श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

? मनमंजुषेतून ?

☆ बोल्ले तो मराठी☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

जसविंदर… ऊर्फ जस्सी.

आमच्या चांडाळ चौकडीतला एक कोन.

खरं तर तो आमच्या गँगमधे कसा?

कोणालाही आश्चर्य वाटेल.

आम्ही तिघे.

म्हणजे मी, लल्या आणि सम्या… कौस्तुभ, ललित आणि सम्यक.

अनुक्रमे सदाशिव, नारायण आणि शनिवार. पुणे 30.

झोपण्यापुरते घरी असायचो.

बाकी स. प. महाविद्यालय किंवा त्यामागे तिलक.

आम्ही तिघेही एम. ए. मराठी करतोय.

खरं सांगायचं तर खाज म्हणून.

मराठी साहित्यविश्वाला,

आमच्या असण्यानं आणि नसण्यानं,

काहीही फरक पडणार नाहीये…

तरीही.

मी सो काॅल्ड पटकथा लेखक आहे.

दोन चार वेळकाढू, रोजच्या साबुछाप मालिकांच्या काही भागांचं लेखन केलंय.

नवीन कामाची धडपड चालूय.

असली रिकामी धडपड,

शिकतोय या नावाखाली, सहज खपून जाते.

लल्या एका नामवंत वृत्तपत्रात ऊमेदवारी करतोय.

बी. जे. झालंय.

त्याला शब्दप्रचूर असं काहीसं, जडजड स्तंभलेखन करायचंय.

एरवी नाईटशिफ्ट करतो.

राहिला सम्यक.

तो ऊत्तम निवेदक होणारेय म्हणे.

एका रेडिओ चॅनलवर पार्ट टाईम आर जे आहे.

थोडक्यात आमच्यापैकी कोणीही, वेल सेटल्ड नाही.

रिकामं घरी बसण्यापेक्षा काॅलेजदर्शन बरं.

आमचा अभ्यास.

हा एक अभ्यासाचा विषय.

अभ्यास फारसा करत नसलो तरी, वाचायचो भरपूर.

अत्रे सभागृहातलं एकही पुस्तकांचं प्रदर्शन चुकवायचो नाही.

आप्पा बळवंतचे वारकरी.

वाचनाची भूक वाढत चाललेली.

भरपूर वाचायचो.

अगदी तहानभूक विसरून.

माज करावा अशी एकच चीज, आमच्याकडे होती.

आमची शुद्ध, साजूक पुणेरी मराठी भाषा.

काय तिचा तो दिमाख.

तो लहेजा.

ते पावित्र्य.

ते भाषिक सौंदर्य.

ते अनुनासिक ऊच्चारण.

आम्ही तिघं बोलत बसलो की,

तमाम जन, तयांचे कान आम्हास बहाल करीत.

एखाद्या नऊवारीतल्या सुवासिनीने,

ईकडच्या स्वारीला, ” आम्ही नाही जा “

असे लटके बोल ऐकवावेत.

आणिक तो नरोत्तम, आनंदाने बेहोश व्हावा. ,

तस्सं.

तस्स मराठी असायचं आमचं.

जाम माज होता आम्हाला, आमच्या शुद्धतेचा.

किंबहुना खरं मराठी भाषासौंदर्य,

हे फक्त पुणे 30 या टापूतच टिकून राहिले आहे,

याविषयी आमच्या मनात किंतू नव्हता.

‘ आनी, पानी, करायलास, करतूस, काय बे… ‘

हे सगळं ऐकलं की आमचा पारा चढायचा.

बाहेरची लोकं, पुण्यात फार वाढलीयेत आजकाल.

त्यामुळे ईथल्या मराठीचा, घडी घडी विनयभंग होतोय, असं वाटायचं.

असल्या परभाषीक मंडळींपासून, आम्ही चार हात लांब असायचो.

थोडक्यात आम्ही शिष्टवर्गात गणले जात होतो.

हे असं होतं.

एकदा शुद्ध पुणेरी मराठीची भूतबाधा झाली की साला…

क्षमा असावी.

मेहुणा म्हणायला हवं खरं तर.

जाऊ दे.

एक दिवस असाच तिलकवर चहा ढोसत होतो.

आणि जस्सी भेटला.

त्यानं स्वतःहूनच ओळख करून दिली.

‘मी जसविंदरसिंग पंजाबी.

एम. ए. मराठी करतोय.

पुढं पीऐच. डी. पण करणार आहे.

संतसाहित्यावर.

नामदेवांवर. ‘

आम्ही ऊडालो.

एक तर शुद्ध, स्पष्ट भाषा.

अस्सल पुणेरी.

चितळ्यांच्या साजूक तुपातल्या, जिलबीहूनही साजूक.

एकदम वाटलं,

सुबोध भावे पंजाबी पगडी घालून, आला की काय?

‘ तु इतका शुद्ध मराठी कसा बोलू शकतोस? ‘

मी ओठांचा चंबू करून विचारलं.

‘ अरे त्यात काय?

आमची पुण्यातली चौथी पिढी आहे ही.

चिमण्या गणपतीपाशी आमचं पेंटस्चं दुकान आहे.

गेली चाळीस वर्ष.

मी काय, आमच्या घरी सगळे, ईतकंच अस्सल मराठी बोलतात. ‘

माझं तोंड चिमणीएवढं.

जस्सी कधी आमच्या गँगमधे सामील झाला, कळलंच नाही.

खरं तर आमच्यात खरा अभ्यास तोच करायचा.

एकदम सिनसियर.

प्रत्येक अॅक्टिव्हीटीत सक्रीय सहभाग.

मराठी साहित्य मंडळ, वक्तृत्व स्पर्धा सगळीकडे.

हे सगळं करून दुकानही सांभाळायचा.

परचेज, डिलीव्हरी, आॅर्डर, टेंडर…

यापैकी कशासाठी तरी टूरही करायचा.

नगर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा ते पार नागपूरपर्यंत.

सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सावंतवाडी ते पार गोव्यापर्यंत.

महिन्यातून दहा दिवस तरी जस्सी टूरवर असायचा.

दिवाळीची सुट्टी लागली.

जस्सी नागपूरला जाणार होता.

लल्या म्हणाला, आपणही जाऊ.

सम्याही तयार झाला.

तेवढंच महाराष्ट्र दर्शन.

जस्सीला विचारलं.

“मजा येईल.

एकट्याला जाम कंटाळा येतो.

ईन्डिका असते माझ्याकडे.

ड्रायव्हरही असतो. “

आठ दिवसाचा प्रोग्रॅम ठरला.

प्रत्येक ठिकाणी जस्सीचे सप्लायर.

अगदी घरगुती संबंध.

त्याच्याबरोबर आमचंही स्वागत व्हायचं.

हटकून घरी जेवायला बोलवलं जायचं.

मनापासून आग्रह व्हायचा.

नगरपासून सुरवात.

औरंगाबाद, जालना, मेहकर, बुलढाणा, अमरावती, अकोला, नागपूर…

प्रत्येक ठिकाणी वेगळा मेनू.

अस्सल प्रादेशिक.

आमची माती, आमची माणसं.

आम्ही सगळे खुष.

आम्हाला जस्सीचं खूप कौतुक वाटलं.

इतक्या कमी वर्षात, खूप माणसं जोडली होती त्यानं.

नागपूरला पोचलो.

संत्रा बर्फी हादडली.

नागपुरी पोहा चाखला.

परत निघालो.

सहज विषय निघाला.

“जस्सी, तुला कसं जमतं हे सगळं? “

सम्यानं विचारलं.

जस्सीनं मोठ्ठा श्वास घेतला.

” खरं सांगू, मायमराठीमुळे.

पंजाबीईतकंच माझं मराठीवर, प्रेम आहे दोस्तांनो.

पण माझ्या मराठीला भिंती नाहीयेत तुमच्यासारख्या.

अरे दहा मैलावर भाषा बदलते.

नगरला मी नगरी बोलतो.

नागपुरला नागपूरी.

अकोल्याला जाऊन, काय बाप्पा म्हणतो.

सगळं शिकून घेतलंय मी.

भिंती आपोआप गळून पडतात.

माणसं जवळ येतात.

भाषा माणसं जवळ करणारी असावी.

लांब नेणारी नको.

शुद्धलेखनात नियम पाळायलाच हवेत.

पण बोलीभाषेचा अनादर नको.

तीही तितकीच जपायला हवी.

शुद्धतेच्या कसोट्या त्याला लावायला नकोत.

भले भाषेचा लहेजा वेगळा असेल, पोत वेगळा असेल..

पण शेवटी मराठीच आहे ती..

मुळामुठेच्या सीमा ओलांडा अन् बघा, काय बहार येते ती.

समोरच्यानं दोन शब्द ऊच्चारले की, गाव सांगू शकतो मी.

माझ्या धंद्याचं हेच गुपित आहे.

माणसं जोडायला तिथली बोली यायला हवी. “

आम्ही सुन्न.

ऊघडा डोळे.

बघा नीट.

ऊघडले.

सम्यानं त्याच्या रेडिओ चॅनलवर एक टाॅक शो ठेवला.

वेगवेगळ्या गावची, आता पुण्यात सेटल झालेली मंडळी बोलावली.

मराठीची वेगवेगळी रूपं ऐकवली.

बहारदार कार्यक्रम झाला.

पुणेरी मराठी माणसाळतेय, असं वाटायला लागलं

परवा असाच जस्सीच्या दुकानात बसलो होतो.

” काला रंग का दाखवून राहिला बे, मले पारवा हवे हाय ना ” समोरचा माणूस दुकानातल्या माणसाला सांगत होता.

माझी ट्यूब पेटली.

‘ तुम्ही जळगावचे का हो?

ऐकायला छान वाटते तुमची भाषा. ‘

तो ताजाताजा पुण्यात आलेला.

एकदम खुष झाला.

पिशवीतून केळ्याच्या वेफर्सचा पॅक काढला.

मला गिफ्ट केला.

तिखट वेफर्ससुद्धा..

गुलाबजामूनपेक्षा गोड लागले.

मायमराठी तुला सलाम!

 

©  श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सौ.ज्योती कुळकर्णी.
0

खरं आहे कौस्तुभजी, मस्त लेख!