सुश्री संध्या बेडेकर
मनमंजुषेतून
☆ SURPRISE: Young Generation ची नवीन पद्धत… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆
आज सकाळी सकाळी फोन वाजला. आजकाल अवेळी फोन वाजला की आधी जीव घाबरतो. नको नको ते विचार मनात येतात. एकतर मुलं आपल्या जवळ नाहीत. आता सासर माहेरचे सर्व सत्तरी पार झालेले. काही ना काही प्रत्येकाचे सुरूच असते. खरच ती म्हण आहे ना, ’ जगी सर्व सुखी असा कोण आहे ?’ अगदी बरोबर आहे. प्रत्येकाकडे काही ना काही इश्युज् आहेतच म्हणजे असतातच. कधी तब्येतीचा तर कधी पैशाचा. किंवा इतर काही. काहीच नसेल तर ज्येष्ठांची कल्पनाशक्ति अफाट असते, काही तरी शोधून काढतातच. आयुष्य म्हंटल की सुख आणि दुःख या दोघांशी जवळच नातं असतं. त्यांचा लपाछपीचा डाव चालूच असतो. . . त्यामुळे फोन घेईपर्यंत जीव वर खाली होतो. बरं सकाळची वेळ म्हणजे बऱ्यापैकी शांतता असते, त्यात ती फोनची रिंग कर्कश्य वाटते. भरभर धावणे काय ? आता तर भरभर चालणेही जमतं नाही. बरे असो. मी फोन घेतला.
ताईची सून अनिताचा फोन होता.
मी म्हटलं ••• “ काय ग !! सर्व ठीक ना. सकाळी सकाळी फोन कसा काय केला. ? “
अनिता म्हणाली, “ मावशी घाबरू नका. सर्व उत्तम आहे. “
अनिताने तिचा प्लान सांगितला. मला या नवीन मुलींचे कौतुकच वाटते. SURPRISE ही नवीन जनरेशन ची एक ओळख / सवयच झाली आहे. काही तरी छान प्लान कराचयचे आणि surprise द्यायचे.
ताईकडे तीन जनरेशन्स एकत्र राहतात. ताई, भाऊजी, ताईंच्या सासूबाई सौ. निर्मलाताई वय वर्षे ७५. आणि आजोबा. . आणि ही तिसरी यंग जनरेशन अजय आणि अनिता.
ताईचा आणि तिच्या सासूबाईंचा दोघींचा वाढदिवस एकाच महिन्यात असतो. या महिन्यात आजींची पंचाहत्तरी आणि ताईने पंचावन्न पूर्ण केले. कार्यालयात आजींची पंचाहत्तरी अगदी जोरदार थाटामाटात साजरी झाली. नातेवाईकांच्या उपस्थितीत समारंभ आठवणीत रहाण्यासारखा झाला. आजीबाई अगदी खुश होत्या. आजीचे पाय दुखतात म्हणून अनिताने त्यांना एक छान walking stick आणून दिली. तिच्या मदतीने आता त्या आत्मविश्वासाने चालतात. पडायची भिती वाटत नाही. काल अनिताला आजी आपल्या लहानपणीच्या गोष्टी सांगताना रंगून गेल्या होत्या. त्यांचे लग्नाआधीचे घर, शाळा, तेथे असलेले गणपतीचे मंदिर अनेक गोष्टी. त्यांची जीवाभावाची मैत्रीण उज्ज्वला आता आपल्या मुलाकडे रहायला गेली. त्यामुळे त्यांची भेट होत नाही. त्यांच्या आठवणींबद्दल भरभरून बोलत होत्या. ‘ आता या पायांमुळे मला बाहेर जाता येत नाही ‘. असंही त्यांच्या बोलण्यात आलं. मग अनिताने मनातल्या मनात एक प्लान ठरविला.
आज सकाळीच चहा घेताना अनिता म्हणाली, “ आज रविवार, तेंव्हा मला सुट्टी आहे. आजोबा, बाबा, आज आम्ही तिघी – मी आई आणि आजी – बाहेर जाणार आहोत. आज आमचा *Fun day out * आहे.
बाकी तुमच्या सर्वांचा स्वयंपाक घरात असेलच. आम्ही बाहेर फिरणार आणि जेवूनच घरी परतणार. चालेल ना ? ‘
अनिताने मावशींना सांगून आमरस, बटाटा भाजी, पुलाव, कोशिंबीर, चटणी, कुरड्या पापड असा सर्व स्वयंपाक करून घेतला. बाबा, आजोबा किती वाजता जेवणार?? हे विचारून मावशींना वेळेवर गरम पूऱ्या तळून द्यायची सूचना पण दिली.
अनिताला देशमुखांकडे येऊन जेमतेम वर्षच झाले आहे. आज अनिताने घरचा ताबा आपल्याच हातात घेतला की काय ? असंच सर्वांना वाटत होतं. सर्व आश्चर्याने तिच्याकडे बघत होते. सर्वांच्या नजरेत कौतुक होते. आज अनिताचे वेगळेच रूप सर्वांसमोर होते.
Anyways everyone is happy.
अजय म्हणाला, “ अगं!! केवढा पुलाव केला आहेस ? दोन दिवसांचा स्वयंपाक केला की काय ? “
अनिता म्हणाली, “ अरे संपेल की. ”
अनिता, आई आणि आजी दहा वाजताच घराबाहेर पडल्या. आज अनिताचे ऐकायचे, असे सर्वांनी ठरवूनच टाकले होते.
अनिताच्या म्हणण्यानुसार आजींनी काठापदराची निळ्या रंगाची नवीन साडी नेसली. आईंनी पण सूचनेनुसार निळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातला. अनिताचा नेहमी प्रमाणेच जिन्स टॉप, अर्थातच निळा, असा पेहराव होता. अजयने लगेच तिघींचा फोटो काढला. सौंदर्याचे देशमुख घराण्यात वरदानच आहे.
अजयच्या निळ्या रंगाच्या नवीन कारने तिघी बाहेर निघाल्या.
आजोबा गमतीने म्हणाले, ” अरे व्वा अजय!! गम्मतच आहे रे. चला मी पण आज निळ्या रंगाचा कुर्ता घालतो.
अनिताने आजींना आपल्याबरोबर समोर बसविले. म्हणाली, ” आजी आजका दिन आपके लिये. आज का दिन आपके नाम. हुकम करो आजी, आपका हुकुम सर आंखों पर. कुठे कुठे जायचंय?? चला तुमचे जुने घर बघुया. ”
अनिताने कार जुन्या घराच्या दिशेने वळवली.
आजी म्हणाल्या, ” अग आता तिथले सर्व बदलले असेल. ”
तरी जुने घर, आजींची शाळा, गणपतीचे मंदिर. . आजी पूर्ण वेळ जून्या आठवणी सांगण्यात रंगल्या होत्या. अशा अनेक जागी फिरल्यानंतर तिघी वैशालीमध्ये कॉफी प्यायला आल्या. तेथें आजी आणि आजोबा लग्न झाल्यावर येत असत असं आजींनीच बोलताना सांगितले होते.
आई आणि आजी दोघी खूप खुश होत्या. आजचा दिवस वेगळाच उजाडला होता. आता एक वाजायला आला होता. तेथे कॉफी घेतल्यावर अनिताने कार अन्नपूर्णा हॉटेलसमोर उभी केली. आता अनिताच्या सरप्राइज प्लानचा दुसरा भाग होणार होता.
. . थोड्या वेळातच मावशी आईंच्या दोन सख्यांना आणि उज्वलाआजींना घेऊन तेथे पोहचल्या. हा आनंदी धक्का दोघी पचवतच होत्या तर, अनिताची आई, बहिण, वहिनी तेथे दोन eggless cake घेऊन पोहचल्या. सर्व निळ्या रंगातच होत्या हे सांगायला नकोच…निळ्या रंगांच्या वेगवेगळ्या छटांना जणू काही उधाणच आलं होतं. आजींचा आणि आईंचा दोघींचा आवडता रंग म्हणून आज निळाच निळा चोहीकडे.
आजींना आनंदाश्रू आवरत नव्हते. असा वाढदिवस त्यांच्या कल्पनेच्या परे होता. तोही नातसुनेने प्लान केलेला. . म्हणजे दुधात साखरच काय, अगदी मलाई, साय सर्वच भरभरून.
अनिताच्या सासूबाई आणि आई कौतुकाने समाधानाने अनिताकडे बघत होत्या. नजरेनेच धन्यवाद म्हणत होत्या. देवाचे आभार मानत होत्या.
गम्मत म्हणजे त्याच वेळेस तेथे अजयने बेल वाजली म्हणून दार उघडले तर समोर अनिताचे बाबा, भाऊ आणि काका हजर होते. आज सर्वांना सरप्राइजच सरप्राइज होतं. इथे पण आणि तिथे पण. सर्वांनी अनपेक्षित गेटटूगेदर मस्त enjoy केलं. इथे पण आणि तिथे पण.
अन्नपूर्णा मध्ये मस्त गप्पा टप्पा झाल्या. आई आजी दोघींनी केक कापले. शेजारच्या टेबलावर बसलेल्या दोन मुलींनी पण आजींना आईंना * Happy Birthday Aaji, काकू* असं म्हणत wish केलं. केक खाल्ला. जेवण झाल. फोटो, selfie झाली. आजी आणि उज्वलाआजीचे फोटो, आईंचे त्यांच्या सख्यांबरोबर फोटो, असे अनेक combination मध्ये फोटो काढले व लगेच सर्वांना forward केले.
सर्व देशमुखांच्या घरी आले. सर्वांनी केक खाल्ला. कॉफी झाली. गप्पा झाल्या. आजी भरभरून आजच्या outing चे वर्णन करत होत्या. मधून मधून डोळे पुसत होत्या. अनिता उज्वला आजींना घरी पोहचवून आली.
– – आयुष्यभर लक्षात राहील असा हा दिवस उगवला आणि मावळला.
मी घरी पोचल्यावर आजच्या दिवसभराचे आकलन करत होते. अनिताचे तर खूप कौतुक आहेच.
खरंतर हॉटेलमध्ये जाणे ही एक सर्वसाधारण घटना, पण जेंव्हा त्यात आपुलकीचा ओलावा असतो, तेव्हा तोच प्रसंग अविस्मरणीय ठरतो.
. . . . आज अनेक अदृष्य सकारात्मक घटना घडल्या. देशमुख परिवारात अनिताने आपले विशेष स्थान मिळविले. घरचे सर्व आयुष्याच्या पुढच्या प्रवासासाठी निश्चिंत झाले. सर्वांचे आपापसातील संबंध मजबूत झाले. अनिताने आपल्या लहान बहिणीसमोर एक आदर्श उदाहरण प्रस्तुत केले. माहेर सासर दोघांचा मान ठेवला. असा व्यवहार, संवाद आपुलकी म्हणजे सुखाची गुंतवणूक असते.
– – – मातीतील ओलावा जसा झाडांची मुळे पकडून ठेवतो, तसंच शब्दातील गोडवा, व्यवहारातील आपलेपणा, माणसातील नातं जपून ठेवतो. अशाने नातं बहरत फुलत. नातं घट्ट असलं तर इतर न आवडणाऱ्या लहान सहान गोष्टींकडे आपोआपच दुर्लक्ष होतं … खरं तर सुखी संसाराचा मार्ग अगदी सरळ सोपा असतो. फक्त दुसऱ्यांच्या भावना समजायला थोडी समजदारी असावी लागते.
– — – A family doesn’t need to be perfect. It just needs to be United.
आज अनिताच्या गोड वागणुकीने तिने सर्वांची मने जिंकून घेतली. आजी अनिताचा पाठीवर हात ठेवत म्हणाल्या, •••
आजचे SURPRISE एकदम मस्त. Thank you, v much.
© सुश्री संध्या बेडेकर
पुणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






