सुश्री वर्षा बालगोपाल
☆ “दयाळू व्हा…” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆
आपल्याकडे कितीही संपत्ती असू द्या पण जाताना रिकाम्या हातानेच जायला लागते तेव्हा दयाळू व्हा..
नुकतीच म्हणजे २८ सप्टेंबरला लता मंगेशकर यांची 96 वी जयंती झाली आहे. त्या निमित्ताने बऱ्याच आठवणींना उजाळा देण्यात आला. पण मला मात्र त्यांच्या मृत्यूच्या आधी दोन दिवस त्यांनी वार्ताहरांशी साधलेला वार्तालाप आठवला. दुर्दैवाने तो त्यांचा शेवटचा वार्तालाप ठरला.
त्यावेळी त्यांना जीवनाचे अंतीम सत्य उलगडले. त्याची जाणीव झाली आणि या ओघात त्यांनी बरेच चप्पल जोड आहेत पण आता अनवाणी रहावं लागतंय… बरेच उंची कपडे आहेत पण हॉस्पिटल मधल्या गाऊनवर रहावे लागतंय… पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवले पण आता दोन गोळ्या औषधे यावर रहावे लागतय असे सांगून त्या ओघात त्या म्हणाल्या आपल्याकडे कितीही संपत्ती असू द्या पण जाताना रिकाम्या हातानेच जायला लागते तेव्हा दयाळू हा.
एक परमसत्य त्या सांगून गेल्या. पूर्ण विश्वालाच हे गीतासार स्वानुभवातून शिकवून गेल्या.
खरंच मृत्यू हे अंतीम सत्य असले तरी त्या बरोबरच आपण काही घेऊन येत नाही काही घेऊन जात नाही हे पण तितकेच खरे आहे.
कहोना प्यार हैं सिनेमात देखील एका गाण्यात लकी अली म्हणतो
एक पल का जीना फिर तो है जाना
तोफा क्या लेके जाए दिल ये बताना
खाली हाथ आए थे हम
खाली हाथ जाएँगे
बस प्यार के दो मीठे बोल झिल मिलाएँगे
तो हंस क्यूँ की दुनिया को है हसाना
ऐ मेरे दिल तू गाए जा…
याच भावनेने लता दीदी आपल्या मनाला ए मेरे दिल तू गाये जा सांगत आल्या. आणि शेवटी पण हाच संदेश अखील विश्वाला दिला.
पुढे त्यांनी दयाळू व्हा असे पण सांगितले आहे. कारण तुमची दयाळू वृत्तीच तुमच्यपर्यंत पीडितांची संवेदना पोहोचवत असते. म्हणून तुम्ही मिळवलेल्या संपत्तीचा विनियोग दयाळू वृत्तीने लोकांची मदत करण्यात करावा असा महान सांगीतला आहे.
याचे कारणही आपल्याच अनुभवातून दिले आहे. कारण तुम्ही काही घेऊन आले नाहीत काही घेऊन जाणार नाही ही उक्ती चुकीची असल्याचे दर्शवून दिले आहे. मनुष्य रिकाम्या हाताने आला असला हे जरी खरे असले तरी तो येताना आपले भाग्य घेऊन येतो हे त्याहीपेक्षा मोठे सत्य आहे. म्हणूनच आपल्या जीवनात कितीही अडथळे, अडचणी आल्या,… गरीबी, विषप्रयोग, अपयश जे त्यांनी स्वतः अनुभवले तरी आपले कर्म, यावर निष्ठा ठेऊन त्यालाच देव मानून आपले काम सातत्याने करत राहिले तर प्रारंभी दुर्भाग्य वाटलेले आयुष्यच सौभाग्यदायी होऊन जाते.
तसेच जाताना इथले काहीच बरोबर नेता येत असले तरी आपल्या पुण्यकर्माची पुंजी आपण आपल्या बरोबर नेऊ शकतो हा विश्वास वाटून दयाळूपणातून पुण्यपुंजी वाढेल म्हणून दयाळू होण्याचा संदेश त्यांनी दिला.
तेव्हा लता दीदींना आदर्श मानणाऱ्या, त्यांचा अभिमान बाळगणाऱ्या, त्यांच्या आवाजावर, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांनीच त्यांचा कितीही संपत्ती असू द्या पण जाताना रिकाम्या हातानेच जायला लागते तेव्हा दयाळू हा.
हा संदेश मान्य करायला पाहिजे. मनावर कोरून ठेवला पाहिजे. त्या प्रमाणे वागायचा प्रयत्न करायला पाहिजे.
हीच लता दीदींना आदरांजली ठरेल.
☆
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




