डॉ. धनंजय देशपांडे
इंद्रधनुष्य
☆ कर्जात बुडालेला “मेरा नाम जोकर” ☆ डॉ. धनंजय देशपांडे ☆
कर्जात बुडालेला “मेरा नाम जोकर”
– – आणि जिद्दीने लढणारा राजकपूर !
आजवरच्या प्रवासात म्युजिक शो प्रोड्युसर, इव्हेंट मॅनेजर, अँकर, पत्रकारिता अशा विविध टप्प्यावरून आलो. त्यात अनुभवलेल्या पडद्यामागच्या काही अनोख्या किश्यांची ही सिरीज….
‘बजाज’ची एक नवीन दुचाकी लॉन्च होणार होती, त्याबद्दल मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये प्रेस पार्टी ठेवलेली. त्याचे निमंत्रण असल्याने अस्मादिक तिथं ! हॉलमध्ये गेलो…. तर समोर प्रसिद्ध लेखक व तत्कालीन पत्रकार साक्षात शिरीष कणेकर ! अर्थात आमची पूर्वीपासून पत्रमैत्री होतीच…. मात्र भेट अशी पहिलीच. मात्र मला पाहाताच शिरीषराव त्यांच्या खास स्टाईलमध्ये म्हणाले, “आओ मेहेरबान…. हुजूर आते आते बहोत देर कर दी”
आणि मग तिथल्या स्थानिक पत्रकारांना माझी ओळख करून दिली…. तेव्हाचे एक वाक्य अद्याप लक्षात आहे. ते म्हणाले, “लंबी रेस का ये घोडा है…. लिख के रखना”
प्रेस कॉन्फरन्स संपली आणि नंतर ते म्हणाले, “थांबणारे की निघणार लगेच पुण्याला ?” मी म्हटलं ” असं काही फिक्स नाही”
तर म्हणाले, “आताशी बारा वाजलेत. इथलं जेवण काही खास नाही…. आपण बाहेर जाऊ…. गप्पा मारू निवांत, संध्याकाळी जा मग तू पुण्याला”
मी नकार कशाला देतोय.
आणि मग ताजच्याच गल्लीत walking distance वर त्यांचे एक नेहमीचे हॉटेल ठिय्याचे स्थळ होते, तिथं त्यांचे दोन मित्र, ते व मी असे गेलो. आणि साडेबाराला सुरु झालेली मैफिल चक्क संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चालली ! अविस्मरणीय ते क्षण ! तर त्या मैफलीत मी हळूच त्यांना आठवण करून देत म्हणालो, “मेरा नाम जोकर” बद्दल जरा वेगळं सांगणार होता तुम्ही… पत्रात प्रॉमिस केलं होत…. “
यावर त्यांची एकदम कळी खुलली आणि त्यांनी एकसे एक असे किस्से सांगितले…. त्यातले मोजके आज सांगतोय….
सिनेमा तर अनेकजण बनवतात. मात्र “ग्रेटेस्ट शो मॅन” हा जनसन्मान फक्त राजकपूर याना लाभला. कारण त्यांना सगळं काही भव्य दिव्यच बनवायचं असायचं. त्यात कधीही त्यांनी तडजोड केली नाही. प्रसंगी प्रचंड अपयश सोसलं पण हार मानली नाही.
त्यांच्या आयुष्यात आधी “संगम” सिनेमा आला जो सुपर डुपर हिट आणि भरपूर कमाई करून देणारा ठरला. मात्र त्यानंतर काही काळाने आलेला “मेरा नाम जोकर” हा मात्र सुरुवातीला सुपर फ्लॉप ठरला…… इतका की राजकपूर रस्त्यावर येण्याची वेळ आली.
१९७० मध्ये प्रदर्शित झालेल्या त्याच सिनेमाची हि चित्तरकथा….
‘बहुरूपिया’ सिनेमा जो डब्यात गेला…
संगम नंतर राजकपूर यांचा ‘बहुरूपिया’ सिनेमा जुळवाजुळवी सुरु होऊन वैजयंती मालासह शुटिंगही झाले. मात्र मधेच काही कारणाने ते सगळं बंद करावं लागलं आणि तो सिनेमा डबाबंद झाला. यातून बाहेर पडण्यासाठी राजकपूर यांना एका सुपरहिट सिनेमाची गरज होती. आणि त्यांनी “मेरा जाम जोकर” ची जुळणी सुरु केली. त्याकाळातील हा पहिलाच मल्टी स्टारर सिनेमा होता. एकेका हिरोचे त्याकाळी कैक सिनेमा हिट जात होते अन या सगळ्यांना “मेरा नाम जोकर”साठी एकत्र आणण्याची कमाल राजजी यांनी केली. सिम्मी गरेवाल, पद्मिनी, एक रशियन हिरोईन, मनोजकुमार, दारा सिंह, धर्मेंद्र अशी तगडी स्टारकास्ट फायनल झाली. ख्वाजा अहमद अब्बास यांच्यावर लेखनाची जबाबदारी दिली गेली. मात्र तीन टप्प्यात तीन हिरोईन सॊबत कथानक पुढं सरकत जाताना ते इतकं लांबत गेलं की चक्क २५५ मिनिटांची स्टोरी झाली. संगम प्रमाणेच राजजी यांनी या सिनेमाला दोन इन्टर्वल ठेवले. कारण सुमारे सव्वा चार तासाचा हा सिनेमा झाला होता. हाही फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक विक्रमच आहे जो आजवर जगाच्या पाठीवर कुणी मोडू शकला नाही, असं सांगितलं जात.
सहा वर्षांची मेहनत…
लोकेशन पासून ड्रेपरीपर्यंत सर्वच भव्य दिव्य करायच्या ध्यासातून हा सिनेमा शूट पूर्ण व्हायला चक्क सहा वर्ष लागली. राजजी कोणत्याच बाबतीत तडजोड करायला तयार नव्हते. या सिनेमासाठी जणू त्यांनी आपलं सर्वस्व पणाला लावले होते. इतकं की, त्यांचा आर के स्टुडिओ त्यांनी गिरवी ठेवून कर्ज काढलं होत. तरी नंतर पैसे कमी पडू लागल्यावर स्वतःचे राहते घर त्यांनी गिरवी ठेवले पण शूटिंग सुरु ठेवलं.
बोल्ड सीनचे धाडस…
तसेही राजजी यांच्या सिनेमात एखादा तरी छोटासा बोल्ड सीन असतोच. मात्र “मेरा नाम…. ” मध्ये त्यांनी दोन दोन बोल्ड सीन शूट केले. कमी वयातला ऋषी कपूर (ज्याने मोठ्या राजची लहानपणाची भूमिका केलेली) तो शिक्षिका सिम्मी च्या प्रेमात पडतो. त्याच आकर्षणातून सिम्मी एका शेतात कपडे बदलायला जाते तेव्हा तिला ऋषी चोरून पाहतानाचा सिन शूट करण्यात आला.
आणि दुसरा सीन म्हणजे… यात पद्मिनी हिरोईन असली तरी जोकरच्या आयुष्यात ती “मिनू” नावाचा मुलगा बनून येते. मुलांचेच कपडे ती घालत असते. मात्र एका झटापटीच्या सीनमध्ये तिचा शर्ट फाटतो अन काही सेकंद राज तिच्याकडे पाहत थक्क होतात की हा मुलगा नसून मुलगी आहे हे सिद्ध होणारा तो बोल्ड सीन !! पद्मिनीने देखील मोठ्या हिमतीने तो सीन शूट केला. असं म्हणतात की या दोन्ही सीनसाठी राजजी यांनी दोन्ही हिरोईनला ऑकवर्ड वाटू नये म्हणून इतर बाकी सगळ्या कामगारांना दूर ठेवून मोजकेच चार पाच लोक घेऊन शूट केलं होत.
खरेतर या सिनेमात पद्मिनीच्या आधी वैजयंतीमालाच भूमिका करणार होती मात्र तिने याच बोल्ड सीनला नकार दिला आणि सिनेमा सोडला. राजजी यांनीही मग फेवरीट असूनही तिला बाजूला करून पद्मिनीला घेतलं.
सुरुवातीलाच दणका बसला…
मोठ्या गाजावाजात रिलीज झालेला हा “मेरा नाम…. ” पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर कोसळला. त्याकाळात यासाठी लाखों रुपये ओतले होते, गाणीही सुंदर झाली होती. पण का कोण जाणे सिनेमा फ्लॉप ठरला. कदाचित त्यावेळी पब्लिकला सव्वाचार तासाचा सिनेमा हेच डायजेस्ट झालं नसाव. मात्र त्यामुळे राजजी यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले. पण गंमत म्हणजे हाच सिनेमा नंतर दहा वर्षांनी री-रिलीज करण्यात आला तेव्हा मात्र तोच सिनेमा सुपरहिट झाला. “जिना यहा मरना यहा” हे जणू राजजी याचेच जीवनगीत बनले. आजही राजकपूर म्हटलं की पहिल्या दोन सिनेमात याच “मेरा नाम…. “चे नाव घेतलं जात. अर्थात डोक्यावर आधी झालेले कर्ज उतारण्यासाठी राजजी यांनी लगेचच अत्यंत कमी बजेटमधला पण तरुणाईला आवडेल असा “बॉबी” सिनेमा करायला घेतला. ज्यातून ऋषी कपुरची खऱ्या अर्थाने बॉलिवूडमध्ये एंट्री झाली. आणि डिम्पल कपाडियाची पण ! त्यावेळी ती पंधरा वर्षाची होती. बॉबी इतका हिट गेला की त्याच्या कमाईतून राजजी यांनी आपलं सगळं कर्ज तर फेडलच शिवाय नवीन एक घरही घेतलं.
असे होते जिद्दी राजजी !
धर्मेंद्रला राजजीनी दिलेला झटका
“मेरा नाम…. ” मध्ये भलेही राजकपूर सिनेमातील जोकरचे काम करत त्या सर्कसचा मालक दाखवलाय धर्मेंद्र ! मात्र शूटिंग सेटवर उलट चित्र असायचं. तिथं बॉस राजजीच असायचे. शूटिंग दरम्यान एकदा राजजी धर्मेंद्रवर असे काही भडकले की बास ! झालं असं की, खरेतर स्वतः राजकपूर मद्यप्रिय…. शौकीन !! मात्र सेटवर मद्याला पूर्णपणे बंदी त्यांनी घातली होती. एकेदिवशी सेटवर कोपऱ्यातल्या एका बेंचवर धर्मेंद्र “टाईट” होऊन पडलेला राजजींना दिसला. त्यावर राजजी यांनी त्याला गदागदा हलवून जागे केले आणि जाम खरडपट्टी काढली. धर्मेंद्र खाड्कन जागा झाला आणि सरळ राजजीच्या पायावर पडून माफी मागितली. आणि त्यानंतर सेटवर कधीच धर्मेंद्र त्या वाटेला गेला नाही !
राजकुमार आणि राजकपूर यांच्यातील शाब्दिक चकमक
“मेरा नाम, … ” मध्ये शेवटी एक गाणे आहे ज्यामध्ये फिल्म इंडस्ट्रीमधले अनेक नामवंत झलक दाखवून जातात. त्याला “कैमियो” असं म्हणतात. तर यामध्ये राजकुमार यांनी पण काम करावे असं राजजी याना वाटले. यासाठी “मेरा नाम, … “मधील त्या कॅमियो मध्ये सर्कसच्या एका जादूगाराचा रोल ऑफर केला. त्यावर राजकुमार यांनी निरोप पाठवला की, “जर तुमच्या सिनेमात मी हवा असेल तर असे छुटपूट रोल नको, . माझ्या लेव्हलचा असा एखादा रोल असेल तर सांगा आणि नसेल तर क्रिएट करा… मग पाहू”
यावर राजजी मनोमन प्रचंड संतापले होते. मात्र त्यावेळी ते राग गिळून शांत बसले. नंतर प्रेम चोप्रा यांच्या बड्डे पार्टीत या दोघांची गाठ पडली. त्यावेळी राजजी थोडे एन्जॉयच्या मूडमध्ये मस्त “रंगले” होते. आणि नेमकं त्यावेळी त्यांच्यासमोर राजकुमार आले. हे पाहताच मागचा अपमान आठवून राजजी तिथं थेट मोठ्याने बोलले…. “आ गया ब्लडी मर्डरर”
झालं असं होत की, राजकुमार हिरो होण्याआधी पोलीस अधिकारी म्हणून काम करत असताना त्यांच्यावर एका खुनाचा आरोप होता…. त्याकाळी ते खूप गाजलेलं प्रकरण होत, त्याचा संदर्भ घेत राजजीनि त्यांना मर्डरर…. असं म्हणत उट्टे काढले.
त्यावर राजकुमारने यांनीही पलटवार करत म्हटले की, “भुखा मर जाऊंगा लेकिन तुम्हारे पास कभी नही आऊंगा…. पहले फिल्म बनाना सीख लो…. “
आणि “मेरा नाम, … ” सुरुवातीला फ्लॉप झाल्याचे जाहीर झाल्यावर राजकुमार चुटकी वाजवत म्हणाला होता, “राज कपूर को फिल्म मेकिंग का कोर्स कर लेना चाहिये”
असं हे शाब्दिक युद्ध त्याकाळी अनेक फिल्मी मॅगझीन मध्ये झळकले !
आणि आठवणींची राख झाली., ….
साल 2017 मध्ये आरके स्टुडिओला आग लागली आणि त्यात “मेरा नाम, … “मध्ये वापरलेल्या अनेक वस्तू, ड्रेस जळून खाक झाले. त्यातच राजजी याचा तो फेमस झालेला जोकरचा ड्रेस आणि मास्क पण जळून गेला. आणि उरल्या मागे फक्त त्याच्या आठवणी !!
तर असा हा एकंदरीत बऱ्याच उलथापालथी घडवणारा “मेरा नाम, … ” सिनेमा ! आजही इतक्या वर्षांनंतर त्याची मोहिनी (विशेषतः त्याच्या गाण्याची मोहिनी) अनेकांच्या मनावर गारुड करतेय…. यात सगळं आलं.
डॉ. डीडी क्लास : एखादा माणूस इतका मोठा जेव्हा होतो त्याआधी त्याला काय काय सोसावं लागलेलं असतं, त्याच्या ध्यासासाठी घरदार गहाण ठेवावं लागलेलं असत आणि तरी फ्लॉपचा शिक्का बसल्यावर खचून न जाता पुन्हा जनमानसाची नाडी ओळखून बॉबी सारखा लो बजेट सिनेमा तयार करून तो हिट करून त्यातून मागचे नुकसान भरून काढायचे असते, हेच यातून शिकायला मिळते. तसेच “मेरा नाम, … ” जेव्हा दहा वर्षांनी पुन्हा री-रिलीज केला गेला तेव्हा मात्र जबरदस्त धंदा करून गेला जितका पहिल्या वेळी झाला नव्हता. याचा दुसरा अर्थ असा काढला जातो की, राजजीचा “मेरा नाम, … “सिनेमा जगाच्या दहा वर्ष आधीच आला त्यामुळे तो लोकांना पचला नाही. म्हणजेच काय तर…. काळाच्या पुढे जाऊन विचार करण्याची क्षमता असणारे असे हे राजजी म्हणूनच ग्रेट आहेत. उगीच नाही त्यांना “ग्रेटेस्ट शो मॅन” म्हणत !! पन्नाशी क्रॉस आमच्यासारख्या अनेकांच्या तरुण जीवनात राजजी यांनीच तर मोरपंखी आनंदाचा पिसारा फुलवला होता…. त्याकाळात संगम सिनेमातील “बोल राधा बोल संगम होगा के नही” हे केवळ गाणे राहिले नव्हते तर अनेक तरुणाचे ते जणू तरुणींसाठी “प्रपोज करण्याची ओळ” झाली होती. यात सगळं आलं !
रियली… राजजी ने सही मायने मे इंडस्ट्रीपे राज किया !! हॅट्स ऑफ !!
अशा या कलाकारांना मनोमन दंडवत !
तर अशी हि चित्तरकथा !
कशी वाटली…. आवर्जून सांगा !
—
© डॉ. धनंजय देशपांडे (dd)
(सायबर सिक्युरिटी तज्ञ, चित्रकार, लेखक, समुपदेशक, निवेदक)
मो न. ९४२२३०४३४४
1) Global Cyber Crime Helpline National Award winner
2) Digital Hero of the year National Award winner
3) HOD: Cyber Awareness Foundation, Maharashtra State
4) Mentor: Pune University (SPPU), CANADA and UK
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





