श्री मयुरेश उमाकांत डंके

??

☆ “टेलिस्कोप आणि कॅलिडोस्कोप … ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके

सकाळी चालायला गेलो, तेव्हा अंगभर स्वेटर कानटोपी घातलेला एक मुलगा सायकल हाणत भर्रकन क्रॉस झाला. चेहरा आणि सायकल दोन्ही ओळखीची वाटली. परत येताना सुपर मार्केट मधून दूध आणण्यासाठी गेलो. तेवढ्यात मागून तोच सायकलवाला पोरगा हजर..

“वीस घरं झाली बघा. आता घरी जाऊ का मी? ” पोरगा म्हणाला. दुकानदारानं उत्तरादाखल नुसतीच मान डोलावली. पोरगा गेला.

“आत्ता चार-पाच दिवसांपासून सकाळी दूध घालायला जायला लागलाय. ” दुकानदार म्हणाला.

“पण यंदा दहावी आहे ना त्याची? मग? ” मी म्हटलं.

“कसली दहावी अन् कसलं काय? शाळा असती दुपारची. मग सकाळी कुठं काय काम असतं त्याला? झोपलेलाच असतो घरी. मग थोडं केलं काम तर वाया कुठं जाणार आहे? “

“पण तोच वेळ त्यानं अभ्यासासाठी वापरला तर त्याचा फायदा नाही का होणार? “

“फायदा म्हणजे कुठला? मार्कांचाच ना? समजा पडलेच त्याला ८०-९०% मार्क, तरी ऍडमिशन कुठं सहज मिळणार आहे? खाजगी कॉलेजच घ्यावं लागणार. अकरावी आणि बारावी सायन्स म्हटलं तरी दोन वर्षांत सहा ते सात लाख रुपये तर नक्की खर्च होणार. “

“आता एकुलता एक मुलगा आहे ना? मग अडचण काय आहे? “

“एकुलता एक मुलगा आहे, हीच अडचण आहे सर. “

“म्हणजे? “

“एकुलता एक म्हणूनच आजपर्यंत एखाद्या राजाच्या मुलासारखं वाढवलं. जे जे त्यानं मागितलं ते ते सगळं दिलं. काही कमी पडू दिलं नाही. आता मनाविरुद्ध घडण्याची सवयच राहिली नाही त्याला. “

“अरे, पण म्हणून काय दूध घालायला पाठवायचं? “

“तसं नाही सर. दहा पंधरा दिवसांपूर्वी त्याच्या आईला शंका आली. तो आंघोळीला गेल्यावर त्याचं कपाट तिनं उचकून पाहिलं. अंदाज बरोबर निघाला. सिगारेटचं पाकीट, लायटर आणि पैसे सापडले.”

“मग? “

“मग काय? तिनं मला सांगितलं. आता इथं माझ्या जागी माझा बाप असता ना, तर बाथरुममध्येच जाऊन मुलाला तिथंच धुतलं असतं त्यानं. “

“मग तुम्ही केलंत तरी काय? “

“दोन दिवस विचार केला. त्याला काही ओळख दाखवली नाही. तिसऱ्या दिवशी सकाळी तो दात घासून डायनिंग टेबलावर येऊन बसला, तेव्हा त्याच्या समोर नवीन सिगारेटचं पाकीट अन् लायटर ठेवलं. आणि म्हटलं, ही सिगारेट घेत जा. पोट एका झटक्यात साफ होतं बघ. “

“काय सांगता? “

“त्याचा चेहराच पडला सर. तिथल्या तिथं जागेवर त्याला घाम फुटला. तिथंच आमचे दोघांचे पाय धरले. परत आयुष्यात कधी करणार नाही असं म्हणायला लागला. सॉरी म्हणाला. “

“मग? “

“तुझ्यासमोर ही सवय सोडवण्याचे दोन पर्याय आहेत. एक मार्ग व्यसनमुक्ती केंद्रात जाण्याचा आणि दुसरा मार्ग माझा. बोल, तू कुठल्या मार्गानं जाशील? “

“मग? “

” म्हणाला, तुम्ही सांगाल तसं करतो. “

“मग तुम्ही काय केलं? “

“त्याच दिवसापासून त्याला घेऊन संध्याकाळचं जिम लावलं. आता रोज संध्याकाळी एक दीड तास तो आणि मी दोघं जिम ला जातो. रात्री आठ वाजता आम्ही तिघं एकत्र जेवायला बसतो. मग मी पुन्हा दुकानात येतो. “

“पण मुलाची भीती गेली का? “

“त्याला आम्ही काही बोललो नाही, मारलं नाही, उपाशी ठेवलं नाही, फोन बिन काढून घेतला नाही. फक्त त्याला सांगितलं. उद्यापासून तू पहाटे साडेचार वाजता दुकानात यायचं. दुकान उघडायचं. सामान लावून घ्यायचं. दुधाची गाडी आली की, दूध उतरवून घ्यायचं आणि सकाळी सहा वाजता मी आलो की, दुधाची एक लाईन टाकून यायची. “

“तयार झाला का? “

“दोन तीन दिवस मी स्वतः सोबत गेलो. सगळं शिकवलं. मग आता जातोय रोज. ” दुकानदार म्हणाला.

“पण यामुळं प्रश्न सुटेल का? ” मी विचारलं.

“मी दोन दिवस विचार केला ना सर. तेव्हा आपल्याच खूप गोष्टी चुकतायत हे माझ्या लक्षात आलं. तो जे मागत गेला ते आपण त्याला देत गेलो. पण कधी त्याच्यासोबत कुठं गेलो नाही. एकत्र शॉपिंगला गेलो नाही. कधी त्याच्या शाळेत गेलो नाही. ते माझं चुकलंच ना. त्यामुळं, मी कुणावरही अजिबात चिडचिड केली नाही. आधी स्वतःलाच बदलायचं ठरवलं. “

“म्हणजे काय केलं? “

“सगळ्यात पहिलं म्हणजे, मी आधी माझ्या सवयी बदलल्या. त्याला वेळ देण्याचा मार्ग शोधला. तो म्हणजे व्यायाम करणे. म्हणून आता गेल्या आठवड्यापासून संध्याकाळी तीन तास मी दुकानात नसतो. आम्ही दोघं जिम ला एकत्र जातो आणि रात्रीचं जेवण एकत्र करतो. पहाटे दुधाच्या लाईनीची आपल्याकडे पाच सहा मुलं आहेत. साधारण त्याच्यापेक्षा वयानं थोडी मोठी आहेत, पण चांगली आहेत. उनाड नाहीत, व्यसनी नाहीत. तीही शिकतातच ना. पण घरची परिस्थिती नाही म्हणून आपल्याकडं तीन-चार हजारावर काम करतात. त्यांच्यासोबत पहाटे तासभर दुकानात काम केलं तर त्यांच्याशी हा बोलेल. जगण्यासाठी काय काय करावं लागतं याचा जरा डोक्यात प्रकाश पडेल. “

“मग पडतोय का प्रकाश? “

“हळूहळू पडेल. आपल्याला कुठं घाई आहे? बदल सावकाश होऊ दे. मुलाला हाणून मारून काय होणार? ” तो एकदम शांतपणे म्हणाला.

“पण त्याच्या दहावीच्या अभ्यासावर परिणाम होऊ देऊ नका. शिकू दे त्याला भरपूर. “मी म्हटलं.

“बरं झालं, आठवलं. थांबा जरा. ” असं म्हणून त्यानं माझ्याकडून माझा युपीआय आयडी घेतला आणि रक्कम भरली.

“त्याला तुमच्या साधना शिबिराला पाठवायचं होतं. त्याची फी भरुन टाकली. त्याचं शिक्षण थांबवणार नाही सर. भरपूर शिकू दे. पण आता त्याच्या बाबतीत खऱ्या जगाची जाणीव आणि पालकांचा सहवास या दोन गोष्टींमध्ये आपण चुकायचं नाही, असं मी ठरवलंय बघा. ” तो छान हसत म्हणाला.

देवाचं आपल्याकडं किती बारीक लक्ष असतं, याची जाणीव मला झाली. माझ्या दिवसाची सुरुवात इतक्या विलक्षण सुंदर संवादातून झाली की, पुढं कितीतरी वेळ मी त्याच भावनेत होतो. पालकत्वाच्या मार्गात असे धक्के बसणारच, अवघड वळणं येणारच. पण आपण दोन कारखान्यांचे मालक झालो की, आपल्याच वागण्यात खूप फरक पडतो. पहिला म्हणजे डोक्यावर बर्फाचा कारखाना आणि दुसरा म्हणजे जिभेवर साखर कारखाना.. प्रसंग कुठलाही आला तरीही अस्वस्थ न होता, चिडचिड न करता, समोरच्यावर आगपाखड न करता, थंड डोक्यानं मार्ग काढता येणं, हे फार कठीण कौशल्य आहे. प्रत्येकालाच ते साधत नाही.

मुलांसोबत वेळ घालवणं, म्हणजे त्यांच्यावर डिटेक्टिव्हगिरी करणं नव्हे. आपलं त्यांच्याकडं लक्ष असायलाच हवं, पण त्यात संशयाचा सूर नको. वयात येणाऱ्या मुलांशी एकदम मैत्रीही नको अन् शत्रुत्वही नको. खरं तर, कुठलाच अतिरेक नको. अभ्यासाचा अतिरेक, करिअरचा अट्टाहास, पद-पैसा – प्रतिष्ठेच्या अपेक्षांचं ओझं, लोक काय म्हणतील याचा ताण, यापैकी काहीही नको. कारण, हे सगळं त्यांच्या चांगला माणूस म्हणून घडण्याच्या आड येणार आहे, हे नक्की.

अतिरेकी ताण घेऊही नये आणि देऊही नये. चांगलं आरोग्य, चांगले विचार, चांगली अभिरुची, चांगला सहवास आणि चांगला संवाद ही पंचसूत्री हा आजच्या Gen Z पिढीसाठीचा इम्युनिटी बूस्टर प्रोग्राम आहे. जग बदलतंय, समाज बदलतोय, कितीतरी गोष्टी नको तशा आणि नको तितक्या बदलतायत. पण भविष्यातही करिअरमधली अनिश्चितता मोठी की, आपल्या मुलांची माणूस म्हणून घडण्यातली अनिश्चितता मोठी? असा प्रश्न कधी ना कधीतरी आपल्यासमोर उभा ठाकणारच.. अशावेळी आपण नेमकं कशाला प्राधान्य द्यावं, असा संभ्रमाचा चक्रव्यूह आपल्यासमोर उभा राहणं साहजिक आहे.

पण इथंच आपली पालक म्हणून खरी परिक्षा आहे. करिअरची शर्यत आणि त्यातले बरेवाईट चढउतार कुणालाही चुकत नाहीत. अपेक्षाभंग होतील, धक्के बसतील. पण माणूस म्हणून मुलं भक्कम झाली तर, अशी आव्हानं छातीवर घेऊन लढण्याचं धैर्य त्यांच्यात येईल. हिंमत बांधून समोरच्या प्रश्नातून योग्य मार्ग त्यांना काढता येईल. चांगलं जगणं म्हणजे काय, हे त्यांचं त्यांनी ठरवण्याएवढं शहाणपण त्यांना नक्की येईल. कुठल्याच गोष्टीच्या आहारी न जाता, चांगुलपणावर विश्वास कसा ठेवायचा, याची त्यांची वैचारिक बैठक पक्की होईल. शहाणपणानं योग्य निर्णय घेता येतील, शिस्तबद्ध नियोजन करुन ते तडीला नेता येतील. एकटेपणा, निराशा, चिंता, भीती, अनिश्चितता अशा गोष्टींचा विपरीत परिणाम त्यांच्यावर होणार नाही. फक्त एक पंचसूत्री जगायला लागलो तर किती मोठा लाभ होईल..! पुढचं वास्तव दिसण्यासाठी आपल्या मुलांच्या हातात टेलिस्कोप सुद्धा दिला पाहिजे, आणि आयुष्याचा आनंद अनुभवण्यासाठी त्यांच्या हातात कॅलिडोस्कोप सुद्धा दिला पाहिजे.. एवढं आपण जमवलं की झालं आपलं काम..!

बघा.. विचार करा.. याहून जास्त काय लिहू?

©️ श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted