सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “एक खेळ असाही…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

आमची राष्ट्र सेविका समितीची ” विश्वप्रभा” ही शाखा चार महिन्यांपूर्वी सुरू झाली. प्रारंभी ताईंनी आम्हाला सविस्तर माहिती दिली. त्यामुळे शाखेत काय असते याचा थोडा अंदाज आला. तसेच इतरत्र वाचनात आल्याने शाखेसंबंधी बरीच माहिती आधीच आम्हाला होती. इथे खेळ घेतले जातात ते समजले होते. ते कसे असतील बरं.. अशी उत्सुकता होती. आज शाखेतच खेळलेल्या एका खेळाविषयी तुम्हाला माहिती देते.

ताईंनी आम्हाला हा खेळ शिकवला. एका बाजूला चार बायका.. दुसऱ्या बाजूला चार बायका.. बाकीच्या सगळ्या काही अंतर सोडून मध्ये उभ्या राहणार. एका बाजूच्या चार बायकांनी एकमेकींशी बोलून एक वाक्य ठरवायचे. ते म्हणायचे.

त्या ते वाक्य म्हणत असताना त्याच वेळेस मधल्या बायकांनी आरडाओरडा करायचा. जेणेकरून पलीकडच्या चार बायकांना ते वाक्य ऐकू येणार नाही. तरीपण ते वाक्य परत परत सांगायचे. आणि पलीकडच्या त्या चार बायकांनी ते वाक्य ओळखायचे.

अरेच्या हा खेळ तर वेगळाच…

कधी न खेळलेला…

मजेशीरच आहे की…

मग झाली गंमत सुरू..

आम्ही चारजणींनी ” उद्या अक्षय तृतीया आहे हळदी कुंकवाला या” हे वाक्य ठरवलं. आणि ते सांगायला सुरूवात केली.

आम्ही जीव तोडून ओरडून सांगत होतो. त्याचवेळी त्या मधल्या बायकांनी, मुलींनी खेळात ठरल्याप्रमाणे ओरडायला सुरूवात केली. त्या गोंगाटामुळे आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचतच नव्हता.

आम्ही ते वाक्य बोलतं होतो पण पलीकडच्या चार बायका काहीतरी वेगळचं समजत होत्या. दूसरेच शब्द सांगत होत्या.

 हातवारे करून झाले..

खुणा केल्या….. मग कसंबसं त्यांना ओळखायला आलं… त्यांची फजिती बघून आम्हाला हसू येत होतं.

नंतर दुसऱ्या गटाची टर्न…

त्यांनी त्यांचं वाक्य म्हटलं..

आता त्या काय म्हणतात… ते आम्हाला समजत नव्हतं. कारण मधल्या बायकांना, मुलींना चेवच आला होता.

त्यांनी आवाज वाढवला होता.

एकंदरीत धमालच चालु झाली…

मज्जा वाटत होती…..

खूप हसायला येत होते…

आमचा आवाज वाढला की त्याच्यापेक्षा मोठा आवाज मधले करत होते… आता वाक्य ओळखताना आम्ही फसत होतो…. अशा गमतीगमतीतच..

” खेळ संपला”

आमचं हसणं आणि गोंधळ चालूचं होता. तेवढ्यात शांतपणे ताई म्हणाल्या,

” खेळाचा अर्थ समजला का? “

” अर्थ “…. आम्ही एकदम शांत झालो..

त्यांनी बोलायला सुरुवात केली,

” चार जणांना जे सांगायचं आहे ते मध्ये जो समाज दंगा करतो आहे त्यांनी जो कोलाहाल माजवलेला आहे त्यांच्यामुळे तो आवाज दुसऱ्यांपर्यंत पोहोचतच नाहीये. ते त्याचा काहीतरी विपरीत अर्थ लावत आहेत. आज समाजाची तशीच अवस्था झाली आहे…. “

आम्ही स्तब्ध झालो…

एक वेगळाच विचार या खेळाच्या मागे होता तर.. अरेच्चा असं होतं का…

मग ताई म्हणाल्या,

” आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आपण प्रयत्न करत राहायचा. सांकेतिक खुणा करायच्या. तो आवाज कधीतरी त्यांना ऐकू येईल….

त्याचा नेमका अर्थ कळेल…. समजेल.. “

आज आमच्या विचारांना एक वेगळीच दिशा मिळाली…

ताई शांतपणे म्हणाल्या,

” आपण त्या गोंधळाच्या आवाजाने गडबडून गेलो आहोत. आता जरा वेळ डोळे मिटून शांत बसू आणि ओंकार साधना करू.. “

लक्षात आलं त्या आवाजाचा परिणाम झालाच होता.

ओंकार साधनेनंतर….. सगळ्यांनाच खरचं त्या क्षणी थोडी शांतता हवी होती हे समजले.

नंतर ताईंनी एकात्मता मंत्र म्हणायला सांगितला.

अनेकजण निरनिराळ्या नावांनी परमात्म्याला साद घालत असतात. पण तो एकच आहे आणि अद्वितीय आहे.

असा त्या मंत्राचा अर्थ आहे.

 हा मंत्रही आम्हाला शाखेत गेल्यामुळेच समजला.

दुफळी माजवायचा अनेक जण उद्योग करत आहेत. त्यांना वटणीवर आणायचा प्रयत्न चालू आहे हेही ताईंनी आम्हाला सांगितले आहे.

आजच्या खेळातून एक धडा मिळाला.

समाजाची पण वेगळी अशी संस्कृती असते. आपले समाजाशी नाते असते… ते निभावताना भान ठेवायला हवे. एकमेकांशी बोलताना संवाद हवा…. मतं वेगळी असली तरी विसंवाद नको.

विरोध करताना संयमाचा तोल ढासळायला नको याची आपण निश्चितच काळजी घेतली पाहिजे.

आता तर पाच सेकंदात इकडची बातमी तिकडे करणारी विविध उपकरणे माणसांच्या हातात आहेत.. माध्यमं तर अनेक आहेत. त्यामुळे आपण अधिकच जागृत राहायला हवे आहे.

आपल्याशी पण कोणी खेळ खेळताय का हे पण तपासून बघायचे…..

सत्य सांगणारा ते सत्य आपल्यापर्यंत पोहोचवायचा येनकेन प्रकारे प्रयत्न करीत असतो. काही वेळा आपण ते जाणून घेत नाही. म्हणून कितीही गोंधळ चालू असला तरी सत्य लक्षात आलं की समजून घ्यायचं… त्याच्यापर्यंत जायचा प्रयत्न करायचा…

वैयक्तिक आणि कौटुंबिक बाबतीतही हे लागू होत आहे. तिथेही हेच तत्व अमलात आणायला हरकत नाही. तरचं तिथे असलेले हेवेदावे आणि कलह कमी होतील.

अशा सहज मजेच्या खेळातुनही काहीतरी शिकत राहू.

हे खेळ आपल्याला अक्षय आनंद देणारे आहेत तसेच समाजाप्रती जागरूकता निर्माण करणारे पण आहेत. त्यातुनच समाजाला उपयोगी पडणारे सकारात्मक असे विचार मनात रुजवले जातील.

यातूनच विचारी, समंजस, प्रगतिशील असा समाज निर्माण होईल. शांतता नांदेल… आणि आनंद पसरेल…

आता राष्ट्राला याचीच फार गरज आहे…

तुम्ही सुज्ञ आहातच..

त्यामुळे ” खेळ “का सांगितला हे तुम्हाला निश्चितच कळले असेल.

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

पुणे

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted