सुश्री नीला महाबळ गोडबोले

? जीवनरंग ?

☆ आहेर… ☆ सुश्री नीला महाबळ गोडबोले

तो नि त्याची बायको समारंभाच्या हॉलमधे शिरले की सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे वळत.

प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक कुत्सित हसू येई..

तो.. अजय.. गावातला एक दुकानदार..

तालुक्याच्या गावात त्याचं कपड्याचं दुकान होतं, त्याच्या वडिलांनी सुरू केलेलं.. फार मोठं नाही आणि फार लहानही नाही… मध्यम म्हणता येईल असं…

वडिलांचा अजय एकुलता एक मुलगा.. शिक्षणात फारसा रस नसलेला… बारावी जेमतेम गुणांनी उत्तीर्ण झाला..

शिक्षणाला रामराम ठोकला नि दुकानात बसायला लागला… रक्तातून आलेली धंद्याची आवड नि लहानपणापासून वडिलांनी दुकानात बसायला लावल्यामुळे धंद्याची उत्तम जाण…. शिवाय जिभेवर साखर नि डोक्यावर बर्फ…. दुकानात बसू लागला तसा धंदा अजूनच वाढला..

देखण्या अजयवर गावातल्या वधुपित्यांचं लक्ष होतच्….

संस्कारी नि सुरेख असलेल्या माधुरीशी लग्न होऊन अजयचे दोनाचे चार हात झाले… पुढच्या चार वर्षांत चार चिमुकली पावलं घरात दुडदुडू लागली…

…. अजयच्या वडिलांनी दुकान अजयकडे सोपवलं नि अध्यात्माचा मार्ग धरला…

अजयने शेजारचं दुकानही विकत घेतलं.. दोन्ही दुकानं जोडली, सुरेखशी अंतर्गत सजावट केली..

लहानशा दुकानाची छानशी शोरूम झाली… येणाऱ्या जाणाऱ्याच्या नजरेत भरू लागली..

कालांतरांनं छानसं टुमदार घरदेखील त्याने बांधलं… गावातील उच्चवर्तुळात त्याची उठबस वाढली..

नाही म्हटलं तरी त्याची प्रगती गावातील लोकांच्या नजरेत येऊ लागली..

” एवढा पैसा थोडाच सरळमार्गाने येतो… धंद्यात लबाडी करत असणार.. “.. गावात कुजबुज सुरू झाली..

खरंतर त्याची नि त्याच्या कुटुंबाची राहणी तशी साधी होती.. धंद्यासाठी दुकान मोठं केलेलं असलं तरी घर छोटसं नि साधसंच बांधलेलं…. दोन चाकीवरूनच तो फिरत असे…. मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घातेललं…. साऱ्यांचे कपडेही साधेसेच असत…

ना व्यसनं… ना मोठे शौक.. हॉटेलातही कधी ते कुटुंब जात नसे…

” एक नंबरचा चिकट आहे हा अज्या… ” दोस्त नि गावातले लोक त्याच्या माघारीच नाही तर तोंडावर बोलायचे..

या लोकांच्या बोलण्याला अजून एक कारण होतं… अजय कोणत्याही कार्यांत एखाद्या रुपयाचाही आहेर करीत नसे… त्याचं हे रिकाम्या हातांनी जाणं सा-यांनाच खटकणारं…

उच्चभ्रूंच्या कार्यात कुणाचे सोन्या-चांदीचे आहेर.. कुणी उंची वस्त्रे आहेर म्हणून आणलेली.. तर कुणाची गलेलठ्ठ रकमांची पाकिटे.. पण..

अजयकडून साध्या रिकाम्या पाकिटाचाही आहेर नसलेला..

अगदी नातेवाईकांच्या लग्नातही हीच गत..

” नव-यानं नाही म्हटलं तरी आपण आपल्या साठवलेल्या पैशातून आहेर करावा.. असं रिकाम्या हाताने कार्याला जाणं.. किती वाईट दिसतं.. एवढा कंजुषपणा करून काय मिळवतो गं तुझा नवरा.. मेल्यावर साठवलेलं डबोलं इथच सोडून जाणार नं.. की बरोबर नेणार आहे? अगं, लोक किती नावे ठेवतात.. “

…. माधुरीला तिच्या नातेवाईकांकडून, मैत्रिणींकडून, शेजारणींकडून हे ऐकावं लागायचं.. तिला खूप वाईट वाटायचं. डोळे भरून यायचे.. पण ती नव-याच्या शब्दाबाहेर जाणारी नव्हती. बिचारी निमूटपणे सहन करायची..

…. कार्याला जायचं पण तिथं जेवायचं मात्रं नाही… हे धोरण अजय नि पत्नीने पाळलेलं..

अनेक वर्षे हेच सुरू होतं…

तो अक्षय्य तृतीयेचा दिवस होता… त्या दिवशी गावातील पाच अनाथ वधु-वरांचा सामुहिक विवाह सोहळा गावातल्याच सामाजिक संस्थेने आयोजित केलेला.. मोठा मंडप घातलेला.. गावातील असा पहिलाच सोहळा असल्याने अख्खं गाव लोटलेलं.. आमदार, जिल्हाधिकारी अशा व्ही. आय. पीनीही उपस्थिती लावलेली.. गावातील श्रीमंतही हजर असलेले.. या उच्चभ्रूंनी अनाथ जोडप्यांना मदत म्हणून मोठमोठे आहेर आणलेले… सामान्यांनीही यथाशक्ती भेटवस्तू आणलेल्या.. स्टेजवर मान्यवर बसलेले.. त्यांची भाषणे, त्यानंतर लग्नसोहळा.. नंतर जेवण….. असा कार्यक्रम…

एवढ्यात अजय सहकुटुंब मांडवात शिरला.. नेहमीप्रमाणे आजही सा-यांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या..

तो नि त्याचं कुटुंब रिकाम्या हातानेच आलेलं..

” अनाथांच्या लग्नाला तरी काहीतरी आहेर आणायचा होता.. किती निर्लज्ज, स्वार्थी नि कंजुष आहे हा माणूस.. ” लोकांत कुजबुज सुरू झाली..

” श्री. अजय नाईकसाहेबांनी व्यासपीठावर यावं.. “

अजय व्यासपीठावर गेला.. तसे साऱ्यांचेच डोळे विस्फारले.

अध्यक्षांचं भाषण सुरू झालं..

…. ” आजचा कार्यक्रम संपन्न होतोय तो केवळ अजय नाईकसाहेबांमुळे … त्यांनी या लग्नसोहळ्यासाठी पाच लाख रुपयांचा आहेर दिलेला आहे… वगैरे… वगैरे.. “

पुढचं भाषण बऱ्याच लोकांच्या डोक्यातच शिरलं नाही..

अजय भाषणासाठी उभा राहिला….

” मित्रांनो, तुम्हाला बसलेला धक्का मी समजू शकतो. कोणत्याही लग्नात रुपयाभरही आहेर न करणारा मी..

अन् आज मी या लग्नासाठी पाच लाखांचा आहेर दिला.. कदाचित तुम्हाला हे खोटं वाटलं असेल..

पण हे खरं आहे..

…. दोस्तांनो, मी तेंव्हा पाचवी-सहावीत असेन. माझ्या मावशीकडे माझ्या मावसभावाचं लग्न होतं.

मावशीचं सासर खूप श्रीमंत, तालेवार.. त्यामुळे लग्न सोहळा जंगी.. मी नि माझी बहीण आई बरोबर समारंभाला गेलो होतो…. घरचं देवकार्य पार पडलं. नातेवाईक आहेर देऊ लागले.. कुणी सोन्याच्या अंगठ्या, कुणी सोनसाखळ्या नवरदेवाला भेट म्हणून दिल्या.. मावशीला भरजरी सांड्यांचे आहेर दिले जात होते…

…. आईची आहेराची पाळी आली.. आईनं तिच्या भाच्याला सोन्याचं लहानसं वळं दिलं… मावशीला साडी दिली.. मावशीच्या यजमानांना धोतरटोपी दिली.. तशा मावशीच्या सासुबाई गरजल्या,

” शांते, असले कपडे आमची नोकरमाणसंसुद्धा वापरत नाहीत.. आमचा अपमान करण्यासाठी असले कपडे आणलेस का? घेऊन जा ते कपडे परत… “

त्या बाईंनी ते कपडे आईकडे भिरकावले..

आई रडू लागली तसे मावशीचेही डोळे भरले.. पण कुणाचीच बोलायची हिम्मत झाली नाही..

आमची त्यावेळी बेताची परिस्थिती होती.. दुकानाचं कर्ज डोक्यावर होतं. आजोबांच्या

आजारपणाचा मोठा खर्च झालेला होता. रोजचाच खर्च कसाबसा भागत होता. आईने स्वत:चं कानातलं गहाण टाकलं. त्यातून लहानसं वळं केलं. उरलेल्या पैशातून मावशीसाठी साडी नि काकांसाठी धोतरजोडी घेतली.

… त्या बोलण्याने आई खूप दुखावली. पण तिने तोल ढळू दिला नाही.. लग्नापर्यंत आम्ही थांबलो..

नि लग्न झाल्याबरोबर जेवण न करता आमच्या गावी परत आलो..

.. दिवस सरले. आमचं कर्ज फिटलं. दुकानातून भरपूर पैसे मिळू लागले. तिकडे मावसभावाने व्यसनापायी सगळं वैभव गमावलं…. पण माझ्या मनावर उमटलेला तो अपमानाचा ओरखडा मात्रं बुजला नाही.

मी ठरवलं की कोणाला कधीच आहेर द्यायचा नाही…!! म्हणून मी कोणत्याही समारंभात रिकाम्या हाताने यायचो.. तुम्ही मला हसायचात, चेष्टा करायचात, माझा अपमानही करायचात.. पण मी त्याकडे काणाडोळा करायचो.. कारण पदरमोड करूनही दिलेल्या आहेराची किंमत दुस-याच्या लेखी काय असते, हे लहानपणीच मी अनुभवलं होतं.. मी आहेर द्यायचो नाही पण घरी आल्यावर एका पेटीत ती आहेराची रक्कम जमा करायचो….. या गोष्टीला अकरा वर्षे झाली. मागच्या महिन्यात पेटीतील रक्कम मोजली.

अडीच लाख झाली. त्यात मी माझे स्वत:चे अडीच लाख घातले… पाच लाख या अनाथ लेकरांच्या लग्नसोहळ्याला दिले. त्यातून त्या जोडप्याचा लग्नसमारंभ केला जाईल आणि संसारोपयोगी वस्तू देऊन त्यांचा संसार उभा राहील..

…. गरज नसणा-या श्रीमंत लोकांना पद्धत म्हणून उगीचच आहेर करून नावे ठेवून घेण्यापेक्षा आहेराची गरज असणा-यांना आहेर केलेला बरा… नाही का? “

आता लाज वाटण्याची वेळ उपस्थितांची होती..

.. पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांनी अजयकडे पाहिले नि टाळ्यांच्या कडकडाटाने त्याला मानवंदना दिली…

© सुश्री नीला महाबळ गोडबोले 

सोलापूर 

फोन नं. 9820206306,  ई-मेल- gauri_gadekar@hotmail. com; gaurigadekar589@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments