डॉ. माधुरी जोशी

? मनमंजुषेतून ?

☆ Memory? नाही.. नाही… “आठवण”!!!  – भाग – १ डॉ. माधुरी जोशी 

काहींना वाटेल.. हे काय?  सेम तर शब्द आहेत. फक्त भाषा वेगळ्या वेगळ्या….. पण मला नाही तसं वाटंत.. इतर भाषांमधल्या उत्तम साहित्याचे अनुवाद आपण वाचतो… पण ते “भाषांतर”नाही.. “रूपांतर”हवं… प्रत्येक भाषेचा लहेजा, सांगणं वेगळं असतं… ते केवळ पर्यायी शब्दांनी दुसऱ्या भाषेत त्याच feelings नी उमटेलच असं नाही. आणि इथेच मला memory आणि आठवण यात फरक वाटतो… मला तरी memory शब्द स्मरणाशी, तपशीलाशी, नोंदीशी कोरडा बांधलेला वाटतो. Mechanical वाटतो जरा… पण “आठवण” मात्र ह्रदयाशी, मनाशी जोडलेली खूप जपून ठेवलेली वाटते. अर्थात काहींना पटेल काहींना नाही… पण मला तरी दोन्हीत भावनिक अंतर वाटतं… नवीन तंत्रज्ञानात तर मेमरी फुल होऊ शकते… मशीन सांगतं तसं… काही तरी डिलीट करायला लावतं… ते जातंच मग…. पण आठवणींचं तसं नाही… त्या अंतिम क्षणापर्यंत सोबत असतात… नवनवीन साठंत राहतात… खोल मनाच्या गाभ्यात. सुखरूप.. सुखद… दु:खद… सुकून देणाऱ्या… अस्वस्थही…. मुलायम अन् यातनामय पण… सुरेल… बेसूर.. त्यांना डिलीटचा पर्यायच नाही… असतातच सोबत..

प्रत्येकासारखं माझंही आयुष्य चढ ऊतारांचं, सुखदुःखांचं, यश अपयशांचं…. पण ती सारी यादी बाजुला सारून मी फक्त माझ्या सुरेल प्रवासातल्या अशा “आठवणी” सांगणार आहे ज्या फक्त ” माझ्या “आहेत. त्यांनी ज्ञान, दिशा, उत्तुंग आनंद, भाग्य दिलं…. महान कलाकारांचं दर्शन घडवलं… लोकहो, लेख जरा मोठा आहे कारण ती माणसंच फार मोठी….. पण आजवरच्या अनुभवावरून वाचाल… जरूर वाचा!!!

तर पहिली “आठवण”अर्थातच पहिल्या सुरेल टप्प्यावरची… आदरणीय पिंपळखरे गुरूजींची…. अनेक वर्ष रागरागिण्यात रमलेले सर.. आम्हा कित्येक शिष्यांना त्या सुरेल राजरस्त्यावरून सहज, कसलाही आव, अहं न आणता नेणारे… अत्यंत सुरेल सुंदर डिझाईन्सनी सजलेले राग, स्वर रस्ते, सहजपणे गायकीतून पोहोचलेलं राग शास्त्र, अनेक बंदिशी, रागरूपं, ताना, आलापी… सगळ्यांनी ते त्या ८×१० च्या खोलीचा स्वरमहाल करून टाकत अगदी…..

अशीच एक संध्याकाळ.. सर पौडहून शाळेतून सायकल हापसत थकून आलेले… फक्त कपभर गरम चहा एवढीच मागणी… मी पोहोचले होते. समोर भिंतीवर ८/१०चादरी एकावर एक ठेवून केलेलं आसन.. टेकायला तक्क्या… समोर तानपुरा घेऊन शिकायला उत्सुक मी… उजव्या हाताला एक कॉट… डाव्या हाताला बाईंचं स्वैपाकघर… अत्यंत छोट्याशा जागेची ही रचना, नेपथ्य… अगदी सामान्य, साधं, बेताचं….

त्या दिवशी सरांनी कलावती राग शिकवायला घेतला… साग… सागप… गपगसा… नि्धसा… गप धनि् धप… गप.. गध.. गनि् धप गपधनि्सां…. मंद्र, मध्य, तार सप्तकं सजत होती. विलंबित ख्याल कलावतीचं अंतरंग उलगडंत होता… अजून संध्याकाळचा कलता ऊजेड होता… तासभर तरी त्या मिंड, ते स्वरगुच्छ, गंधार पंचमाचं मैत्र, कोमल निषादाची आळवणी.. परत पंचमावर विश्राम… अहाहा!! काय सुंदर रस्ते… काय सुंदर कलावतीचं सांगणं, रिषभ मध्यमा शिवायही सजणारं ते ओडव रूप…. सर खरंतर ग्वाल्हेर गायकीतले… ते तर शुद्ध, ताकदीचं गाणं….. पण सर काहीतरी वेगळंच शिकवंत, रंगवंत, नटवंत असंत… कुठून आलं हे त्यांच्याकडे?  हा वेगळा विचार, भाव… असे अनेक राग आम्ही शिकत होतो… मांडत होतो… कौतुक होत होतं….. पण त्या दिवशीचा कलावती काही औरच होता… आजवर आठवणीत दाटलेला.. मनात, “माझ्या”ह्रदयात सतत “आठवणींची सूर संगत”….

त्या खोलीत फक्त एक पिवळा बल्ब असे. दिवेलागणीला लागणारा…. पण त्या रंगतदार कलावतीत जाणीवंच झाली नाही दिवेलागणीची… सरांच्या घराचं दार सदैव उघडं असे.. दिवा लागलाच नव्हता कारण जणू कलावतीचाच प्रकाश होता खोलीत… त्या दिवशी बराच उशीर झाला म्हणून वडील न्यायला आले. ते आमच्यामधून जाऊन कॉटवर बसले… बऱ्याच वेळानं तो अद्भुत स्वर पिसारा मिटला आणि लक्षात आलं दिवाच लावला नाही… तंबोरी आडवी ठेवून मी उठले… दिवा लावला… समोर आप्पा.. माझे वडील… बापरे!!!म्हणजे खूपच उशीर झाला. मुकाट्यानं घरी निघाले. वाटेत संवाद नाही. घाबरले. त्यांचा गाण्याला जरा विरोध होता. वाटलं उद्यापासून गाणं संपलं बहुतेक… एक चौक ओलांडला.. आप्पा म्हणाले, ” हे काय गात होतात”?  हे अनपेक्षित होतं.. मी म्हंटलं, “कलावती नावाचा राग”.. ते म्हणाले, “इतकं सुंदर असतं गाणं?  तुम्ही इतकं रंगून गात होतात… मी आलेलं कळलं पण नाही… ध्यान लागणं यापेक्षा वेगळं काय असतं?  यापुढे तुला अडवणार नाही.. तू शीक.. गा…. तू इतकं सुंदर गातेस हेही मला माहितीच नव्हतं” हे सारं मला खूप, खूप, खूपच सुखद होतं. विशेष म्हणजे सरांच्या कलावतीच्या गायकीनं ते काम केलं होतं…. कुणी तरी सांगितलं म्हणून घडलं नव्हतं…..

आजवर तो कलावती, ती सुरेल दिवेलागणी, आप्पांची परवानगी शाब्बासकी.. सगळं सगळं आहे “आठवणीत” “मनात” “हृदयात”फक्त…. “माझं”

त्यावेळी झालेल्या गाण्याच्या गानवर्धनच्या कार्यक्रमाला पंडिता रोहिणी भाटे… बेबीताई अध्यक्ष होत्या. त्या दिवशी रागेश्री पण सुंदर रंगला. त्यांना गाणं खूप आवडलं. ‌‌कथक नृत्याला साथ करायला त्यांनी बोलावलं. त्या वसंतरावांच्या, लच्छू महाराजजींच्या शिष्या होत्या. अशा विद्वान, झोकून काम करणाऱ्या कलावती बरोबर काम करणं हे गौरवाचं होतं आणि खूप काही शिकण्यासारखं असणार होतं. मग नृत्य भारती, मी आणि बेबीताई असा प्रवास सुरू झाला. लयकारीत बुडालेले वेगळं संगीताचं रूप… मराठी, ब्रज, अवधी, हिंदी संस्कृत भाषांशी जवळीक असणारं… अनेक रसांशी नातं असणारं… तालांमधे रमणारं… वंदनेतून देवदेवतांचं दर्शन घडवणारं…. अनेक रचना अनेक रूपं…. मी नोकरी करत असे त्यामुळे काही शिकायला, प्रॅक्टिसला मी शाळेच्या आधी घरातलं सगळं आवरून नऊ साडेनऊला पोहोचे…. साडेअकराला शाळेसाठी निघावंच लागे… पूना कॉफी हाऊसच्या मागच्या जिन्यात त्यांच्या मंद, शांत सेंटचा सुगंध तरंगत असे… म्हणजे आल्या आहेत ही खूण… वेळ पाळणं, जपणं, सांभाळणं हे तर त्यांचं खास वैशिष्ट्य…. कधी उशीर नाहीच. वर हॉलच्या खिडक्या उघडून, नादमय घुंगरू बांधून, मेट्रोनोम लावून, त्या मधल्या फरशीवर रियाज सुरू झालेला असे. हाताची घडी घालून, मंद रंगसंगतीच्या पोशाखातल्या बेबीताईंचं लयीशी ध्यान लागलेलं असे. नगमा धरण्याइतपंत हार्मोनियम मी वाजवु लागले की बारीक हासरे डोळे उघडून त्या गोड हासंत. फक्त त्या, मी, दिन की पूरियाचा लाडका नगमा आणि टकटक लयबद्ध मेट्रोनोम.. एवढंच हॉलमध्ये… किती भाग्यवान मी… त्या रियाजाची साक्षी.. संगतकार, श्रोता, रसिक, अभ्यासक, दर्शक…. सर्वकाही….

अध्यात्मातले लोक सात्विक तेज आभा, प्रभा, ऑरा जे जे काय मानतात, म्हणतात ते मला जाणवायचं… हे काहीतरी वेगळं आहे, उत्तुंग आहे, मधुर आहे… ते तेज खोलीभर पसरलंय… जिथे ततकार चाललाय ती दगडाची फरशी सुद्धा मऊशार भासायची… ती “चपत”.. ते घुंगरू, ते वजनदार तरी हळुवार काम…. सारं सारं जाणवायचं. अभिनयाची भावपूर्ण ताकद… सजणाऱ्या देखण्या संगीत रचना… किती, काय त्यांनी शिकवलं, गाऊन घेतलं, सूचना केल्या, दिशा दाखवल्या.. शास्त्रीय संगीतातल्या पण श्रीमंत दागिन्यांसारख्या रचना… त्यांचे स्वर, शब्द, कोरिओग्राफी बघत ऐकत मी समोर आश्चर्यचकित… दिग्मुढ…. हे काय रसायन आहे?  या इतक्या अशा बहुमिती, बहुआयामी!!माझं भाग्य म्हणून मी त्यांच्या संगीताचा भाग झाले. थोडी ना थोडकी २५ वर्षं… खूप कार्यक्रम, दौरे, कौतुकं… पण त्या सकाळच्या रियाजाची श्रीमंती फक्त “माझी”… “एकटीची”…….

आता ती इमारत नाही… हॉल नाही… ततकारानं पावन झालेली फरशी नाही.. तो जिन्यातला रेंगाळलेला सुगंध नाही…. पण माझ्या आठवणीत, डोळ्यात, मनात, कानात…. सगळं सेफ लॉकरसारखं जपलंय…. आठवणींची सोनेरी किल्ली लावली की सारा खजिना समोर… “फक्त माझा. “. “माझ्या आठवणींचा”……

 कथक नृत्याशी पत्रिकेचा कोणता तरी ग्रह बांधलाच गेला असावा… कथकचे अनेक महोत्सव अन् माझी जागरूक, सुरेल, भावपूर्ण साथ हा प्रवास सुरूच झाला. अनेक कथक कलाकार, घराणी, त्यांच्या रचना… तोवर खूप कमी माहिती असलेल्या गोष्टी समोर आल्या. पं. बिरजूमहाराजजींनी दिल्लीत माझं गाणं ऐकलं… खूप खूष झाले.. खरं तर भावस्वराची देवाची देणगी… बेबीताईंकडची संधी, हे त्यातलं रहस्य होतं. कथक केंद्राच्या एका वर्कशॉपमध्ये ते म्हणाले, “यह बहुत भावपूर्ण और सुरीला गाती है”.. ‌त्यांचं कौतुक ऐकून मी आनंदाने बहरून गेले. अन् एक दिवस फोनंच आला शाश्वती दीदीचा गायनसाथ करण्यासाठी, महाराजजींना,

सवाईमधे….. केवढं भाग्य, गौरव… दूरवरून रंगमंचावर ते मार्दवयुक्त तरी ताकदीचं नृत्य पहात होते… आता सूरसंगत करणारी उजवी बाजू झाले. तो सवाई महोत्सव अविस्मरणीय!!!!

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ.माधुरी जोशी

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted