाणी. पाचा उत्तरी सुफळ सपूर्ण. कहाणी कोणतीही असो, तिचा शेवट याच वाक्याने होत असे.
त्यावेळी मी आजीला विचारायची, ही ‘साठा उत्तराची कहाणी. पाचा उत्तरी सुफळ सपूर्ण’ म्हणजे काय? तिला काही सांगता आले नाही. त्यानंतर मी मोठी होत गेले. खूप काही ऐकलं, वाचलं, पण ‘साठा उत्तरीचं कोडं काही सुटलं नाही. अनेक भाषेच्या अभ्यासकांना, विचारवंतांना, संशोधकांना विचारलं, पण मला काही समाधानकारक उत्तर मिळालं नाही.
शेवटी एक प्रयत्न म्हणून गुगल बाबाला विचारले. त्यांनी सांगितले, ‘साठा उत्तरी म्हणजे, साठ उतारे असलेली कहाणी म्हणजे कथा. ’. ती पाचा उत्तरी म्हणजे, ’ पाच उतार्यात सांगितली. ’ म्हणजे मोठ्ठी लांबलचक कहाणी, थोडक्यात… पाच उतार्यात सांगितली.
‘पाचा उत्तरी सुफळ सपूर्ण’ म्हणजे मोठ्ठी कहाणी ऐकून जे पुण्य, फळ लाभेल, ते, ही थोडक्यात सांगितलेली कहाणी ऐकूनही लाभेल. तोच तत्त्वबोध लहान कहाणी ऐकूनही होईल.
लोक हो, मला हे पटलं. तुम्हाला ते पटतय का, बघा!
© उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





