श्री सुनीत मुळे
मनमंजुषेतून
☆ लक्षणं जिवंतपणाची. लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
कोणी पोरं क्रिकेट खेळताना दिसली की एक तरी ओव्हर खेळावीशी वाटते….
घरी जाताना टीव्हीच्या दुकानासमोर गर्दी दिसली तर रस्त्यावर थांबून चार बॉल मॅच बघावीशी वाटते….
ग्राउंडवर मॅच दिसली की बॅटला बॉल लागल्यावरचा आवाज ऐकावासा वाटतो…
रिक्षाचा पोंगा दिसला की वाजवावासा वाटतो…
वडाच्या पारंब्या दिसल्या की झोका घ्यावासा वाटतो…
चिंचेचं झाड दिसलं की एक तरी बुटुक हाताला येतं का बघावंस वाटतं…
लगडलेल्या कैऱ्या दिसल्या की दगड मारावासा वाटतो…
पाण्याचं तळं दिसलं की चपट्या दगडाने भाकऱ्या पाडाव्याश्या वाटतात…
मित्र भेटले की कोणाचा इन केलेला शर्ट मागून बाहेर काढावासा वाटतो…
कोणी खुर्चीवर बसायच्या आधी ती खुर्ची ओढावीशी वाटते…
मैत्रीणीला झुरळाची नायतर पालीची भीती दाखवायला आवडतं….
फ्रुटी पिऊन झाली तरी त्यातून शेवटचा थेंब येईपर्यंत फूड-फूड आवाज काढवासा वाटतो…
रिकामी प्लास्टिक ची पिशवी फुगवून अचानक कोणाच्यातरी मागे फोडावीशी वाटते….
वाढदिवस साजरा झाल्यावर फुगे उंच उडवावेसे वाटतात…
तेच फुगे नंतर फोडावेसे वाटतात…
जिन्याचा लाकडी कठडा दिसला की त्यावरून घसरावसं वाटतं….
शेजारची बेल मारून पळून जावसं वाटतं…
एखाद्या गाडीच्या टायरमधली हवा काढायचं नाटक, तोंडानी सुसुसू आवाज काढवासा वाटतो…
मॉल मधल्या ट्रॉलीची गाडी गाडी करावीशी वाटते…..
रिकामा फळा दिसला की त्यावर डोंगर, नदी, नारळाचं झाड, घर, पक्षी काढावेसे वाटतात….
गेलेले दिवे आल्यावर, मेणबत्ती सगळ्यात आधी विझवावीशी वाटते….
पेट्रोलचा, स्पिरिटचा वास छान वाटतो….
सोसायटीत कोणी सायकल चालवताना दिसलं की वाढलेल्या वजनासह एक तरी राउंड मारावीशी वाटते….
पहिल्या पावसानंतर गाडीवरचा वडापाव खावासा वाटतो….
रात्री काहीही कारण नसताना, भूक लागते आणि फडताळातले डबे ढुंडाळून क्रीम बिस्कीट खावंसं वाटतं, नायतर फ्रिजमधली चॉकलेट खावीशी वाटतात…. वेफर्सचा, फरसाणाचा डबा फस्त होतो…
मलई बर्फी, गुलाबजाम, जिलबी आणि असे गोड काही दिसले की ज्याचं एकावर समाधान होत नाही…. पैज लावून खावंसं वाटतं…
मोगरा, जुईचा गजरा दिसला की घ्यावासा वाटतो… घमघमाट मनात थेट पोहोचतो….
बिजेची कोर आकाशात दिसली तर रस्त्यात थांबून झूम करून फोटो काढवासा वाटतो….
ट्रीपला जाताना जुनी मराठी गाणी ऐकावीशी वाटतात….
कोकणात एक छोटं घर हवं असं वाटतं….
आणि
श्यामची आई सिनेमा बघताना आजही डोळ्यात पाणी येतं….
वाढणारं वय हा केवळ एक आकडा आहे…. नुसता श्वास चालतोय म्हणून माणूस जिवंत नसतो…. हे ज्यांना वाटतं, असंच करावंसं वाटतं, त्यांची जिवंतपणाची लक्षणं यापेक्षा वेगळी नसतात….
खरं ना!!!
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती – श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






