सुश्री संध्या बेडेकर
विविधा
☆ “राष्ट्रीय सणांचे महत्त्व…” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆
जुलै, ऑगस्ट महिने म्हणजे बारा महिन्यांपैकीच. पण खास, वेगळे महिने. श्रावण म्हणजे पावसाच्या सरी. पूर्ण वातावरण छान, सुंदर हिरवेगार, आल्हाददायक प्रत्त्येकच दिवशी काही तरी विशेष आहे, असं वाटत. आणि खरच काही न काही असतही. नागपंचमी, जिवतीची पूजा, श्रावणसोमवार, जन्माष्टमी, गोपाळकाला, दहीहंडी, महालक्ष्मी पूजन, आणि बाप्पा चे आगमन ही असतेच. •••••
असे अनेक सणवार. प्रत्त्येकाचे विशेष महत्व. कधी आपल्या मुलांच्यासाठी, तर कधी मुली माहेरी येतात म्हणून. तर कधी घरच्या कान्हा करिता. तर कधी नववधू ची मंगळागौर. शुक्रवारी हळदीकुंकू, तर श्रावणातला सत्यनारायण. बरोबर खाण्यापिण्याची रेलचेल. पूरणपोळी, भजी शुक्रवारी गुळ चणे, सत्यनारायणाचा प्रसाद, राखीचा नारळीभात, कृष्ण जन्माष्टमी नंतरचा गोपाळकाला. मज्जाच मज्जा असते. ••••
महालक्ष्मीची पूजा हा एक मोठा सण. •••••
देशस्थांचे महालक्ष्मी पूजन म्हणजे अगदी प्रशस्त कार्यक्रम /सोहळा. त्या दिवशी सोळा भाज्या, चार पाच कोशिंबीरी, पाच प्रकारची भजी, पडवळ टाकून कढी, ज्वारीची आंबिल, सांजोरया, पूरणपोळी, करंजी, लाडू पात्या यांचा फुलोरा असतोच. हा सगळा कार्यक्रम जेष्ठा आणि कनिष्ठा माहेरी आलेल्या असताना, त्यांच्या स्वागतासाठी. माहेरी आलेल्या मुलींचे कौतुक. स्वागत. दोघी बहिणींचे आगमन त्यांचा पाहुणचार, दागिने साड्या, सर्व तयारी अगदी दहा बारा दिवसांआधी च सुरू होते. त्यांची मुले ही असतातच बरोबर. एक दिवस राहुन आपल्या घरी परत जातात. ••••
प्रत्येक दिवशी एक नवीन कार्यक्रम उत्साह आनंद सगळीकडे. •••••
याच बरोबर १५ ऑगस्ट म्हणजे देशाचा, सर्व नागरिकांचा मोठा सण. राष्ट्रीय सण. सर्व सणांपेक्षा मोठा, एकत्र येऊन साजरा होणारा सण.
तस बघीतल तर राष्ट्र भक्ती, राष्ट्र प्रेम दखवायच, म्हणजे फक्त १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीला देश भक्ती गाणी ऐकायची, झेंडावंदन, भाषण ऐकायच एवढच नव्हे.
आपल्या देशाचा अभिमान, आपल्याला मिळालेल व्यक्ती स्वातंत्र्य, आपली सुरक्षा, प्रगती हे सर्व आपण दररोज अनुभवतो. मग काय? फक्त या दोनच दिवस देशाचा विचार करायचा का?
आपल्याच घरच उदाहरण घ्या… घरचा प्रमूख कितीही चांगला जबाबदार असला, तरी घरच्या मेंबर्स ची पण काही जबाबदारी असतेच ना.
घरातील चार लोकांची मत एकसारखी नसतात. त्यावर आपापसात चर्चा होते.
कधी कधी तर अगदी गरमागरम चर्चा होते. विषय किती वाढवायचा? कुठे थांबायच? हे कळल तर पुन्हा सर्व एकत्र गुणागोविंदाने नांदतात. एकमेकांना मदत करतात. घरातील शांती, प्रगती याकडे लक्ष देतात. शेजारी जाऊन आपल्या घरच्या गोष्टी सांगत नाहीत. त्यांना आपल्या घरच्या आंतरिक गोष्टींबद्दल चर्चा करायला, आपल्या घरात ढवळाढवळ करायला चांस देत नाही. आपल्या भावाबहिणींबद्दल एकही अशी तशी गोष्ट ऐकायला आपण तयार नसतो. हे नियम घराचे स्वास्थ्य टिकवायला आपण पाळतो. आपला स्वाभिमान जपतो. दररोज लक्ष देतो. बरोबर शेजारचा अडचणीत असला तर लगेच मदतीचा हात पूढे करतो. हे सर्व आपला विवेक, संतुलन आणि शिस्त, परस्पर आदर यामुळे शक्य होत.
जेंव्हा एकाच घरातील चार जण एकाच मताचे नसतात, तेंव्हा देशातील १४० करोड लोकांमध्ये मतभेद असतीलच. फक्त त्यात स्वार्थ् नसावा. देश सर्वोपरी असावा…
मग हाच विचार, हीच भावना, असच वागण, , ही समज आपल्या देशासाठी पण असायला हवी ना. फक्त दोन दिवस नाही, तर दररोजचचच..
इतक्यातच घडलेली घटना…
४१ वर्षानंतर अंतराळातून
भारत कसा दिसतो?
याबद्दल बोलताना Wing Commander Sudhanshu Shukla म्हणाले…
* अंतराळातून भारत महत्वाकांक्षी दिसतो. निडर दिसतो, confident दिसतो, येथून भारत गौरवशाली दिसतो म्हणूनच आपला भारत सारे जहां से अच्छा आहे.
त्या दिवशी देशभरातील सर्व नागरिक शुधांशुच्या सुखरूप परत येण्याची वाट बघत होते. प्रार्थना करत होते. त्यांना बघून सर्वांचा ऊर दाटून आला. सर्वत्र टाळयांचा कडकडाट ऐकू आला.
अंतराळातून भारताबद्दल उद्गारलेली ही वाक्य, त्या भावना, त्या आशा, अपेक्षा, इच्छा आपल्या सगळ्यांच्याच मनात आहेत.
मग माझ्या सारख्या सामान्य नागरिकाची जबाबदारी काय? मान्य आहे,… मी किंवा माझ्यासारखे बहुतेक सगळेच अंतराळात जाऊ शकत नाही, सीमेवर देशाचे रक्षण करायलाही जाणे जमणार नाही. प्रत्येकाकडून ही अपेक्षाही नाही आणि गरजही नाही. पण मी काहीच करणार नाही का? फक्त टाळया वाजवेन, हेही अजिबातच बरोबर नाही.
सिंदूर operation च्या वेळेस देशावर आलेल संकट आपण बघीतल. कोविडचा महामारीचा पिरेडही आपण बघीतला.
परिस्थिती चे गांभिर्य कळल्यावर लगेचच आपण नवीन झालेले बदल मान्य केले. कुठलाही हट्ट न करता, तक्रार न करता, जसं जे नियमात बसेल तसं सहर्ष करत गेलो. ही किती मोठी, किती कौतुकाची गोष्ट आहे. आपल्या देशाची गरज आहे, फक्त एवढी समज सर्वांना समजली. व त्याप्रमाणे सर्व वागू लागले. सध्या सर्व देव पांढरा कोट घालून दवाखान्यात आहेत हे म्हणणे तेंव्हा आपल्याला पटले. •••••
हा सर्व सणाहुन मोठा असा समजदारीचा, जबाबदारीचा, देशभक्तीचा, परिचय आपण दिला. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. यापेक्षा अजून जास्त एक भारतीय आपला परिचय काय देऊ शकतो??. म्हणजे देशाची गरज, आपली जबाबदारी, आपल्या सर्वांना चांगली समजते. सर्वांच्या सहकार्याने देशावर आलेल्या संकटाला आपण नेहमीच सामोरे जातो.
ही समजदारी, देशभक्ति, जबाबदारीने वागण हे नेहमीच असाव ना. त्यासाठी कठीण परिस्थितीतच यायला हवी का?
कोणत्याही सणापेक्षा ‘ राष्ट्रीय सण/प्रश्न ‘ मग तो स्वतंत्रता दिवस असो, किंवा देशावर आलेले संकट असो. सर्वांचे एकत्र येणे, मजबूती ने सामोरे जाणे, ही महत्वाची गोष्ट आहे. देशाला सांभाळणारे बरेच आहेत. फक्त मी काय करावे? व काय करू नये? एवढच समजणे सामान्य नागरिकाचे कर्तव्य आहे. हे फक्त कठीण परिस्थितीतच नाही, तर नेहमीच आहे. ••••••
देशाचे नागरिक, त्यांचे विचार, शिस्त देशाची संपत्ती असते. देशाचे वैभव, शान असते. असे जबाबदार नागरिक देशाची ढाल असतात.
मी माझ्या घराची शांतता, स्वच्छता सांभाळतो, शेजारयांशी चांगले संबंध ठेवतो. प्रत्त्येकाचा आदर करतो. हीच एक बेसिक गोष्ट सर्वांनी पाळली तर या आंतरिक शक्तिमुळे देशातच काय? देशाच्या बाहेर सुद्धा सुरक्षिततेचे कवच आपोआपच तयार होईल. मग फक्त आपणच नाही तर दूसरे बाहेरचे पण म्हणतील..
ये भारत है। ये भारत के लोग है । सारे जहां से अच्छे है।
म्हणतात ना…
Your greatest weapon is your mind. Train it To make right decisions. To make right selectios. To make right choices.
जय हिंद.
© सुश्री संध्या बेडेकर
पुणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈






