सुश्री मंजिरी येडूरकर
इंद्रधनुष्य
☆ उर्मिला – लेख क्र. १ ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆
(अशा स्त्रिया ज्यांच्या कर्तृत्वाची, त्यागाची दखल कधीच घेतली गेली नाही, कौतुकही कधी झाले नाही.)
एक ! फक्त, एक निर्णय झाला किंवा घ्यावा लागला आणि आमचं सारं कुटुंब उध्वस्त झालं. मी फक्त निर्णय म्हणते आहे. आजही त्या शब्दाला मी कोणतंही विशेषण लावू शकत नाही. म्हणजे हा निर्णय योग्य होता की चुकीचा होता हे नियतीच जाणे ! पण आमच्या सगळ्या कुटुंबांनं जे भोगलं ते मला नाही वाटत इतर कोणी भोगलं असेल. गतजन्मी खूप हातून पापे घडलेली माणसे या जन्मात एकमेकाचे इतके जिव्हाळ्याचे सोबती बनून कां जन्माला आली असतील? आज या साऱ्यांचीच कैफियत घेऊन आले आहे.
मी उर्मिला, जनक राजा व राणी सुनयना यांची मुलगी! सीता, माझी मोठी बहीण फक्त दत्तक घेतलेली! मांडवी व श्रुतकिर्ती या माझे काका, कुशल ध्वज, यांच्या मुली! आमच्यावर बालपणीच फार चांगले संस्कार झाले. कारण जनक तात हे महान शिवभक्त होते. भौतिक संपत्तीची आसक्ती नसणारे तरीही राजा असणारे ते एक आदर्श उदाहरण होते. अध्यात्मिक प्रवचनात त्यांना अतिशय रस होता. निरनिराळे ऋषी, साधक यांच्याशी ते संवाद करीत असत. अशा वातावरणात आम्ही वाढलो, त्यामुळे ज्ञानाच्या भुकेल्या, कर्तव्य तत्पर, निर्भय, अनासक्त हे गुण तर आमच्यात असायलाच हवेत नं!.
सीतेचं स्वयंवर झालं, दशरथ राजांचा मुलगा राम, यांनी पण जिंकला व त्यांचा विवाह सीतेशी पक्का झाला. त्याचवेळी भरत यांचा विवाह मांडवीशी, शत्रुघ्न यांचा विवाह श्रुतकीर्तीशी व लक्ष्मण यांचा विवाह माझ्याशी म्हणजे उर्मिलाशी झाला. संबोधने वापरुन आपला गोंधळ होऊ नये म्हणून मी सगळ्यांना नावानेच संबोधते त्याबद्दल मला क्षमा करा.
आम्ही सगळ्याच लहान होतो त्यामुळे लग्नानंतरची पहिली बारा वर्षे कशी भुर्रकन उडाली समजलंच नाही. राजा दशरथांनी आपला ज्येष्ठ पुत्र राम यांना राज्याभिषेक करण्याचं ठरवले, आणि एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली. अर्थात मी फार लांबवत नाही कारण राम लक्ष्मण आणि सीता यांच्या बद्दल आपल्या सर्वांना माहीतच आहे त्यामुळे त्यांनी जे काही सोसलं त्याची इथे चर्चा करायचं कारणच नाहीय.
राम सूर्य असेल तर सीता म्हणजे सूर्यप्रकाश त्यामुळे त्यांना एकमेकापासून वेगळे करणे शक्यच नाही. त्यांचं असं दिव्य नातं होतं. पण प्रत्यक्षात तसे ते कधीच फार काळ एकत्र राहू शकले नाहीत किंवा संसार सुख उपभोगू शकले नाहीत. फरक इतकाच की त्यांच्या त्यागाच्या संकटाच्या विजयाच्या कथा झाल्या आणि बाकी सारे कुटुंबीय हे मौनात गेले. ऐश्वर्य, कीर्ती, धैर्य, संपत्ती, ज्ञान व वैराग्य हे सहा गुण एकत्र असणारे भगवान श्रीराम एकमेव होते. या सर्व गुणांचे परमस्वरूप प्रकट करणारी सीता ही सर्वोच्च शक्ति होती. त्यामुळे हा शक्ती आणि नीती यांचा संयोग होता
श्रीरामांचा वनवासात जाण्याचा निर्णय झाला सगळं कुटुंब, सगळी प्रजा शोकसागरात बुडून गेली. लक्ष्मण यांनी पण रामाबरोबर जाण्याचे ठरविले. त्यांचे तर, जेथे श्रीराम तेथे मी, हे ब्रीदच होते. मी ही तुमच्याबरोबर येणार असा मी हट्ट धरला. पण तात व तीन माता यांना सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर टाकून ते गेले. जातांना असेही सांगून गेले की मी परत येईपर्यंत डोळ्यातून एक टीप सुद्धा गाळायचं नाही. पती सेवेपेक्षा पती आज्ञा महत्वाची नं? आणि माझा वियोग सुरू झाला. दोनच दिवसांनी दुःखातिरेकाने राजा दशरथ यांचे निर्वाण झाले. आणि पुन्हा एकदा सगळीकडे अश्रुंचा पूर लोटला. श्रीरामांनी परत येण्यास नकार दिला व भरत यांनी राज्याभिषेक करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे कैकयी माता पश्र्चाताप दग्ध झाल्या, कौसल्या माता व सुमित्रा माता दुःखात बुडाल्या. एकाच वेळी दोन वियोग सहन करणं कोणालाच शक्य नव्हतं. त्या तिघींनी सर्वसंगपरित्याग करून संन्यास घेतला. घराचा एक आश्रम झाला. भरताने, राम परत येत नाहीत तोवर अयोध्येला येणार नाही, असे सांगितले व ते नंदीग्राम येथे जाऊन संन्यस्थ वृत्तीने राहू लागले. फक्त रामाची आज्ञा म्हणून अयोध्येत सिंहासनावर रामाच्या पादुका ठेऊन शत्रुघ्न च्या मदतीने राज्यकारभार बघू लागले. आणि माझ्याबरोबर मांडवी चा ही वियोग सुरू झाला. फक्त शत्रुघ्न व श्रुतकिर्ती नाही म्हणायला एकत्र होते. शत्रुघ्न यांच्यावर राज्याची जबाबदारी आली. सैन्याचा युद्धाचा सराव, शस्त्रे, प्रत्यक्ष युद्ध यात बुडाले. त्यांनीही चांगला कारभार करून राज्याचा विस्तार केला. पण चौदा वर्षात एकाच्याही चेहऱ्यावर कधी स्मित रेषा उमटली नाही. त्यामुळे श्रुतकिर्ती सुखी होती असे म्हणणे चुकीचे आहे. सगळेच नाईलाज या शब्दाच्या आधीन होते. त्यातच लक्ष्मण यांनी राम सीता यांचे रक्षण करण्यासाठी निद्रा देवीकडे निद्रा न देण्याची विनंती केली. पण त्यांच्या वाटणीची निद्रा कुणाला तरी देणे आवश्यक होते. लक्ष्मणांनी माझी निवड केली. मला रोज निद्रादेवीची उपासना करावी लागे. नसलेल्या तिघांची काळजी तर जीव पोखरत होती
दरवर्षी शिशिरात झडणारा आणि वसंतात फुलणारा, आज तर पक्षी आणि त्यांची पिल्ले यांनी चैतन्य भरलेला हा कदंब मी न्याहाळत राहते. मनात येतं, हे निसर्गाचं देणं आपल्याला का लाभलं नाही. चौदा वर्षे हा असाच झडलेला इक्ष्वांकु वंश पाहत राहायचं.
अशीच चौदा वर्षे लोटली. रावणाशी युद्ध करताना लक्ष्मण घायाळ झाल्याची बातमी नाही म्हणायला माझ्या जीवाचे पाणी करून गेली. त्यानंतर आनंदी आनंद येईल, खूप वर्षांनी हे घर हसेल असं वाटत होतं. पण सीतेचा सहवास या घराच्या नशिबातच नव्हता. अग्निपरीक्षा, मग पुन्हा वनवास, मग लव कुश यांना माझ्या ओटीत ठेवून, जीवनयात्रा संपवून धरणीच्या कुशीत विसावण झालं. हे सगळं कमी झालं म्हणून की काय दुर्वासांचा शाप रयतेला भोगावा लागू नये म्हणून स्वतः शिक्षा भोगण्याचा परस्पर निर्णय घेऊन लक्ष्मणांनी शरयू नदीत जलसमाधी घेतली. कां? मी कोणीच नव्हते कां त्यांची? त्यांना कदाचित दुसरा पर्याय नसेल पण मला होता नं! कां, माझा हात धरून मला म्हणाले नाहीत, ‘ चल! दोघे मिळून शरयू मातेच्या कुशीत विसावू. आता पुन्हा वियोग नाही सहन होत. ‘ माझा विचार त्यांच्या मनाला शिवलाही नसेल? कां पुन्हा तेच!कर्तव्य, जबाबदारी हे शब्द वापरून आपली होणारी फसवणूक!
सगळे भाऊ आदर्श व्यक्ती, आदर्श भाऊ, आदर्श पुत्र, आदर्श प्रजा पालक होते. सगळ्या स्त्रिया आदर्श पतिव्रता, आदर्श सुना, आदर्श माता होत्या. सारे सदाचारी, सत्शील, कोणत्याही गोष्टीचा सहजपणे परित्याग करणारे! तरीही प्रत्येकाचे जीवन कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत दुःखी होते. नियतीला नेमकं काय शिकवायचं असतं, कोणता धडा द्यायचा असतो, हेच कळत नाही.
☆
© सौ.मंजिरी येडूरकर
लेखिका व कवयित्री, मो – 9421096611
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





