मेहबूब जमादार 

🔅 विविधा 🔅

☆ बातम्या ☆ 🖋 मेहबूब जमादार ☆

खरं तर दूरदर्शन वरील बातम्या पाहून त्याच त्या बातम्या

कितीवेळ पहाव्या अन का पहाव्या असा प्रश्न पडतो. एकच बातमी सह्याद्री वाहीनी सोडली तर प्रत्येक वाहीनी वर दर दहा मिनीटाला चालू असते. प्रत्येक घरात हल्ली दूरदर्शन आहे. घरात राहणा-या माणसानीं ती कितीवेळा पहावी याला काही गणितच राहिलेले नाही.

एक एक बातमी तर सलग तीन तीन दिवस चालू असते. एखदा बातमी सरळ सांगायची. परत तीच बातमी मीठमसाला लावून सांगायची. परत तीच फोडणी देवून सांगायची. परत दोन तासानी त्या बातमीच्या घटनेबद्दल लोकांचं काय मत आहे, हे विचारायचं. प्रत्यक्ष त्या घटनेचं त्या जागेवरील चित्रीकरण दाखवायचं. बातमी तीच एखदा पुरुषाकडून कांहीवेळाने स्त्री कडून सांगायला लावायची.

ते ही जोरदार आवाजात. घरातल्या ऐकणा-या माणसाला वाटावं ही बातमी नसून कोठेतरी दंगलच चालू आहे. हे सर्व का? तर चॉनेलवाल्यांचा टीआरपी

वाढावा म्हणून. मला यातून एक म्हणायचं आहे तुमच्या टीआरपी साठी किती लोकांना तुंम्ही कितीदा मुर्ख बनवणार आहात.

सर्वसाधारण १९९० च्या पुर्वी बातम्या सांगणा-या स्त्री कलाकार सुंदर वेशभूषा करून बातम्या सांगायच्या. फार सुंदर बातम्या वाटायच्या. मनांला वाटायचं या बातम्या तास न तास पहात रहाव्या. एकतर बातम्या देणा-यांचा आवाज इतका गोड असायचा. बाहेर बसणारे लोक, हा आवाज ओळखायचे. त्या बातम्यात कर्णमधुर आवाज होता, शालीनता होती. सहजसुंदर आवाजाने ते रसिकांना आकर्षित करायचे. अशा बातम्यांची सुरुवात सहजसुंदर हास्याने व्हायची तर शेवटही सुंदरशा हास्यानेच व्हायचा.

टिव्ही वरील हिंदी बातम्यांची सुरूवात सन १९६५ पासून झाली. पहिली बातमी देण्याचा मान हा प्रतिमा पुरी यानां मिळाला. त्यानंतर ज्यानीं जादूई आवाजाने सर्वसामान्य रसिकांवर भूरळ पाडली त्यामध्ये सलमा सुलतान, शमी नारंग, सरला नायर, मंजिरी जोशी अगदी अलीकडे म्हणजे २००५ पर्यंत शोभना जगदीश यांच नांव घ्यावं लागेल. अर्थात आपल्याकडे टिव्ही १९८५-९० च्या काळात आला. पण एक सत्य आपण कबूल केले पाहिजे. जोपर्यंत दूरदर्शन होतं तोवर सारं काही ठिक होतं.

चांगल्या बातम्या व दर्जेदार मालिका आपणाला त्यावेळीच पहायला मिळाल्या. रंगीत टिव्ही नसतानां आपण हे रसिकतेने पहायचो. ऐकायचो.

आज आपण पहातोय त्या बातम्या भले ख-या असतील ही पण रसिकांना त्या फेक न्यूज वाटू

लागल्यात. म्हणजेच त्यामधील सत्यता पडताळणीची

वेळ तुंम्हा-आंम्हावर आलेली आहे. या बाबींचा निश्चितच आपणाला गांभीर्याने विचार करावा लागेल.

राजकीय बातम्या बद्दल तर न बोललेलं बर!

इतक्या बेभरवशाच्या बातम्या चॅनेल वाले द्यायला लागलेत. उदाहरण द्यायचं झालं तर हल्ली काही नेत्यांना मंत्री पद मिळाली नाहीत. त्यामूळे ते नाराज आहेत. इथपर्यंत ठिक आहे. पण ते अमुक पक्षाकडे निघालेत. त्यानीं या नेत्यांची भेट घेतली, त्या नेत्यांची भेट घेतली. प्रत्यक्ष आजही पाहिलं तर आपणास यामध्ये काही ही सत्य नसल्याचे आढळून येईल. पण अशा बातम्या कोण पहिल्यांदा देतो यासाठी ही लागलेली चुरस आहे, हे सहज आपल्या लक्षात येईल.

काही बातम्या टीआरपी वाढविण्यासाठी अति रक्तरंजित दाखविल्या जातात. जर अशा बातम्यांची खरी बाजू लोकांपासून दडवून ठेवली जाते. त्यामुळे आज आपली जबाबदारी फारच वाढली आहे हे सत्य नाकारून चालणार नाही.

© मेहबूब जमादार

मु. कासमवाडी,पोस्ट -पेठ, ता. वाळवा, जि. सांगली

मो .9970900243

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments