सौ. ज्योती कुळकर्णी
मनमंजुषेतून
☆ भांड्याला भांडं लागणारच! ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆
भांड्याला भांडं लागणारच!
आणि…
लागले की नाद होणारच!
याचा सरळ अर्थ खरं म्हणजे असाच आहे, की तोंडाला तोंड लागलं म्हणजे वाद होणारच! पण हे सरळ कुणाला सांगितलं तर आणखी कितीही तोंडं तोंडाला लागू शकतील आणि किती वाद वाढतील याचा नेम नाही. म्हणून आपण म्हणतो भांड्याला भांडं लागलं की नाद होणारच! तसेही आपल्याला मधून नादमय बोलायची सवय असतेच नं! म्हणूनही आपण तसं म्हणतो.
आमच्या माहेरी मंजुळ नादा मध्ये बोलायची कोणाला सवय नव्हतीच! घर एवढं मोठं की अशा मंजुळ नादात बोललं तर कोणाला हाकाही ऐकू येणार नाहीत आणि दिलेलं उत्तरही ऐकू येणार नाही. खाली-वर आम्ही आणि काका असं राहत असू. काही निरोप द्यायचा असेल तर शंखनादासारखा आवाज करून बोलल्याशिवाय जागच्या जागून निरोप कसा देणार! थोडक्यात शंकराच्या डमरूमधून काय निघेल! अशा नादाची आम्हाला अतिशय सवय होती. कोणी हळू बोललं तर जेवलीस की नाही? अशी विचारणा व्हायची.
त्यातून आमच्या घरातही दुकानं आणि घरासमोरही दुकान ओळी. मग काय! माझे वडील प्रेस वाल्यालाही पापाराऽऽम कपडे घेऊन जा. असे मोठ्ठ्या आवाजात सांगायचे. दुसऱ्या दुकानदाराला, दाढीचं ब्लेडही खर्जाच्या आवाजात मागूनच बोलावून घ्यायचे. अशी भांड्याच्या नादापेक्षा तोंडाच्या नादाचीच आम्हाला फार सवय होती. त्यामुळे नादमय भांडे काय असतात हे माहितीच नाही. एकदा आमच्या घरात भाड्याने राहणारी कुमुद नावाची बहिणी सारखीच एक मुलगी आली घरी. माझ्या हाताने दोन भांड्यांना भांडे लागले. आवाज झालाच! ती अगदी त्रासिक चेहरा करून म्हणाली, ‘ए तो नाद थांबव. ‘ मी तिला ठामपणे म्हटले, ”असा काय भांड्यांचा झालेला नाद थांबवता थोडाच येतो! ” मग तिने मला सांगितले की त्या भांड्याला हात लाव म्हणजे नाद थांबतो. तेव्हा मला कळले, खऱ्या भांड्याला भांडे लागणे आणि लागल्यावर नाद होणे म्हणजे काय असते ते.
असेच आमच्या बहिणींचे तोंडाला तोंडं लागणे की भांड्याला भांडे लागणे असे वाद आणि नाद नेहमीच व्हायचे कधी रडा रड व्हायची तर कधी आम्ही त्याची मजा पण घ्यायचो. एकदा आम्ही सर्वांनी घरी आणलेली केळी खाल्लीत. पण माझ्या लहान बहिणीने एक केळ जास्त घेतले. तर मी लगेच तिच्याशी भांडायला लागले एक केळ जास्त का घेतलं म्हणून! तेवढ्यात वडील आले. आणि मला म्हणाले घेऊ दे घेतलं तर ती का तुझ्या बापाचं खाते. मी मनातच म्हटलं ‘माझ्या बापाचं नाही तर कोणाचं खाते आहे? मी आधी आली आहे नं! ‘ पण तेवढं काही म्हटलं नाही बरं मी. तेवढं सौजन्य होतं म्हटलं माझ्यात! पण तरी अकलेचे तारे तोडलेच मी! माझे वडील जमदग्नीचा अवतार असूनही धाडस करून त्यांना म्हटलंच. ती माझ्यापेक्षा लहान आहे म्हणजे माझ्यापेक्षा जास्त काळ जगणार आहे. म्हणून ती माझ्यापेक्षा भरपूर जास्त केळं जास्त खाईल. यावर त्यांना अक्षरशः हसावे, की रडावे, की आपल्या या दिव्य पोरीवर पंचारती ओवाळून टाकाव्यात असेच झाले असावे. मी मात्र बोलून टाकूनही स्थितप्रज्ञ वृत्तीने त्यांच्याकडे बघत होते. शेवटी त्यांनीच माझा नाद सोडला.
असे नाद नेहमीच काही भांड्याला भांडे किंवा तोंडाला तोंड लागूनच होतात असे नाही. तर कधी कधी एकाचेच तोंड वाजत राहते. आमच्या आजीने माझ्या आईला कामात थोडा आधार व्हावा म्हणून माहेरची एक बाई कामासाठी पाठवली होती. त्यांना आम्ही सगळे नानीबाई म्हणत असूं. तेव्हा अशा बऱ्याच विधवा आणि सोवळ्या बायका असायच्या. कामही करायच्या बिचाऱ्या. त्यांच्या काही अपेक्षाही नसायच्या फारशा. त्या एक दिवस मला कॉफी द्यायला विसरल्या. त्या गेल्या नंतर किती वेळा कॉफी प्यायले पण कॉफी पिताना नेहमी आईला म्हणायचे की नानीबाईच्या वेळची माझी कॉफी शिल्लकच राहिलेली आहे. एक दिवस तिने दोन कप कॉफी दिली मला आणि सांगितलं ही नानीबाईच्या वेळी ची कॉफी घे आणि ही आताची कॉफी घे आणि तुझा एका भांड्याने-तोंडाने वाजणारा नाद संपव एकदाचा! तरी हळूच पुटपुटलेच मी! एकाच वेळेला दोन कप कॉफी घेऊन मागची थोडीच भरून निघते. पण आईला आपली लेक माहिती असल्यामुळे कळलं की हिच्याकडे आता जास्त लक्ष देण्यात अर्थ नाही!
असो. असा एका तोंडाने होणारा वाद एकदा मी सासूबाईं सोबतही केला. त्या दर गुरुवारी सगळ्यांना उपास असतो म्हणून भाजी संध्याकाळी आणायच्या. सकाळी माणसांमधून जेवायला हे एकटेच म्हणून त्या सकाळी काही भाजी आणायच्या नाहीत. माझ्या मनात असायचंच. ह्यांना त्या दिवशी दोनदा भाजी मिळेल म्हणूनच त्या आणत नाहीत. बरं सासरी आल्यावर तरी चुपचाप बसावं की नाही? एकदा मी म्हटलंच. हळूच पुटपुटले बरं. तरी त्यांना ऐकू गेलंच. ह्यांना गुरूवारी दोनदा भाजी मिळेल नं! म्हणून गुरुवारी सकाळी भाजी आणल्या जात नाही. त्या काही आई थोडीच होत्या! सरळ कमरेला पदर खोचून दोन भांडे समोरासमोर आले होते. पण जाऊ दे म्हणून मी माझं भांडं गप्पच ठेवलं त्यांचं वाजलेलं ऐकत राहिले.
असे भांड्याला भांडे किंवा तोंडाला तोंडे लागतांना कधी नाद होतो तर कधी वाद! अशा नादातूनच शंकराच्या डमरूतून निघाले तसे अ ई ऊ ण ऋ ऌ क निघाले तर सुंदर बोलण्याची भाषा आणि लिपी तयार होते नाही का? …
(ता. क. : अजून शिल्लक असलेले पुन्हा केव्हातरी…)
© सौ. ज्योती कुळकर्णी
अकोला
मोबा. नं. ९८२२१०९६२४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




