श्री सचिन वसंत पाटील
☆ …मग लेखणीच पाय बनली! ☆ श्री सचिन वसंत पाटील ☆
विसाव्या वर्षी अपघातामध्ये दोन्ही पायातली ताकद गमावली. त्यावेळेपासून चालणं फिरणं बंद झालं. वडिलांना वाचनाचा छंद होता. खूप कमी वयात चांगली पुस्तके वाचायला मिळाली. त्यातून ग्रामीण साहित्याची गोडी लागली. पुस्तकातील विचारांनी जगण्याची उमेद दिली. सकारात्मक दृष्टिकोन दिला. पाय चालत नाहीत म्हणून लेखणी हाती घेतली. मग वाट मिळाली. हळूहळू लेखणीच पाय बनली. सुरुवातीला मन रितं व्हावं म्हणून लिहीत होतो नंतर ग्रामीण माणसांच्या कथा-व्यथा लिहू लागलो.
सांगलीजवळच्या कर्नाळ या खेडेगावात लहानाचा मोठा झालो. माझ्या कथांचे नायक, नायिका या गावातील कष्टकरी, शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यातील व्यथा-वेदना काल्पनिक नसून अवतीभवतीच्या व कृष्णाकाठच्या आहेत. हे सगळं अनुभूतीतून आलेलं वास्तवदर्शी लेखन आहे. असं जरी असले तरी या कथा लिहून मी काय फार मोठं काम केलं नाही. उलट मी ज्या शेतकरी कुटुंबात जन्मलो, ज्या मातेच्या पोटी जन्मलो, ज्या मातीतून उगवलो त्या मातीचे ऋण फेडण्यासाठी कर्तव्य भावनेतून मी लिहितो.
माझ्या ‘सांगावा’ या पहिल्याच कथासंग्रहातील बहुसंख्य कथा नातेसंबंधावर आधारित आहेत. जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरणामुळे नात्यामधील वाढलेलं अंतर, हरवलेलं प्रेम, जिव्हाळा, ओलावा, माणूसकी या कथांतून आली आहे. तर ‘अवकाळी विळखा’ या कथासंग्रहामध्ये प्रामुख्याने शेती-शेतकरी या विषयांशी संबंधित कथा आहेत. त्या मानाने पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी हा शेतीला पाणी असल्याने सुखी, संपन्न मानला जातो. परंतु या शेतकऱ्यांच्याही अनेक समस्या आहेत, त्यांचेही वेगवेगळे प्रश्न आहेत. ते शासनदरबारी मांडण्याचा, इतरांना सांगण्याचा प्रयत्न मी या कथांच्या माध्यमातून केला आहे. शेतकऱ्यांचे दु:ख, व्यथा-वेदनांबरोबरच काही प्रश्नांची सकारात्म उत्तरे शोधायचा प्रयत्न मी केला आहे.
गाव हा सगळ्यांच्याच आपुलकीचा, जिव्हाळ्याचा विषय असतो. आज गाव बदललंय, बदलतंय… गावावर ग्लोबल वॉर्मिंग, माॅल, ढाबा संस्कृती टी. व्ही. , मोबाईल अशी अनेक आक्रमणे आली आहेत. गावात अनेक सेवा, सुविधाही आल्या आहेत. गावातल्या अनेक परंपरा बंद पडल्या आहेत. जुनी अलुतेदारी-बलुतेदारी पार मोडीत निघाली आहे. झाडांची संख्या घटली आहे. देशी गाय, बैलजोडी, कावळे, चिमण्या दुर्मीळ झाल्या आहेत. पण हळूहळू माणूसही माणसांपासून दुरावतोय. मनामनातलं अंतर वाढतंय. भोवतालचं जग आभासी बनतंय. आपण करीत असलेली प्रगती पोकळ वाटतेय… तरीही ही सगळी आक्रमणे पचवून आज गाव कसं उभं आहे. हे गावातील बदल, गावातील अस्सल, इरसाल माणसं आणि जुना गावागाडा ‘गावठी गिच्चा’ या कथासंग्रहात आला आहे.
कथेबरोबरच ‘पाय आणि वाटा’ या नावाने माझा एक ललितसंग्रहही प्रसिद्ध झाला आहे. मला वीस वर्षे पाय होते आणि वीस बाबीस वर्षे मी पायांशिवाय जगलोय. पाय असण्यातलं सुख आणि पाय नसण्याचं दु:ख समान पातळीवर ठेवून हे लेखन करायचा प्रयत्न मी केला आहे. वीस वर्षे पायाने अनुभवलेल्या संवेदना या लेखनात एकवटलेल्या आहेत. त्याबरोबरच मराठी बोलीभाषा टिकल्या पाहिजेत तरच आपली संस्कृती टिकेल या भावनेतून मराठीतील दुर्मीळ बावीस बोलीतील बावीस कथांचे संपादन ‘मायबोली रंग कथांचे’ या अनोख्या पुस्तकात केले आहे. पुस्तके वाचल्यामुळे मी जिवंत राहिलो! लेखनामुळे प्रेरणा मिळाली. पुस्तकांचे, मायमराठीचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. हे उपकारांची अल्पशी परतफेड या शब्दांची सेवा करून केला आहे.
माझ्या हालचालींना-लेखनाला मर्यादा आहेत. मला बसून लिहीता येत नाही. एका कुशीवर झोपून रोज दोन पाने मी लिहू शकतो. सातत्याने वीस-पंचवीस वर्षाच्या दीर्घ लेखनातून तीन कथासंग्रह प्रकाशित झाले. चांगला वाचक मिळण्याच्या बाबतीत मी नशीबवान आहे. पहिल्या ‘सांगावा’ या कथासंग्रहाच्या पाच आवृत्ती प्रकाशित झाल्या. महाराष्ट्र साहित्य परिषद, लोकनेते राजारामबापू पाटील पुरस्कारांसह अनेक पुरस्कार या संग्रहास मिळाले. तर ‘अवकाळी विळखा’ या कथासंग्रहाची तिसरी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली आहे. त्यासही महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, गुहागर, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर यांचा मानाचा कै. शंकर खंडू पाटील पुरस्कार, माणदेश साहित्य प्रतिष्ठानच्या पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तसेच माझी कथा सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे बी. ए. भाग एक आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बी. काॅम. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे, हा माझा सन्मान नसून मी करीत असलेल्या सेवेचा सन्मान आहे. माझ्या पुस्तकांवर मान्यवर समीक्षकांचे चार समीक्षाग्रंथ प्रसिद्ध झाले. अनेक मराठी अभ्यासकांनी राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरांवर शोधनिबंध सादर केले असून एमफीएल, पीएचडी संशोधनासाठीही या साहित्याची निवड झाली आहे. तरीही मी माझ्या कथा लेखनावर अजिबात संतुष्ट नाही. मला सतत वाटत राहते, आपण आणखी चांगली कथा लिहिली पाहिजे.
*****
© श्री सचिन वसंत पाटील
संपर्क – विजय भारत चौक, मु. पो. कर्नाळ, ता. मिरज जि. सांगली, पिन कोड ४१६ ३०४ मोबा. ८२७५३७७०४९.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




