श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ जय वाल्मिकी तुज हे तर्पण … ☆ श्री दिवाकर बुरसे

जय मृत्युंजय जय कविभूषण
जय वाल्मीकी तुज हे तर्पण
तव चरणीं सर्वस्व समर्पण!

©️ दिवाकर बुरसे, पुणे

आज अश्विन पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा आणि… आदिकवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती

जगातील सर्वाधिक लोकप्रिय, अजरामर आद्य महाकाव्य ‘रामायणा’चे रचयिता आद्य महाकवी महर्षी वाल्मिकी !ज्यांच्यामुळे प्रत्येक हिंदु भारतियाच्या श्वासा-श्वासात राम रुजला ते वाल्मिकी! ज्यांच्यामुळे सामान्यांना आपल्या जीवनात ‘राम वाटू लागला’ ते वाल्मिकी! भारतीय काव्यसृष्टीला अनुपम असा ‘अनुष्टप् छंद’ अर्पण करणारे असे महर्षी वाल्मिकी ! आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे पुण्यस्मरण आणि त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन !

जन्म:
महर्षी वाल्मिकींचा जन्म त्रेतायुगात अश्विन मासाच्या पौर्णिमेला झाला. पौराणिक मान्यतेनुसार भगवान वरुण देवाच्या दहा पुत्रांपैकी एक पुत्र ‘प्रचेता’ आणि त्याची पत्नी ‘चार्षणी’ यांच्या पोटी त्यांचा झाला. अनेक ठिकाणी त्यांना ‘प्रचेतस पुत्र’ असेही संबोधले गेले आहे. अन्य काही पुराणांनुसार ते ब्राह्मण कुलातील होते. त्यांचे नाव ‘रत्नाकर’ होते.

जन्मग्राम व बालपण
पौराणिक कथेनुसार महर्षी वाल्मिकींचे जन्मग्राम महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील ‘वालझरी’ मानले जाते. दुसरी मान्यता अशी की, पुरंदर तालुक्यात पालखी मार्गावर ‘ वाल्हे ‘ नावाने एक गाव लागते. काहींच्या मते महर्षी वाल्मिकींचा जन्म या गावी झाला. या गावात त्यांचे एक मंदीरही आहे.

बालपणीच त्यांचे एका भिल्ल स्त्रीने अपहरण केले. तिनेच त्यांचे संगोपन, पालनपोषण केले. त्या समाजात त्यांना ‘वाल्या’ किंवा ‘वाल्या कोळी’ म्हणून ओळखले जाऊ लागले. मोठा झाल्यावर तो वाल्या चोऱ्यामाऱ्या, वाटमाऱ्या, दरोडेखोरी करू लागला. पुढे देवर्षि नारदांच्या कृपेने आणि ऋषींमुनींच्या संगतीत नामस्मरण आणि योगसाधना केल्यामुळे त्यांच्या जीवनात अमुलाग्र परिवर्तन झाले.

नारदानुग्रह व तप:श्चर्या
नारदमुनिंच्या मार्गदर्शनाखाली त्याने राम नामाचा जप सुरू केला. प्रदीर्घ जपसाधनेने त्यांचा जीवनप्रवाह पूर्णपणे बदलला. साधनाकाळात त्यांनी दीर्मकांच्या (वाळवी ) घरात तपश्चर्या केली. कालांतराने त्यांच्याभोवती वारूळ तयार झाले. वाल्मीक म्हणजे वारुळ. वारुळातून प्रकटले म्हणून त्यांना “वाल्मीकी” नाव मिळाले. खडतर तपश्चर्येने त्यांनी संपूर्ण आत्मशुद्धी प्राप्ती केली.

रामायणाची रचना

पुढे नारदांच्या सांगण्यावरून त्यांनी संस्कृतमध्ये रामायण हे महाकाव्य रचले. प्रभु रामचंद्रांनी सीतेचा त्याग केल्यानंतर त्यांनी त्या वनवासी सीतेला आपल्या आश्रमात आश्रय दिला. लव-कुश यांचा जन्म त्यांच्याच आश्रमातच झाला. यथावकाश महर्षींनी लवकुशांना रामकथा शिकविली.

रामायणाविषयी अल्प
महर्षी वाल्मीकि हे संस्कृत भाषेतील आदिकवी मानले जातात. त्यांची प्रमुख रचना म्हणजे “रामायण”. रामायण हे प्रभु रामचंद्रांच्या जीवनावर आधारित महाकाव्य आहे. मर्यादा आणि धर्म याचे आदर्श चित्रण त्या काव्यात केले आहे.

वाल्मिकी रामायणमध्ये सुमारे २४, ००० श्लोक असून हे सात कांडांमध्ये म्हणजे खंडांमध्ये विभागलेले आहे. या सात कांडांची नावे आणि त्यांचे विषय खालीलप्रमाणे आहेत:-

१) बालकांड
रामाचा जन्म, बालपण, अयोध्येतील रामाचे जीवन, विश्वामित्रांनी रामाला राक्षसांपासून संरक्षणासाठी वनात नेणे, सीता स्वयंवराची घटना या कांडात आहे.

२) अयोध्याकांड
कैकेयीच्या हट्टामुळे रामाला वनवासाला जावे लागणे, दशरथाचा मृत्यू, रामाचे वनवासासाठी प्रयाण, भरताच्या भेटीचा प्रसंग यात आहे.

३) अरण्यकांड
रामाचे वनवासातील जीवन, रावणाकडून सीतेचे अपहरण, जटायूचे आत्मार्पण, ऋषिमुनिंच्या आश्रमांचे संरक्षण यांचे वर्णन.

४) किष्किंधाकांड
रामाचे किष्किंधा नगरीत, वानर राजसत्तेत आगमन, सुग्रीव आणि हनुमान यांचा सहयोग, वाली निर्दलन, वानर सेनेकडून सीतेच्या शोध मोहिमेचा आरंभ.

५) सुंदरकांड
हनुमानाचे लंकेला जाणे, अशोकवाटिकेत सीतेस भेटणे, लंकादहन, रामाला लंकेची व सीता स्थानबद्ध असलेल्या स्थानाची माहिती देणे.

सुंदरकांडला ‘सुंदर’ असे नाव देण्याचे मुख्य कारण असे की या कांडात राम नाही तर हनुमान हे मुख्य पात्र आहे. त्याची नि:स्वार्थ भक्ती, शौर्य, पराक्रम आणि प्रेम यांचे सुंदर वर्णन महर्षींनी केले आहे. वाल्मिकी यांनी हनुमानाला लाडाने ‘सुंदर’ म्हणून संबोधले आहे. त्या कथेतील प्रत्येक घटक, म्हणजे राम, सीता आणि हनुमान यांचे सर्व गुण आणि त्यांची कथा अत्यंत मनोहर आणि सुंदर असल्यामुळे ‘सुंदरकांड’ असे नाव ठेवले आहे.

श्रीलंकेतील अशोक वाटिका, तिच्या भोवतालची ‘सुंदर पर्वतराजी’ ज्या ठिकाणी हनुमानाने सीतेचा शोध घेतला, तिथे त्याने केलेले पराक्रम, लंकादहन, अशा क्रियाकलापांनाही ‘सुंदर’ या नावाशी जोडले आहे. त्यामुळे कांडाचे नामकरण ‘सुंदर’ असे केले आहे. ‘सुंदरकांड’ हे रामायणातील एकमेव असे कांड आहे ज्यात हनुमान हा मुख्य नायक आहे. तो ह्या साऱ्याच कथानकात भक्ति आणि वीरता यांचा सुंदर रंग भरतो. हनुमानाच्या भक्तीतील सुंदरता, त्यांच्या साहसांचा गौरव आणि अशोक वाटिकेच्या परिसराचा संदर्भ यामुळे या कांडाला ‘सुंदरकांड’ असे समर्पक नाव दिले गेले आहे.

६) युद्धकांड
राम आणि रावण यांच्यातील युद्ध, कुंभकर्ण, मेघनाद, रावणाचा वध, रामाचे अयोध्येकडे परतणे आणि राज्याभिषेक.

७) उत्तरकांड

रामाने लोकनिंदेमुळे सीतेचा त्याग करणे, लव-कुश यांचा जन्म, रामाचा अश्वमेध यज्ञ, त्यानंतरची कथा आणि रामावताराची समाप्ती

महर्षींनी हे महाकाव्य लिहून भारतीय संस्कृती, कर्तव्यपरायण जीवन आणि मानवतेचे संदेश दिले आहेत. रामायणाने भारतीय संस्कृतीवर अमिट ठसा उमटवला आहे.

महर्षींची अवतारसमाप्ती
महर्षी वाल्मीकी यांची अवतारसमाप्ती म्हणजे त्यांच्या मृत्यूविषयी मात्र स्पष्ट माहिती उपलब्ध नाही.

वाल्मिकींची प्रतिभा त्यांच्या काव्यगुणवैशिष्ठ्यांमुळे अतुलनीय ठरली आहे. त्यांनी ‘रामायण’ महाकाव्य रचून भारतीय काव्यसंपदेला अमर केले आहे.

काव्याची वैशिष्ठ्ये
त्यांच्या काव्यातील मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे सर्जनशीलता, उत्तुंग कल्पनाशक्ती, रसरशीत, जिवंत वर्णनशैली, सहजता व नैसर्गिकतेचा संगम आणि चरित्रप्रधान कथाकथन. वाल्मिकींचे काव्य मानवी भावभावनांनी संपन्न असून त्यांनी प्रत्येक पात्राची मनोवृत्ती, मानसिक अवस्था प्रभावीपणे मांडलेली आहे. त्यांची भाषा साधी, सोपी, प्रवाही व प्रभावशाली आहे. त्यामुळे त्यांचे काव्य सहजाकलनीय झाले आहे.

वाल्मिकींची प्रतिभा केवळ रचनेत नाही तर त्यांनी सामाजिक, धार्मिक, नैतिक, आणि मानवतेची मूल्येही प्रकट केली आहेत. त्यांच्या काव्यशैलीत वर्णन आणि संवादांचे उत्कृष्ट संतुलन आहे. रामायणामध्ये निसर्गाचे, नात्यांचे, धर्माचे गूढ दर्शन होत असून त्याचा प्रभाव संपूर्ण काव्यावर दिसतो.

सारांश, वाल्मिकींची उत्तुंग प्रतिभा अद्वितीय काव्यनिर्मिती आणि कल्पनाशक्तीत आहे. त्यांच्या काव्यात जिवंत वर्णने, भावभावना, साधी पण प्रभावी भाषा यांचे एकत्रीकरण दिसते. रामायण सामाजिक, धार्मिक आणि नैतिक मूल्यांचा प्रखर संदेश देणारे महाकाव्य आहे. हे काव्य शास्त्र व ललित काव्याच्या संमिश्रतेने ओतप्रोत भरलेले आहे. ही सारी वैशिष्ट्ये वाल्मिकींच्या अत्युच्च प्रतिभेचा, काव्यसिद्धीचा परिचय करुन देतात. वरील सर्व काव्यगुणवैशिष्ठ्यांमुळे रामायण अनेक शतके भारतीय आणि जागतिक साहित्याच्या शिखरावरील एक अमर ग्रंथ मानले जाते.

काव्यशैली विषयी

वाल्मिकींच्या काव्यशैलीची मुख्य वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे:-

वाल्मिकी रामायणातील काव्य अतुलनीय आणि अलौकिक आहे. त्यामध्ये समास, संधी, विभक्ती यांसारख्या संस्कृत काव्यनियमांचे काटकोर पालन केलेले आहे. त्यात समता म्हणजे प्रकर्षादि दोषांचा अभाव, माधुर्य, प्रसाद, सुबोधता यांचे सामर्थ्य स्पष्ट दिसते. त्यांच्या काव्याचा प्रमुख रस ‘कारुण्य’ हा आहे. या महाकाव्याचा उद्गमच मुळी काममोहित क्रौंच मिथुनातील नर क्रौंचाच्या वधाच्या करूण दृश्यामुळे झाला आहे! खेरीज शृंगार, हास्य, रौद्र, भयानक, वीर आणि शांत या इतर रसांचे देखील संतुलित दर्शन रामायणात होते.

संपूर्ण काव्य श्लोकात्मक, अनुष्टपछंदोबद्ध असून ते विलक्षण गेय आहे. त्याच्या वाचनाने रसिक मनाला सात्विक सौंदर्याचे दर्शन होऊन परमानंद प्राप्त होतो.

वर्णनशैली अतिशय सजीव, सुसंगत असून, निसर्ग, ऋतू, व्यक्ती, नगररचना व सामाजिक जीवनाचे बारकावे यांचे सुंदर चित्रण केलेले आहे. (उदा. अयोध्या नगराचे तपशिलवार वर्णन)

काव्यात चमत्कृती किंवा अतर्क्य अतिशयोक्ती नसून, रामायण एक मानवी गाथा म्हणून प्रामाणिकपणे मांडलेली आहे. रामायण हा जीवन मार्गदर्शक आणि तत्वज्ञानात्मक ग्रंथ सुद्धा आहे. वाल्मिकींच्या काव्यशैलीमध्ये नैतिकता, धर्माचरण, मनुष्य जीवनातील सत्य आणि कर्तव्य यांचे निर्देश मोठ्या प्रकर्शाने दिसतात.

हे काव्य अत्यंत प्रभावी आणि भावप्रधान असून, प्रत्येक पात्राची मनोवृत्ती आणि भावनांचे सखोल दर्शन घडवते. ही सारी वैशिष्ट्ये वाल्मिकींच्या काव्यशैलीला शास्त्रशुद्धतेसह लालित्य प्रदान करतात. त्यामुळेच रामायणाला जनमानसात ‘सदाबहार महाकाव्य’ म्हणून अग्रस्थान प्राप्त झाले आहे

जगभरातील अनेक भाषांमध्ये रामायणाची भाषांतरे झाली आहेत. ज्ञान प्रबोधिनीच्या संकलनामध्ये १९७७ रामायणांच्या आवृत्त्या वेगवेगळ्या भाषांमध्ये असल्याचे आढळते. यामध्ये भारतातील विविध प्रादेशिक भाषा उदा. बंगाली, तमिळ, तेलुगू, कन्नड, असमिया, मराठी, हिंदी, संस्कृत, उर्दू, फारसी तसेच फार मोठ्या प्रमाणात अन्य आंतरराष्ट्रीय भाषातून झाली आहेत. अनेक आशियायी भाषा जसे की जपानी, थाई, चिनी, तिबेटी, इंडोनेशियन, फ्रेंच, जर्मन, रशियन, इत्यादी भाषांमध्ये सुद्धा झाली आहेत.

*समारोप*
अशा या महान, रामचरित्रावर महाकाव्य निर्मिणाऱ्या आद्यकवी महर्षि वाल्मिकींना कोटी कोटी प्रणाम!

॥ श्रीराम जय राम जय जय राम ॥

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted