प्रा. भरत खैरकर
मनमंजुषेतून
☆ “मोड…” ☆ प्रा. भरत खैरकर ☆
गावापासून उत्तरेला निघालेला रस्ता पुढे जाऊन दोन गावाकडे जायचा. त्या ठिकाणाला गावचे लोक मोड म्हणायचे! कुठे मोडी पर्यंत गेला होता कां? मोडीवर बसला होता कां? मोडीवर काय चालू आहे? वगैरे सारखी ह्या मोडीबाबत चौकशी असायची. गावच्या कारभारात ह्या मोडीचा खूप मोठा वाटा होता.
मला तर मोड खूप खूप आवडायची. साधारणतः दीड दोन किलोमीटर अंतरावर असलेली ही मोड आणि त्या पुढच्या पाचशे सहाशे मीटरवर असलेली नदी मला नेहमीच आकर्षून घ्यायची. ह्या नदीच्या पुलावर बसून मी कित्येक कविता केलेल्या आहेत. पुलाखालून वाहणाऱ्या पाण्याला बघून मी माझी ‘गुढतळे’ ही कविता लिहिलेली आहे. ह्या नदीकाठावर सकाळपासून संध्याकाळपर्यंत विविध कामे चाललेली असतात. नदीपासून थोडं लांब गेल्यावर पन्नासेक फुटावरून खालच्या दगडावर पडणारी पाण्याची धार हळूहळू घाटदार वळण घेत संथ होते. छोटासं नितळ पाण्याचं तळं तिथे होतं. ते वलयामुळे अजूनच उठून दिसतं. मनात भावनांचे तरंग उठावे तसे ह्या पाण्याचे तरंग धारेच्या केंद्रापासून दूरवर.. काठापर्यंत.. जाऊन हळूहळू संतरुप धारण करतात. पुढे हे नदीचे पाणी मार्ग काढीत काढीत गावात गेल्यावर एका नाल्याचं रूप धारण करतं. पुढे ही नदी तीन-चार गावातून जाऊन एका धरणामध्ये बंदिस्त झाली आहे!
सायंकाळी मोडीवर फिरायला जाणारी गावातील जेष्ठ मंडळी, कर्मचारी, बँकेचे लोक, शिक्षक, इत्यादी सगळे सरकारी कर्मचारी मोडी पर्यंत येऊन परतायचे.. मोडीवरील डांबरी रस्त्याच्या कडेला बसून हे सगळे ऑफिसच्या.. कुटुंबाच्या गप्पा तसेच सुखदुःखाचे विषय बोलायचे..
ह्या मोडीवर एक मारुतीचे मंदिर आहे. उत्तरेकडे गेलेली ही मोड पण मारुती मात्र दक्षिणेकडे असल्याने पठ्ठा गावाकडे लक्ष ठेवून आहे असं वाटायचं. ह्याच मोडीवर दोन्ही बाजूंकडून येणाऱ्या शेतातील गुरं, म्हशी, गाई शिवारातून परतायच्या.. संध्याकाळच्या वेळी गुराढोरांच्या धुळीने माखलेले आकाश आणि त्यात किरमिजी रंगाची सूर्याची किरणे.. त्यामुळे गावाचं सौंदर्य अजूनच उजळून निघायचं. मोडी वरून दिसणारं हे गावाचं हे दृश्य अद्भुत असायचं.
लहान मुले बराच वेळपर्यंत शेतातून येणाऱ्या आपल्या आईची ह्या मोडीजवळ येऊन वाट बघायचे.. आपापल्या घरट्याकडे निघालेली पाखरं.. विशेषतः बगळ्यांची रांग.. मोडीवरून अद्भुत दिसायची..
मारुती मंदिराच्या परिसरात एक भलं मोठं वडाचं झाड होतं.. त्या झाडांवर संध्याकाळी सर्व पक्षांची शाळा भरायची.. त्यांचा किलबिलाट संपूर्ण गावाचा आसमंत भरून टाकायचा.. साधारणत: सात वाजल्याच्या दरम्यान मंदिरामध्ये आरती व्हायची.. मोडीवर फिरायला गेलेले बहुतांश लोक ह्या आरतीमध्ये सामील व्हायचे.. लाऊड स्पीकरवर ह्या आरतीचा आवाज संपूर्ण गावापर्यंत पोहोचायचा.. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या बसेस, ट्रॅव्हल्स, खाजगी वाहने या ठिकाणी थांबायची.. लोक आग्रहास्तव एक ‘थांबा’ मोडीवर तयार झाला होता!
आता तर हळूहळू मोडी पासून गावापर्यंतच्या संपूर्ण रस्त्यावर दुतर्फा अतिक्रमण झाले आहे.. आणि मोठमोठाली दुकाने लागलेली आहेत.. एवढेच नाही तर आधुनिकतेची आवश्यकता म्हणून की काय तीन चार बियरबार व एक पेट्रोल पंप या ठिकाणी झालेले आहेत.. हळूहळू गावाचं गावपण जाऊन.. शहरीकरणामुळे ही मोड सुद्धा आता पहिल्यासारखी न राहता रस्ता रुंदीकरणामध्ये चार पदरी.. सहा पदरी करता करता सरळ होते की काय? अशी भीती वाटायला लागली आहे.. गावाला लागलेलं शहरीकरणाचं वेड एकूणच गावपण घालवील की काय? हा प्रश्न पडतो.
गावची ही मोड.. तिथून दिसणारी संध्याकाळ.. मारुतीचा पार.. तिथल्या वडावर असलेली बगळ्यांची शाळा.. आरतीचा मधुर ध्वनी.. फिरायला गेलेल्यांच्या गप्पा आणि विशेषतः पलीकडे असलेल्या नदीवर घालवलेला माझा बालपणीचा काळ मला अजूनही मोडी पर्यंत घेऊन जातो आणि तिथे गावाच्या कुशीत आपण किती सुरक्षित सुखी समाधानी होतो याचं भान जागवितो.
लेखक : प्रा. भरत खैरकर, चिंचवड, पुणे ३३.
९८८१६१५३२९.
मोड – – –
गावापासून उत्तरेला निघालेला रस्ता पुढे जाऊन दोन गावाकडे जायचा. त्या ठिकाणाला गावचे लोक मोड म्हणायचे! कुठे मोडी पर्यंत गेला होता कां? मोडीवर बसला होता कां? मोडीवर काय चालू आहे? वगैरे सारखी ह्या मोडीबाबत चौकशी असायची. गावच्या कारभारात ह्या मोडीचा खूप मोठा वाटा होता.
मला तर मोड खूप खूप आवडायची. साधारणतः दीड दोन किलोमीटर अंतरावर असलेली ही मोड आणि त्या पुढच्या पाचशे सहाशे मीटरवर असलेली नदी मला नेहमीच आकर्षून घ्यायची. ह्या नदीच्या पुलावर बसून मी कित्येक कविता केलेल्या आहेत. पुलाखालून वाहणाऱ्या पाण्याला बघून मी माझी ‘गुढतळे’ ही कविता लिहिलेली आहे. ह्या नदीकाठावर सकाळपासून संध्याकाळपर्यंत विविध कामे चाललेली असतात. नदीपासून थोडं लांब गेल्यावर पन्नासेक फुटावरून खालच्या दगडावर पडणारी पाण्याची धार हळूहळू घाटदार वळण घेत संथ होते. छोटासं नितळ पाण्याचं तळं तिथे होतं. ते वलयामुळे अजूनच उठून दिसतं. मनात भावनांचे तरंग उठावे तसे ह्या पाण्याचे तरंग धारेच्या केंद्रापासून दूरवर.. काठापर्यंत.. जाऊन हळूहळू संतरुप धारण करतात. पुढे हे नदीचे पाणी मार्ग काढीत काढीत गावात गेल्यावर एका नाल्याचं रूप धारण करतं. पुढे ही नदी तीन-चार गावातून जाऊन एका धरणामध्ये बंदिस्त झाली आहे!
सायंकाळी मोडीवर फिरायला जाणारी गावातील जेष्ठ मंडळी, कर्मचारी, बँकेचे लोक, शिक्षक, इत्यादी सगळे सरकारी कर्मचारी मोडी पर्यंत येऊन परतायचे.. मोडीवरील डांबरी रस्त्याच्या कडेला बसून हे सगळे ऑफिसच्या.. कुटुंबाच्या गप्पा तसेच सुखदुःखाचे विषय बोलायचे..
ह्या मोडीवर एक मारुतीचे मंदिर आहे. उत्तरेकडे गेलेली ही मोड पण मारुती मात्र दक्षिणेकडे असल्याने पठ्ठा गावाकडे लक्ष ठेवून आहे असं वाटायचं. ह्याच मोडीवर दोन्ही बाजूंकडून येणाऱ्या शेतातील गुरं, म्हशी, गाई शिवारातून परतायच्या.. संध्याकाळच्या वेळी गुराढोरांच्या धुळीने माखलेले आकाश आणि त्यात किरमिजी रंगाची सूर्याची किरणे.. त्यामुळे गावाचं सौंदर्य अजूनच उजळून निघायचं. मोडी वरून दिसणारं हे गावाचं हे दृश्य अद्भुत असायचं.
लहान मुले बराच वेळपर्यंत शेतातून येणाऱ्या आपल्या आईची ह्या मोडीजवळ येऊन वाट बघायचे.. आपापल्या घरट्याकडे निघालेली पाखरं.. विशेषतः बगळ्यांची रांग.. मोडीवरून अद्भुत दिसायची..
मारुती मंदिराच्या परिसरात एक भलं मोठं वडाचं झाड होतं.. त्या झाडांवर संध्याकाळी सर्व पक्षांची शाळा भरायची.. त्यांचा किलबिलाट संपूर्ण गावाचा आसमंत भरून टाकायचा.. साधारणत: सात वाजल्याच्या दरम्यान मंदिरामध्ये आरती व्हायची.. मोडीवर फिरायला गेलेले बहुतांश लोक ह्या आरतीमध्ये सामील व्हायचे.. लाऊड स्पीकरवर ह्या आरतीचा आवाज संपूर्ण गावापर्यंत पोहोचायचा.. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या बसेस, ट्रॅव्हल्स, खाजगी वाहने या ठिकाणी थांबायची.. लोक आग्रहास्तव एक ‘थांबा’ मोडीवर तयार झाला होता!
आता तर हळूहळू मोडी पासून गावापर्यंतच्या संपूर्ण रस्त्यावर दुतर्फा अतिक्रमण झाले आहे.. आणि मोठमोठाली दुकाने लागलेली आहेत.. एवढेच नाही तर आधुनिकतेची आवश्यकता म्हणून की काय तीन चार बियरबार व एक पेट्रोल पंप या ठिकाणी झालेले आहेत.. हळूहळू गावाचं गावपण जाऊन.. शहरीकरणामुळे ही मोड सुद्धा आता पहिल्यासारखी न राहता रस्ता रुंदीकरणामध्ये चार पदरी.. सहा पदरी करता करता सरळ होते की काय? अशी भीती वाटायला लागली आहे.. गावाला लागलेलं शहरीकरणाचं वेड एकूणच गावपण घालवील की काय? हा प्रश्न पडतो.
गावची ही मोड.. तिथून दिसणारी संध्याकाळ.. मारुतीचा पार.. तिथल्या वडावर असलेली बगळ्यांची शाळा.. आरतीचा मधुर ध्वनी.. फिरायला गेलेल्यांच्या गप्पा आणि विशेषतः पलीकडे असलेल्या नदीवर घालवलेला माझा बालपणीचा काळ मला अजूनही मोडी पर्यंत घेऊन जातो आणि तिथे गावाच्या कुशीत आपण किती सुरक्षित सुखी समाधानी होतो याचं भान जागवितो.
© प्रा. भरत खैरकर
संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो. ९८८१६१५३२९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





