श्री संदीप सुंकले (दास चैतन्य)
मनमंजुषेतून
☆ मनामनातील वेताळ… लेख क्र. २ ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) ☆
बायको, पत्नी, भार्या, सहचारिणी, अर्धांगिनी अशा विविध नावाने ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीला हल्ली wife असेही म्हटले जाते…
सामान्य मनुष्याची एक खोड आहे. त्याला असे नेहमी वाटतं असते की समोरच्या मनुष्याने कायम आदर्श वागले पाहिजे…! आणि खास करून ते सुनेच्या आणि बायकोच्या बाबतीत तर हमखास वाटत असते…
काही वर्षांपूर्वी एक मालिका येऊन गेली, त्यात असे म्हटले होते की सर्वांना आपली अक्कल आणि दुसऱ्याची बायको नेहमी चांगली वाटतं असते…
.. यातील विनोदाचा भाग सोडून दिला तरी यातून बोध घेण्यासारखे खूप काही आहे…
एक मुलगी आपले घर, परिवार आणि बालपणीचे भावबंध सोडून दुसऱ्याचे घरी जाते ती फक्त त्या नवऱ्यापासून प्रेम, माया, आधार, पाठिंबा, प्रोत्साहन मिळेल या आशेने…
डीएनए मध्ये असलेल्या स्वतःचे विश्व (कुटुंब) निर्माण करण्याच्या स्वाभाविक ओढीने ती मुलगी हे सर्व स्वीकारते… स्वतःचे विश्व निर्माण करण्यासाठी नवऱ्याची निवड केली की तिला त्यावर त्याचे अख्खे कुटुंब आणि परिवार सुद्धा स्वीकारावा लागतो…
सध्याच्या काळात तर त्रिकोणी कुटुंब असल्याने आणि समाजात मिसळण्याची सवय नसल्याने किंवा तशी सवय न लावण्याने मुली सासरी जरी पुष्कळ माणसे असतील तर एकदम गोंधळून जातात… , ज्याच्याशी लग्न केले तो सुद्धा नुकताच नवरा झाला असल्याने तो सुद्धा तिला समजून घेण्यात आणि उचित मार्गदर्शन करण्यात कमी पडतो… , मग ती गोंधळून जाते…
सुदैवाने घरातील मोठ्या माणसांनी तिला नीट पार्श्वभूमी समजून सांगितली आणि तिने ती सजगतेने समजून घेतली तर ती मुलगी तिथे हळूहळू रुळते, त्या घराला आपले घर मानते, आपलेसे करते…
आमच्या घरात असे चालत नाही असे सांगण्या आधी, आमच्या घरात काय काय चालते हे सांगितले तर आलेल्या नवीन मुलीला त्या त्या घरात राहणे सोयीचे होऊ शकेल…
… याची दक्षता मात्र दोन्ही कडून घेतली गेली पाहिजे…
बायको म्हणून आलेली मुलगी आधी सून होते, कोणाची वहिनी होते, कोणाची मामी होते, कोणाची आत्या होते, त्यामुळे बायकोच्या भूमिकेत शिरायला आणि ती भूमिका सर्वार्थाने वटवायला वेळ लागतो…
तोपर्यंत नवऱ्याच्या मनात बायको नावाचा वेताळ (बायकोने अमुक अमुक पद्धतीनं वागले पाहिजे…) जागृत झालेला असतो…
– – आणि वेताळ जागृत झाला की तो काय करतो याचा अनुभव प्रत्येकाने कमीअधिक प्रमाणात नक्कीच घेतला आहे, घेतला असेल… मग तिथेच बारीकशी ठिणगी पडते…
ती ठिणगी जर वेळीच मायेच्या, समजुतीच्या अग्निरोधकाने विझविली नाही तर ते नवरा बायको नावाला राहतात, ते कधीच एकमेकांचे सहचर होत नाहीत… , त्यांना मुले होतात, प्रपंच होतो पण जेवणात मीठ नसलेला त्यांचा संसार होतो…
एका छताखाली राहिलो म्हणून कोणी हे आमचे कुटुंब आहे असे म्हणू शकत नाही…
जसा काडी काडी जोडून संसार केला जातो, तसे नवरा बायकोने परस्परांचा एकेक गुणावगुण पाहून, आवश्यक तिथे लक्ष आणि दुर्लक्ष करून नाते घट्ट केले पाहिजे, जोडीदाराचे न्यून पाहून ते जगाला न दाखवता, ते न्यून नकळत कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे…
विवाह पत्रिकेवर विघ्नहर्त्याचे चित्र छापून सुरुवात जरूर करावी, पण शेवट चांगला होण्यासाठी दोघांनी अथक आणि अविरत प्रयत्न करावे… , इच्छा चांगली असेल तर मार्ग मिळतोच…
*सांधा मजबूत होण्यासाठी कोणीतरी मोठे व्हावे लागते आणि कोणीतरी स्वतःला तासून घ्यावे लागते… *
बायको कडून असलेल्या अपेक्षा त्या त्या नवऱ्याने स्पष्ट करून सांगाव्या आणि आपल्या बद्दल असलेल्या तिच्या अपेक्षा शांतपणे विचारून घ्याव्यात…
त्यासाठी आवश्यक तो वेळ द्यावा…
कालपर्यंत फक्त मुलगी म्हणून असलेली तिची ओळख, तिला विसरायला आणि बायको म्हणून झालेली नवीन ओळख अंगिकारायला तिला पुरेसा वेळ
द्यायला हवा…
बीज पेरले की दुसऱ्या दिवशी त्याचे रोप होत नाही आणि संध्याकाळी त्याला फळे येत नाहीत… , नाही का?
मनुष्य दुसऱ्याकडून असलेल्या अपेक्षा मनमोकळेपणे आणि समोरच्याचा आदर ठेवून सांगू शकला तर त्याच्या मनात असलेले वेताळ त्याला त्रास देणार नाहीत…
मग ते नातं सासू, सून, सासरझ नणंद, दीर, जाऊ, नवरा, बायको, कोणतेही असो…
– – सुस्पष्ट आणि माफक अपेक्षा – संवाद – सहवास – पारदर्शकता – बांधिलकी – जबाबदारी –
अकृत्रिम स्नेह – आणि समर्पण….. या काही गुणांचा उपयोग करुन मनुष्य कोणतेही नाते संवर्धित करू शकतो, उबदार करू शकतो… आपण तसा प्रयत्न करू…
– – –
आज काळ बदलला, त्यामुळे अनेक नात्यांचे संदर्भ आणि कमीअधिक प्रमाणात बदलत गेल्या…
सुनेच्या भूमिकेत शिरणाऱ्या मुलीच्या आणि सून म्हणून ज्या घरात ती मुलगी जनरल आहे, त्या घरातील लोकांच्या अपेक्षाही बदलत गेल्या असे म्हणता येईल…
१९९१ पासून भारतात आर्थिक बदलांना सुरुवात झाली आणि मागील ३०_३५ वर्षात याचे बरेवाईट परिणाम समाजमनावर झाले. मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर याचे परिणाम झाले…
महान तत्त्ववेत्ता *रेने देकार्त* म्हणतात, त्याप्रमाणे “जुने कितीही सदोष वाटू लागले, तरी अगदी निर्दोष नवे हाती येइपर्यंत शहाण्याने हातच्या जुन्याचा त्याग करू नये. भारतीय समाज मात्र नवनवीन प्रयोग मागील ३० ते ३५ वर्षे करीत आहे…!
– – जागतिकीकरणामुळे कुटुंबव्यवस्था बदलली. कुटुंबाचा आकार बदलत गेला, थोडक्यात कमी कमी होत गेला…! ! मनुष्याचे स्टेटस सिम्बॉल आणि त्याची व्याप्ती बदलत गेली…! कुटुंबाचा आकार कमी होत असताना, पगाराचे आकडे, गॅजेट्स आणि घरापुढे वाहनांची संख्या मात्र वाढत गेली…
पारंपरिक *”विवाह ते लिव्ह इन रिलेशनशिप”* हा प्रवास मागील ३० ते ३५ वर्षातील आहे…
*याच काही वर्षात space, privacy, आणि अशा अनेक संकल्पना येणारी नवीन पिढी आत्मसात करीत गेली… *.
एखादे नाणे हातात घेतले की त्यांच्या दोन्ही बाजू आपल्या हातात अलगद येतात, या न्यायाने प्रत्येक व्यवस्थेत असलेले गुणदोष असतातच. पारंपरिक विवाह पद्धतीत सुद्धा गुणदोष होते, आहेत आणि त्याला पर्याय म्हणून पुढे आलेल्या अनेक पद्धतीत सुद्धा कमीअधिक प्रमाणात गुणदोष आहेत. हे अगदी स्वाभाविक आहे. इथे समर्थ रामदास स्वामी सांगतात त्याप्रमाणे विवेक करण्याची गरज आहे. पण जागतिकीकरणाचा रेट्यापुढे याचा विचार करायला आणि त्यानुसार काही आराखडा तयार करण्यात आपली समाजव्यवस्था कमी पडली असे खेदाने म्हणावे वाटते. एकेकाळी समाजाचे प्रबोधन करणारी, सामाजिक सभ्यता समजून सांगणारी व्यवस्था अडगळीत पडली आणि प्रसारमाध्यमे सांगतील, दाखवतील त्याला समाजाने सभ्यता मानण्यास प्रारंभ केला. याचा परिणाम असा झाला की भारतीय मनुष्याला भारतीय सभ्यता पूर्णपणे सोडणे शक्य झालं नाही आणि परदेशी सभ्यता मनापासून अंगीकारता आली नाही, यातून एक वेगळीच संस्कृती (?) भारतीय समाज मानसाला स्वीकारणे क्रमप्राप्त झाले…
आधी सांगितल्याप्रमाणे ज्याप्रमाणे जागतिकीकरणाचा परिणाम जसा समाजावर झाला, तसा तो नातेसंबंधांवर नसता झाला तर नवल…
बायकोने पैसे कमवून घरी आणले पाहिजेत, तसे घरातील सर्व कर्तव्ये सुद्धा तिने तितक्याच निगुतीने करायला हवीत अशी अपेक्षा समाजात आपल्याला पहायला मिळतात… , तसेच दुसऱ्या बाजूला मुली जास्तीत जास्त करिअरच्या मागे लागलेल्या आढळतात. कधीकधी या अपेक्षा स्पर्धेचे रूप घेऊन जेव्हा आपल्या समोर येतात तेव्हा विवाहाचा मूळ हेतू आपण विसरून गेलो की काय असे म्हणावेसे वाटते…
आपल्या सारखा नवीन जीव निर्माण करणे, ही प्रत्येक जीवाची मूलभूत इच्छा मानली जाते. आणि यातूनच विवाह संस्था निर्माण झाली असे आपल्याला म्हणता येईल…! पूर्वी असलेली मुलांची संख्या आता शून्यावर येऊ घातली आहे…! याचे सामाजिक आणि विविध क्षेत्रावर बरेवाईट परिणाम होत आहेत… , याचाही विचार समाज म्हणून प्रत्येक घटकाने करण्याची गरज आहे…
*मनुष्य समाजशील प्राणी आहे असे आपण मानतो. मनुष्य एकटा राहूच शकत नाही. जर तो एकटा राहू शकत नसेल तर त्याला समाजाच्या आधाराने रहावे लागेल. जर समाजाच्या आधाराने रहायचे असेल तर समाजाच्या हिताचे, पर्यायाने आपापल्या हिताचे रक्षण करणे हे आपले आद्य कर्तव्य नव्हे काय? *
*भारतीय समाजाचा डीएनए पुढील पिढीत चांगल्या अर्थाने जपणे, संवर्धित करणे आणि पुढील पिढीकडे सोपवणे हे प्रत्यकाचे आद्यकर्तव्य आहे…! *
*हे कर्तव्य पार पाडण्यासाठी मनात मनात दडून बसलेले जोडीदाराकडून अवास्तव अपेक्षा, व्यावसायिक जीवघेणी स्पर्धा, अनावश्यक स्टेटस सिम्बॉल, आपल्या जमिनीशी असलेली नाळ तोडणारे असे विविध वेताळ आपल्याला जाणीवपूर्वक झटकून टाकावे लागतील…! मग यातूनच एकसंघ, एकरस आणि सर्वसमावेशक असा सदृढ समाज निर्माण होईल असा मला विश्वास वाटतो…! *
— लेख क्र. २
© श्री संदीप सुंकले (दासचैतन्य)
मो. 8380019676
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर





