मंजुषा सुनीत मुळे

? विविधा ?

संध्येच्या उंबरठ्यावर… ☆ मंजुषा सुनीत मुळे 

उंबरठा… सीमारेषेसारखी एक स्पष्ट आणि तरीही ओढाळ रेष.. ही रेष ओलांडून बाहेर जातांनाही मनाला एक नि:शब्द ओढ लावते आणि ओलांडून आत येतांनाही ओढच लावते.. म्हणून ती ‘ओढाळ’… दोन्ही वेळा अशी ओढ लावणाऱ्या मनातल्या भावना जरी वेगळ्या असल्या तरी ओढ तीच असते.. म्हणूनच उंबरठा ही खरोखरच एक ओढाळ रेष…

आणि ही उंबरठ्याची ओढ फक्त माणसालाच असते असं नाही.. तर निसर्गालाही असतेच असते.. आणि ती माणसाने आदर्श घ्यावा अशीच असते..

आता सूर्याचंच उदाहरण घ्या ना! ‘ कधी एकदा रात्र संपते आणि मी तिच्या घराचा उंबरठा ओलांडतो याचीच फार घाई असते त्याला.. आणि मग ऊर्जेची उधळण करणारा सूर्य एकदाचा आकाशात आगमन करतो.. दिवसभर चालत रहातो. त्याच्याही वाटेत अडथळे असतातच की – – कधी राक्षसासारख्या काळ्याभोर ढगांचे.. कधी जणू त्याला चक्क अडवून धोधो कोसळणाऱ्या पावसाचे.. पण म्हणून तो वैतागत नाही.. थांबत नाही.. आणि चालत राहतो पुन्हा रात्रीच्याच उंबरठ्याच्या दिशेने.. पण असं परतत असतांना त्याला ना दु:ख असतं ना खंत, कारण असं परतणंही त्याने मनापासून स्वीकारलेलं असतं.. म्हणूनच तर भा. रा. तांब्यांसारखे संवेदनशील कवी त्या मावळत्या सूर्याला बघून म्हणतात.. ”अर्घ्य तुज जोडुनी दोन्ही करा. ”. परततांनाही तितक्याच शांतपणे.. निर्लेपपणे तो जातो म्हणून त्याला ‘ समदर्शी ‘ अशी उपमा देतात… आणि म्हणूनच रात्रीचा.. पहाटेचा.. सकाळचा.. दुपारचा.. संध्याकाळचा असे सगळे उंबरठे तो रोज तितक्याच उत्साहाने आणि मनापासून पार करतो.

– – प्रत्येक माणूसही त्या सूर्यासारखाच आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर असे उंबरठे ओलांडत असतो. आपले काम संपल्यावर अगदी अलिप्तपणाने सहज मावळतीला जाणाऱ्या त्या सूर्याकडून माणसाने हा अलिप्तपणा शिकण्यासारखा. आपल्यालाही संध्यासमयी परतायचंच आहे याचं भान आपल्या कर्तृत्वाच्या धुंदीत रमताना ठेवायलाच हवं.

माणसाच्या आयुष्यात त्याला खुणावत असणाऱ्या उंबरठ्यांबद्दल बोलायचं तर – – –

पहिले बरेच उंबरे कुतुहलाने.. उत्सुकतेने.. उत्साहाने ओलांडण्याची जणू घाईच झालेली असते… आणि तो ओलांडून बाहेर गेल्यावर परत तोच उंबरठा ओलांडून आत येण्याचीही घाईच… पण हे सगळे उंबरठे असा परतून येण्याचा आनंद देतात तो शिशु अवस्थेत.. बाल्यावस्थेत.. कुमारवयात…आणि ‘ विद्यार्थी ‘ या भूमिकेत असेपर्यंत… स्वतःच स्वतःच्या सर्वांगीण क्षमतेची ओळख करून घेईपर्यंत…

… मग एकदा का हा तरुणपणाचा उंबरठा ओलांडत बाहेरच्या जगात पाऊल टाकलं की ती रम्य सुखद सकाळ त्या उंबरठ्याच्या आत सुखरूप.. आणि माणूस बाहेरच्या तापलेल्या आणि बहुशः रखरखीत अशा दुपारसारख्या व्यवहारी.. हिशोबी जगात पाऊल टाकतो. सुरुवातीला सगळं काही नवीन असल्याने उत्साह.. उमेद.. कुतूहल.. आणि स्वतः कमावत असल्याचा.. ‘ आता मी कुणावरही अवलंबून नाही ‘ याचा अभिमानमिश्रित आनंद असतो. मग हळूहळू चटके जाणवायला लागतात.. पण म्हणून आता लगेच परत फिरून येणं शक्य नसतं. ही आयुष्याची दुपार.. मग ज्या वाटेने चालायचं आहे ती वाट स्वतःला आवडणारी असो वा दुसरी वाट दिसत नाही म्हणून स्वीकारलेली असो… अटळ म्हणावी अशी … ही वाट म्हणजे शरीरावरचा आणि त्याहीपेक्षा मनावरचा ताण वाढवणारी.. बरेचदा दुसरा पर्याय नाही म्हणून आणि बरेचदा अहंकाराच्या पोटी … किंवा स्पर्धा जिंकण्याच्या इर्षेपोटी मग स्वतःच स्वतःच्या डोक्यावर घेतलेली ओझी पेलत नसतांनाही पाय ओढत चालायला भाग पाडणारी…

… पण उमेदीचं एकेक वर्ष संपत जातं आणि हळूहळू नकळत ही दुपार कलंडायला लागते.. पाय थकल्याची जाणीव व्हायला लागते.. शरीरावर त्याच्या खुणा दिसायला लागतात. आणि आता हे धावणं पुरे असं मनापासून वाटायला लागतं….

… आणि खुणावायला लागतो तो संध्याकाळचा उंबरठा. नकळत त्याची ओढ वाटायला लागते … आणि माणूस इतक्या वर्षांच्या कामाच्या रहाटगाडग्यातून एकदाचा बाहेर पडतो.. निवृत्त होतो.

…  हा उंबरठा मात्र कितीही ओढ लावत असला.. आकर्षक वाटत असला.. तरी मनाला बुचकळ्यात टाकणारा. रोजची उरस्फोड आता संपणार हे माहित असूनही एकीकडे याचा आनंद आणि एकीकडे एक अनामिक हुरहूर अशी मनाची द्विधावस्था करणारा आणि अशावेळी माणसाची मजा बघायला जणू उत्सुक असणारा हा उंबरठा…

या उंबरठ्याशी पोहोचणं.. तो ओलांडणं.. ही गोष्ट आनंद आणि समाधान देणारी असते, की विनाकारण अस्वस्थ चिडचिड करायला लावणारी असते हे मात्र माणसागणिक बदलणारं गणित – – हे गणित काहीजण सहजपणाने सोडवून टाकतात.. आणि काहीजण मात्र स्वतःच ते इतकं किचकट करून टाकतात की आयुष्यच ओलांडून जायची वेळ आली तरी त्यांना हे गणित सोडवता येत नाही.

– – हा उंबरा ओलांडतांना आयुष्याचा रंगमंच फिरता आहे हे प्रकर्षाने जाणवतं… मंचही बदललेला आणि रंगही हळूहळू पण नक्कीच बदलायला लागलेले.. प्रत्येकाची भूमिकाही about turn केल्यासारखी बदललेली… म्हणजे माणसाची घरातली आधीची भूमिका बरीच वेगळी आणि ठळक होते.. आधीचा रंगमंच दृष्टीआड झालेला असतो… घरातले सदस्य त्यांच्याही नकळत त्याच माणसाला आता वेगळ्या भूमिकेसाठी गृहीत धरायला लागतात.. आणि इथेच आयुष्याची संध्याकाळ जराशी गडद होऊन स्पष्टपणे खुणावायला लागते.

– – अनेक महत्वाच्या गोष्टी मनाला समजावण्याची ही वेळ. कालपर्यंत मिळत असलेला मान.. आदर खुर्चीमुळे मिळालेला होता हे कटू सत्य पचवणं तसं जडच जात असतं. तारेवरची कसरत करण्याची सवय असलेले पाय आता ती कसरत संपल्यावर कुठे वळवावेत हा संभ्रम पडलेला असतो. घड्याळाची बांधिलकी संपल्याने बरं तर वाटत असतं.. पण आता इतका रिकामा वेळ हातात आहे त्याचं काय करायचं हे नेमकं ठरवणं सतत बुचकळ्यात टाकत असतं… सारंच कसं निवांत.. बऱ्याचदा हा ध्येय नसणारा निवांतपणा.. किंवा हे रिकामपण अस्वस्थता.. चिडचिड आणणारं असतं..

पण अशावेळी सगळ्या सृष्टीलाच खुणावणारे संध्येचे प्रसन्न शांत रंग आवर्जून बघायला हवेत.. समजून घ्यायला हवेत. या रंगांमध्ये कुठलीच दाहक छटा नसते हे एकदा लक्षात घेतले की अस्वस्थ मनही शांत व्हायला हवे.. अगदी प्रयत्नपूर्वक ते शांत ठेवणे जमायला हवे……

“श्यामरंगी रंगे जशी ही सृष्टी आतुरतेने..

तन मन मम जणू तीच आर्तता.. बहर तू होऊन ये … “

… असं जर आयुष्याच्या संध्येला विनवता आलं तर ही संध्याकाळही वेगळ्या आणि सौम्य असूनही फार सुखद अशा रंगांमध्ये नक्कीच आनंदी आणि बहारदार होऊ शकते यात शंकाच नाही … आणि अशावेळी मदतीला येतात ते … अनेक वर्षं मनात नाईलाजाने दडपून ठेवावे लागलेले आपले छंद.. नंतर बघू म्हणून मनाच्या कोपऱ्यात ढकलून ठेवलेल्या कितीतरी आवडीनिवडी.. आयुष्यभर कुठल्याही परिस्थितीत आपल्याला साथ देत आलेल्या आपल्या जोडीदाराची आणि आपणही नाईलाजाने नजरेआड केलेली कितीतरी स्वप्ने पूर्ण करण्याची मनात जपलेली आस – – – आयुष्याची संध्याकाळ मजेत आणि मनाजोगती साजरी करण्यासाठी अनेक वर्षं जतन करून ठेवलेले हे खजिने उघडले की दुपारी अभावितपणे अनुभवलेला आयुष्यातला व्यावहारिक कोरडेपणा.. रखरखीतपणा.. नकळत विस्मरणात जायला लागतो. आत्तापर्यंत इतरांबद्दल मनात सांभाळून ठेवलेली कटुता.. तेढ.. द्वेष.. वैर.. अशी मनात साठवलेली अडगळ अजिबातच गरजेची नाही हे मनापासून जाणवलं तर मग अशी अडगळ नकळत मनातून बाहेर टाकली जाते आणि मन लहान मुलांसारखं स्वच्छ आणि हलकं व्हायला लागतं. मित्रांबरोबर कट्ट्यावर मारल्या जाणाऱ्या एरवी फुटकळ वाटणाऱ्या गप्पाही मन ताजंतवानं ठेवायला पुरतात…एखादी लहानशी ट्रीपही मन टवटवीत करून टाकते. स्वतःचं आवडतं गाणं बेसूर म्हणतांनाही मनाला स्वच्छंदपणाचा आगळा आनंद देऊन जातं.. कारण आता फक्त स्वतःसाठी जगायचं आहे ही भावना मनात ठसवता येणं जमवता येतं.. आणि ही संधी आयुष्याच्या संध्येच्या उंबरठ्यावर मनापासून उभं राहिलं तरच मिळते … अनेक वर्षं कळतनकळत किंवा जाणीवपूर्वकही जपलेली ताठर मानसिकता बदलण्याची ही सुवर्णसंधी या उंबरठ्यावर पोहोचल्यावरच मिळते…हो.. पण कुणी सल्ले मागितले तरच द्यावेत ही शहाणी समज मात्र इथे यायला हवी. महत्वाचं म्हणजे कुटुंबासोबत रहातांना आवश्यक ती उदासीनता किंवा अलिप्तता अंगी बाळगता यायलाच हवी.

– – या संदर्भात माऊलींनी भावार्थ दीपिकेत ज्ञानी माणसाचे सुंदर समर्पक वर्णन केले आहे की –

असा माणूस “ गोरुवें बैसली । रुखातळीं । “ असं समजून वागतो.. याचा एक अर्थ असा की संसार हा झाडाखाली बसलेल्या गुरांप्रमाणे क्षणिक वाटसरूसारखा असतो.. झाड त्यांना सावली देते.. खाद्य देते.. पण स्वतः मात्र निरपेक्षपणाने अलिप्त रहाते.. सूज्ञ माणसाने हेच लक्षात घ्यावे आणि संसाराबद्दल.. विशेषतः आपल्या मुलाबाळांबद्दल त्या झाडासारखे अलिप्त रहाण्यास शिकावे.

– – या उंबऱ्याआडून डोकावणाऱ्या आणि चिंतेत पाडणाऱ्याही काही गोष्टी नक्कीच असतात.. जसे की नियमित उत्पन्न बंद होणे किंवा बरेच कमी होणे … इतकी वर्षं शांतपणे सहकार्य करणारे शरीर वेगवेगळ्या प्रकारे कुरकुर करायला लागणे इ… पण या गोष्टी आधीपासून गृहीत धरून, त्यासाठी विचारपूर्वक आणि डोळसपणे योग्य ती तजवीज करण्याचा धोरणीपणा आधीच्या उंबरठ्यापासूनच दाखवण्याची दूरदृष्टी असणाऱ्यांना हे त्रास खूपच सुसह्य करणे अशक्य अजिबात नाही.

… या टप्प्यावर आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे स्वतःची वृत्ती आणि विचार जाणीवपूर्वक सकारात्मक ठेवणे.. सकारात्मकता हे फक्त आजारांवरचेच नाही तर इतर अनेक समस्यांवरचे एक अतिशय प्रभावी औषध आहे, ज्यामुळे भरकटणारे दु:खद आणि त्रासदायक विचार मनात टिकूच शकत नाहीत … आणि मग संध्याकाळचे जरा फिकुटलेले पण शांत.. सौम्य रंग मनापासून आवडायला लागतात.

– मग हे सगळे सखेसोबती आपणहून सोबत घेऊन संध्येच्या उंबरठ्यावर उभं असतांना समोर दिसेल तो फक्त एक आगळा ताजा आनंद.. अंतर्बाह्य शांतता … आणि आयुष्य सार्थकी लागल्याचे अनमोल समाधान…

 

© मंजुषा सुनीत मुळे

सांगली 

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
1
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
सौ.ज्योती कुळकर्णी.
0

खूप सुंदर लेख मंजूषा ताई