श्री मयुरेश उमाकांत डंके
☆ “असू आम्ही सुखाने पत्थर पायातील” – भाग – २ ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆
(उदाहरणार्थ, एखाद्या मावशीबाईंनी टोपलीभर करवंदं विकायला गडावर नेली तर दिवसभरात त्यातली निम्मीसुद्धा संपत नाहीत, पण एखाद्यानं “स्टिंग” च्या बाटल्या विकायला ठेवल्या तर त्याला एकाच दिवसात तीन चार वेळा खालून वर माल आणावा लागतो, इतकी भरपूर विक्री होते. अशी निरीक्षणं त्यांनी नोंदवली. तीच गोष्ट शेव, मसाला शेंगदाणे आणि वेफर्स च्या पाकिटांची होती.) इथून पुढे —
पूर्वी गडावर येणारी माणसं त्यांच्यासोबत डबा आणायची. सोबतीला गडावरच्या आया बहिणींकडून दही किंवा ताक घ्यायची. त्यामुळं, प्लॅस्टिक च्या कचऱ्याच्या भस्मासुराची चिंता कुठल्याच गडाला नव्हती. पूर्वी डबा घेऊन येणारी माणसं आता खिशात पैसे घेऊन येतात आणि तहानलाडू भूकलाडू जंकफूडच्या रुपात विकत घेऊन खातात. वाटाणे, फुटाणे, खारे शेंगदाणे खिशात घेऊन ते खात खात गड चढणं आता दुर्मिळ झालं आहे. गडाच्या वाटेवर चार जण एखाद्या झाडाखाली बसून भुईमुगाच्या शेंगा फोडून खात बसलेत, हे तर आता पाहायलाही मिळत नाही. शंभर रुपयांच्या शेंगा घेऊन ती पिशवी खालून वर आणत बसण्यापेक्षा दहा रुपयात वेफर्सचं पाकीट कुठल्याही स्टॉलवर मिळतंय, या ‘तथाकथित’ सोयीमुळे सगळा सत्यानाश होतोय.
वीस रुपये देऊन मूठभर करवंदं किंवा जांभळं घेण्यापेक्षा वीस रुपयांत वेफर्स घेणं चवीला आवडतंय आणि खिशाला परवडतंय, असा विचार गडावर येणारी माणसं करायला लागली. साहजिकच, चिंचा, बोरं, आवळे खाणारी मंडळीच उरली नाहीत तर विकणार कुणाला? या समस्येपोटीच गडावर पाकिटबंद पदार्थांचा सुळसुळाट झाला आहे.
रायगड विकास प्राधिकरणानं पायरी मार्गावर किमान दहा ठिकाणी तरी नळाद्वारे पाणी उपलब्ध करुन दिलं तर चहा सरबतांसाठीचे कागदी कप आणि ग्लास बंद करता येतील. काचेचे कप, ग्लास धुवायला पाणी असेल तर कागदी कप लोक कशासाठी विकतील? यावर्षी आम्ही पायरी मार्गावर साधारण दोन हजार चहाचे कागदी कप गोळा केले. एका नळ योजनेमुळे गडाच्या पर्यावरणात आणि स्वच्छतेत किती मोठा फरक पडेल पहा..
यावर्षी पायरी मार्गावर जागोजागी आरोग्य विभागाच्या वतीने मोफत ORS ची पाकिटं वाटली जात होती. लोक घेत होते आणि पुढे जाऊन वाटेत ती पाकिटं तशीच टाकून देत होते. माझ्यापुढं एक दहा पंधरा तरुणांचा गट चालत होता. त्यांनीही ती पाकिटं “फुकट ते पौष्टिक” या न्यायानं घेतली. पण पुढं जाऊन त्यांनी ती कचऱ्यात टाकून दिली.. संपूर्ण पायरी मार्गावर आम्हाला अशीच न वापरलेली शेकडो पाकीटं कचऱ्यात टाकून दिलेली मिळाली..!
“ह्यातनं कसली एनर्जी मिळतीय, ह्याच्या जागी एक एक विमल ची पुडी द्यायला पाहिजे होती” असा डायलॉग मारणाऱ्या एकाला मी पाठमोरा ऐकला. आजन्म स्वतः निर्व्यसनी असणाऱ्या आणि व्यसन करणाऱ्याला जबर शिक्षा ठोठावणाऱ्या राजाच्या राजधानीच्या ठिकाणी असं बोलणारा हा गडी जर तानाजीरावांच्या किंवा हंबीररावांच्या हाती लागला असता तर त्यांनी त्याचं काय केलं असतं, याचा विचारच केलेला बरा. तानाजीरावांनी त्याच्या श्रीमुखात अशी काही लगावली असती की, गड्याची जीभ पुन्हा आयुष्यभर विमल म्हणायच्या अवस्थेत राहिली नसती.
पण एक विलक्षण तरुण मला दिसला. पहाटे पावणेसहा वाजता वाघबिळाच्या रस्त्यावर जे शिरकाई देवीचं मंदिर आहे, तिथं देवीपुढं बसून तो त्याच्या हातातल्या स्मार्टफोन मधून “मराठा म्हणावे अशा वाघराला” चे श्लोक डोळे मिटून ऐकत होता. मला फार आश्चर्य वाटलं. माझ्यासोबतचे सगळे पुढं निघून गेले होते, मी एकटाच होतो. पाच मिनिटं थांबलो. त्याचं ऐकून संपलं. तो उठला आणि मागे वळला, तसं मी त्याला या श्लोकांबद्दल विचारलं. तेव्हां तो म्हणाला, “हे भिडे गुरुजी कोण आहेत हे मला माहिती नव्हतं. मिडियावरच्या उलट सुलट बातम्यांमधून मी त्यांच्याविषयी ऐकत होतो. पण असे कुणी इतके वृद्ध आजोबा खरोखरच जर अशा विचारांचे असतील तर हजारो तरुण त्यांना फॉलो का करत असतील, असं मला वाटायचं. नंतर मला युट्यूबवर हे श्लोक मिळाले. शिवाजी महाराजांना “पुण्यश्लोक” म्हणणारे मी पाहिले ते केवळ हेच.. मी ते श्लोक ऐकले आणि विचार केला. तेव्हापासून मी रोज सकाळी देवापुढं बसून हे श्लोक ऐकतो. शिवाजी महाराजांचा आदर्श घेण्याचा प्रयत्न करतो. “
असा एकलव्य मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहत होतो. आमच्या थोड्या जुजबी गप्पा झाल्या. कानात इयरफोन्स लावून ते श्लोक ऐकत ऐकत तो नाणे दरवाज्याच्या दिशेनं झपाझप पावलं टाकत निघूनही गेला. आपापल्या आयुष्यात, आपापल्या निवडलेल्या क्षेत्रात वज्रासारखी तत्त्वनिष्ठा आणि राष्ट्रीय चारित्र्य जगणारे कोट्यवधी तरुण उभे राहिले तर ह्या दुर्गराज रायगडावरच्या मराठी तख्ताला याहून आणखी काय हवंय ?
आज रायगडाचे तट अन् खालचे कडे प्लॅस्टिकनं भरून गेले आहेत. प्रचंड कचरा पडला आहे. तो भारतीय नागरिकांनीच केला आहे, यात शंका नाही. मराठी साम्राज्याची राजधानी प्लॅस्टिकच्या विळख्यात अडकत चालली आहे. रायगडाचं पक्षीजीवन, वन्य प्राणीजीवन दिवसेंदिवस खराब होत चाललं आहे. कुणाचंच तिकडं लक्ष नाही. येणाऱ्या कुणालाही त्याविषयी आस्था नाही.
माणसांना ऐतिहासिक स्थळांच्या ठिकाणी वावरण्याचं भान नसतं, हेच सत्य आहे. हा केवळ कपड्यांच्या बाबतीतल्या आचारसंहितेचा मुद्दा नाही. आपली वाणीसुध्दा नियंत्रित असणं आवश्यक आहे. कोणत्याही ऐतिहासिक सांस्कृतिक ठिकाणी कसं वागावं हे आजही लोकांना कळत नसेल तर, आजवरचं सगळं औपचारिक शिक्षण निरुपयोगीच आहे, असं मान्य करावं लागेल. नियमांच्या पाट्या लावून उपयोग होत नाही, किंवा दंड करुन उपयोग होत नाही. “स्वयंशिस्त” आणि “तारतम्य” हे दोन गुण अविरतपणे शिकवत राहण्याची गरज आहे. महाराजांच्या गडकोटांची आजची परिस्थिती चिंताजनक असली तरीही, स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीतीचं समग्र दर्शन घडवणारं आज्ञापत्र मात्र आजही उपलब्ध आहे.
शिवाजी महाराजांचं आज्ञापत्र हा केवळ ऐतिहासिक दस्तऐवज नाही. तो प्रत्यक्ष आचरण करण्याचा विषय आहे. आज्ञापत्र शाळांमधून मुलांना शिकवलं गेलं पाहिजे. त्याचा अभ्यास मुलांनी केला पाहिजे. आज्ञापत्राचे प्रशिक्षण वर्ग, अभ्यास वर्ग झाले पाहिजेत. मुलांसाठी शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रावर आधारित ज्ञान परिक्षा महाराष्ट्रात सुरु व्हायला हवी. कारण, त्यातून शिकावं असं प्रचंड आहे.
लिहिण्यासारखं खूप काही आहे. व्यक्त करण्यासारखे अनुभव खूप आहेत. पण व्यक्त होण्यालाही शेवटी चौकट असतेच. ज्याला बदल घडवून आणण्याची इच्छा आहे, त्यानं अखंड कृतिशील राहिलंच पाहिजे. “आचारशीळ विचारशीळ | दानशीळ धर्मशीळ | सर्वज्ञपणें सुशीळ | सकळां ठायीं ||” असं शिवाजी महाराजांचं वर्णन आहे. त्याचंच आचरण करण्याची गरज आहे.
|| अधिक काय लिहावें, सर्व सूज्ञ आहेति ||
|| मर्यादेयं विराजते ||
— समाप्त —
©️ श्री मयुरेश उमाकांत डंके
मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.
8905199711, 87697 33771
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





