श्री कौस्तुभ परांजपे
विविधा
☆ “यमुनोत्री…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆
हा खरंतर आमच्या केदारनाथ यात्रेचा पहिला टप्पा. अगोदर लिहिलेल्या केदारनाथ यात्रेचा पूर्वार्ध. यमुनोत्री यात्रेत घोडेबाजार सह रस्ता, पायी, घोड्यावर, पीट्टू, आणि डोली ने प्रवास कसा होतो हे पाहण्याचा सगळा अनुभव पहिल्यांदा आला. आणि काहीप्रमाणात पुढील केदारनाथ प्रवास कसा असेल याची थोडीफार जाणीव झाली ती याच प्रवासात. पण जाणीव असणं आणि प्रत्यक्ष परिस्थिती, यात काहिवेळा प्रत्यक्ष परिस्थिती थोडी बिकट असते असा अनुभव येतो. तो मात्र केदारनाथलाच आला.
एखाद्या पैसे गुंतवण्याच्या जाहिरातीत जसं काही जोखीम किंवा आर्थिक धोका असणार्या काही गोष्टी पटापट सांगीतल्या तर जातात, पण आपल्याला त्या नीट कळत नाहीत. तसाच काहीसा प्रकार यमुनोत्री आणि केदारनाथ प्रवासात जाणवला.
यमुनोत्री यात्रेत केदारनाथ यात्रेची कल्पना आली असली तरी ती फक्त चुणूक होती. कारण या यात्रेचा प्रवास छोटासाच होता. अंतर जास्त नव्हतं. वातावरण बदलाचा प्रभाव तेव्हढा नव्हता. आणि पायी, घोडा, किंवा डोलीच्या प्रवासाच्या अगोदर आणि नंतर पायी चालण्याचा प्रसंग आला नाही.
पण घोड्यावर बसण्याचा त्रास लक्षात आला तो इथेच. आम्ही घोडे करायचे ठरवल्यावर त्या घोडेवाल्यांना आपलाच घोडा घेऊन आपल्यालाच पैसे मिळावेत याची इतकी घाई झाली की आमच्यापैकी दिसेल त्याला, बाई आणि माणूस यांना उचलून घोड्यावर बसवायची स्पर्धाच सुरु झाली आहे असं वाटलं.
मी वर जावं की नाही. जायचच असल्यास घोडा करावा की डोली. याचा विचार करण्याअगोदरच चारपाच जणांनी जमेल तसं उचलून एखाद पोतं चढवून त्याला हलवून नीट कराव तसं समोर असलेल्या घोड्यावर मला चढवलं सुध्दा. त्यातही पहीला प्रयत्न थोडा असफल झाल्यावर माझ्या शरीराकडे आणि हालचालींकडे पाहून एक त्यातल्यात्यात कमी उंचीचा घोडा आणला.
यावेळी मला दहीहंडी उत्सवाची आठवण झाली. फक्त तिथे पहिला प्रयत्न असफल झाल्यावर दुसरा संघ येतो. पण लक्ष्य तेवढंच उंच असतं. इथे मला घोड्यावर चढवणारा संघ त्याच घोडेवाल्यांचा होता. पण कमी उंचीचा घोडा आणून गोंविंदाला (मला) कमी उंचावर चढवलं जाणार होतं. यात मी मात्र कदाचित मनातल्यामनात खऱ्या गोंविंदाचा धावा केला असावा.
या सगळ्या गदारोळात आमच्यापैकी दोन तीन जणांना याच पध्दतीने घोड्यावर चढवलं सुध्दा होतं. असा प्रसंग अगोदर आला नसल्याने जवळपास प्रत्येकाच्या तोंडातून कमी अधीक प्रमाणात, वेगवेगळे आवाज निघाले होते. या आवाजात भिती, किंचाळणं, सवय नसणं, या प्रकारे उचलतील याचा अंदाज नसणं याचे संमिश्र भाव होते. मला त्रास झाल्याने माझ्या तोंडातून आवाज येत नव्हता, तर मला घोड्यावर बसायचंच नाही म्हणून मी चक्क ओरडत होतो. पण ते ऐकणार कोण……. कारण सगळ्यांच्याच बाजूला घोडे आणि घोडेवाले यांचीच गर्दी.
मी घोड्यावरुन काहिही करून खाली उतरण्यासाठी धडपडत होतो. आणि आलेलं गिर्हाईक जाऊनये याचा खटाटोप घोडेवाले करत होते. यात थोडा गोंधळ झाला. पण या सगळ्या गोंधळात एकच जण त्यातल्यात्यात शांत होता….. तो म्हणजे घोडा…….
म्हणजे माणसं घोड्यासारखी आणि घोडा माणसासारखा वागत होता…….
मी अगदी थोडावेळच घोड्यावर होतो. पण तेवढ्या अल्पकाळात माझ्या नजरेसमोर घोड्यावर बसून, हातात तलवार घेऊन, ती घोड्यांबरोबर चालवणारे मावळे. आणि पाठीशी लहान मुलाला बांधून मेरी झांसी नही दूंगी असं ठणकावून सांगणारी झाशीची राणी येऊन गेले. आणि मनातल्यामनात त्यांची माफी मागत. तडफेने घोड्यावरुन पायउतार झालो.
राजकारणात पायउतार व्हाव यासाठी खटाटोप असतो. तर इथे मी पायउतार होवूनये म्हणून प्रयत्न सुरु होते. पण शेवटी विजय माझाच झाला असलातरी आता काय करावं?……. या विचारात घोडेवाले आणि माझ्या बायकोसह ज्यांनी मला बरोबर नेले होते ते सगळेच मान खाली घालून वीचार करत होते. शेवटी तुुम्ही सगळे जा…… मी यमुनोत्रीच दर्शन घेतलं नाही तरी चालेल….. या विचारावर माझा प्रवास थांबला आणि इतरांचा सुरु झाला.
यांच्या पूर्ण प्रवासाला दोनतीन तासांचा कालावधी अपेक्षीत होता. पण जेमतेम अर्धाच तास झाला असेल. माझ्या बायकोच्या सांगण्यावरून परत एक सहकारी कुलकर्णी यांचा फोन…….. काय विचार करताय….. परत केव्हा येणार आहोत…. करा हिंमत….. डोली करा पाहिजेतर……. आम्ही रस्त्यात, नाहीतर वर थांबतो, वाट बघतो.
मग काय?……. माझ्या अंगात परत एकदा झाशीची राणी, आणि मावळे यांच स्फुरण चढलं. फक्त चढाईसाठी घोड्याएवजी डोली वापरावी असा निर्णय माझाच झाला. (कधीतरी मी एकटासुध्दा धाडसी आणि ठोस निर्णय घेऊ शकतो. यामुळे आत्मविश्वास वाढला.) आणि परत आमच्या चारचाकीच्या सारथ्याला सोबत घेत मी एक डोली ठरवून त्यात त्याच डोलीवाल्यांच्या साहाय्याने अगदी पेशवाई थाटात नाही, पण पाय जमतील तसे जवळ लांब करत वीराजमान झालो. सुदैवाने वातावरण चांगले होते.
मी वीराजमान झाल्यावर आमचा प्रवास सुरु झाल्याची वार्ता उलट टपाली भ्रमणध्वनी द्वारे पाठवण्याची काळजी मीच घेतली. ती पोहोचेपर्यंत त्यांचा गड सर होत आला होता. त्यांच्यासाठी ही आनंदी वार्ता होती. बायको जवळ त्या वेळी तिथे साखर असती तर कदाचित तीने त्या बसल्या घोड्यावरुनच साखर वाटायचा आनंदही घेतला असता. पण तो योग नव्हता.
मी सुखरुप वर पोहोचलो. आमची मंडळी आणि सोबतचे सहकारी यांची भेट झाली. आणि यमुनोत्री दर्शन व परतीचा प्रवास सुखरुप झाला.
या वेळी एक गोष्ट घडली ती आमचे सहकारी नंदेश परदेशी यांनी लक्षात आणली. बर्याचशा सिनेमात लग्नाची द्रृश्य आवर्जून दाखवली जातात. या सगळ्या सोहळ्यात नयनरम्य द्रृश्य असतात. असच नयनरम्य द्रृश्य आमच्या या प्रवासात पण होतं. फक्त सिनेमात वर हा घोड्यावर असतो. आणि वधू डोलीत असते. आमचा लग्न सोहळा कधीच पार पडला होता. पण आज माझी बायको घोड्यावर स्वार होती. आणि मी मात्र डोलीत होतो. आज खर्या गोष्टीला क्रूतीची साथ होती. आणि साक्ष होती यमुनोत्री.
आजच नाही तर आजच्या आधीच्या इतर प्रवासातच काय….. बाहेर जातांना सुध्दा खर्या अर्थाने ती पुढाकार घेत असते, आणि मी त्यातल्यात्यात सुरक्षित आणि कमी खडतर मार्ग माझा असतो, आणि खडतर तिचा. पण आज ते घोडा आणि डोली या प्रवासात जाणवलं.
© श्री कौस्तुभ परांजपे
मो 9579032601
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈





लेखनाची शैली आवडली. असेच लिहित रहा, वाचायला आवडेल. विश्वास दाते.