श्री मंजिरी येडूरकर
इंद्रधनुष्य
☆ “देवाघरचे ज्ञात कुणाला – –” ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆
नारायण गंगाराम सुर्वे – बाळ कोल्हटकर
देवाघरचे ज्ञात कुणाला – –
२०२५, २०२६ मध्ये बऱ्याच लेखक, कवी, नाटककार, संगीतकार, गायक यांची जन्मशताब्दी होती आणि काहींची अजून आहे. त्यातील दोघांच्या स्मृती जागविण्याचा मी प्रयत्न केला आहे. एक आहेत नारायण सुर्वे, जन्म १५ ऑक्टोबर १९२६ आणि दुसरे आहेत बाळ कोल्हटकर, जन्म २५ सप्टेंबर १९२६
१) ‘देवाघरचे ज्ञात कुणाला, विचित्र नेमानेम ‘ या ओळींची सत्यता पटवणारा प्रसंग!
कुणीतरी एक बाळ रस्त्यावर टाकून देतं, एका पन्नाशी ओलांडलेल्या गिरणी कामगाराला ते दिसतं, तो उचलून घरी आणतो, दोन घास स्वतःला मिळायची मारामार पण त्यातलाच एक घास देऊन पोराला जगवतो, वाढवतो, आपलं नांव देतो. तुम्हाला वाटेल व्वा! अनाथ मुलाला घर मिळालं, माणसं मिळाली. नशीबवान आहे पोर! पण नाही, अजून त्याचे हाल संपले नव्हते. जरा पोर मोठ्ठं होत नाही तोच हा उसना बाप रिटायर होतो. आता खायचं काय? मोठ्ठा प्रश्न आवासून उभा राहतो. मग तो बाप गावाकडे जाऊन रहाण्याचा विचार करतो. आपल्याच पोटापाण्याचं काय नक्की नाही, हे पोर नेऊन काय करायचं? इथं काहीतरी काम करेल पण जगेल, याविचारानं मुलाच्या हातावर १० रुपयाची नोट ठेवतो, आणि म्हणतो, पुढचं आयुष्य कसं जगायचं तुझं तू ठरव. आणि ते पोर पुन्हा एकदा अनाथ होतं. मुंबईच्या अफाट जनसागरात लोटलं जातं. मग काय हॉटेल मधल्या पोऱ्यापासून मिळेल ते काम करून पोटाचं खळगं भरू लागलं. कधी कधी ते ही भरायचं नाही, पण मिळेल तिथलं पाणी होतंच. हाच तो मुलगा पुढे साहित्यिक होणारा नारायण गंगाराम सुर्वे!
नंतर त्यांना गिरणी कामगार म्हणून नोकरी मिळाली, आणि ते कामगार चळवळीशी जोडले गेले. त्यावेळी पत्रकं तयार करणं, ती वाटणं, भाषणे करणं, मतदान कसं करायचं याचं कामगारांना प्रशिक्षण देणं, पोस्टर्स चिकटवणं, ही कामे करताना कामगारांच्या वेदनेने त्यांना कवी बनवलं. त्यामुळे त्यांच्या कवितात कष्टकरी वर्गाची भाषा होती. मारकस बाबा या कवितेत ते आपली कार्ल मार्क्सशी ओळख कशी झाली ते सांगतात. मार्क्स वादाने ते प्रभावित झाले होते. त्याच दरम्यान कामगार वस्तीमधील आपल्या काकांच्या घरी राहणाऱ्या अनाथ मुलीबरोबर प्रेमसंबंध निर्माण झाले, परिणिती लग्नात झाली.
मुळातच हुशार होते. त्यांनी एका शाळेत शिपाई म्हणून नोकरी धरली. कविता करणं सुरूच होतं. त्यांची पहिली कविता नवयुग मासिकात ‘ डोंगरी शेत माझं गं ‘ प्रसिद्ध झाली. नोकरी करता करता सातवीची परीक्षा पास झाले. अध्यापक प्रमाणपत्र कोर्स पूर्ण केला व त्याच शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले.
त्यांना स्वतःचं पुस्तक काढायचं होतं. पण खिसा कधीच परवानगी द्यायचा नाही. शेवटी पत्नी कृष्णाबाई यांनी गळ्यातलं मंगळसूत्र काढून दिलं आणि पाहिलं पुस्तक ‘ऐसा गा मी ब्रह्मा’ प्रकाशित झालं. या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचे १००० रु बक्षिसही मिळाले. त्यामुळे कृष्णाबाई नव्या मंगळसूत्रात मानाने सजल्या. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिलंच नाही. त्यांच्या ‘ माझे विद्यापीठ ‘ ह्या काव्य संग्रहाची अनेक भाषांत भाषांतरे झाली. प्रतिष्ठेचा सोविएत लँड नेहरू पुरस्कार मिळाला. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झाले.
त्यांनी अनेक साहित्य संमेलने गाजवली. काव्य मैफिलीत ते खड्या सुरात कविता म्हणायचे. ‘ मास्तर तुमचंच नाव लिवा ‘ ही त्यांची कविता प्रचंड गाजली. त्यांच्या साहित्यात जीवनानुभव होते. त्यांनी जीवनातील संघर्षाच्या कविता केल्या पण कधीच जातपात, उच्चनीच, ईश्वरवाद, प्रारब्ध यांचा कधीही उल्लेख केला नाही. अशा या वल्लीचा पदपथापासून विद्यापीठापर्यंत व कामगारापासून बुद्धिनिष्ठ समीक्षकापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. शेवटी त्यांच्याच ‘माझे विद्यापीठ’ मधून
ना घर होते, ना गणगोत, चालेन तेवढी पायाखालची जमीन होती
दुकानांचे आडोसे होते, मोफत नगरपालिकेची फुटपाथ खुलीच होती ———
२) दुसरे आहेत नाट्य वेडे म्हणजे अक्षरशः वेडेच, छोटा गडकरी, बाळ कोल्हटकर! एक नाट्यलेखक, कवी, दिग्दर्शक, उत्कृष्ठ कलाकार असे बहुगुणसंपन्न!
लहानपणीच मातृ – पितृ छत्र हरवलं. साताऱ्याला एकत्र कुटुंबात राहणाऱ्या बाळ ने १५ व्या वर्षी नाट्यगृह पाहू न शकलेलं जोहार हे नाटक लिहिलं. नाटकाच्या वेडाने पछाडल्याने घर सोडलं आणि मुंबईचा रस्ता धरला.
ह्या नाती व माणसं सांभाळणाऱ्या अवलियाचाही खारच्या झोपडपट्टीपासून अंबरनाथच्या भूषण बंगल्यापर्यंतचा प्रवास कल्पनातीत आहे.
सुरवातीला तर हा माणूस नाटक लिहायचा, त्यातील गाणी लिहायचा, महत्त्वाची भूमिका स्वतः करायचा, बाकीचे नट शोधायचा, नाटक बसवायचा, वेशभूषा, मेकअप स्वतः करायचा, नाटकासाठी स्टेज मिळवणं, प्रकाशयोजना, स्टेज सजावट सगळी कामं एकहाती करायचे. कारण पैसा नसायचा. अशी एक दोन नाहीत तर ३० पेक्षा जास्त नाटके त्यांनी लिहिली. सुरवातीला साधी कौटुंबिक नाटके होती. त्यांचे विषय, प्रेमविवाह त्याला विरोध, मुलांच्या शिक्षणात आर्थिक अडचणी, मुलीचं लग्न, सासर माहेर यातली ओढाताण
असे सामान्यांचे प्रश्न घेतले होते. त्यांचे काव्यात्मक संवाद, सुभाषित वजा वाक्ये अशी की टाळ्यांचा कडकडाट झाल्याशिवाय राहायचा नाही. त्यांना प्रेक्षकांची नस सापडली होती. पडदा उघडल्यावर घराला छोटे फाटक, बाहेर टाकलेली खाट, पाय धुवायला छोटी मोरी, दारात रांगोळी, तुळशी वृंदावन, त्यासमोर तेवणारी पणती, मनाच्या श्लोकाचे पडसाद इतकं प्रभावी, पवित्र वातावरण बघूनच प्रेक्षक भरवून जायचे. प्रत्येक प्रेक्षकाला आपल्या घरी किंवा आपल्या आसपास घटना घडताहेत असंच वाटायचं. इतकी नाटकातल्या पात्रांशी जवळीक निर्माण व्हायची. त्याचे संवाद इतके प्रभावी, संवेदनशील असायचे की प्रेक्षक नाट्यगृहात ढसाढसा रडताना, मनमोकळं हसताना दिसायचे. त्यांच्या काही नाटकांवर, कथानकांवर खूप टीकाही झाल्या, पण त्यांची नाटके प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली. दुरितांचे तिमिर जावो, वाहतोही दुर्वांची जुडी, मुंबईची माणसं, एखाद्याचे नशीब या नाटकांचे तर १०००ते २००० प्रयोग झाले.
त्यांनी काही वेगळे प्रयोगही केले. देव दीनाघरी धावला, या नाटकातून कृष्ण व सुदामा यांच्यातील निःस्वार्थ मैत्री दाखवतात. त्या काळातील राजकारणावरही भाष्य करतात. सीमेवरून परत जा, या नाटकात अलेक्झांडर व पौरस यांच्यातील संघर्ष मांडला आहे. त्यातून देशप्रेम, संघटन यांचे महत्व प्रतीत होते. उघडले स्वर्गाचे दार यात वशिष्ठ व विश्वामित्र यांच्यात राजर्षी की महर्षी म्हणावे यातून झालेला बौद्धिक वाद आहे. त्यांची नाटके व्यावसायिक असली तरी प्रत्येक नाटक काही मूल्यं अधोरेखित करतं.
त्यांची गेय काव्य लिहिण्याची हातोटीही वाखाणण्याजोगी आहे. काही गाजलेली गाणी, आई तुझी आठवण येते, मलयगिरीचा चंदन गंधित, निघाले आज तिकडच्या घरी, ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी, तू जपून टाक पाऊल जरा इत्यादी.
त्यांना शिक्षणात, शाळेत फारसा रस नव्हताच पण नशीब चांगले की याच शाळेत त्यांना शां. गो. गुप्ते यांच्यासारखे नाटककार शिक्षक म्हणून लाभले. पण खरं सांगू, मला असं वाटतं हे जर नाटक वेड नसतं तर यांनी सहज ३० एक कादंबऱ्या, ३० एक कथासंग्रह, ३० एक कवितासंग्रह सहज प्रसिद्ध केले असते, इतका अफाट कल्पनासंग्रह, भाषेवर प्रभुत्व, लेखनासाठी लागणारे बारीक सारीक तपशील, लिखाणात सातत्यता त्यांच्याकडे होती. नाही, पण मग हा इतका विविध विषयांवरील नाटकांचा खजिना आपल्याला कसा मिळाला असता?
दोघांच्याही स्मृतींना त्रिवार वंदन!!
© सौ.मंजिरी येडूरकर
लेखिका व कवयित्री, मो – 9421096611
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




