नीता कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ “सण गुढीपाडव्याचा…” ☆ नीता चंद्रकांत कुलकर्णी

 गुढीपाडवा म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे बांबुची उंच काठी, त्याच्या टोकाला जरीच वस्त्र, त्यावर उलटे पात्र (कलश), फुलांचा हार, कडुलिंबाची डहाळी आणि साखरेची पदक माळ अस चित्र लगेच समोर येतं.

परंपरे प्रमाणे वर्षानुवर्ष आपण अशी गुढी ऊभी करत आहोत. ती अशीच का उभी करायला सांगितली असेल बरं? याचा कधी विचार केलात का?

 त्याचा निश्चितच शास्त्रशुद्ध अर्थ असणार…

राष्ट्रसेविका समितीच्या नित्य पाठाच्या पुस्तकात यावरचे एक सुरेख गीत आहे. त्या गीतात गुढीचा नेमका जो भावार्थ आहे तो सांगितलेला आहे. हिंदू संस्कृतीत कधीकधी प्रतिकांचा वापर असतो. त्यातून काहीतरी शिकवण आणि बोध आपण घ्यायचा असतो. यावर्षी आपण तो समजून घेऊ.

मान वर करून बघावं लागेल अशा ऊंच जागी गुढी उभी करायची. आपलं ध्येय हे नेहमी उच्च असावं… हेच ही काठी सुचवते. अर्थात हे सहजा सहजी होणार नाही. त्यासाठी आपण वेळ न घालवता सतत कष्ट केले तरच हे साध्य होते… असा कानमंत्र ती देते.

पहाटेच उठून स्नान करून शुचिर्भूत होऊन गुढी उभी करायची.

सहजपणे लक्षात येतं… लवकर उठलं की कामं करण्यासाठी अधिक वेळ मिळतो. घ्येय गाठायचं असेल तर कृती करताना काळाचं आणि वेळेचं भान ठेवायच हे गणित जमायला हव.

आज सण आहे म्हणून भरजरी वस्त्र गुढीला लावलेले आहे. ते सांगते.. जीवनात सतत आनंद मिळेल अशी वेडी आशा ठेवायची नाही. दुःखही अटळ आहे.. त्याची पण तयारी ठेवा.

कोणाला दान द्यायचे असेल तर आपण ते पात्र पूर्ण पालथे करतो. रिकामे करतो… त्याचेच प्रतीक हे गुढीवरचे पात्र आहे. म्हणूनच ते पालथे आहे. ढग पृथ्वीवर जलधारांचा वर्षाव करून पूर्ण रिकामे होतात… निसर्गातून आपल्याला हा संदेश दिलेला आहे. यातून आपला हात देणारा… मदतीचा असावा हे शिकवले जाते.

कर्तव्य निभावताना वेळ.. प्रसंगी कठोरपणे निर्णय घ्यावे लागतात. तेव्हा ते कटु वाटले तरी..

 शेवटी ते हिताचे असतात. त्याने मनाला पुढे शांती मिळणार आहे. कडुलिंबाकडून हा बोध घ्यायचा.

गुढीवर साखरेचा मध्यभागी छान पदक असलेला हार असतो. बुद्धी वैभव आले तरी त्याचा गर्व नाही करायचा. अंगी नम्रता हवी. वाणीत गोडवा असावा.. शब्दात मधुरता असेल तरच लोक जोडले जातात.

तर असा हा आपल्या गुढीचा सुरेख अर्थ…

आता यापुढे गीतात जे सांगितले आहे ते फार महत्त्वाचे आहे.

आता अशीच गुढी यावर्षी आपण आपल्या मनात लावूया. ती लावताना मातृभूमीच्या प्रेमाचा सडा टाकायचा, अंतकरणात प्रखर देश निष्ठेची रांगोळी काढायची. मी आणि माझे इतके सिमित न राहता भारत मातेची सेवा हे उच्च ध्येय ठेवायचे.

अशी ही नवीन संकल्पनांची गुढी उभी करून.. आनंदानं नववर्षाचे स्वागत करायचं.

हातचं काही न राखता देशासाठी सर्वस्व अर्पण करायचं. हे ध्येय ठेवलं तर पुढचं वर्षच नाही तर आयुष्य आनंदात जाणार आहे.

इतका विशाल विचार राष्ट्रसेविका समितीच्या गीताने… प्रतिकात्मक अर्थाने आपल्याला दिलेला आहे. तो तर समजला. आता कृती करणे आपल्या हातात आहे.

मी काय करू शकेन.. काय करायला हवं… यासाठी मला कोण सहाय्य करेल… याचा विचार करा. आसपास शोध घ्या. तुम्हाला ऊत्तर मिळेल. प्रत्येकाने थोडे थोडे काम केले तरी सगळ्यांचे मिळून खूप काही होणार आहे. त्यासाठी एकत्र येऊया.

आमच्या राष्ट्र सेविका समितीत या… इथे हेच शिकवले जाते.

मी नेहमी सांगते ते आठवा बरं…

“संगत फार महत्त्वाची असते. “

हा नवा विचार मनात रुजावा… यावर्षी तो समजून घेऊन आपण गुढीकडे पहावे…

म्हणून हा लेखप्रपंच…

मराठी नववर्षाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!!

©  नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments