श्री जगदीश काबरे
☆ “स्वयंप्रामाणिकता : धर्मभयापलीकडील नैतिकता” ☆ श्री जगदीश काबरे ☆
माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे. त्याला विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि स्वतःच्या कृतींचे परिणाम भोगण्याची क्षमता निसर्गाने दिलेली आहे. तरीही शतकानुशतके माणसाने आपल्या नैतिक आचरणाचा आधार बाहेरच्या कोणत्यातरी शक्तीवर, कोणत्यातरी भीतीवर, कोणत्यातरी परलोकाच्या कल्पनेवर ठेवला आहे. धर्मसंस्काराने माणसाला प्रामाणिक बनवता येते, असा दावा केला जातो. परंतु या दाव्यात एक मूलभूत विसंगती आहे. भीतीतून निर्माण होणारी नैतिकता ही खरी नैतिकता नसते. जो माणूस केवळ देवाची किंवा धर्माची भीती बाळगून सत्शीलपणे वागतो, तो मुळात आतून अनैतिकच असतो. अशा माणसाला इंग्रजीमध्ये otherwise gentleman असे म्हणतात. कारण त्याच्या अनैतिकतेला बाहेरून एक धार्मिक आवरण चढवलेले असते. खऱ्या नैतिकतेचा उगम भीतीत नाही, तर स्वतःच्या मनाशी असलेल्या प्रामाणिकतेत आहे.
धर्म आणि नैतिकता यांचा संबंध माणसाने युगानुयुगे गृहीत धरला आहे. धर्मग्रंथ सांगतात की चांगले वाग, नाहीतर नरक भोगशील. देव पाहतो आहे, म्हणून वाईट करू नकोस. परलोकात जाब द्यावा लागेल, म्हणून इहलोकात सावध राहा. या सगळ्या शिकवणींचा आधार एकच आहे, तो म्हणजे भीती. माणसाला त्याच्या स्वतःच्या विवेकावर विश्वास ठेवण्याऐवजी एका बाहेरच्या अदृश्य शक्तीच्या नजरेची भीती दाखवून नियंत्रित करण्याचा हा प्रयत्न आहे. परंतु विचार करा, जेव्हा कोणी पाहत नसेल, जेव्हा देवही गाफील असेल असे वाटेल, तेव्हा या भीतीच्या आधारावर उभी राहिलेली नैतिकता टिकेल का? इतिहास सांगतो की ती टिकत नाही. धर्माच्या नावावर झालेले अत्याचार, धार्मिक माणसांनी केलेल्या अनैतिक गोष्टी, हे सगळे याचेच पुरावे आहेत.
मग स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहणे म्हणजे नक्की काय तर आपल्या प्रत्येक कृतीची, प्रत्येक विचाराची, प्रत्येक निर्णयाची जाणीव ठेवणे. स्वतःशीही खोटेपणाने न वागणे. आपली प्रेरणा काय आहे, आपला हेतू काय आहे, हे स्वतःपासून लपवून न ठेवणे. जेव्हा माणूस स्वतःशीच खरा असतो, तेव्हा त्याला इतरांशीही खरे राहणे सहज शक्य होते. कारण खोटेपणा खोट्या गोष्टीची एक साखळी बनवतो. एक खोटे दुसऱ्या खोट्याला जन्म देते. पण जो माणूस स्वतःशीच पारदर्शक आहे, त्याची नैतिकता आतून येते. धर्माच्या भीतीखाली जगणारा माणूस सतत दुभंगलेल्या अवस्थेत असतो. आतून काहीतरी वेगळे वाटते, बाहेरून वेगळे वागावे लागते. मनात एक असते, बोलण्यात दुसरे. कृतीत आणखी वेगळे. या दुभंगलेपणातून माणसाला कधीही आंतरिक शांती मिळत नाही. तो सतत एका अव्यक्त अपराधभावनेच्या सावलीत जगत असतो. धर्माने सांगितलेल्या नियमांची पूर्तता करण्यासाठी तो जे करतो ते मनापासून नसते, ते केवळ दंड टाळण्यासाठी असते. अशा माणसाला नैतिक म्हणता येईल का? खरे पहाता, तो केवळ नैतिकतेचे नाटक करत असतो.
परलोकाची संकल्पना आणि त्यावर आधारित नैतिकता याबद्दलही गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. परलोक खरोखर अस्तित्वात आहे की नाही, याचा कोणताही शास्त्रीय पुरावा उपलब्ध नाही. तरीही करोडो माणसे परलोकाच्या भीतीने जगतात. स्वर्ग मिळेल म्हणून चांगले वागतात, नरकाची भीती वाटते म्हणून वाईट गोष्टी करणे टाळतात. पण हा व्यवहार आहे, नैतिकता नव्हे. ज्या माणसाला परलोकाचे बक्षीस लुभावत असते तो मुळातच नैतिक नसतोच. नैतिकता ही अटी-शर्तींवर उभारलेली नसते. खरी नैतिकता ही निःस्वार्थ असते, ती स्वतःच्या मनाशी प्रामाणिक असते म्हणून पाळली जाते, कुठल्या बक्षिसाच्या अपेक्षेने नव्हे. देवावर अंधश्रद्धा ठेवणारा माणूस हळूहळू स्वतःच्या विचारशक्तीवरचा विश्वास गमावतो. कारण त्याला सतत सांगितले जाते की, तू काहीच करू शकत नाहीस, देवाच्या इच्छेशिवाय पान हलत नाही. हे सतत कानीकपाळी पडल्यामुळे तो आपल्या स्वतःच्या क्षमतांवर शंका घेऊ लागतो. अपयश आले तर देवाची इच्छा म्हणतो, यश आले तर देवाची कृपा म्हणतो. या दोन्हींमध्ये तो स्वतःला कुठेच ठेवत नाही. मग त्याच्या आयुष्यात प्रगती होणार कशी? प्रगतीसाठी लागते आत्मपरीक्षण, स्वतःच्या चुका स्वीकारण्याची तयारी, आणि त्या बदलण्याची हिम्मत. पण जो माणूस सगळे देवावर ढकलतो, तो ही तिन्ही कारणे टाळतो.
समाजात नियम असतात, कायदे असतात. काही माणसे हे नियम केवळ पोलिसांच्या भीतीने पाळतात. काही माणसे समाजाच्या निंदेच्या भीतीने पाळतात. आणि काही माणसे धर्माच्या भीतीने पाळतात. या तिन्ही प्रकारच्या माणसांमध्ये एक साम्य आहे, ते म्हणजे त्यांच्या वर्तनाचे मूळ भीतीत आहे. भीती हे नैतिकतेचे मूळ असू शकत नाही. भीतीतून जन्मलेली नैतिकता ही एखाद्या वाळूच्या घराप्रमाणे असते, जी थोड्याशा वाऱ्याने कोसळते. याउलट, स्वतःच्या विवेकातून, स्वतःच्या जबाबदारीच्या जाणिवेतून आलेली नैतिकता ही दगडाच्या भिंतीप्रमाणे असते. ती कोणत्याही परिस्थितीत टिकते. कारण तिचा आधार बाहेर नाही, माणसाच्या आत आहे. स्वतःची जबाबदारी ओळखणे हे प्रगल्भ माणसाचे लक्षण आहे. जेव्हा माणूस म्हणतो की, माझ्या आयुष्यात जे घडते त्याला मीच जबाबदार आहे, माझ्या चुका माझ्याच आहेत, माझे यश माझेच आहे, तेव्हा तो खऱ्या अर्थाने प्रगतीच्या दिशेने कूच करतो. कारण जेव्हा माणूस आपल्या कृतींचे परिणाम स्वतः भोगायची तयारी ठेवतो, तेव्हा तो अधिक विचारपूर्वक वागतो, तो धर्माच्या भीतीशिवायही नैतिक राहू शकतो. त्याला कोणत्या धार्मिक ग्रंथाची, कोणत्या कर्मकांडाची, कोणत्याही उपासनेची गरज लागत नाही.
विवेकी माणूस म्हणजे केवळ बुद्धिमान माणूस नव्हे. विवेक म्हणजे बुद्धी आणि भावना यांचा समतोल. विवेकी माणूस हा इतरांच्या दुःखाला संवेदनशीलतेने समजतो. तो जाणतो की माझ्या कृतींचा दुसऱ्यावर काय परिणाम होणार आहे. हे जाणणे म्हणजेच सहानुभूती, आणि सहानुभूती हे नैतिक वर्तनाचे मूळ आहे. सहानुभूती ही भीतीतून येत नाही, ती मनाच्या गाभ्यातून येते. असा माणूस धर्मभयाने वागणाऱ्या माणसापेक्षा कितीतरी पटींनी जास्त नैतिक असतो. देवावर विश्वास ठेवणे म्हणजे आपली जबाबदारी एका अदृश्य शक्तीकडे सोपवणे. पण स्वतःच्या कर्तृत्वावर आत्मविश्वास ठेवणे म्हणजे जबाबदारी स्वतः उचलणे. जो माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो, तो आव्हानांपुढे खचत नाही, तो स्वतःच्या चुका स्वीकारतो आणि पुन्हा त्या चुका होऊ नये म्हणून दक्ष राहतो. असाच माणूस प्रगती करतो, जीवनात अर्थ शोधतो. त्याचे नैतिक आचरण त्याच्या विकसित होत जाणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा एक घटक बनते. त्याउलट जो देवाधर्माच्या भीतीमुळे नैतिकतेने वागतो तो संधी मिळताच अनैतिक कृत्य करायला धजावतो. समाजाची रचना, लोकशाहीचा पाया, मानवी नात्यांची दृढता, हे सगळे स्वयंप्रेरित नैतिकतेवर अवलंबून असते. जर माणसे आतून नैतिक असतील, तर कोणतीही बाह्य शक्ती त्यांना अनैतिक बनवू शकत नाही.
जी मुले केवळ शिक्षेच्या भीतीने चांगली वागतात, ती मोठी झाल्यावर पालकांच्या नियंत्रणातून बाहेर गेल्यावर बिघडण्याची शक्यता जास्त असते. जी मुले नैतिकतेचे मूल्य समजून-उमजून वागतात, ती आयुष्यभर त्या मूल्यांशी बांधील राहतात. म्हणूनच मुलांना धर्माच्या भीतीने नव्हे, तर कारण-परिणामाच्या समजुतीतून नैतिकता शिकवणे हे खऱ्या अर्थाने संस्कार करणे आहे. त्यांना सांगा की, दुसऱ्याला दुखवू नका कारण त्यामुळे त्यांना वेदना होतात, देव रागावेल म्हणून नव्हे, तर त्यांना सांगा की खरे बोला कारण खोट्याने नाती मोडतात. नरकात जाल म्हणून सतशीलतेने वागू नका तर तो तुमचा अंगभूत गुणधर्म झाला पाहिजे. हे शिक्षण मुलाला आयुष्यभर पुरते. थोडक्यात, नीतिमत्तेने जगणे हा माणसाचा अंगभूत गुणधर्म बनणे हेच खऱ्या नैतिकतेचे ध्येय आहे. हे घडण्यासाठी धर्मसंस्काराची नव्हे, तर विवेकी संस्काराची गरज आहे. माणसाला स्वतःशी प्रामाणिक राहण्याची, स्वतःच्या कृतींची जबाबदारी घेण्याची, दुसऱ्याच्या वेदनांना संवेदनशीलतेने समजण्याची सवय लागणे, हेच खरे मानवी उन्नतीचे लक्षण आहे. देवाच्या भीतीखाली वाकणारा माणूस कधीही पूर्णपणे ताठ उभा राहू शकत नाही. स्वतःच्या विवेकावर विसंबणारा माणूस मात्र कोणत्याही परिस्थितीत ताठ उभा राहतो. म्हणून स्वयंप्रामाणिकता ही धार्मिक संस्कारांपेक्षा मानवी प्रगल्भतेचा, माणसाच्या खऱ्या स्वातंत्र्याचा, आणि सच्च्या नैतिकतेचा एकमेव विश्वासार्ह आधार आहे.
© श्री जगदीश काबरे
(लेखक समाजचिंतक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन प्रसारक आहेत.)
jetjagdish@gmail.com मो ९९२०१९७६८०
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






