श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ८३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- दिवसभराची सगळी कामं मार्गी लावून खूप थकल्यानंतर संध्याकाळी उशीरा मी वखरेसाहेबांच्या केबिनमधे गेलो ते उद्या सकाळी सहस्त्रबुद्धेंना भेटायला जाईन तेव्हा तिथं जे सांगायचं ते मनाशी ठरवूनच. पण… मी जे ठरवलं होतं ते वखरेसाहेबांना योग्य वाटेल? कारण ते अंमलात आणायचं तर त्याची थोडी झळ प्रभूदेसाईनाही लागणार होतीच. ते वखरेसाहेबांना योग्य वाटलं नाही तर? …)

“सर, उद्या सकाळी सहस्त्रबुध्देंना ठरल्याप्रमाणे भेटायला जाईन तेव्हा त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन आपण प्रभूदेसाईंच्या विरुद्ध नेमकी काय कार्यवाही करणार आहोत हे त्यांना सांगावं लागेल, जेणेकरून त्यांच्या तक्रारीची आपण निदान दखल तरी घेतलीय असं होईल

त्याशिवाय… “

वखरेसाहेब विचारात पडल्याचे जाणवताच मी क्षणभर स्तब्ध झालो.

“तक्रारीबाबत प्रभूदेसाईंचं नेमकं काय म्हणणं आहे ते सांगायची निदान एक तरी संधी त्यांना द्यायला हवी ना पण? ” वखरेसाहेब म्हणाले.

” हो. हे मलाही मान्य आहे. पण आता ती वेळ निघून गेलीय. आपल्यापुरतं बोलायचं तर या न वर्षात त्यांना तशी संधीच दिली नसेल असं मला नाही वाटत. फाईलवर जरी तसं दिसत नसलं तरी त्यांना याची पूर्वकल्पना होती हे नक्की. शिवाय या संदर्भातलं सगळं प्रोसिजर तंतोतंत पूर्ण करण्याइतका वेळ, हा विषय तातडीने मिटवायचा तर आपल्याजवळ नाहीये. त्यातूनही आपण आत्ता त्यांना लेखी जाब विचारला तर ते त्याला आक्षेपही घेऊ शकतील. तक्रारीत नमूद केलेलं सगळं खोटं आहे असंही म्हणू शकतील. आणि मग तक्रार मागे घेण्यासंबंधीचे सगळेच मार्ग आपणच आपल्या हाताने बंद केल्यासारखे होईल. आज या क्षणी निकड आहे ती सहस्त्रबुद्धे आजोबांनी ती तक्रार लेखी मागे घेण्याची. “

“पण त्यामुळे ऑफिसर्स युनियनची यात इन्व्हाॅलमेंट झाली तर हे प्रकरण अधिकच चिघळेल त्याचं काय? “

“तुम्ही इथे डी. जी. एम् असताना प्रभूदेसाई युनियन मार्फत दाद मागतील असं मला नाही वाटत. त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यापूर्वी तुम्ही त्यांना समजावून सांगितलंत तर प्रसंगाचं गांभीर्य ओळखून तरी ते तुमचं ऐकतील असं मला वाटतं. ” मी म्हणालो. ते थोडे विचारात पडले.

“ते तर आहेच. बरं मग तुम्ही सहस्त्रबुध्देंना काय सांगायचं ठरवलंय? ” त्यांनी विचारलं.

प्रश्न थेट होता. माझ्याजवळ उत्तरही होतं. पण तरीही सहस्त्रबुद्धेंचा अंदाज घेतल्याशिवाय आपली पानं आत्ताच उघड करायला नको असं मला वाटलं. कारण त्याला अनुसरून वखरेसाहेबांनी प्रभूदेसाईंना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि त्याला प्रभूदेसाईंनी नाराजी दाखवून विरोध केला तर? विषाची परीक्षा न बघता याक्षणी मौन पाळणंच मला योग्य वाटलं.

“सहस्त्रबुद्धेंचा कल पाहून जे प्रॅक्टिकल असेल तेच करायचं तरीही कुठल्याही परिस्थितीत टोकाची तडजोड करायची नाही एवढंच मी ठरवलंय. ” मी म्हणालो, “आपला हात दगडाखाली सापडल्याचं जाणवून न देता सहस्त्रबुध्देंना कसं समजवायचं ते मी पाहिन. ” मी आश्वासन दिलं. आता यापुढं सारासार विचार करून आपल्या अधिकारात जे शक्य आहे ते करून मोकळं व्हायचं हे मनोमन ठरवून टाकलं आणि हा विषय तिथंच संपवला.

आता उद्या सकाळी सहस्त्रबुद्धेंच्या घरी जाऊ तेव्हा ‘त्या’ला साक्षी ठेवून सारासार विचार करून जे योग्य वाटेल ते करायचे हे ठरवल्यामुळे त्या रात्री मन अस्वस्थ नव्हतं. तरीही शांत झोप लागली नाहीच.

दुसऱ्या दिवशी सकाळी सहस्त्रबुद्धे आजोबांनी माझं हसतमुखाने स्वागत केलं तेव्हा मात्र काल सहजसोपं वाटणारं सगळं अवघडच वाटलं क्षणभर.

“आजोबा,… ” मी शब्द जुळवू लागलो.. “काल साहेबांशी सगळी चर्चा करून मी आलोय. स्वत:शी प्रामाणिक राहून जे करणे शक्य आहे ते करायचं असं आम्ही ठरवलंय. ही तक्रार लेखी स्वरूपात करण्यामागची तुमची भावना मी समजू शकतो. प्रभूदेसाई यांच्याकडून झालेला तुमचा अपमान आणि अनादर माझ्यासाठी अतिशय क्लेशकारक आणि असमर्थनीय आहे. खरंतर या चुकीला क्षमा नाही असंच मला वाटतं. तरीही कोणताही निर्णय घेताना भावनेपेक्षा त्यासंबंधीचे नियम आणि व्यावहारिकता याच गोष्टींचा प्रामुख्याने विचार करणं आवश्यक आहे जे मला टाळता येणार नाही. निर्णय घ्यायची जबाबदारी पार पडताना आज मी या कात्रीत सापडलोय.

“मला कल्पना आहे याची. तुमच्या मर्यादेत राहून जे शक्य ते तुम्ही नक्की कराल याबद्दल मला खात्री आहे. तरीही माझी ही तक्रार तीन वर्षे दाबून कां ठेवली गेली होती? आणि याला जबाबदार कोण? या माझ्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं मात्र मला कधीच मिळणार नाहीयेत. ” आजोबा म्हणाले. त्यांचा आवाज भरून आला होता.

“याचं उत्तरही आहे माझ्याजवळ. पण त्याबाबतचे कोणतेही पुरावे माझ्याजवळ नसताना मी काही बोलणं कदाचित योग्य होणार नाही. तरीही तुमच्यासमोर याबाबतचे माझे विचार मोकळेपणाने व्यक्त करणं अनाठायी नाही असंच मला वाटतं. खरं सांगायचं तर प्रमोशननंतर मी इथं चार्ज घेऊन फक्त दोन आठवडेच तर होतायत. तुम्ही आणि प्रभूदेसाई दोघेही तोपर्यंत मला अनोळखीच होतात. यातली प्रभूदेसाईंची बाजू कोणत्याही अँगलने विचार केला तरी मला समर्थनीय वाटत नाही हे खरंच. तुम्ही गैरसमज नका करून घेऊ प्लीज पण

प्रभूदेसाई इथे तुम्हाला भेटायला आले असताना तुम्ही त्यांना आतही न घेता हाकलून लावलं होतंत. बँकेने तुम्हाला समक्ष भेटून तुमची बाजू समजून सांगण्याचं लेखी आवाहन केलेलं असूनसुद्धा तुम्ही त्याला प्रतिसाद दिला नव्हतात. या कम्युनिकेशन गॅपमुळे तुमच्याबाबत प्रभूदेसाईंकडून समजलेली माहितीच तत्कालीन अधिकाऱ्यांनी ग्राह्य धरल्याने यातलं गांभीर्य त्यांच्यापर्यंत पोहोचूच शकलेलं नसावं कदाचित. ”

“त्या प्रभूदेसाईला समोर पाहून माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. तरीही मी त्याला हुसकून नव्हतं लावलं. त्याने माझे पाय धरून माफी मागावी अशीही माझी अपेक्षा नव्हती. म्हणूनच ‘तुला जे कांही सांगायचं ते तुझ्या बँकेला सांग. ‘ असं म्हणून मी त्याला परत जायला सांगितलं. दुसरी गोष्ट मी बँकेत जाऊन माझी बाजू समजावून सांगण्याची. बँकेच्या कामाच्या पद्धतीनुसार ते योग्य असेलही कदाचित किंवा त्या लोकांनी शोधलेली ती तात्पुरती पळवाटही असेल. कारण माझी बाजू खरंच समजून घ्यायची त्यांची इच्छा असती तर तिथल्या एखाद्या अधिकाऱ्याने मला येऊन भेटणं आणि माझी बाजू समजून घेणं जास्त योग्य आणि आवश्यक होतं, कीं असे कागदी घोडे नाचवत राहून माझ्यासारख्या वृद्ध ग्राहकाला न्याय मिळवण्यासाठी बँकेत हेलपाटे घालायला लावणं संयुक्तिक होतं? तुम्ही गेले चार दिवस इथं येताच आहात ना? अतिशय समंजसपणे, पोटतिडकीने बोलता आहातच ना माझ्याशी? ”

एम्. डी. व्हिजिटमुळं हा विषय आज आलाय तसा ऐरणीवर आला नसता तर? मी आलो असतो इथं? आवर्जून भेटलो असतो यांना? … मलाच प्रश्न पडला. सहस्त्रबुद्धे आजोबांच्या रूपात समोर बसून इथं ‘तो’च मला प्रश्न विचारतोय असं वाटून गेलं. आता ‘त्या’च्यापासून काय लपवायचं?

“खरं सांगू? एरवी हा तुम्ही केलेल्या तक्रारीचा प्रश्न मी चार्ज घेतल्याबरोबर असा तातडीने माझ्या टेबलवर आलाच नसता कदाचित. पण याच दरम्यान एम्. डी. व्हिजिट झाली आणि त्यानिमित्ताने हाच नव्हे तर इतर अनेक विषय ऐरणीवर आले. योगायोगाने आमचे डी. जी. एम् पुढच्या आठवड्यात मीटिंगसाठी सेंट्रल ऑफिसला जाणार आहेत. त्यामुळेच त्यानिमित्ताने अशा प्रलंबित बाबीही तातडीने हातावेगळ्या करायचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळेच मी या गोष्टीला प्राधान्य देऊन गेले चार दिवस तुमच्याकडे येतोय. यात माझा मोठेपणा किंवा कर्तृत्त्व कांहीच नाहीय. हा फक्त माझ्या कर्तव्याचा भाग आहे एक. ते कर्तव्य मी मनापासून निभावतोय एवढंच. तरीही तुमच्याशी झालेल्या पहिल्या भेटीतच तुमच्याकडून जे समजलं त्यामुळे तुमच्यावरचा अन्याय दूर करण्याची निकड मला तीव्रतेने जाणवली हेही तितकंच खरं.. ” मी मोकळेपणानं, कोणताही आडपडदा न ठेवता सांगून टाकलं. आजोबा शांतपणे ऐकत होते. आता हा धागा असाच अधांतरी सोडावासा वाटेना.

“आता पुन्हा शून्यातून सुरुवात करून प्रभूदेसाईंकडून त्यांचं म्हणणं लेखी मागवायचं, त्याची शहानिशा करायची, त्यांचं म्हणणं पटलं नाही तर योग्य कारणं देऊन ते स्वीकारता येत नसल्याचं त्यांना कळवायचं आणि या सगळ्या सोपस्कारांत हे घोंगडं असंच प्रदीर्घकाळ आहे तसंच राहू द्यायचं कां? तसं जरी केलं तरी त्यातून निष्पन्न काय होणार? यात आर्थिक फसवणूक किंवा अपहार नसल्याने जास्तीत जास्त शिक्षा काय तर त्यांना योग्य वागणुकीबद्दल लेखी समज देणे. त्यानंतरही स्वतःची चूक नाकारून ते स्वतःचं खोटं समर्थनही करू शकतील ते वेगळंच. अशा परिस्थितीत त्यांनी तुम्हाला दिलेली वागणूक योग्य नसल्याची जाणीव त्यांना करून देऊन बँक ग्राहकांशी वागता बोलताना यापुढे योग्य दक्षता घेण्याची एक संधी देणारा ‘अॅडवायजरी मेमो’ त्यांना तातडीने देऊन प्रश्न इथेच संपवावा हा एकमेव मार्ग मला या परिस्थितीत योग्य वाटतो. हे अर्थातच तुमचं समाधान होणार असेल तरच. “

सहस्त्रबुद्धे आजोबांनी सगळं शांतपणे ऐकून घेतलं. उठून ते लगबगीने आत गेले. ते हे सगळं कसं स्वीकारतील हेच कळत नव्हतं. यापुढं करण्यासारखं माझ्या हातात आता कांही शिल्लकही नव्हतं. आता जे होईल ते स्वीकारायचं आणि इथून निघून जायचं असा विचार करून मी बसून होतो. तेवढ्यांत आजोबा बाहेर आले आणि त्यांच्या हातातली पत्राची घडी शांतपणे माझ्याकडे दिली.

“काय आहे हे? “

“तुम्ही काय करू शकाल ते तुमचं सांगून झालं, आता मी काय करायचं ठरवलंय ते सांगतो. हे माझं पत्र. वाचून तरी बघा ” ते म्हणाले. मी घडी उघडून पत्रावरून नजर फिरवली आणि आश्चर्याने आजोबांकडे अविश्वासाने पहातच राहिलो. मला काय बोलावं तेच सुचेना.

या अकल्पितावर माझा अजूनही विश्वासच बसत नव्हता. माझ्या दृष्टीने तरी तो त्या क्षणीच नव्हे तर आजही एक चमत्कारच वाटतोय मला!

“आजोबा, तुम्ही हे.. हे सगळं खरंच मनापासून करताय ना? “

“असा प्रश्न कां पडावा तुम्हाला? त्या पत्रावरची तारीख तरी बघा.. ” ते म्हणाले.

तारीख दोन दिवसांपूर्वीची होती!

“त्यादिवशी तुम्हीच म्हणाला होतात ना, प्रभूदेसाईना बँकेच्या नियमात बसेल तीच शिक्षा करणं आम्हाला शक्य होईल जे सर्वार्थाने तुम्हाला न्याय देणारं वाटेलंच असं नाही म्हणून? शिवाय या सर्व व्यवस्थेवरही सर्वाधिकार असलेली अशी एक अदृश्य यंत्रणा ‘वर’ कार्यरत असतेच. ती देवाची यंत्रणा! ‘तो’ पहात असतो सगळं आणि त्याच्या हातातल्या आवाज नसणाऱ्या काठीने तो योग्य न्यायही करत असतो असंही म्हणाला होतात तुम्ही. मला पटलं होतं ते. त्या प्रभूदेसाईला आता काय शिक्षा करायची ते मी त्या दिवशीच माझ्या देवावर सोपवून मोकळा झालोय. बँकेने उशीरा कां होईना माझ्या तक्रारीची योग्य दखल घेतल्याने माझी तक्रार मी मागे घेत असल्याचं हे पत्रही मी त्याच दिवशी लिहून ठेवलं होतं. आता तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही करालच. बाकी सगळं दत्त महाराज पाहून घेतील.. ” ते शांतपणे म्हणाले.

माझा विश्वासच बसेना.

मी भारावलेल्या अवस्थेत थक्क होऊन पहात राहिलो फक्त…!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted