श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ “आठवणी दाटतात!!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
मेजर संदीप उन्नीकृष्णन
राऊळात जाता श्री विठ्ठलाची भेट झाली नाही म्हणजे पांडुरंग परमात्मा कुठे तरी दूर, बाहेर गेले असतील. त्यांना येण्यास का बरं वेळ लागतो आहे? असं कुठल्या कामात अडकलेत देव, कुणाच्या भेटीत एवढे गुंतून राहिले असतील? जी अवस्था संत जनाबाईंची तीच अवस्था मूल गमावलेल्या आईची आणि अर्थात बापाचीही! जनाबाईंचा विठ्ठल तरी त्यांना भेटला…पण या आई-बापास त्यांचा विठ्ठल किमान या जन्मी तरी दिसणार नाही प्रत्यक्ष. त्याची जागा दुसरं कुणी घेऊ शकेल अशीही स्थिती नव्हती. त्याच्याऐवजी नव्हे, पण त्याच्यासारखं कुणीतरी आयुष्यात आलं तर…ते कुणाला नको असेल?
एकुलता एक मुलगा…देशरक्षणासाठी जातो म्हणाला. त्याला अडवून उपयोग नव्हताच. प्रकाश पसरवणारा तो संदीप…यांच्या संदीपने देशाचा प्रकाश तेवत राहावा म्हणून स्वत: विझून जाणं पसंत केलं.
हिंदुस्थानला युद्धात पराभूत करू शकत नाही…पण त्याला सतत रक्तबंबाळ तर करूच शकतो…असं शत्रूच्या म्होरक्याने त्यांच्या पळपुट्या सेनेला शिकवून ठेवलं आहे. “we will bleed them a thousand times” आम्ही एक हजार वेळा युद्ध करू…अशी त्यांची दर्पोक्ती असते..आणि प्रत्येक पराभवानंतर ते हेच म्हणत राहतात. त्यानुसार ते एकेदिवशी देशाच्या आर्थिक राजधानीत घुसले. शेकडो निष्पाप नागरीकांना ओलीस धरले! त्यांना हुसकावून लावण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागली!
२६ नोव्हेंबर, २००८. केरळ(मूळ गाव), कर्नाटक(जन्म, बालपण) आणि महाराष्ट्राशी (एन.डी.ए.खडकवासला) नाते असलेले मेजर संदीप उन्नीकृष्णन…मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील हल्लेखोरांवर चालून गेलेला झंझावात! Operation Tornado मध्ये 51, Special Action Group (51 SAG) चे पथक प्रमुख म्हणून मेजर साहेब दहा कमांडोजसह ताजच्या सहाव्या मजल्यावर पोहोचले. ओलिसांची सहाव्या मजल्यावरून सुटका करीत ते पाचव्या मजल्यावर पोहोचले. तोच चौथ्या मजल्यावरील एका मोठ्या दालनात अतिरेकी असल्याची शंका आली…दालनाचा दरवाजा आतून बंद होता!
दरवाजा तोडून उघडला गेला…आतून प्रचंड गोळीबार झाला…आपला एक कमांडो जबर जखमी झाला. त्या दालनात हातगोळा फेकून अतिरेकी तिथून दुस-या ठिकाणी निसटून गेले.
मेजर साहेबांनी उर्वरीत कमांडोज सोबत घेत आणखी सुमारे १५ तास ओलिसांची सुखरूप सुटका करण्याचे काम केले. २७ नोव्हेंबरची मध्यरात्र. ताज मधील मध्यभागी असलेल्या जिन्याने वरच्या मजल्यावर एकट्याने शोध घेत जाण्याचा निर्णय साहेबांनी घेतला!
याच प्रयत्नात त्यांनी चार अतिरेक्यांना एका खोलीत आश्रय घ्यायला भाग पाडले…आता त्यांचा पळण्याचा मार्ग बंद…मध्ये मेजर साहेब होते. ते त्यांच्या साथीदारांना म्हणाले…”तुम्ही कुणीही वर येऊ नका…ते धोक्याचे आहे. मी यांचा बंदोबस्त करेन…! आणि मेजर साहेब त्या अंधा-या, धुराने भरलेल्या दालनात घुसले…चार रायफली धडाडल्या…साहेबांनी त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव केला…पण अतिरेक्यांच्या गोळ्यांनी मेजर साहेबांना पुरते घायाळ करून टाकले! एक दीप विझून गेला होता!
साहेबांचे आई-वडील ताज मधील त्या दालनाला दरवर्षी २७ नोव्हेंबरच्या रात्री, मध्यरात्री भेट देतात…जिथे मेजर साहेबांनी शेवटचा श्वास घेतला, त्या खोलीत थांबतात…त्यांच्या अश्रूंना वाटा फुटतात. या दोघांनी आपल्या लेकाच्या स्मृती जपण्याचा आटोकाट प्रयत्न सुरु ठेवला आहे…काळ जखमा भरून टाकतो…पण यांच्या जखमा अजूनही ओल्याच आहेत!
पुतळे उभारले गेले, रस्त्यांना नांवे दिली गेली. चित्रपट हे एक अत्यंत प्रभावी माध्यम आहे. जो प्रभाव एखादा ग्रंथ करू शकणार नाही, तो प्रभाव काही तासांत एखादा उत्तम चित्रपट निर्माण करू शकतो. विषय अतिशय रोमांचक असल्याने अनेक चित्रपट निर्माते मेजर साहेबांचे वडील के.उन्नीकृष्णन (ISRO मधील सेवानिवृत्त संशोधक) आणि साहेबांच्या मातोश्री धनलक्ष्मी यांना भेटले. “आम्ही मेजर साहेबांच्या कामगिरीवर चित्रपट बनवू म्हणाले. पण या व्यावसायिक लोकांचा आविर्भाव “आम्ही तुमच्यावर उपकारच करतो आहोत” असा असल्याचे या दोघांना वाटले. त्यामुळे त्यांनी कुणालाच परवानगी दिली नाही. माझा मुलगा देशासाठी हुतात्मा झाला..त्यामुळे तो सर्व देशाचा मुलगा ठरला. पण राजकीय मंडळी त्यांच्या त्यांच्या स्वार्थासाठी अशा बलिदानांचा वापर करून घेतात, याचा त्यांना राग होता. त्यांनी केरळच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्याला घरी येण्यास थेट मज्जाव केला होता. मध्ये असेच काही दिवस गेले!
हैदराबादेत जन्मलेला पण अमेरिकेत वाढलेला एक युवा अभिनेता, लेखक आणि अनेक तेलगु चित्रपटांत चमकलेला आणि बाहुबली चित्रपटात खलनायकाच्या वेशात दिसलेल्या देखण्या आदिवी सेश याच्याही मनात मेजर साहेबांची कथा घोळत होती. त्यांनी उन्नीकृष्णन दांपत्याचे मन वळवले…आणि एक नातं आकार घेऊ लागलं! आदिवी यांनी स्वत: कथा, पटकथा लिहिली आणि मेजर संदीप यांची भूमिकाही निभावली…किंबहुना जगली! चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेत तन-मन आणि धनाने सहभागी झाले. मध्येच उपटलेल्या कोरोना संकटातही हार न मानता एक सामाजिक जबाबदारी म्हणून ‘मेजर’ चित्रपट तयार व्हावा म्हणून मेहनत घेतली. या काळात कोरोनाने जगाला हैराण करून ठेवले होते, या चित्रपट निर्मितीमध्ये सहभागी असलेल्या अनेकांचे जवळचे आप्त यात दगावले. या सर्व परिस्थितीमध्ये धैर्य न गमावता आदिवी काम करीत राहिले…Mission Major!
पण आदिवू यांनी संदीप उन्नीकृष्णन यांचे जीवन समजावून घेतले. Don’t come up! I will handle them! हे मेजर साहेबांनी त्या रात्री उच्चारलेले वाक्य त्यांनी मनात बिंबवून घेतलं. मेजर साहेबांच्या आयुष्यात आलेल्या जवळजवळ सर्वांशी आदिवू स्वत: बोलले, त्या त्या ठिकाणांना भेटी दिल्या…आणि पडद्यावर एक वीर गाथा साकारली गेली.
‘मेजर’ चित्रपटाच्या पहिल्या प्रदर्शनाला मेजर साहेबांच्या मातोश्री, मेजर साहेबांनी त्यांना भेट दिलेली साडी परिधान करून आल्या होत्या. आदिवी त्यांना ‘अम्मा’ संबोधतात! मी मेजर संदीप यांची जागा कदापि घेऊ शकणार नाही…पण अम्माचा धाकटा मुलगा तर होऊच शकतो. आदिवी यांच्यामुळे उन्नीकृष्णन दांपत्याच्या चेह-यावर कित्येक वर्षांनी पहिल्यांदा हास्य उमटलं…ही खूप मोठी गोष्ट होती.
आदिवू यांनी चित्रपटातून मिळणा-या पैशांचा विचार केला नाही. हिंदी आणि तेलगु भाषांत हा चित्रपट वेगवेगळा चित्रित केला. हा चित्रपट त्यांनी जागतिक पातळीवर पोहोचावा यासाठी खूप प्रयत्न केले. याचवेळी दक्षिणेतील महान अभिनेत्यांचे चित्रपट प्रदर्शित झाले होते…पण तरीही ‘मेजर’ चित्रपटाने उत्तम पैसे मिळवले. अधिकाधिक तरुणांपर्यंत मेजर संदीप यांची शौर्यगाथा पोहोचावी म्हणून कित्येक ठिकाणी हा चित्रपट विनामूल्यही दाखवण्यात आला. मेजर संदीप उन्नीकृष्णन यांचा जन्म केरळ येथे झाला होता. केरळसाठी हा चित्रपट खास मल्याळम भाषेतही ‘डब’ करण्यात आला होता. मेजर आणि मेजर संदीप अशी दोन शीर्षके या चित्रपटासाठी राखून ठेवण्यात आलेली होती. तत्पूर्वी अमिताभ बच्चन यांचा मेजर साहब हा हिंदी चित्रपट येऊन गेला होताच. अर्थात याची कथा वेगळी होती.
भारतात चित्रपट निर्मिती हा प्रचंड मोठा व्यवसाय आहे. अभिनेते, अभिनेत्री यांचा चाहता वर्ग मोठा आहेच…शिवाय या लोकांचे अनुकरणही खूप केले जाते…लोक यांनाच हिरो मानतात. पण देशासाठी खरेखुरे बलिदान देणा-या सैनिकांच्या कथा सामान्य लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीत. अनेक वीरांची माहितीच लोकांना कधीही होत नाही. या पार्श्वभूमीवर आदिवी सेश या अभिनेत्याने दाखवलेले धाडस कौतुकास्पदच म्हणावे लागेल! अभिनंदन, आदिवी! मेजर संदीप उन्नीकृष्णन यांना मरणोत्तर अशोक चक्र प्रदान करण्यात आले. १५ मार्च हा यांचा वाढदिवस! यानिमित्ताने त्यांच्या स्मृती जागवण्याचा हा प्रयत्न. जय हिंद!
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





