सौ राधिका -माजगावकर- पंडित
जीवनरंग
☆ ‘फुंकर…’ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆
आंघोळ करून आल्यावर कुंकू लावतांना तिचा हात थरथरला. ‘आता हे सौभाग्य लेणं म्हणजे… ‘तिला कापरं भरलं. डोळ्यांची तळी तुडुंब भरली. डॉक्टर म्हणाले होते, “फार हाल होताहेत तुमच्या मिस्टरांचे. त्यांचे हाल देवालाही बघवत नाहीयेत. माझ्याकडून मी प्रयत्न करतोच आहे पण.. बाकी सगळं त्या वरच्याच्या हातात आहे. ” डॉक्टरच ते! स्पष्ट सांगणं त्यांचं काम होतं, पण ते शब्द तिच्या कानात शिसासारखे ओतले गेले. तिच्या पायाखालची जमीनच सरकली.
एकांतात ती खूप खूप रडली. पण मुलांकरीता तिने उसनं चंद्रबळ आणलं होतं. एकांतात तिचा बांध फुटायचा, भीषण भविष्याने तिचे हातपाय गळून जायचे. पण सगळ्यांसमोर अश्रू लपवून वरवर अभिनयाचा मुखवटा चढवावाच लागायचा.
दिवस जात होते. भाद्रपद आला. गौराईचा दिवस उगवला. तिच्या मनात काय आलं कोण जाणे, लगबगीने तिने गौरी समोर पांच सुवासिनींची ओटी भरली. ‘गौरायांनो दर वर्षी अशीच संधी, असाच सवाष्णीचा मान मला द्या. मला न्या, पण ह्यांचं आयुष्य वाढू द्या”.
आलेल्या पाचजणींनी मळवट भरून तिची साडी चोळीने ओटी भरली होती. आणि तो मळवट बघून कसे कोण जाणे तिच्या मिस्टरांच्या तोंडून शब्द बाहेर पडले, ते म्हणाले, “तु अशीच रहा. ”
पण… पण…. व्हायचं तेच झालं. दुर्दैवाने तिला मागे सोडून 58 वर्षाची साथ सोडून तिला पोरकं करून ते पुढे गेले. दुर्दैव तिचं.
दरवर्षीप्रमाणे तिला माहेरचं सवाष्णीचं बोलावणं भाचेसुने कडून आलं. मनातली खळबळ सांगायला मैत्रिणीसारखी वहिनी पण आता नव्हती. ती पण मैत्रीची साथ सोडून न परतणाऱ्या मार्गावर गेली होती. गौरीचं सवाष्णीचं आमंत्रण द्यायला आलेल्या भाचे सुनेला तिने दाटल्या कंठाने सांगितलं, “हे बघ, आता तू दुसरी सवाष्ण बघ. मी ही अशी ” —
तिला मध्येच अडवत भाचे सून म्हणाली, “आत्या, कोण म्हणतं तुम्ही सवाष्ण नाही, काकांनी तुम्हाला आहे तसं राह्यला सांगितलं होतं, मुलांनी पण मंगळसूत्र ठेवण्याचा आग्रह धरलाय, आणि हो काकांच्या आठवणींचं लेणं हे तुमच्यासाठी सौभाग्य लेणंच आहे नाही का! ते काही नाही, आमचा सगळ्यांचा हट्ट आहे दर वर्षी प्रमाणे माहेरवाशिण म्हणून सवाष्णीचा तुमचा मान चालूच राहणार आहे.
आणि आज गौराईचा प्रसाद घेऊन ती निघाली. हळदी कुंकवाला बायका आल्या होत्या. तिला कुंकू लावतांना एक जण कुजबुजली, “अगं पण आत्या तर…. ” दुसरीने तिला मध्येच दटावलं, पण ते वाक्य ऐकल्यावर ती कावरी बावरी झाली. सकाळपासून गप्पगप्पच होती ती.
भाचेसून हळदी कुंकवाचा करंडा घेऊन तिच्या पुढे उभी राहिली, आणि म्हणाली, “आत्त्या पदर पुढे करा, खणा नारळानी ओटी भरायचीय तुमची. “
क्षणभर ती गांगरली. डोळे पाणावले. कानाशी तिच्या ह्यांचा आवाज आला, ‘कसला विचार करतेस?मी सांगितलं होतं ना तुला, तू आहेस तशीच सवाष्ण म्हणूनच रहाणार आहेस. आणि आता तर नातेवाईकांनी, समाजानी पण ते मान्य केलय. आणि अगं वेडे, तुझ्या मनात, तुझ्याबरोबर तर कायम मी आहेच की. माझ्या आठवणींना, प्रेमाला सौभाग्य लेणंच म्हणायचं. ते तर कायम तुझ्याजवळ असणारच आहे. घे ती ओटी. ‘
आणि मग भाचे सुनेने पुढे केलेली ओटी घेण्यासाठी तिने पदराची झोळी केली. ताटकळलेली सून लगबगीने पुढे झाली.
आधुनिक पिढीने पाडलेला तो नवीन पायंडा होता. समाजाने मांडलेल्या जुन्या विचारांना मागे सारून नवीन विचारांची ती मांडणी होती. इतकंच काय, सुनेच्या भगिनी मंडळांनी पण ही प्रथा सुरू केली होती. काही दिवसापूर्वी त्या मंडळाच्या सहवासात तिने हे अनुभवलंही होतं. खरंच त्यांच्या ह्या आधुनिक विचारांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. मनात प्रचंड पोकळी निर्माण झालेल्या एकटेपणाच्या भावनेने व्याकुळ झालेल्या दुःखी मनाला तो एक दिलासाच होता असंच म्हणावं लागेल नाही का!
आत्त्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या भाच्याच्या चेहऱ्यावर आत्त्याने परिस्थिती स्विकारली म्हणून समाधानाची रेषा उमटली. कारण आत्याच्या उतरलेल्या चेहऱ्याकडे बघून तोही कावराबावरा झाला होता. प्रसंग वरकरणी साधा पण काळजाला हात घालणारा होता. तिच्या जखमी मनावर घातलेली ती ‘फुंकर’ होती. तिच्या मनात आलं, ह्या जवळच्या माणसांकरीता तरी आहे ते वास्तव आपल्याला स्वीकारायला हवंय, आलेल्या परिस्थितीला सामोरं जायला हवं.
…. गौराईच्या चेहऱ्यावर हसू उमटल्याचा, श्रीगणेशाचा आशिर्वादाचा हात उंचावल्याचा तिला भास झाला आणि ती माहेरवाशीण गौरीपुढे नमस्कारासाठी वाकली.
© सौ राधिका -माजगावकर- पंडित
पुणे – 51
मो. 8451027554
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




