श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “ऑपरेशन ‘लोकटक विजय’” – भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके

ब्रिगेडीअर श्री. सौरभ सिंग शेखावत (Retd.)

मणिपुरच्या मैतेई बांधवांच्या भाषेत ‘लोक’ म्हणजे वाहता प्रवाह आणि ‘टक’ म्हणजे शेवट… टोक! ‘लोकटक’ म्हणजे वाहत्या प्रवाहाचे अंतिम टोक!

हे लोकटक म्हणजे एक विशालकाय गोड्या पाण्याचे सरोवर आहे.. क्षेत्रफळ सुमारे २५० चौरस किलोमीटर्स जे पावसाळ्यात ५०० चौरस किलोमीटर्सपर्यंत विस्तारत जाऊ शकते! आणि या सरोवरात एक जागतिक आश्चर्य नांदताना दिसते… या सरोवरात सुमारे सहा हजार माणसं राहतात!

या सरोवरात एक विशिष्ट प्रकारचे गवत उगवते आणि कालांतराने हे गवत तळापासून वेगळे होऊन पाण्यावर तरंगू लागते. तळातून सोबत आलेली माती, पाण्यातील रासायनिक घटक आणि इतर नैसर्गिक प्रक्रिया घडत जाऊन हे गवत पुंजक्या पुंजक्यांनी एकमेकाला जोडले जाते आणि दोन-तीन मीटर्स जाडी असलेले जणू एक तरंगणारे बेटच अस्तित्वात येते… असे बेट जे माणसांचे, घरांचे वजन पेलू शकेल! या पुंजक्याला ‘फुमदी’ म्हणतात. मासेमार बांधव असा फुमदी एकत्रित करतात आणि त्या जोडून एक मोठे वर्तुळ तयार करतात… त्या वर्तुळातल्या पाण्यात जाळी टाकतात व मासे पकडतात. याच वर्तुळात माशांची पैदासही केली जाते.

बांबू, प्लास्टिक आणि अन्य हलक्या वस्तू वापरून या तरंगत्या बेटांवर इथल्या मच्छीमार बांधवांनी राहण्याजोगती घरं निर्माण केलीत. सरोवरातील मासळी पकडून शहरांत जाऊन विकणे हा इथला प्रमुख व्यवसाय! वर्षाला साधारण दीड हजार टन मासळी इथून मिळते. एरव्ही ही बेटं त्या भव्य सरोवरात एकाकीच… चहूबाजूंनी पाणी आणि जमिनीवर पाय ठेवण्याचं एकमेव साधन म्हणजे निमुळत्या हलक्या, लाकडी नावा.. canoes!

मणिपूरची राजधानी इंफाळ इथून ३८ किलोमीटर्सवर आहे. शेजारचा ब्रम्हदेश मात्र इथून हाकेच्या अंतरावर… एवढा जवळ की काही तासांत तिकडे जाऊन इकडे सहीसलामत परत येता यावे!

उत्तर-पूर्व भारताचे मणिपूर… महाराजा बोधाचंद्र सिंग यांनी घेतलेल्या निर्णयानुसार १५ ऑक्टोबर, १९४९ रोजी भारतात विलीन झाले आणि १९७२ मध्ये मणिपूरला पूर्ण राज्याचा दर्जा दिला गेला. परंतू साधारणत: १९६४ पासून या प्रदेशातील काही विशिष्ट समाजसमूहातील काही गट भारतापासून वेगळे होण्याच्या दृष्टीने शेजारील काही देशांच्या मदतीने भारतविरोधात सशस्त्र संघर्ष करण्याच्या प्रयत्नात आहेत. विविध नावांनी कार्यरत असलेल्या या संघटनांत हजारो सशस्त्र, प्रशिक्षित अतिरेकी होते आणि आहेत! अपहरण, हत्या आणि खंडणी गोळा करणे हा यांचा प्रमुख उद्योग आहे. भारतात कारवाया करून म्यानमार (तत्कालीन ब्रम्हदेश)मध्ये पलायन करायचे अशी यांचा कामाची पद्धत आहे.

भारताचे सार्वभौमत्व अखंडित राखण्यासाठी भारतीय सैन्यदल इथे सातत्याने डोळ्यांत तेल घालून कार्यरत असते… सीमा सुरक्षा बल, आसाम रायफल्स, आसाम पोलिस इत्यादी आणि भारतीय सैन्यातील शेकडो जवान-अधिकारी यांनी यासाठी प्राणांची आहुतीही दिलेली आहे! शिवाय घनदाट जंगल, दमट हवामान, पर्वतराजी अशी बिकट स्थिती आहेच.

२००८… याच तरंगत्या ‘फुमदी’ पैकी एका फुमदी वर काही झोपड्या होत्या. त्यांपैकी मध्यभागी असलेल्या चार झोपड्यांत दहा-बारा अतिरेकी वस्ती करून असल्याची पक्की खबर भारतीय सेनेला प्राप्त झाली! एका स्थानिक व्यक्तीला त्या अतिरेक्यांनी धमकावून पैसे मागितले होते अन्यथा त्याची हत्या केली जाईल, असा दमही दिला होता. त्या व्यक्तीच्या भावाकडून ही माहिती स्थानिक पोलिसांना आणि तिथून आपल्या सैन्याला मिळाली होती… खात्री करून घेणे गरजेचे होते… पण एवढ्या मोठ्या संख्येने अतिरेकी सापडणार असतील तर धोका पत्करणे अपरिहार्य होते!

परंतू वरिष्ठ अधिकारी अशा कोणत्याही मोहिमेला परवानगी देत नव्हते. कारण या मोहिमेत प्रचंड धोका होता. मणिपूरची त्यावेळची राजकीय, सामाजिक परिस्थिती लक्षात घेता, जर मोहीम फसली तर स्थानिक जनतेचा मोठा रोष पत्करावा लागण्याची शक्यता होती… किंबहुना देशविघातक शक्ती असे काही होण्याची ववाटच पहात असतात. नकार ऐकून या मोहिमेवर जाऊ इच्छिणारे आपले कथानायक अधिकारी मनातून खट्टू झाले… पण शेवटी आज्ञा ती आज्ञाच.

परंतू दुर्दैवी योगायोगाने आपल्या बी. एस. एफ. च्या तळावर काहीच दिवसांत मोठा अतिरेकी हल्ला झाला आणि अनेक जवानांची आहुती पडली. यामुळे चिडलेल्या अधिका-यांनी या अतिरेक्यांविरोधात मोठी मोहीम उघडण्याची व त्यांना धडा शिकवण्याची आवश्यकता व्यक्त केली. अर्थातच या लोकटक मोहिमेस हिरवा कंदील मिळाला… आणि सैनिक, अधिकारी तयारीला लागले!

अतिरेक्यांचा ठावठिकाणा समजावा म्हणून खब-याला घेऊन सैन्य पथकाच्या प्रमुखांनी काही सैनिकांना सोबत घेऊन एका बोटीतून तिकडे प्रयाण केले. काही अंतरावर असताना त्यांना लाकूड तोडण्याचा आवाज आला. खबरी म्हणाला, “हे लोक म्यानमारमधून इकडे घुसतात, बांबू, लाकडे तोडून घेऊन जातात. ते लोक तिथून जाईपर्यंत साहेबांनी दबा धरून वाट पाहिली. कोणतीही सैन्य कारवाई करण्यापूर्वी अगदी सूक्ष्म नियोजन करणे आवश्यक असते! आरंभी असे ऑपरेशन अतिशय धोकादायक, अव्यवहार्य आहे, असं सांगून प्रमुख अधिका-यांनी या मोहिमेस परवानगी नाकारली होती. इथे काही हजार सामान्य नागरिकही रहात असल्याने हवाई हल्ला हा पर्याय असूच शकत नव्हता. त्यांना सर्व बाजूंनी घेरायचे म्हटले तर तिथपर्यंत पोहोचायला नावांशिवाय पर्याय नव्हता. यांत्रिक नावा, रबर बोटी वापरणे सोयीचे नव्हते… कारण सरोवरातील ‘फुमदी’ तरंगत असतात आणि सतत जागा बदलतात.. त्यांच्या गवतात नाव अडकून बसतात. दिवसा-उजेडी अतिरेक्यांच्या वस्तीपर्यंत पोहोचायचे म्हणजे अतिरेक्यांना येणा-या बोटी सहज दिसणार… आणि त्यांच्याकडे असलेल्या अत्याधुनिक शस्त्रांनी ते पाण्यातून येणा-या सैन्यावर सहज आणि अचूक गोळीबार करू शकणार! अशी परिस्थिती होती. त्यांनी गोळीबार आरंभला तर प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात स्थानिक सामान्य लोकांच्या जीवाला धोका होता!

इथून सुरु झालं.. ४५ दिवसांचं एक अद्भूत ऑपरेशन… एक सैन्य मोहिम… जिचं नाव ठेवलं गेलं.. ऑप. लोकटक विजय! जमिनीपासून अतिरेकी वस्ती सुमारे सात किलोमीटर्सवर असावी. विविध प्रकारची त्यावेळची आधुनिक संपर्क साधने, दुर्बिणी वापरून या वस्तीवर बारीक नजर ठेवली जाऊ लागली. एका उंच झाडावर चढून एका सैनिकाला ते ठिकाण नेमके कुठे आणि कसे आहे, यावर नजर ठेवण्याची जबाबदारी दिली गेली. त्या सैनिकाने तेवढ्या उंचीवर चढून मचाण बांधले आणि आधुनिक उपकरणे वापरून बरीच माहिती गोळा करून दिली! अचूक हल्ला करण्यासाठी अतिरेक्यांच्या वस्तीचे निश्चित ठिकाण समजणे गरजेचे होते. त्यासाठी ज्याने खबर आणली होती, त्यालाच मासेमार म्हणून तिथपर्यंत जाऊन यायला सांगितले… त्याच्याकडे आधुनिक यंत्रणा लपवून दिली… त्यामुळे तांत्रिक भाषेत co-ordinates मिळू शकले!

नावा घेऊन जाणे अशक्य असल्याने तिथपर्यंत पोहत जाण्याचा मार्ग निवडला गेला… पण अंतर होते सात किलोमीटर्स. अवजड शस्त्रं घेऊन पोहत जाणे… कल्पना करता येईल का? यासाठी सराव पाहिजे. दिवसा सराव करता येणार नव्हता. कारण सरोवरात दिवसभर म्हणजे पहाटे चार ते रात्री दहा-साडेदहापर्यंत मासेमारी चालते… लोक सैनिकांना सराव करताना दिसता कामा नव्हते! यावर उपाय म्हणून या सरोवराच्या एका बाजूला असलेल्या चार-साडेचार किलोमीटर्स लांबीच्या एका कालव्याचा वापर करण्याचे ठरले. त्यानुसार रात्री अकरा ते पहाटे साडेतीन पर्यंत सैनिक शस्त्रं घेऊन त्या थंडीत पोहण्याचा सराव करू लागले. एवढे काटक, कणखर सैनिक परंतू इतका वेळ पोहणे म्हणजे मानवी क्षमतेची कसोटी पाहणारे ठरत होते. कित्येक सैनिक आजारी पडले आणि त्यांना अतिदक्षता विभागात ठेवावे लागले. कित्येकांचे पाच-सहा किलो वजन कमी झाले. कालव्याच्या पाण्याचा त्यांच्या शरीरावर परिणाम दिसू लागला. पण तरीही सराव सुरु होताच! पण पुढे असे लक्षात आले की, एवढे पोहूनही रात्रीच्या अंधारात आणि मर्यादित वेळेत लक्ष्य गाठता येणार तर नाहीच, पण गाठले गेले तरी प्रचंड थकलेले सैनिक लढणार तरी कुठल्या बळाने!

काही दिवसांनी ही योजना मागे ठेवण्यात आली. आणि रबरी नावा आणल्या गेल्या, पण सरोवरातील गवतामुळे त्याही प्रभावीरीत्या चालेनात… अडकून राहू लागल्या. निमुळत्या नावा अर्थात canoes मधून जायचे ठरले. पण ह्या नावा स्थानिक पातळीवरून खरेदी केल्या असत्या तर त्याचा बोभाटा झाला असता म्हणून दुस-या राज्यातून त्या मागवून घेतल्या गेल्या! पण canoe चालवण्यासाठीही सराव पाहिजे. कारण canoe म्हणजे जणू सायकल. सराव नसला म्हणजे सायकल चालवताना जसा माणूस कोसळतो, तसे पाण्यात कोसळावे लागणार!

मग पुढील काही दिवस canoe चालवून सराव केला गेला… यात हलत्या नावांत उभे राहून गोळीबार करण्याच्या सरावाचाही समावेश होताच. गरज पडेल तेंव्हा या canoe पाण्यात पालथ्या करून त्या पालथ्या झालेल्या canoeवर बंदुका टेकवून, पाण्यात तरंगत राहातही निशाणेबाजीचा सराव झाला! या प्रयत्नांत हत्यारे पाण्यात पडत, बुडून तळाशी जात. मग आपले पाणबुडे सैनिक ही हत्यारे शोधून परत आणीत. असे वीस पंचवीस दिवस झाल्यावर एकेदिवशी ‘टार्गेट’ (लक्ष्य)च्या किती जवळ जाता येईल याची चाचणी झाली… यशस्वी चाचणी झाली!

– क्रमशः भाग पहिला 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments