सुश्री सुनिता गद्रे
मनमंजुषेतून
☆ देव जेव्हा आजारी पडतो… भाग-२ – लेखक : श्री रवि वालेकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे ☆
(सगळे उत्साहात चाललेले असताना, एक नवा पेच निर्माण होतो!) — इथून पुढे —–
मोकळ्या हवेत, सकाळी सकाळी, विहिरीच्या थंड पाण्याने (ते सुद्धा १०८ हंडे किंवा कलश!) स्नान केल्याने त्याच दिवशी तिघाही भावंडाना ज्वर चढतो! ताप येतो! संपूर्ण शरीर दुखू लागते! बाहेरच्या गार वाऱ्याने ताप अजून चढू नये म्हणून तिघाही भावंडांना सफेद सुती वस्त्र गुंडाळून परत मंदिराच्या आत आणले जाते. मात्र आजारी असल्याने त्यांना परत त्यांच्या मूळ गाभाऱ्यात न नेता अधिक शुश्रूषेसाठी `अनासार घर किंवा अनासार पिंडी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विशिष्ट दालनात नेले जाते. आता बरे होईपर्यंत – म्हणजे पुढचे १५ दिवस) महाप्रभूंचा भाऊ बहिणीबरोबर मुक्काम इथेच!
तातडीने राजवैद्यांना पाचारण केले जाते. भगवंतांना आणि त्यांच्या भावंडांना `आल्या-गेल्या पाहुण्यांचा’ तसेच भक्तमंडळींचा व्यत्यय होऊ नये म्हणून `अनासार घर’ या दालनाबाहेर बांबूच्या चटयांची तात्पुरती भिंत बांधली जाते. अर्थात या तात्पुरत्या भिंतीला एक फट सोडली जाते, ती राजवैद्य आणि `दैत्यपती’ या आदिवासी समूहातील काही विशिष्ट व्यक्तींच्या जाण्या-येण्यासाठी. हे `दैत्यपती’ भगवंतांना बरे वाटावे म्हणून काहीतरी गुप्त विधी करत असतात! इतर कोणालाही `अनासार घरा’त १५ दिवस प्रवेश नाही! पुजाऱ्यांना सुद्धा नाही! या १५ दिवसांच्या `महाप्रभूंच्या `आजारपणाच्या’ कालखंडाला `अनासार पर्व’ असे संबोधतात.
उपचार सुरु होतात. बाहेर भक्तमंडळींमध्ये चलबिचल चालू असते! त्यांच्या समाधानासाठी राजवैद्य दररोज सायंकाळी मंदिराच्या पायऱ्यांवरून तब्येतीची खुशाली कळवत असतात. हे म्हणजे आपल्याकडे पत्रकारांसाठी VIP लोकांचे ‘Medical Bulletin’ असते, तसे झाले!
मी मागची दोन वर्षे हे अनुभवलेय. भक्तमंडळी अतिशय उत्सुकतेने राजवैद्यांची वाट बघत असतात. राजवैद्य ओडिया भाषेत काहीतरी बोलतात, आणि भक्तांच्या उत्साहाला उधाण येते. आरत्या सुरू होतात, काही जण अगदी ढोल वगैरे घेऊन येतात! खरे तर ते राजवैद्य वर्षानुवर्षे तेच तेच सांगत असतात! ते तरी नवीन काय सांगणार? `आज देवांच्या तब्येतीत चांगली सुधारणा जाणवली’ असे सांगितले की इकडे ढोल ताशे सुरु! काय तो जयघोष, काय तो जयजयकार! मंदिरात, मंदिराच्या आवारात, आवाराबाहेर फक्त आणि फक्त ‘जोय जगन्नाथ, ज्योय जगन्नाथ’ एवढेच ऐकू येते!
त्या लाकडी मूर्तींमध्ये देव आहे, हा प्रचंड विश्वास! इतका की आपण घरच्या मंडळींना आजार असताना कसे सुरुवातीचे काही दिवस जड अन्न देत नाही, तसेच इथेही. पहिले चार दिवस जगन्नाथांना `अनासार पाना’ नामक गोड दुधाचे द्रव्य (पंचामृत सदृश्य) दिले जाते! दुसरा काही घन-स्वरूप प्रसाद दिला आणि अपचन झाले तर काय घ्या? चार दिवस झाले की पाचव्या दिवशी देवांच्या अंगाला `फुलेरी तेला’ने मसाज केला जातो! तिळाच्या तेलात सुगंधी द्रव्ये, औषधी मुळ्या वगैरे टाकून या `फुलारी तेला’चे बुधले एक वर्ष आधीच जमिनीत पुरलेले असतात! (पुढच्या वर्षीसाठी – २०२६ साठी – हे `फुलेरी तेला’चे बुधले जमिनीत पुरण्याचा कार्यक्रम मागच्याच आठवड्यात इकडे झाला). वर्षभर जमिनीखाली ठेवल्याने तिळाच्या तेलातील औषधी मुळ्या व्यवस्थित मुरतात. त्यातले सगळे सत्व तेलात उतरले की मगच ते तेल वापरायचे! देवाच्या तब्येतीची एवढी काळजी, की एकदा (पाचव्या दिवसापासून) देवांना थोडे थोडे बरे वाटायला सुरुवात झाल्यानंतर त्यांना इतर काही प्रसाद अर्पण करण्याऐवजी, `दशमूला मोदकां’चा भोग चढवतात! या `मोदका’त दहा वेगवेगळ्या औषधी वनस्पतींची मुळे सुकवून केलेली भुकटी, इतर काही आयुर्वैदिक औषधे, मध, साखर, दूध आणि बरेच पौष्टिक पदार्थ असतात. राजवैद्य स्वतःच्या हाताने हा `मोदक’ बनवतात. हे मोदक बनवण्याचा वंशपरंपरागत अधिकार राजवैद्यांचा असतो! असा दररोज १२० `मोदकांचा’ प्रसाद भगवंतांना अर्पण केला जातो. या `पौष्टिक, स्वादिष्ट आणि औषधी मोदका’ मुळे महाप्रभु आणि त्यांच्या भावंडांची तब्येत झपाट्याने सुधारू लागते. उपचार सुरु झाल्यानंतर खरेतर १२ व्या दिवशीच जगन्नाथाची तब्येत सुधारते, पण डॉक्टरी धर्माला जागून राजवैद्य अजून २-३ दिवस आराम करण्यास सांगतात! ‘घरी जायची घाई करू नका. अजून थोड्या टेस्ट करू आणि दोन तिन दिवसांनी डिस्चार्जचे बघू! ‘
१३व्या दिवशी राजाला सांगावा धाडला जातो आणि कळवले जाते की महाप्रभू, बलभद्र आणि सुभद्रा यांची तब्येत ठणठणीत झाली आहे. पुरीचे महाराज तब्येतीची हालचाल विचारण्यासाठी मंदिराला भेट देतात. आजचा प्रसाद खास महाराजांतर्फे असतो!
स्वतंत्र दालन, ते १५ दिवस सगळ्यांपासून अलग ठेवणे (कोवीडची आठवण येते ना?), औषधांचा मारा, तेलाने मालिश, औषधी मोदक …. हे सगळे कशासाठी? तर एका लाकडी मूर्तीसाठी! हा विचार आपल्यासारख्या (परक्या) लोकांच्या डोक्यात येतो, पण ओडिया लोक त्याला जुमानत नाहीत. बरं, हे कोणा ओडिया व्यक्तीला सांगायला गेलो, तरी तो चिडत नाही. `असे बोलण्यास भगवान जगन्नाथच तुला उद्युक्त करत आहेत’ असा सरळ साधा युक्तिवाद करतात! विषयच बंद!
देवाला किती माणसात आणलेय यांनी! देव हा देव आहेच, पण त्याला मानवाप्रमाणे भाव भावना, पीडा, दुःख, आजारपण आहे, हे अगदी आतपर्यंत झिरपले आहे. हा देव भामटेपणा करतो, बायकोला न कळवता बहिण आणि भावाला घेऊन गुपचुप ट्रिपला जातो, बायकोला (लक्ष्मी) हे कळल्यानंतर तिची माफी मागतो, गयावया करतो..
सगळे काही सर्वसामान्य माणसासारखे. ट्रिप वरून परतताना ‘माय मरो, मावशी जगो’ म्हणत मिठाई खाण्यासाठी मावशीच्या घरी एक दिवस मुक्काम ठोकतो, घरी परतल्यानंतर, घरात पाय ठेवण्याआधी बायकोचा रूसवा काढण्यासाठी तिला गोडधोड खाऊ घालतो! सगळी गंमतच आहे!
दोन वर्षांपूर्वी याच `अनासार पर्व’ असतानाच्या काळात मी मित्रांसह जगन्नाथाच्या मंदिरात गेलो होतो. बाहेर आवारात घोळक्याने काही आदिवासी बायका रडत होत्या, ओडिया भाषेत काही ओरडत होत्या. काहीतरी अघटीत घडले की काय अशा शंकेने मी माझ्या एका ओडिया मित्राला विचारले. त्याने जे सांगितले, ते ऐकून मी थक्कच झालो! त्या ज्या बोलत होत्या त्याचे त्याने जे भाषांतर केले, त्याचा मतितार्थ, `माझा ग सोन्या, माझा ग बबड्या, कधी बरा होणार रे तू? ’ असा होता! जगन्नाथ आजारी पडले, म्हणून त्या रडत होत्या! जणू जगन्नाथ त्यांचं बाळ होता! आता याला काय म्हणावे? रथयात्रा सुरु व्हायच्या आदल्या दिवशी भगवान खडखडीत बरे होऊन सगळ्यांना दर्शन देतात, हा वर्षानुवर्षे काय, शतकानुशतके चाललेला प्रघात आहे. सगळ्या जगाला हे माहिती आहे, तरी एवढे दुःख?
`काही वाईट झाले तर जगन्नाथाने आपल्याला आपल्या अपकृत्यांची शिक्षा दिलीय आणि काही चांगले झाले, तर जगन्नाथाने कृपा केलीय’ एवढ्या साध्या विचाराने जगन्नाथाचे भक्त जगन्नाथाशी तादात्म्य पावलेत, एकरूप झालेत. जगन्नाथाला ते देवस्वरूप मानतातच, पण कुटुंबातील एक घटकही मानतात! जगन्नाथ मंदिराच्या आवारात फिरताना बरेच (फुटकळ) पुजारी आपणास भेटतात. जगन्नाथाचे थेट जवळून दर्शन करून देतो सांगून भोळ्या भाविकांकडून पाचशे रुपये उकळतात. या व्यतिरिक्त देवाच्या अंगावरची फुलांची माळ वा एखादे फुल, कळसावरील झेंडा (इथे दररोज शेकडो झेंडे मंदिरावर चढवतात. कळसावरील मुख्य ध्वज वेगळा.) शास्त्रोक्त पूजा, जगन्नाथाच्या पायाजवळील ओरिजनल’ प्रसाद याचे वेगवेगळे चार्ज असतात! यात अजून एक (सशुल्क) सेवा असते, ती म्हणजे, देवाला आपले गाऱ्हाणे कळवणे! तो भामटा पुजारी आपण तुमचे गाऱ्हाणे देवाला रात्री नक्की ऐकवू, असे सांगून शंभर रुपये खिशात टाकतो. मला आश्चर्य वाटते, की हा धडधडीत खोटेपणा लोकांच्या लक्षात कसा येत नाही? असे असूनही थोडा कानोसा घेतला, तर आवारात बरेच लोक अशा भामट्या पुजाऱ्यांना आपले घराचे गाऱ्हाणे, अडचणी, त्रास, दुःख सांगताना दिसतील. किती तो विश्वास!
शेवटी, भक्तीचा मूळ पायाच विश्वास आहे.
नाही का?
……. जोय जगन्नाथ!
– समाप्त –
लेखक : श्री रवी वाळेकर
प्रस्तुती : सुश्री सुनिता गद्रे
माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






