सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ शब्दाचे सामर्थ्य… ☆ सौ शालिनी जोशी

संत तुकारामांचे शब्द —-

संत तुकाराम म्हणतात,

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने l

शब्दांचीच शस्त्रे यत्न करू l

आमच्या घरी शब्दरूपी रत्नांचे धन आहे आणि शब्दरूपी शस्त्र आम्ही जतन केले आहे. शब्दच कसे रत्न आणि शस्त्र असे विरुद्ध होतात, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो.

लौकिक दृष्टीने घरदार, पैसा- अडका, सोनं -नाणं, जमीन- जुमला हे धन ठरतं. त्याचा उपयोग भोगासाठी, चरितार्थासाठी, दानधर्मासाठी केला जातो. तुकाराम अशाच एका सुखवस्तु घरात जन्मले. पण कुटुंबातील लोकांचे मृत्यू, धंद्यातील उतरण आणि दुष्काळ यामुळे हालाखिची परिस्थिती निर्माण झाली. तुकारामांचे प्रपंचातील लक्ष कमी झाले. ते ईश्वर चिंतनात राहू लागले. निर्धन तुकारामांच्या मुखातून शब्दरूपी धन ओसंडून वाहू लागले. जे लौकिक संपत्तीने साधलं नसतं ते त्यांच्या अभंगवाणीने साध्य झाले.

त्या शब्दांनाच रत्नाचे तेज आणि शस्त्राची धार प्राप्त झाली. परमेश्वर भेटला तरी जनसमुदायाचा विसर त्यांना पडला नाही. धर्माचे पालन आणि पाषाण खंडन यासाठी आपला अवतार असल्याचे त्यांनी ओळखले. आपले शब्दरूपी धन त्यांनी मुक्तपणे उधळले आणि क्रांती केली. सदाचारी आणि दांभिक प्रवृत्तीच्या लोकांचे समाजात मिश्रण असते. तुकारामांना सर्वांचाच कळवळा. ‘ बुडते हे जन न देखवे डोळा’ असा त्यांचा स्वभाव होता. सज्जनांसाठी त्यांचे शब्द मेणाहून मऊ तर दुर्जनांसाठी वज्राहून कठोर झाले.

बेभान, पाखंडी, ढोंगी समाजाला वठणीवर आणण्यासाठी, ‘तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाणं फिरे l’ अशा थाटात ते सुधारणा कार्याला तत्पर झाले. ‘ नाठाळाचे हाती देऊ काठी ‘असे त्यांचे शब्द शस्त्रासारखे ठरले. लोकांना आपली चूक कळली. लोकांची मने त्यांनी जिंकली. लोकांना नामस्मरणाचा सुलभ, सोपा मार्ग दाखवला. ‘ पुण्य पर उपकारl पाप ते परपीडा l’ अशी पाप- पुण्याची सोपी व्याख्या लोकांसमोर ठेवली. स्वतः संसारातून दूर झाले पण लोकांचा संसार उन्नत व्हावा म्हणून शब्दातून त्यांनी मार्ग दाखवला. विपन्नावस्थेतही परमार्थ करता येतो हे दाखवून दिलं.

आजच्या धकाधकीच्या व अशांततेच्या काळातही माणसाला सावरणारी व समाधान देणारी ही तुकोबांची वाणी. रत्नाला नाश नाही तसेच त्यांचे अभंग अभंग राहिले. पुढेही राहतील. रत्न चमकदार असते आपल्या तेजाने परिसर उजळून टाकते. असेच शब्द समाजाच्या उन्नतीला कारण होतात, तेव्हा रत्न होतात व समाजातील अपप्रवृत्ती विरोधात लढण्याची प्रेरणा देतात तेव्हा शस्त्र होतात. हेच लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढ्यात आपल्या जहाल लेखणी द्वारे साधले. असे हे शब्दाचे सामर्थ्य.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted