सौ राधिका -माजगावकर- पंडित
☆ ‘स्वर्गदार…’ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆
सत्तरीच्या घरातल्या हसतमुख दमदार पावले टाकीत, येणाऱ्या जाणाऱ्यांचा राम राम स्वीकारत, झपाझप चालत माझ्याकडे येणाऱ्या काकांना मी विचारले “काय हो काका किती दिवसांनी भेटताय कुठे लपला होतात?
माझ्या कोपरखळीला दाद देत मिस्कील हंसत त्यांच उत्तर आलं, ” गेलो होतो मसणात” मी उडालेच, ” काय काका! काहीतरीच काय बोलणं?, नाही म्हणजे कुणी जवळचं माणूस.. त्यांचं काही बरवाईट?तुम्ही दुःखी आहात का? नाही म्हणजे स्मशानात? म्ह ण जे अशा जागी कोणी सहज, मुद्दामून जात नाही, नाही कां? माझा नुसता गोंधळ उडाला होता.
“कबूल आहे! नाही जात अशा ठिकाणी. पण मी गेलो आणि भरून पावलो. प्रसन्न मनाने त्या वैकुंठधामात वावरलो. माझ्या चेहऱ्यावरचा गोंधळ बघून काका पुढे म्हणाले, “माझ्या बोलण्याने गोंधळलीस ना नेहमीसारखी! बैस खाली. सगळं सांगतो. माझं कोड्यातलं बोलणं संभ्रमात टाकतय ना तुला?
“हो ना हो!एक वेळ पुस्तकातलं कोडं सोडवणं सोप्प आहे पण स्मशान काय मसणात काय! काका हे माझ्याअल्पबुद्धी पलीकडचं आहे, तेव्हा आता फिरक्या घेणं पुरे आणि मुद्द्यावर या काकासाहेब “
आणि मग गाडी रुळावर आली वक्तृत्व स्पर्धेत 1ला नंबर असलेले माझे जेष्ठ मित्रवर्य बोलू लागले, “अगं इंदोरला गेलं होतं आमचं मित्र मंडळ. सगळं इंदोर पालथ घातलं. खाऊ गल्ली झाली, मंदिरें झाली, मार्केटिंग झालं. सगळे जाम दमले आणि म्हणाले, ” बस झालं! सगळं शहर फिरलोय आता उद्या पुण्याला निघायचं बघूया.
माझ्या मनात वेगळंच चाललं होतं. मला कुठेतरी वाचल्याचं आठवत होतं. इंदोर दहनघाट बघण्यासारखा आहे. ताड्कन उठलो आणि गर्जना केली “चलो दहनघाट ” दहनघाट???झोपलेले खाड्कन जागे झाले. जागे असलेल्यांनी डोळे विस्फारले, बसलेले ताड्कन उठून मला धरायला धावले, सगळ्यांना वाटलं परिणाम झालाय माझ्या डोक्यावर. बायको तर इतकी भेदरली की किंचाळून म्हणाली, “अहो काल उज्जेनला महाकालेश्वराची भस्मपूजा पाहयलीत त्याचा काही विपरीत परिणाम नाही ना हॊ झाला तुमच्यावर?
सगळ्यांच्या नजरेत कींव होती. “भ्रमिष्ट झालाय हा! अशा सुतकी अशुभ ठिकाणी कुणी जातं कां रें मुर्खा!” वशा खेकसलाचं.
आरडाओरडा, मित्रांच्या शिव्या, बायकोचं रडणं चालूच होतं. जणू काही मी शेवटच्या प्रवासाला निघालोय परत येणारच नाहीय्ये की काय असंच मला वाटायला लागलं. ” काका मजेत टाळ्या वाजवून गंमत सांगत होते.
न राहून मी म्हणाले”काकुंच बरोबर आहे काका, अहो मृत्यूचं नाव काढलं, प्रेतयात्रा पाहिली, ज्वाळा बघितल्या की माणूस घाबरतोच आणि अशा ठिकाणी सगळं सोडून जाण्याची तुम्हाला तरी काय बुद्धि झाली?काहीतरी असतं हं काका तुमचं !
“अगं बाई! पुढचं तर ऐक त्याचं असं झालं माझे एक मित्रवर्य ह्या उपक्रमात सहभागी आहेत. ते म्हणाले “मध्य प्रदेशात आलात ना की दहन घाटाला भेट द्यायला विसरू नका. ती जागा बघण्यासारखी आहे. उदास मनाला टवटवी आणणारी फुलझाडे आहेत तिथे.
असं बघ राधिका, जाणारा महाप्रवासाला पुढे निघून जातो पण मागे राहणाऱ्याचं काय? ते दुःख, वियोग ज्याचा त्यालाचं सहन करावा लागतो. दुखणं आणि दुःख एकमेकांना वाटून नाही घेता येत. अश्रूंचा पूर, वियोग, आक्रोशामुळे वातावरण गंभीर, उदास झालेलं असतं म्हणूनच आत्म्याला शांती आणि दुःखाला मुक्ती मिळावी ह्यासाठी कार्यकारी मंडळींनी त्याठिकाणी वृक्षराजी आणि बागबगीचा लावलाय. तिथे अत्यंत स्वच्छ स्वच्छतागृहे आहेत. मध्य प्रदेशातलं इंदौर शहरातलं उत्कृष्ट सुंदर सुरेख हिरव्यागार गारव्यातलं स्मशानगृह ‘ ऊपेक्षणीय ‘ नसून प्रेक्षणीय आहे. प्रवेशद्वारापासूनच या मोक्षद्वारात आत्म्याला शांती, श्रद्धांजली आणि इतरांच्या उदासी वातावरणाला तिलांजली मिळते. ती हिरवाई बघून क्षणभर कां होईना दुःखाचा विसर पडतो.
महान वृक्ष इथे उभे आहेत त्यांच्या प्रचंड सावलीखाली 100 सव्वाशे माणसं बसू शकतात. पिंपळावर भुते असतात म्हणे! पण हाच पिंपळवड, चिंच, कडुलिंब आपल्याला प्राणवायू पुरवतो. हे तर पट्तय नां तुला? आणि म्हणूनच असे वटवृक्ष शुद्ध हवेसाठी इथे लावलेले आहेत.
ऐक हं!एक सुंदर श्लोक आठवलाय बघ मला..
‘मुले ब्रम्हा, त्वचा विष्णू । शाखा शंकर मे वचं रादन्यो नमोस्तुते. ।। ‘
हे संस्कृत पंडित म्हणतात ‘ह्या अश्वत्थ (पिंपळ) वृक्षाच्या मुळात ब्रह्मा, सालीत विष्णू, फांद्यात भगवान शंकर आहेत तर पानांपानांत देवी देवतांचा वास असतो अशा वृक्षराज पिंपळाला माझे नमन असो.
काकांचं अगाध ज्ञान, वक्तृत्व शैली आणि संकलन बघून मी अवाक झाले होते. मी म्हणाले, “मग तर काका त्या मुक्तीधाम मध्ये शंकराचा म्हणजेचं पिंपळवृक्षाचा निवास हवाच नाही का?”
“हॊ तर नक्कीच हवाय! पवित्र तुळसबनही इथे आहे. पर्यावरण, आणि निसर्गांनी दिलेलं दान आपण जपायलाच हवंय. तुला काय सांगू राधिका, तिथल्या व्यवस्थापक मंडळींनी खूप धोरणानी जागरूकतेने ते जपलयं. पर्यावरणाला पूरक असे उपक्रम ते राबवतात. कचऱ्यातून कला साधून, खत सांठवून
west मधून best ते साधतात. ”
“काय सांगताय काय काका तुम्ही!”माझी उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
“पुढचं तर ऐक! दहन केल्यावर फेकलेले बांबू एकत्र करून सुसज्ज, सजावटीचे कठडे विविध रंगाने रंगवून त्यांनी ते प्रेक्षणीय केलेआहेत. “
सारं काही ऐकतांना भारावून मी म्हणाले, ” किती वेगळ्या वातावरणात, निसर्ग सुखसानिध्यात नेऊन दुखितांच दुःख, ही मंडळी हलकं करतात नाही का! खरंच स्तुत्य, आदर्श आहे हा उपक्रम. मला नंबर मिळेल का हो त्यांचा? माझ्या प्रश्नावर काकासाहेब उत्तरले” हो नक्की! अगं पण अजून मला सांगायचंय, ऐक नां! इथे मोक्षकाष्ट मोफत मिळते. अंत्यसंस्कारासाठीची रक्षा हवेत, पर्यावरणात मिसळून प्रदूषण वाढू नये म्हणून खतासाठी ती रक्षा वापरतात. त्यासाठी निर्माल्य कलशासारखे मोठे रक्षाकलश इथे ठेवलेले आहेत.
काकांच्या तोडून ही नवीन आणि उपयुक्त माहिती ऐकून मी निशब्द झाले. खरंच कमाल आहे हं ह्या उपक्रमाची आणि त्या कल्पक मंडळींची. दुःखितांच्या दुःखावर फुंकर घालताना ते समाजकार्यही करताहेत. खरंच भन्नाट आयडिया, काका इथूनच माझा त्यांना मनापासून नमस्कार.
“राधिकाजी इससे भी बढकर और बढीया बात है l आगे सुनो, काकाजी बरेच मूडमध्ये आले होते. उत्साहाने त्यांचा धबधबा सुरू झाला, “अगं माणसांचा, पर्यावरणाचा त्यांनी विचार केला आहेचं पण पशुपक्ष्यांचीही त्यांनी सोय केलीय. त्यांनी अशी मनमोहक सुगंधी फुलझाडं लावली आहे की ती रंगीबेरंगी दुनिया बघून फुलपांखरे फुलाफुलांवर बागडतात. आणि भरपूर मकरंद प्राशन करतात. जवळची माणसं दुरावल्यामुळे आप्तेष्ट उदास निराश झालेली असतात. डोळ्यांची तळी तुडुंब भरतात पण अश्रूंच्या पडद्याआडून त्यांना दिसतील अशी गुलाब जाईजुई मोगरा, पारिजातक, सोनचाफा इत्यादी सुगंधी फुले वाऱ्याच्या झुळकीबरोबर डोलतात. ते दृश्य त्यांच्या दुःखी मनावर फुंकर घालून क्षणभर का होईना त्यांना दिलासा मिळतो. पक्षीगण मंजूळ आवाजात त्यांचं सांत्वन पण करतात”
हे सगळं काकांचं सांगणं ऐकून मी मंत्रमुग्ध झाले होते माझ्या तोंडून उस्फूर्तपणे शब्द बाहेर पडले, ” काकासाहेब हे स्वर्गदार इतकं दिलासा देणार असेल तर पण मी पण जाईन त्या स्मशानात. घाटावरचा दिलासादायी निसर्ग बघायला “
काका टाळी वाजवून म्हणाले “ पटलं ना तुला? मग समजावून सांग तुझ्या काकीला”
“नक्कीच काका ” असं आश्वासन देऊन मी बागेच्या बाहेर पडले. मनोमनी इंदोरकरांच्या अफलातून कल्पकतेला आणि उपक्रमाला मी इथूनच हात जोडले. या सगळ्या वेगळ्या अर्थपूर्ण उपक्रमाचे सार्थक करणाऱ्या या मंडळींना खरंच जीवनाचा अर्थ कळला आहे. त्यांना माझा मानाचा मुजरा !!
© सौ राधिका -माजगावकर- पंडित
पुणे – 51
मो. 8451027554
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




