सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ पाहुणा… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

कधीकधी घराच्या दारावर, खिडकीवर कावळा ‘काव – काव’ करत सतत ओरडत असतो, तेव्हा घरातली माणसं म्हणतात, ‘कावळा ओरडतोय, आज कोण पाहुणे येणार आहे कोण जाणे!’

पाहुणा येण्याचा तो एक संकेत मानला जात असे. पाहुणा, पाहुणचार हे मराठीतील शब्द आपल्याला परिचित असे आहेत.. कायमचा न राहणारा असा तो पाहुणा!

त्यावरून मला मी पूर्वी आकुर्डीला मुलांना घेऊन माहेरी जात असे, तेव्हाची गोष्ट आठवते. माझ्या भावाची मुले आणि माझी मुले वयाने जवळपास सारखीच होती. एकत्र खेळत असत, तशीच सतत भांडतही असत छोट्या छोट्या गोष्टींसाठी! त्यांची भांडणे, रडा रडी होत असे. तेव्हा माझे वडील समजून घालायचे. तिथल्या नातवंडांना सांगायचे, ‘अरे दे त्याला तो मागतोय तो खेळ, चार दिवसांसाठी पाहुणा आलाय ना तो!’असा हा पाहुणा काही का राहून परत आपल्या घरी जाणार हे ठरलेलं असायचं! 

‘पाहुणा’ शब्द आणखी एका संदर्भात मला आठवतो. पावसाळ्याच्या दिवसात दुपारनंतर पाऊस सुरू झाला की, ‘माझा सासुबाई म्हणायच्या की, आता हा संध्याकाळचा पाव्हणा आलाय, आता कुठला तो थांबतो!’ म्हणजे हा पाऊस आता रात्रभर पडणारच अशी त्यांना खात्री असायची! 

लग्न होऊन मुलगी सासरी गेली की माहेरच्या घरात ती पाहुणी होते! ती जेव्हा माहेरी येते, तेव्हा तिच्या लक्षात येतं की, आपली खोली, आपलं कपाट, किंवा वस्तू आता इतरांनी व्यापलेला आहेत! आपण इथे पाहुणे आहोत माहेरी! चार दिवस माहेरच्या माणसांबरोबर राहून पुन्हा तिला सासरच्या घराची ओढ लागत असते..

पूर्वीच्या काळी मुली लग्नाच्या वेळी लहान असत.. त्यामुळे विविध कारणांनी मुलीला माहेरी बोलावले जाई. हळूहळू मुलगी मोठी होई आणि सासरच्या घरात रूळून जाई! ही परंपरागत रीत! बहिणाबाई चौधरी आपल्या गीतात सांगतात, ‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते!’

लग्नाच्या वेळी दुसऱ्या घराला नवीन असलेली ती मुलगी काही वर्षातच ते ‘आपलं घर’ मानायला लागते! आणि तिथे पाहुणी राहत नाही..

आपल्याकडे बरेचसे सणवार साजरे करताना ‘पाहुणे’ म्हणून देवही येतात! भाद्रपदात गणपती पाहुणा म्हणून येतो. तो कुठे दीड दिवस, कुठे पाच दिवस, सात दिवस तर कुठे दहा दिवस, अनंत चतुर्दशी पर्यंत तो रहातो.. तेव्हा आपल्या मनात गणपतीचा पाहुणचार ही भावना असते.

आपण गणपतीसाठी आरास करतो, त्याला मखरात बसवतो, गोडधोड खायला घालतो आणि त्याचे कौतुक करतो. गणपती पाठो पाठ त्याच्या बहिण रुपात गौरी पाहुणी येते. तिलाही आपण जेऊ खाऊ घालतो आणि मगच गणपती- गौरीचे विसर्जन करतो. हे पाहुणे आपल्याला आनंद देतात. ‘ गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असे सांगून आपण गणपती- गौरींना निरोप देतो.

‘पाहुणी आली माझ्या घरी, अंबिका माया जगदीश्वरी’ या गीताने आपण नवरात्रात देवीचे स्वागत करतो. नऊ दिवस देवी विविध रूपात आपल्याकडे पाहुणी म्हणून येते. आपण देवीला सजवतो, तिची विविध रूपे उभी करून तिच्या दर्शनाचा, अस्तित्वाचा आनंद घेतो.. अशी ही देवी नवरात्राची पाहुणी असते! नेहमीप्रमाणे हे सर्व लिहिताना मला जाणवते की, हिंदू संस्कृतीतील प्रत्येक सण हा आपल्याला नवीन काही शिकवतो. ‘ अतिथी देवो भव’ हे तर आपण घरातच शिकतो. असे हे देवस्वरूप मोठे पाहुणे माझ्या मनामध्ये आठवले!

काळ जसा बदलत गेला तशी ” पाहुणा ” शब्दाची संकल्पना ही बदलत गेली. आपल्या घराच्या चौकटीत राहणाऱ्या आधुनिक समाजाला पाहुणा म्हणजे काहीशी अडचणच वाटू लागली. एकत्र कुटुंब पद्धती बऱ्याच कारणाने कमी होत गेली. विभक्त कुटुंबाला पाहुणचार करायला ही वेळ नाही अशी स्थिती होत गेली. कारणे काहीही असोत, घर लहान असेल, घरातील दोन्ही व्यक्ती नोकरी करत असतील किंवा इतरही आर्थिक कारणे असतील तर पाहुणा हा नको वाटतो. आवर्जून लोकांना बोलावणे कमी झाले आहे, संपले नाहीये!

………

आत्ता पाहुणा हा विषय माझ्या मनात डोकावला तो माझ्या लेकीकडे दुबईला येण्याने! इथे आल्यापासून मुलगी, जावई नातवंडे सतत आजीची चौकशी करतात ती ‘कम्फर्टेबल’ आहे ना म्हणून !माझी काळजी घेतात. मी महिनाभरासाठी इथे आले आहे, त्यामुळे माझ्या नातीने आपल्या कपाटातील दोन कप्पे आजीला तिचे कपडे, सामान ठेवण्यासाठी रिकामे करून दिले तर नातवाने आजीला सगळं मिळतंय ना, याची चौकशी केली! रोज संध्याकाळी आजीला घेऊन चक्कर मारून आणायचे काम दोन्ही नातवंडांनी स्वखुशीने स्वीकारले! अशावेळी वाटतं माझ्यासारखी भाग्यवान मीच! इतका छान पाहुणचार मिळतोय आपल्याला!!

“पाहुणा” हा शब्द आपण वेगवेगळ्या ठिकाणी वापरतो. एखाद्या कार्यक्रमासाठी आपण जेव्हा प्रतिष्ठित व्यक्तींना निमंत्रित करतो, तेव्हा त्यांना “पाहुणे” म्हणून योग्य तो सन्मान दिला पाहिजे, स्वागत केले पाहिजे.. तेव्हाच त्या पाहुण्यांनाही आनंद वाटेल! पाहुणचार घेतानाही तो आपल्याला दिलेला सन्मान आहे, याचे भान ठेवून, आपण पाहुणा या पदाला योग्य असे वागले पाहिजे हेही पाहुण्याचे कर्तव्यच असते!

 निसर्गामध्ये ही विविध प्रकारचे ‘पाहुणे’ हजेरी लावत असतात. काही वनस्पती ठराविक काळातच येतात आणि जातात, जसे पांढरे शुभ्र ब्रह्मकमळ ठराविक दिवसातच येते आणि ते रात्री पुरतेच राहते! पक्षी सुद्धा पाहुणे म्हणून एका देशातून दुसऱ्या देशात ‘पाहुणे’ म्हणून येतात. उत्तरेकडची थंडी सोसत नाही म्हणून खूप दूरचा प्रवास करून इग्रेट्स, कॉर्मोनंट्स् सारखे पक्षी पाहुणे म्हणून येतात. थंड वातावरणात असणारे पेंग्विन सारखे पक्षी गरम देशात कृत्रिम रित्या बर्फ निर्माण करून तिथे पाळतात पण ते पाहुणे काही काळापुरतेच असतात.

पक्षी, प्राणी आणि आपण सुद्धा या जगात ‘पाहुणे’ म्हणूनच आलो आहोत, ही जाणीव माणसाने कायम मनात ठेवली पाहिजे. प्रत्येकाला वाटते की या पृथ्वीतलावर आपण कायमचेच राहायला आलो आहोत! पण देहाची नश्वरता लक्षात आली की जाणवते, आपण तर इथे पाहुण्यासारखेच आहोत! जेव्हा केव्हा परमेश्वराचे बोलावणे येईल तेव्हा हा देह सोडून आपल्याला परत जायचे आहे! त्यामुळे मानव रुपात असताना आपण चांगले राहिले पाहिजे. निसर्गाचा, पर्यावरणाचा ऱ्हास होईल अशी कृती न करता निसर्गाला त्याचे अस्तित्व टिकवून ठेवायला मदत केली पाहिजे! परमेश्वराच्या कृपेने आपल्याला मानव जन्म मिळाला आहे त्या परमेश्वराचे आपण ऋणी राहिले पाहिजे. हे जग मानवाने व्यापले आहे. आपल्या प्रमाणेच सर्व प्राणी, पशुपक्षी आणि निसर्ग या पृथ्वीचे भागीदार आहेत. सजीवांचे संवर्धन, संगोपन या निसर्गातच होत असते. या पृथ्वीतलावर राहताना ‘हे जग आपल्याला कधीतरी सोडून जायचे आहे याची जाणीव ठेवली पाहिजे. आपण जन्माबरोबरच मृत्यूला घेऊन येत असतो. मृत्यू म्हणजे विनाश नाही तर जिवाचे स्थित्यंतर आहे असे प्रत्यक्ष भगवान कृष्णाने सांगितले आहे. एक वस्त्र टाकून दुसरे वस्त्र परिधान करतो त्याप्रमाणे जीव दुसऱ्या रूपात प्रकटतो हे कृष्णाने अर्जुनाला सांगितले, त्याचाच अर्थ असा केला या पृथ्वीवर आपण ‘पाहुणे’ म्हणूनच येतो…. आणि त्याला कधीतरी ” परतीचा प्रवास” हा असतोच!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
4 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
सौ.ज्योती कुळकर्णी, अकोला.
0

उज्ज्वला ताई खरंच खूप सुंदर लिहिता तुम्ही .