श्री जगदीश काबरे
☆ “मानुषप्राण्यापासून माणूस होण्याचा प्रवास” ☆ श्री जगदीश काबरे ☆
मनुष्य हा जिवंत प्राणी असला, तरी केवळ जैविक प्रक्रिया आणि प्रेरणांनी चालणारे यंत्र नाही. भूक लागली की अन्न घेणे, तहान लागली की पाणी पिणे, किंवा लैंगिक प्रेरणेने प्रेमसंबंध निर्माण करणे, हे सर्व नैसर्गिक आहे. पण या कृतींमध्ये केवळ शारीरिक क्रिया असेल तर त्यात ‘मानवता’ नसते. आपण या कृती सराईतपणे करतो, पण एकवेळ अशी येते की आपल्या मनात “का? ” हा प्रश्न उभा राहतो. आपण का जगतो, का खातो, का पितो, का प्रेम करतो, का द्वेष करतो, हे प्रश्न पडणे ही आपल्या माणूसपणाची सुरूवात असते. यंत्राला “का? ” विचारता येत नाही; ते फक्त ‘कार्य’ करते, पण मानव विचार करतो. विचारच त्याला जैविकतेच्या पलीकडे घेऊन जातो.
“का? ” हा प्रश्न म्हणजे सज्ञानतेचा प्रारंभ आहे. एकदा हा प्रश्न पडला की सर्व अनुभवांवर एक नवा प्रकाश पडतो. भूक लागली म्हणून खाणे आणि पोषणासाठी खाणे यात फरक जाणवतो. प्रेम हे केवळ शारीरिक नसून भावनिक आणि बौद्धिकही आहे, हे कळते. प्राण्यांमध्ये सर्वसाधारणपणे दोनच लिंग का आहेत? ” हा प्रश्न जेव्हा पडतो, तेव्हा जैविक रचनेपलीकडे जाऊन प्रजोत्पादन, समाजरचना, आणि लैंगिकतेच्या नैतिक-मानसिक अर्थाचा शोध सुरू होतो. अशा वेळी आपण “यंत्र” नसतो, तर “चेतन प्राणी” बनतो.
मानवाचा विकास हा या ‘का? ’ च्या शोधामुळेच झाला आहे. आदिमानव आकाशातील वीज, पाऊस, आग, तारे, मृत्यू, जन्म या सगळ्यांविषयी का, कसे, कशासाठी, असे प्रश्न स्वतःलाच विचारत गेला आणि त्यातून वैज्ञानिकता जन्माला आली. विज्ञान म्हणजे प्रश्न विचारण्याची पद्धत. धर्म, परंपरा, आणि समाजरचना अनेकदा उत्तरं देतात, पण विज्ञान प्रश्न विचारतं. कारण “का” विचारण्यातच प्रगती आहे. आपण जेव्हा भौतिकतेच्या पलीकडे विचार करतो, तेव्हा आपल्याला मानवतेची खरी किल्ली सापडते.
विज्ञान आपल्याला मानवतेकडे नेणारा मार्ग आहे. ते केवळ यंत्रे निर्माण करत नाही, तर आपल्या विचारांना सज्ञान बनवतं. विज्ञानामुळे आपण शरीर, मन आणि निसर्ग यांच्या परस्परसंबंधाचा अर्थ शोधतो. “यंत्र” म्हणून शरीराचं महत्त्व नाकारायचं नाही; शरीर म्हणजे आपल्या अनुभवांचं माध्यम आहे. पण शरीराच्या मर्यादेपलीकडे जाणारा विचार म्हणजेच माणूसपण. शरीराला भूक लागते, पण मनाला ज्ञानाची भूक असते. शरीर तहानेने पाणी मागतं, पण मन ज्ञानाची तहान बाळगतं. शरीर लैंगिकतेने प्रेम व्यक्त करतं, पण विचारांच्या उंचीवर ते सर्जनशीलतेत आणि करुणेत रुपांतरित होतं.
यंत्राला आदेश दिले की ते चालतं; पण माणूस विचार करून स्वतःचे आदेश ठरवतो. हीच त्याची ओळख आहे. जर आपण विचार थांबवले, प्रश्न विचारणे थांबवले, तर आपण पुन्हा यंत्र होतो… समाज, धर्म, बाजार किंवा राजकारण यांच्या नियंत्रणाखाली चालणारे यंत्र. पण “का? ” हा प्रश्न विचारणारा माणूस मुक्त असतो. तो कोणत्याही धर्माचा अंधानुयायी राहत नाही, कोणत्याही जात-लिंग-धर्माविषयी द्वेष बाळगत नाही, कारण त्याला समजतं की द्वेषाचं मूळ अज्ञानात आहे. “मला परधर्मीयांचा राग का येतो? ” असा प्रश्न पडतो, तेव्हा आपण आपल्या भीती, संस्कार, आणि इतिहासाकडे पाहू लागतो. त्या प्रक्रियेतून आपण स्वतःला घडवत मानवतेकडे पोहोचतो.
“का? ” हा प्रश्न म्हणजेच आत्मजागृती. तो प्रश्न आपल्याला स्वार्थातून परमार्थाकडे, अंधश्रद्धेतून विवेकाकडे, आणि यंत्रमानवतेतून खऱ्या मानवतेकडे नेतो. विज्ञान म्हणजे या प्रवासाची दिशा दाखवणारा दीपस्तंभ आहे. विज्ञान सांगतं की सर्व गोष्टींचं कारण असतं, प्रत्येक क्रियेला परिणाम असतो, आणि सर्व विश्व एकमेकांशी जोडलेलं आहे. म्हणूनच विज्ञान आपल्याला अंधानुकरणापासून वाचवतं, आणि प्रश्न विचारायला शिकवतं.
मानवाचा उत्क्रांती प्रवास हा शरीराच्याच नव्हे तर विचारांच्याही उत्क्रांतीचा आहे. एकेकाळी आपण फक्त अन्नासाठी जगत होतो, पण आज आपण अर्थपूर्ण जगण्यासाठी धडपडत असतो. या प्रवासात “का? ” हा प्रश्नच आपल्याला चालना देतो. शरीर मर्यादित आहे, पण विचार अमर्याद आहे. शरीर मरण पावते, पण विचार जिवंत राहतात. म्हणूनच विचारविश्वात रममाण होण्यात खरी मजा आहे. तिथे आनंद भौतिक सुखांपेक्षा गहिरा असतो, कारण तो ज्ञानातून, सत्याच्या शोधातून मिळतो.
विज्ञानसाक्षरता म्हणजे केवळ प्रयोगशाळेतील प्रयोग नव्हे, तर जीवनाकडे विवेकाने पाहण्याची वृत्ती. “का? ” विचारणं म्हणजेच विज्ञानसाक्षरतेचा पाया. प्रत्येक प्रश्न आपल्याला नव्या उत्तराकडे, नव्या शोधाकडे घेऊन जातो. आणि या सततच्या शोधामुळे आपण यंत्रापेक्षा श्रेष्ठ होतो. कारण आपण फक्त जगत नाही, तर “जगण्याचा अर्थ” शोधतो.
माणूस म्हणून आपली खरी ओळख त्याच्या विचार करण्याच्या शक्तित आहे. आपण खाणं, पिणं, प्रजनन करणं या क्रिया केवळ शरीरासाठी करतो; पण विचार करणे, प्रश्न विचारणे हे उन्नतीसाठी करतो. शरीर जगण्यासाठी आहे, पण विचार हे जीवनाचं कारण आहेत. म्हणूनच “का? ” हा प्रश्न पडणं म्हणजे प्राण्यापासून मानवाकडे झालेला प्रवास आहे. विज्ञान हा त्या प्रवासाचा धागा आहे, जो आपल्याला ज्ञान, करुणा, आणि मानवतेकडे नेतो. शरीर, यंत्र, जग ही सर्व साधनं आहेत; पण विचार हेच अंतिम साध्य आहे. त्या विचारविश्वात रममाण झाल्यावरच आपण खऱ्या अर्थाने “माणूस” होतो.
© श्री जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





