डॉ. माधुरी जोशी

? मनमंजुषेतून ?

☆ Memory? नाही.. नाही… “आठवण”!!!  – भाग – २ डॉ. माधुरी जोशी 

(अन् एक दिवस फोनच आला शाश्वती दीदीचा गायनसाथ करण्यासाठी, महाराजजींना, सवाईमधे….. केवढं भाग्य, गौरव… दूरवरून रंगमंचावर ते मार्दवयुक्त तरी ताकदीचं नृत्य पहात होते… आता सूरसंगत करणारी उजवी बाजू झाले. तो सवाई महोत्सव अविस्मरणीय!!!!) 

इथून पुढे – – 

ज्या दिवशी रात्री गायचं होतं त्याच दिवशी सकाळी पहिली भेट झाली.. काय गायचं हे कळायची, शिकायची, ते स्वर आपले करायची…. महाराज जी उत्तम गात असत… एकेक रचना उलगडायला लागली… माझ्या रितीनुसार आधी टेक्स्ट, मग चाल, नोटेशन, रिपीटीशन मग ती सगळ्या अंगांनी फुलवायची… असा आराखडा… लहान वॉकमन होता सोबत… कारण आजचं रचनेची ओळख, आजचं रचना मनात तोंडात दृढ करणं आणि आजचं गाणं ते ही सवाईत… भयंकर चॅलेंज होतं…. खूप दडपण आलं… यापूर्वी बेबीताईंकडे ते शांत शिकलेलं, मुरलेलं असे… ओळखीचं होई.. आत्मविश्वास वाटे… इथे रचना स्वतःची वगैरे व्हायला वेळंच नव्हता… त्यातही शिकवताना महाराजजींची गायनातही उपज सुंदर खरी पण दडपण वाढवणारी.. ‌बापरे हे सगळं लक्षात राहील? सगळं वूळेवर आठवेल? ते तुडुंब गात होते. स्वरात रंगत होते.. आणि मी गोंधळत होते. मन अस्वस्थ… इतक्या स्वरावली ऐकून डोकं भंजाळलेलं…. काय आठवेल? होईल ना नीट?

 सकाळी साडेनऊला सुरु झालेलं हे सत्र दोन अडीचला संपलं. एकूण चार रचना होत्या. प्रॅक्टीस संपलं. रिक्षानं घरी गेले. परत आठपर्यंत पोहोचायचे होतं कार्यक्रमासाठी… तो वॉकमन, ते महाराजजींचे स्वर, नवीन अनोळखी रचना, मांडणी…. फक्त ओळख होण्यात उरलेले तास संपले…. मनावर प्रचंड ताण, दिवसभराची दगदग… पोहोचले तरी जागेवर… वेळेत आणि ग्रीन रूममधे मनासारखा आवाजंच लागेना… महाराज जी म्हणाले, “टेंशन मत लो! तुम अच्छा गाती हो! बहुत सुंदर होने वाला है… आशीर्वाद…!! “त्या शब्दांनी एकदम रिलॅक्स झाले. आणि खरंच पहिली मालकंस मधली वंदना अत्यंत सुरेल मधुर जादू व्हावी तशी मांडवभर पसरली, तरंगली… मी थक्क… काय होईल ही भितीची भावनाच संपली… अक्षरशःरंगून गायले. दिवसभर ऐकलेल्या महाराजजींच्या स्वररचना सामोऱ्या झाल्या… चित्तात रमायला लागल्या.. सगळं आठवायलाच लागलं. इतकंच नाही तर काही ऊपजही झाली… सगळं सुखद, सुरीलं, सुंदर…. नृत्य करतांना उजव्या बाजुला त्यांची दाद मिळाली.. सारं अनमोल…. शिकलेलं गायलेलं “माझं” झालं होतं…. त्या दिवसाची आठवण कधीच मिटली नाही… मिटणारही नाही… एका महान नृत्य कलाकारांची संगीतावरची हुकूमत, शिकवण्याची हातोटी, प्रचंड उपज पाहून थक्क झाले होते. अलीकडे बिंदादीन महाराजांवर पुस्तक लिहीतांना त्यांना भेटत राहिले. कालकाबिंदा घराण्यावर कुणी काही लिहीतंय या भावनेनीच ते प्रसन्न झाले. त्यांच्या आजोबांच्या मायेनं, आदरानं, गौरवानं अनेक आठवणी, किस्से, रचना त्यांचे राग किती तरी भरभरून बोलले… खरंच ते म्हणाले तसं, “बरगत का पेड कभी खत्म नहीं होता! “…. मी पहात होते पिढ्यान् पिढ्या चालत आलेला कथकचा वारसा आणि कथकची कसलीही परंपरा नसणाऱ्या बेबीताईंचा तो रियाज… दोन्ही कथकचे कलाकार माझ्या पत्रिकेतल्या भाग्याने आठवणीत कायमचे घर करुन राहिले आहेत… “माझ्या आठवणींची” श्रीमंती होऊन….

कधी कधी मी देवाच्या दैवाच्या देणगीनं आश्चर्यचकित होते. एका साधारण घरातल्या मुलीला हे भविष्यात मिळेल असं म्हणणं खोटं वाटलं असतं तेव्हा… पिंपळखरे सर, बेबीताई, महाराज जी.. असाच एक देखणा योग… असा परीसस्पर्श….

पं. जितेंद्र अभिषेकींसारखे प्रचंड अभ्यासू, व्यासंगी, ज्ञानी, बहुआयामी श्रेष्ठ कलावंत उशीरा पण अनमोल असे “गुरू” लाभले…. केवळ नाट्यसंगीत एवढंच श्रेयच नाहीच बुवांचं… तर अनेक अनवट राग आपल्या सहज ओळखीचे केले त्यांनी आणि ओळखीचे राग अनोखे सजवले ही ती मौल्यवान देणगी… किती बंदिशी मिळवल्या, बांधल्या, डोळस शिष्यवर्ग घडवला, मुक्त हस्तानी विद्या दिली… निरपेक्षपणे…. अन् एकीकडे भावगीतं, कविता, अभंग, पदं, ठुमऱ्या, निर्गुणी, तराणे, सरगम, चतुरंग हे पण मनामनात रुजवलं… किती ताल, किती लयकारी… आणि हे सगळं घडतांना शब्द, भावार्थ, साहित्य साऱ्याला भावनेच्या ओलाव्याचं अस्तर… इतक्या मिती असणारा कलावंत खरंच दुर्मिळ.. एकाचवेळी इतकं बहुविध कर्तुत्व…. ८०च्या आसपास बुवा पुण्यात आले आणि माझा शिकण्याचा मार्ग मिळाला. नोकरी, लहान मुलं, घरात वडीलधारी हे सांभाळूनच करायचं होतं गाणं. मग अनेक राग, वेगळ्याच मात्रांवरून ऊठान असणाऱ्या बंदिशी, आपण चुकणार असं मनात येईपर्यंत अलगद समेवर आणून सोडणाऱ्या अशा तालाशी घट्ट…. तरी भाव जपणारी रचना.. असं वाटे हे यांनी कधी मिळवलं? जपलं? वाढवलं? फुलवलं? सारं बुद्धीवादी तरी लडीवाळ.. न ऐकले देखले राग सुंदर सजवत… ते मांडायचे कसे? कोणत्या फ्रेजेस? का? टाळायचं काय? राग रूप शुद्ध कसं ठेवायचं? चुकलं तर रस्ता कसा बदलायचा? फार कमी बोलणं तरी गायकीतून सगळं सांगत. सारा बुद्धीचा वारसा भेटत राही…. या साऱ्यातून मी काही मिळवत होते. घडंत होते बदलंत होते. ते सुगम संगीत शिकवत नसत… ते कॅसेटवर पहा म्हणायचे. तरी मी विनंती करून “विष्णुमय जग”शिकवा म्हंटलं. तो अभंग चारूकेशी रागात… म्हणून जरा स्वर गुणगुणते… बुवा म्हणाले, “चारूकेशी नाही तुकाराम महाराज काय सांगतात ते चारुकेशीतून गा” केवढी शब्दांची महती!! गायकीचं मर्म!! एकदम लख्ख दर्शनंच…. तोच धागा ख्याल गातांना, बंदिशीतही…. खरंच किती सुंदर तत्व…. माझं भावपूर्णतेशी नातं होतंच… आता ते परी पूर्ण झालं.. अशा भावपूर्ण, लयदार, सुरिल्या आठवणींनी “माझा” खजिना अनमोल झाला पुन्हा!!!

या साऱ्या भावपूर्णतेला उत्तरेच्या मातीचा, लोकसंगीताचा, ठुमरी दादऱ्याचा गंध लाभला पंडिता शोभा गुर्टुंकडून शिकतांना.. माझी नोकरी… त्या मुंबईला… मग दर रविवारी सिंहगडनी दादर.. वरळी… शिकणं झालं की परत दादर पुणं…. पण साडे अकरा ते दीड फक्त मी आणि त्यांचे स्वर… शिकवणं… पहाटे जातांना स्वरांची ओढ… परततांना नवीन स्वरांची संगत… ती गर्दी, भांडणं, विक्रेते, कोलाहल… सगळ्या पल्याड ते स्वर नेत. तो मधाळ ताकदीचा स्वर… ते भक्ती रसात चिंब “म्हारो प्रणाम”, रंगपंचमीच्या रंगात, मोरीत नटलेले “केसरीया अंगिया”, “रंगी सारी गुलाबी”… तर विरह रसातली “पतझड. “.. “सैंय्या निकस गये” आर्त सिंध भैरवी… किती काय काय त्यांच्यापाशी… प्रचंड… नित्य नवं… प्रत्येकाचं आपलं रूप रंग भाव रस… गातांना रागावरची पकड आणि नजाकत… सहज राग बदलायची हुकूमत… तालाच्या चौकटीतच पण तरिही मोकळं गाणं… स्वरवलयं सहज समेवर… सारं जसं काही श्वासात, रक्तात भिनलेलं.. सहज… प्रयास नाही फक्त आनंद उधळणं!! आवाजाला सुंदर वजन, गोलाई तरी खटके, मुरक्या, मिंड, हरकतींची पखरण

खरंच मी तो अनुभव घेतांना हरकून जाई…..

तो जुलै महिना होता. रविवारी सकाळपासून पाऊस लागला होता. जायचय तर मुंबईला.. तो मुंबईतला पाऊस… जावं की नाही? ते स्वर सतत साद घालत होते. तशीच धाडस करुन निघाले. नशीबानं पावसाचा जोर जरा ओसरला होता. पडत होता पण सुसह्य.. त्या दिवशी त्यांचा काय मूड होता काय जाणे? एकदम तोडीचे स्वर पसरले… मी खूषंच… कारण ठुमरी सम्राज्ञीकडून इतका आवडता राग…. न मागता… त्यांनी द्रुत एकतालातला तराणा सांगितला.. तबला नव्हता पण एकतालानी हात सोडला नव्हता आणि एक त्रितालातली बंदिश…. मला तरी ते दोन्ही नवीन होतं.. मी तोडीच्या स्वरात चिंब आणि तो तोडी रिमझिम पावसात… त्या एकदम थांबल्या गातांना… म्हणाल्या, “पाऊस ऐक… ऐक त्याचा स्वर, लय… ते शब्दही त्या दिवशीच्या तोडी सारखाच खोल आनंद देऊन गेले.. ‌निसर्ग आणि स्वर… आगळं दर्शन.. आजही ते शब्द आणि तोडीत भिजलेला पाऊस तसाच आहे आठवणीत आणि…..

डोळ्यात पाणी कृतज्ञतेचं देव, दैव, हे गुरूजन साऱ्यांसाठी… दरवेळी नव्या टप्प्यावर, त्याच स्वर, लय, भाव रस तत्वांची नव्यानं ओळख देत राहिले… साऱ्यांची ऋणी.. अखेरच्या श्वासापर्यंत……

एक ओळ आठवली. ‌‌

“सूर बिना सब शून्य

गुरू बिना सुर अंधा “

खरंच एकाच आयुष्यातले सारे सुरेल रस्ते.. ‌प्रत्येक गुरूंनी फुलवले… एकटीला हे असं दान मिळेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं… स्वर, लय, शब्द, भाव, राग, रचना, बंदिशींची सप्तरंगी इंद्रधनुष्य आजही मनात रंग उधळतात…. आठवणींची तोरणं सजवतात…. मग आठवणींची कुपी डोळस सुरांनी भरून वाहते… त्या साऱ्या गुरूजनांच्या, सुरेल रस्त्यांची, भावपूर्ण अस्तराची…. “आठवण”. सदैव मनात स्वर भरते.. कारण खरं आहे.. “गुरू बिन सूर अंधा”

देवा… दैवा आणि गुरूजनांनो

धन्यवाद या सुरेल आठवणीसाठी!!!

– समाप्त –  

© डॉ.माधुरी जोशी

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted