सुश्री नीता कुलकर्णी
विविधा
☆ “आपला धर्म आणि संस्कृती…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆
आपली खाद्यसंस्कृती हा माझा लेख तुम्ही वाचला आहेत. खाद्य बरोबर संस्कृती हा शब्द मी वापरला आहे.
संस्कृती म्हणजे काय तर..
आपल्या श्रद्धा, मूल्य, ज्ञान रीतीरीवाज, यांनी परिपूर्ण अशी आपली जगण्याची पद्धत.
ती अनेक वर्षाच्या अभ्यासानंतर निर्माण होते. त्याचा सर्वांगीण विचार आपल्या पूर्वजांनी केला आहे.
तदनुसार ऋतुमान आणि शरीर शास्त्राचा अभ्यास करून त्यांनी हे पदार्थ ठरवले आहेत. दैनंदिन आहारात बदल करून ते पदार्थ केले जातात. ते त्या वेळी आपल्या पोटात जाणे हे आपल्या आरोग्यासाठी हितकारक आहे.
” आरोग्यम् धनसंपदा “
हे कितीतरी वर्षांपूर्वीच आपल्याला सांगून ठेवलेल आहे. निरामय आरोग्यासाठी हा आहार आहे.
आपल्या धर्मात अनेक सणंवारं, व्रतवैकल्य, नेम, प्रथा आहेत. आपला धर्म हा मानसिक, शारीरिक आणि आरोग्य शास्त्र जपणारा असा आहे. त्याची एक चौकट पूर्वजांनी घालून दिलेली आहे.
गंमत अशी आहे की ती चौकट त्रासदायक न वाटता आनंदी कशी होईल याचाही विचार त्यांनी केलेला आहे. त्यामुळे लक्षात येते की त्या दिवशी का होईना आपण दुःख बाजूला ठेऊन सण साजरा करतो.
म्हणूनच इतकी शतकें झाली तरी आपला घर्म अबाधित आहे.. आता तर उलट इतरांना त्यापासून प्रेरणा मिळत आहे.
काही सण आपण आपल्या कुटुंबात साजरे करतो शिवाय सार्वजनिक पण करतो. त्यातून एक प्रकारचे समाज प्रबोधन होत आहे. एक लक्षात ठेवायचे की त्यातला मूळ गाभा, त्याचा अर्थ समजून घेऊन आपण विवेकानी सण साजरे केले पाहिजेत.
गाय, वासरू, बैल, नाग, गरुड, यांची पूजा करून आपण सर्वांचा मान राखतो. त्यांच्याबद्दल कृतज्ञ असतो. तो कृतीतून व्यक्त करतो.
वनस्पती शास्त्राचा अभ्यास पूर्वजांनी केलेला होता. त्यामुळे दाराशी तुळस लावली जाते. वडाच्या झाडाची पूजा केली जाते. बेलाचे पान देवाला वाहिले जाते. त्यांचे उपयोगी गुण आपल्याला माहीतच आहेत. यातूनच वृक्ष संवर्धन होते. वृक्ष जोपासले जात आहेत.
हळदी कुंकू हे कुटुंब, नातेवाईक आणि त्याच्याबरोबरच समाज एकत्र बांधून ठेवण्यासाठी केलेली सुंदर प्रथा आहे. त्यामुळे आपापसात माया, प्रेम व स्नेहबंध निर्माण होतात. आसपासच्या लोकांच्या ओळखी होतात. वेळप्रसंगी मदतीला हेच लोक धावून येतात. आपला एकोपा वाढवण्यासाठी ही प्रथा आपण चालू ठेऊ. सध्याच्या परिस्थितीत याची फार गरज आहे.
श्लोक, आरत्या, प्रार्थना यामुळे पाठांतराची सवय होते. टाळ आणि घंटा आरती करताना वाजवली तर त्याचा नाद जोश निर्माण करतो. वातावरणात सकारात्मक लहरी उमटतात. घरात अल्हाददायक असे वातावरण तयार होते. ती ऊर्जा आणि शक्ती खरोखर जाणवते.
सहजपणे आपण म्हणतो
” किती छान वाटले आज “
तीच ही अंतरंगाला जाणवणारी शक्ती…
आरती झाली की प्रसाद येतो. प्रसाद आणि नैवेद्य या संकल्पनेमुळे संयम बाळगायला हवा हे लहानपणापासून आपोआप शिकले जाते. आरती नंतर प्रसाद मिळणार हे माहीत असते. त्यामुळे समोर लाडू, पेढे असले तरी लहान मुलं त्याला हात लावत नाहीत.
हेच नकळत होणारे संस्कार आहेत.
खरंतर खूप गोष्टींबद्दल लिहिता येईल. पण लेख मोठा होईल म्हणून लिहीत नाही.
तुम्ही सुज्ञ आहात.. तुमचा तुम्ही विचार करून समजून घेताल हे मला माहित आहे.
असा हा पावित्र्य, मांगल्य जपणारा आपल्या संस्कृतीचा अमूल्य ठेवा आपण होईल तितका जतन करू.
त्याचे महत्त्व पुढच्या पिढीला सांगू.
☆
© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी
पुणे
मो 9763631255
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





