सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “संविधान दिनाच्या सर्वांना अनेक अनेक शुभेच्छा!” ☆ सुश्री शीला पतकी 

(२६ नोव्हेंबर : भारतीय संविधान दिन)

स्वतंत्र झालेल्या आपल्या देशाला आपला कायदा प्राप्त होणे हे खूप मोठे भाग्य आहे. इतक्या मोठ्या देशाला, ज्यामध्ये असंख्य भाषा बोलल्या जातात, असंख्य जाती जमातीचे- विविध धर्माचे लोक राहतात. प्रत्येक राज्याच्या भौगोलिक परिस्थिती वेगळ्या, साक्षरतेचा अभाव, कायदा म्हणजे काय याची जाणीवही नाही, अशा काळामध्ये अत्यंत दूरदर्शीपणाने आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान ही मोठी देणगी दिली आहे, जी १९४९ साली आजच्या दिवशी राष्ट्राला समर्पित करण्यात आली.

आपल्या देशाला आपला स्वतःचा कायदा मिळाला. आपल्या माणसांच्या गरजा, आपल्या माणसांच्या समस्या बारकाईने जाणून घेऊन अत्यंत सूक्ष्मतेने अभ्यास करून हे संविधान बनवले गेले आहे. पुढे काळानुसार काही बदल होत जातील हे लक्षात घेऊन त्यात बदलालाही जागा ठेवली आहे.. केवढी दूरदृष्टी !आम्हाला सगळ्यांना वर्तनाचे नियम दिले. राज्यकर्ते कसे निवडावे, ते कसे असावेत, त्यांनी समाजासाठी काय करावे? समाजाने कोणत्या नियमांचे पालन करावे, जेणेकरून या देशामध्ये सुख शांती नांदेल, सामान्य माणूस – गरिबातला गरीब माणूस सुखी होईल आणि समाधानाने या देशात राहील, – असे सगळे मुद्दे विचारात घेतले गेले. हा देश चालवणारे जे आहेत त्यांना निवडून देण्याचा सर्वात मोठा अधिकार त्यामुळेच सामान्य माणसाला दिला गेला आहे. माझं राष्ट्र कुठल्या तत्वाने, कुठल्या नियमाने चालावं, ते कोणाच्या हातात सुरक्षित राहील, याचा विचार सामान्य माणूस ठरवू शकतो… आजच्या दिवशी फक्त एवढा विचार केला की मला संविधानाने दिलेला इतका मोठा अधिकार मी योग्य पद्धतीने वापरतोय का तरी खूप मोठी गोष्ट आहे.

सामान्य माणसाला सातत्याने वाटत राहतं की माझ्या एका मताने काय होणार आहे किंवा त्या मताच्या बदल्यात मला काय मिळणार आहे? त्याचा केवळ तात्कालिक विचार सुद्धा केला जातो पण सामान्य माणसाला आपली ताकद मात्र कधीच ओळखता आली नाही. परवा एक छान वाक्य वाचलं….

“मुंग्याने जंगलात वारूळ बांधलं की हत्तीसुद्धा जंगल सोडून जातात”. किती सुंदर वाक्य आहे ना! एवढीशी मुंगी- तिची ताकद किती, पण हत्तीला जेरीला आणायची हिम्मत तिच्यामध्ये असते.. पण हे आपण कधी जाणणारच नाही का? आणि म्हणूनच आजची परिस्थिती आली आहे. प्रत्येक ठिकाणी पैसा दिल्याशिवाय काम होत नाही याला जबाबदार आपणच आहोत. आपल्याला सारखं वाटत राहतं की आपला आवाज किती पोहोचणार? आपण काय करणार? आपली ताकद कुठे आहे एवढी?… अरे एकदा आवाज तरी करून बघा.. !

या संदर्भात एक किस्सा आहे माझ्याकडे – –

 2007 साली निवृत्त झाल्यानंतर सहाव्या वेतन आयोगाचा फरक आणि त्याचे पेन्शन याचा एक आदेश मला ट्रेझरी मधून आला, आणि तो फॉर्म भरून दिला की आमची पेन्शन लगेच जमा होणार होती, म्हणजे ती फरकाची रक्कम जमा होणार होती जी बरीच मोठी होती. जिल्ह्यातील अनेक शिक्षक त्या दिवशी ट्रेझरी मध्ये आले होते. परगाववरून आलेले, संसाराच्या ओझ्याने वाकलेले – त्यांच्या मानाने मी बरीच तरुण दिसत होते कारण मला हे ताण नव्हते. असो. मी त्या शिक्षकांचे बरेच फॉर्म भरणे वगैरे काम करून देत होते. खिडकीत ते फॉर्म घेण्यासाठी जो माणूस बसला होता तो सातत्याने प्रत्येक माणसाला विचारत होता – ‘ मग आम्हाला काहीतरी द्या ना ‘.. आणि त्याला ती माणसे ‘ हो देतो साहेब देतो साहेब ‘ असं म्हणत होती.

… त्या फॉर्मच्या रांगेत मी उभी होते. मी तीन-चार जणांचे हे बोलणे ऐकले. माझ्या समोरच्या शिक्षकाने सांगितले की ‘ हो देतो. हे काम झालं की आपण बाहेर जाऊ ‘. त्याबरोबर मी जोरात उसळले ‘ सर काय सांगताय तुम्ही.. त्याला काय द्यायचे आणि कशासाठी?’ मी त्या माणसाला विचारलं ‘ तुमचा डबा खाऊन झालाय का ?’ – आणि माझ्या प्रश्न विचारण्यात इतकी जरब होती की तो पटकन म्हणाला ‘ हो हो… ‘

मी लगेच त्याला म्हटलं.. ‘ मग तो रिकामा डबा घेऊन ऑफिसच्या समोर बसा.. काय चाललंय तुमचं ? भिकाऱ्यासारखे प्रत्येकाला विचारताय काहीतरी द्या काहीतरी द्या.. आम्हाला काही फुकट मिळालेले नाहीये. 35 -35 वर्षे नोकरी केली आहे. तुला काही कमी पडले का बाबा?. तू पण सरकारी नोकरीवाला तुला चांगला पगार आहे…. ’

… माझे एक जोरदार भाषणच झाले तिथे… ! त्याच वेळेला अण्णा हजारेंचे भ्रष्टाचार विरोधी आंदोलन जोरदार चालू होते.. ‘ तो म्हातारा माणूस तिथे उपोषणाला बसून मरायला लागलाय आणि आपण इथे तेच करायला याला प्रोत्साहन देतोय.. काय केले आपण आयुष्यभर… आपल्या विद्यार्थ्यांना हेच शिकवले का? ’.. या सगळ्या गोष्टीनंतर वातावरण तंग.. सगळं ऑफिस शान्त.. कोणीतरी वरिष्ठ अधिकारी धावत धावत आले. त्यांनी चौकशी केली, त्या माणसाला तेथून उठवले आणि दुसऱ्या माणसाला बसवले.. दिलगिरी व्यक्त केली आणि काम सुरू झाले.. !

 …… ही असते मुंगीची ताकद ! आपण आजमावून पाहायला पाहिजे ना… ?पण आपण त्या फंदात पडतच नाही. चार पैसे टाकून पटकन काम होतं ना, झालं तर मग! ‘

– – मित्रहो एकदा मुंगी होऊन आपली ताकद आजमावून तरी बघा. संविधानाने महिलांना, कष्टकऱ्यांना, तळागाळातल्या माणसाला, खूप विचारपूर्वक अधिकार दिले आहेत. आपण कुठे काम करत असू तर त्यांच्या सगळ्यांच्या अधिकाराला जपू आणि आपला अधिकारही योग्य पद्धतीने वापरू… !

.. मी तर ते वाक्य माझ्या घरातल्या फळ्यावर लिहूनच ठेवले आहे

” मुंग्यांनी वारूळ घातले जंगलात की हत्ती सुद्धा जंगल सोडून जातो “

…. किती सुंदर विचार आहे. आजच्या दिवशी या वाक्यावर विचार करा आणि जमलं तर वागायचा प्रयत्न करा…. जय हिंद !

 आदरणीय बाबासाहेब आजच्या दिवशी तुम्हालाही विनम्र अभिवादन, कारण या संविधानात आम्हा स्त्रियांना तर तुम्ही खूप हक्क दिले आहेत.

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted