सुश्री वर्षा बालगोपाल
इंद्रधनुष्य
☆ “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे…” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे…
… आणि तो मी मिळवणारच !!
स्वातंत्र्य पूर्वीचा काळ… ब्रिटिश महासत्ता यांचे साम्राज्य… अशावेळी चाललेला स्वातंत्र लढा… त्याचवेळी कायद्याचा अभ्यास करून त्याच्या जोरावर अनेक सभा गाजवणारे बाळ गंगाधर टिळक… जन समान्यांचे मन जिंकणारे त्यांचे प्रभूत्व आणि त्याच जोरावर मिळालेली लोकमान्य ही पदवी किंवा मिळालेला किताब…
१९१६ चा झालेला स्वातंत्र्याचा महासंग्राम आणि त्याचवेळी लखनौ येथील परिषदेत काढलेले हे धीरोदगार
“ स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे.. आणि तो मी मिळवणारच.”
हेच वाक्य घेऊन नंतर स्वातंत्र्य लढ्याची पुढील वाटचाल सुरु झाली. जणू स्वातंत्र्याच्या काटेरी वाटेवर या वाक्याच्या मखमली पायघड्या त्यांनी अंथरल्या होत्या.
काय नाहीये या वाक्यात? या वाक्यात खच्चून भरलेली खंबीरता आहे. एक ठोस मागणी आहे. एक दृढ निश्चय आहे. एक धमकावणी आहे. एक आत्मविश्वास आहे. एक ध्येयासक्ती आहे. एक नेतृत्व आहे. एक परखडपणा आहे. एक स्वप्न आहे. एक दिलेली मोठी समज आहे….
अशा कितीतरी भावनांची ज्योत करून लावलेली एक धगधगती मशाल म्हणजे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळणारच हे उद्गार.
एवढ्या सगळ्या भावनांनी भरलेले हे उद्गार काढण्यासाठी टिळकांना आधी स्वराज्य या शब्दासाठी पण मोठा झगडा करावा लागला होता. स्वराज्य ही संकल्पना शिवाजी महाराजांना स्मरून त्यांनी रुजवली असल्याचे सांगितले जाते. पण स्वराज्य म्हणजे काय हे स्पष्ट करताना बेळगावहून सातारा व वाई येथे कार्यक्रम करीत टिळक अहमदनगर शहरात दाखल झाले. तेथे ३१ मे आणि १ जून या दिवशी भरवलेल्या सभांमधून त्यांनी ‘स्वराज्या’ची भूमिका स्पष्ट केली. आपला इंग्लंडमधील राजसत्तेला मुळीच विरोध नसून या राजसत्तेच्या भारतातील नोकरांना विरोध असल्याचे ते सांगू लागले. ब्रिटिशांची मूळ सत्ता म्हणजे मूळ धनी चांगला असून त्याला आपला पाठिंबाच आहे, पण त्याच्या इथल्या कोठावळ्यांना विरोध केला पाहिजे. त्यांच्याऐवजी आमचा कारभार आम्ही करणे म्हणजे स्वराज्य. यात ब्रिटिश सत्तेला विरोधाचा प्रश्न येतोच कोठे? आपल्या सर्व समस्यांचे उत्तर स्वराज्य हे आहे. स्वराज्य ही गुरुकिल्लीच आहे. असा युक्तिवाद करून त्यांनी स्वराज्य ही संकल्पना ब्रिटिशांच्याही गळी उतरवली होती आणि स्वराज्यासाठी मान्यता मिळवली होती.
जन्मसिद्ध अधिकार म्हणजे काय? ते कोणते? ते कसे असायला हवेत याचा कायदेशीर अभ्यास करून अत्यंत परखड भूमिका घेत ठणकावून हे उद्गार काढले होते.
जन्मसिद्ध अधिकार म्हणजे जन्मत: मिळालेले अधिकार असे नसून वारसा हक्काने मिळालेले अधिकार आहे हा सूक्ष्म भेद पण त्यांनी जाणला होता. जसे कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या निधनानंतर काही अधिकार फक्त मोठ्या मुलालाच मिळतात, काही गोष्टी करण्याचे स्वातंत्र्य फक्त मुलांनाच दिलेले असते तसे काहीसे आहे असे सांगून ब्रिटिश लोकांना मोठ्या चतुराईने फसवले होते. परंतु त्यात निव्वळ देशभक्ती होती. त्यात त्यांचा वैयक्तिक फायदा नव्हता. म्हणूनच या वाक्याने दाखवलेली दिशा ही स्वातंत्र्य मंदिराकडे जाणाऱ्या पहिल्या पायरीवरील शिळा ठरली.
म्हणूनच आजच्या काळातही जेथे जेथे अन्याय दिसत आहे, जेथे जेथे आपल्या देशाची अभिमानता दाखवून द्यायची गरज आहे तेव्हा तेव्हा हेच उद्गार नाही काढले तरी तशी आग्रही भूमिका घेऊन.. तशीच परखडता ठेऊन.. तेवढाच खंबीरपणा दाखवून आपले म्हणणे सांगता आले पाहिजे. तो करारीपणा.. तो निग्रहीबाणा प्रत्येकाने अंगीकारला पाहिजे.
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





